अकोल्यात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांविरुद्ध ‘बौद्धां’चे बंडाचे निशाण
पडघम - राज्यकारण
संजीवनी जाधव
  • अकोला जिल्हा आणि अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
  • Sat , 09 October 2021
  • पडघम राज्यकारण अकोला Akola प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar भारिप भारतीय रिपब्लिकन पक्ष वंचित बहुजन आघाडी Vanchit Bahujan Aaghadi

अकोला जिल्हा म्हणजे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची राजकीय प्रयोगशाळा. अनेक धक्कादायक राजकीय निर्णय घेण्यात आंबेडकर निष्णात आहेत. १९८०पासून त्यांनी या जिल्ह्यातील बौद्ध मतदार जोडून घेतला आणि त्याला बहुजन समाजाचे कोंदण दिले. त्यामुळे राजकीय दरारा आणि मर्यादित राजकीय यश त्यांना आणि त्यांच्या पक्षाला प्राप्त झाले. धक्कातंत्र या धोकादायक तंत्राचा वापर आणि जिल्ह्यात हद्दपार केलेले बौद्ध नेतृत्व यामुळे अकोला जिल्ह्यात बौद्ध समाजाने बंडाचे यशस्वी निशाण फडकावले आहे. एकेकाळी बौद्ध हे भारिपशिवाय कुठेही जात नसत. हे चित्र वेगाने बदलले आहे. आंबेडकरांचा गड असलेल्या वस्तीमध्ये भाजपात जाऊन नगरसेवक होणे आणि अपक्ष बौद्ध जिल्हा परिषद सदस्य विधानसभेला राखीव असलेल्या मूर्तिझापूर मतदारसंघातून पक्षाच्या विरुद्ध निवडून आला आहे. या घटना लहान वाटत असल्या तरी त्यांचे उपद्रवमूल्य मोठे आहे.

अकोल्यात आंबेडकरांची जादू ओसरत असल्याचे चिन्हे आहे. पक्षात मराठा आणि कुणबी समाजाचे वाढलेले प्रस्थ, तसेच स्थानिक बौद्ध नेतृत्व पद्धतशीरपणे संपवल्याने बौद्ध मतदार सैरभैर असून नेतृत्वाला जुमानेसा झाला आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

आंबेडकरांकडे नेते टिकत का नाही, याचे उत्तर ते कधीच देत नाहीत. आंबेडकर समर्थक ‘गेला तो बेईमान’ असा शिक्का मारून मोकळे होतात. ‘आत्मचिंतन’ हा प्रकार भारिपवाल्यांना (नव्या वंचितच्या) लागू नाही. मी इतिहासात फार रमत नाही, असे आंबेडकर सांगतात! त्यांचे समर्थक भावनिक राजकारणातून यातून बाहेर यायला तयार नाहीत. नवनवीन प्रयोगांमध्ये आंबेडकरांनी कायम जिल्ह्यातील बौद्ध नेतृत्व घरी बसवले आहे.

त्याची सुरुवात होते ती लंकेश्वर यांच्यापासून. पुढे बी. आर. सिरसाठ यांनी केलेल्या बंडखोरीमुळे अकोल्यात दुहीची बीजे रोवली गेली. अनेक वर्षे नगरसेवक असलेले सुनील मेश्राम, श्रवण इंगळे, दिलीप तायडे, किशोर मानवतकरसारखे प्रभावी नेते घरी बसवले. अकोल्याच्या पहिल्या बौद्ध महापौर जोत्स्ना गवई यांचे पती महापौरपदाची कारकीर्द बाकी असताना राष्ट्रवादीच्या विजय देशमुख यांच्यासोबत गेले. देवराव अहिर, सिद्धार्थ वरोठे, श्रवण इंगळे, विशाल जगताप हे एकेकाळी पक्षाचे पदाधिकारी होते. त्यांनी मनपा निवडणुकीत बंडाचा झेंडा हाती घेतला. त्यामध्ये देवराव अहिर, सिद्धार्थ वरोठे, श्रवण इंगळे आणि जगताप यांच्या अर्धांगिनी आणि मुले थेट भाजपातून निवडून आले.

त्याशिवाय आणखी दोन बौद्ध खंदारे आणि काळे नगरसेवक झाले. भारिपचा एकही बौद्ध नगरसेवक निवडून आला नाही. भारिपचे निवडून आलेले नगरसेवक मराठा, ब्राह्मण आणि तेली आहेत.

२००४मध्ये लोकसभेत आंबेडकर लोकसभेत पराभूत झाले. त्या वेळी पक्षात असलेली बौद्ध पदाधिकारी यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला. अनेकांचे राजकीय जीवन अकाली संपवण्यात आले. जुने-जाणते नेते डी. एन. खंडारे, दिलीप तायडे, भाई भोजने, पुष्पलता इंगळे, सिद्धार्थ वानखडे, अशोक गायकवाड, प्रधान गुरुजी, मनोहर खंडारे, संजय गवारगुरू अशा अनेकांना अपमानित करून बाजूला सारले गेले. पक्षाबाहेरून आलेले अशोक पळसपगार यांना जिल्हाध्यक्ष करण्यात आले. पुढे शांतानंद सरस्वती या विश्व् हिंदू परिषदेच्या नेत्याला प्रमुख केले. शिवसेनेत असलेले अ‍ॅड. बलदेव पळसपगार यांना पक्षात आणून जिल्हाध्यक्ष केले गेले. २००९मध्ये अ‍ॅड. पळसपगार यांना अनुसूचित जातीसाठी राखीव मूर्तिझापूर विधानसभेची उमेदवारी दिली. २०१४ला मुंबईत राहणाऱ्या राहुल डोंगरे यांना मूर्तिझापूर विधानसभेची उमेदवारी दिली. राष्ट्रवादीत महिला जिल्हाध्यक्ष, पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य असलेल्या प्रतिभा अवचार २०१९मध्ये मूर्तिझापूर विधानसभेच्या उमेदवार होत्या. यामुळे पक्षात इमानदारीने काम करणारे मागे पडले आणि बाहेरून आलेल्यांच्या हाती पक्ष आणि सत्ता गेली. मंत्री असताना पक्ष सोडलेल्या भांडे, बोडखे आणि पवारांच्या मुलांना-सुनेला पक्षाने उमेदवारी दिल्याने बौद्ध समाज अधिकच दुखावला. नेत्याविरुद्ध वागलो की, सन्मान मिळतो, हा पायंडा पडला.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

अशाच वातावरणात प्रकाश आंबेडकरांना टोकाचा विरोध करणारे, त्यांच्या खाजगी जीवनावर अश्लाध्य टीका करणारे बी. आर. सिरसाठ पक्षात परत घेतले गेले. त्यांना जिल्हा परिषद उपाध्यक्षपद दिले गेले. त्यांच्यासोबत आलेले हरिदास भदे यांनी तर बौद्ध नेतृत्व लक्ष्य केले. त्याने पक्षात निष्ठावंत विरुद्ध बेईमान, असा वाद विकोपाला गेला. भदे विरुद्ध पक्षातील असंतोष याचा परिणाम झाला. पक्षाच्या जुन्या पदाधिकारी पुष्पलता इंगळे आणि जगताप नावाचे दोन बौद्ध विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत उभे ठाकले. २४०० मतांनी हरिदास भदे पराभूत झाले आणि दोन्ही बौद्ध पदाधिकाऱ्यां २५०० मते घेतली. पुष्पलता इंगळे पुन्हा पक्षात आल्याने हरिदास भदे प्रचंड नाराज होते. म्हणून राहुल डोंगरे, हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांनी आंबेडकरांना शेवटचा जयभीम करत राष्ट्रवादी जवळ केली. त्याच वेळी संदीप सरनाईक या बौद्ध समाजाच्या पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनीदेखील मूर्तिझापूर विधानसभेत बंडखोरी करत दहा हजार मते घेतली.

वंचितच्या स्थापनेनंतर भारिप विलिन केल्याच्या तीव्र प्रतिक्रिया बौद्ध समाजातून आल्या. त्याला आंबेडकरांनी जुमानले नाही. या काळात इतर समाजाला न्याय देण्याच्या प्रक्रियेत बौद्ध समाजाला दुर्लक्षित केले गेले. ‘बौद्ध मतदार काहीही केला तरी आपल्या सोबत आहे, त्याला आपल्याशिवाय पर्याय नाही’ हा गैरसमज आंबेडकरांना होता. बौद्ध कार्यकर्ते पक्ष सोडून भाजप आणि काँग्रेसमध्ये जाऊन निवडून येत आहेत, याचे भान आंबेडकरांनी बाळगले नाही.

बामसेफ सातत्याने आंबेडकरी समूहाला चेतना देण्याचे काम करत होती. आंबेडकरांचा बहुजनवाद हा बौद्धांचे राजकीय अस्तित्व आणि राजकारण संपवणारे असल्याची जनजागृती बामसेफने केली. पण बौद्ध समाज जागा झाला नाही. पुढील जिल्हा परिषद निवडणुकीत बौद्ध महासभेचे पदाधिकारी संदीप गवई यांनी आपली पत्नी नीता गवई बोरगाव जिल्हा परिषदेमध्ये अपक्ष निवडून आणली. दानापूरमधून पक्षाविरुद्ध निवडून आलेल्या सौ. दामदर यांनीदेखील वंचित विरुद्ध निवडणूक लढून विजय मिळवला. ‘मॅजिक फिगर’साठी संदीप गवई आणि दामदर यांना वंचितने सोबत घेतल्याने ‘सब कुछ चलता हैं’ हे सिद्ध झाले. बार्शी-टाकळी पंचायत समितीत सभापतीपदासाठी भाजपसोबत आणि नगर परिषदेमध्ये काँग्रेससोबत बसल्याने वंचितला काहीही वर्ज्य नाही, हे समोर आले.

आताच्या पोटनिवडणुकीत दगडपरवा मतदारसंघात दोन बौद्धांनी बंडखोरी केली. त्यामुळे तिथे वंचितचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पराभव झाला. बंडखोर राजेश खंदारे यांच्या पत्नीने २०० मते घेतली आणि वंचितचा जिल्हा परिषद सदस्य १८० मतांनी पराभूत झाला. पंचायत समिती बंडखोर संतोष गवई यांच्या पत्नीने ३५० मते घेतली आणि वंचितच्या पंचायत समिती उमेदवाराचा १०० मतांनी पराभव झाला. कुरणखेड मतदारसंघात वंचितच्या सरपंच नागसेन टोबरे बौद्ध उमेदवाराने काँग्रेसपेक्षा २७०० मते जास्त घेतली. वंचितचे माजी सरपंच मिलिंद भोजने यांनी भंबेरीमध्ये ५०० बौद्ध मतदान घेतले. जिल्हा परिषदेला १४ पैकी एक बौद्ध उमेदवार दिलेल्या वंचितच्या एकमेव बौद्ध उमेदवार प्रतिभा अवचार पराभूत झाल्या.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

त्याच वेळी पक्षाविरोधात अपक्ष लढलेल्या प्रमोदिनी गोपाळ कोल्हे विजयी झाल्या. वंचितला सर्वांत मोठा हादरा दिला तो सम्राट डोंगरदिवे यांनी. कधी काळी भारिपमध्ये असलेल्या आणि पक्षाने काढून टाकलेल्या डोंगरदिवे यांनी आंबेडकरांना मोठे आव्हान देत अपक्ष विजय मिळवला आहे. या पूर्वी कोणताही बौद्ध अपक्ष म्हणून जिल्हा परिषदेत निवडून आलेला नाही. वंचितवर निवडून आलेले सहापैकी चार मराठा कुणबी आणि एक कोळी, एक भोई समाजाचे आहेत. वंचितचा बौद्ध उमेदवार खुल्या गटात वंचितवर निवडून येत नाही, बौद्ध अपक्ष निवडून येतो, हा आंबेडकरांना मोठा राजकीय ‘धडा’ आहे.

अकोल्यातील बौद्ध समाज पक्षातच ‘वंचित’ असल्याने आंबेडकरांचा बौद्ध जनाधार सैल झाला आहे. निवडणुकीत भाजप, सेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीची उमेदवारी घेणे, त्यांची पदे घेणे, वंचितच्या विरुद्ध प्रचारात बौद्ध वस्त्यांत फिरणे, त्यांना आपल्या बाजूला वळवणे हे बौद्ध पदाधिकारी यांनी सुरू केले आहे. वंचित किंवा आंबेडकरांविरुद्धची खदखद जाहीर बोलण्यापेक्षा मतदानांतून पुढे येत आहे. बौद्ध समाजाने घेतलेला पवित्रा आंबेडकरांच्या बालेकिल्याला पडलेले मोठे भगदाड आहे. त्याचा फायदा इतर राजकीय पक्ष कसा घेतात, त्यातून बौद्ध समाजाचे नेतृत्व उभे होते की, वाताहत होते, याची वाट न पाहता बौद्ध समाजाने ठोस निर्णय घेतला पाहिजे.

..................................................................................................................................................................

लेखिका अ‍ॅड. संजीवनी जाधव बामसेफच्या कार्यकर्त्या आहेत.

prasannjitgawaiakl@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख