‘भारतीय अभिनयाचा मानदंड’ म्हणजे दिलीपकुमार! पण त्यांच्यातला माणूस, त्यांच्यातला देशभक्त त्याहून खूप मोठा होता!!
संकीर्ण - श्रद्धांजली
कपिल पाटील
  • दिलीपकुमार यांच्या काही भावमुद्रा
  • Wed , 07 July 2021
  • संकीर्ण श्रद्धांजली दिलीपकुमार अमिताभ बच्चन शाहरुख खान अटल बिहारी वाजपेयी विलासराव देशमुख हिंदू-मुस्लीम ओबीसी

भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक दिलीपकुमार यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे.

अत्यंत संयत अभिनयासाठी ते प्रसिद्ध होते. ते अभिनय करत असं कधी वाटतच नसे. अमिताभ बच्चनपासून शाहरुखखानपर्यंत प्रत्येकावर दिलीपकुमार यांचा ठसा आहे.

‘भारतीय अभिनयाचा मानदंड’ म्हणजे दिलीपकुमार! 

गेली ४० वर्षं अमिताभ बच्चन भारतीय सिनेसृष्टी व्यापून आहेत. त्यांच्या तितक्याच श्रेष्ठ दर्जाच्या अभिनेत्री असलेल्या पत्नी खासदार जया बच्चन यांना एकदा सिनेपत्रकारानं विचारलं, ‘भारतीय सिनेसृष्टीचा महानायक कोण? अमिताभ बच्चनच ना? त्या म्हणाल्या, ‘नाही, दिलीपकुमार. फक्त दिलीपकुमार!’ ’

पण अभिनय एवढीच काय ती दिलीपकुमार यांची ओळख नाही. माणुसकीनं ओतप्रोत भरलेला हा अभिनयसम्राट तितकाच रसिकवाचक होता! त्यांच्याकडे विपुल ग्रंथभांडार होतं. इंग्रजी, हिंदी, उर्दू, पंजाबी आणि मराठी या पाच भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

दिलीपकुमारांचं कुटुंब पेशावरहून नाशकात आलं. देवळालीजवळ राहिलं. नाशिककडचं कुणी भेटलं की, ते नाशिकच्या ढंगातलं मराठी आवर्जून बोलत. मराठीतली अनेक गाणी त्यांना तोंडपाठ होती. तमाशा त्यांच्या आवडीचा. अनेक लावण्या त्यांना मुखोद्गत होत्या. एकदा मूडमध्ये त्यांनी मला तालासुरात लावणी गाऊन दाखवली होती.

मला एकदा ते म्हणाले होते- ‘मी मराठी बोलतो ती नाशिककडची. मुंबई-पुण्याची मराठी मला काही जमत नाही.’

खूप आधीची गोष्ट. औरंगाबादला त्यांचं शुटिंग सुरू होतं. त्यांना कळलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुभेदारी गेस्ट हाऊसला आले आहेत. ते बाबासाहेबांना जाऊन भेटले. खूप बोलले. खूप गप्पा मारल्या. बाबासाहेब त्यांना म्हणाले, ‘मुस्लीम समाजातल्या दुबळ्या वर्गासाठी काही करा.’

दिलीपकुमार मला म्हणाले, ‘तेव्हा मला नाही जमलं, पण मुस्लीम ओबीसींच्या प्रश्नावर काम करताना माझ्या मनात आंबेडकरांची ती याद होती.’

इस्लाममध्ये जातपात नाही, भेदभाव नाही, पण भारतीय मुस्लीम समाजात जातीपाती, बिरादरी आहेत. मुस्लीम समाज हा जातीग्रस्त भारतीय समाजाचं अभिन्न अंग आहे. इथं आलेल्या सगळ्या धर्मांना जातीव्यवस्थेनं गिळून टाकलं आहे. जातीचा संबंध नसलेल्या धर्मांना जातीव्यवस्थेची तडजोड करावी लागली. धर्मांतरं झाली, पण जात्यंतरं झाली नाहीत. जाती तशाच राहिल्या. त्यामुळेच मंडल आयोगानं ओबीसींच्या यादीत अनेक मुस्लीम जातींचा समावेश केला. त्यांना आरक्षण मिळावं म्हणून मुस्लीम ओबीसींची चळवळ उभी राहिली. वरिष्ठ मुस्लीम वर्गीयांकडून आधी विरोध झाला, पण दिलीपकुमार ठामपणे उभे राहिल्यानंतर विरोध संपुष्टात आला. महाराष्ट्रात ठिकठिकाणी परिषदा झाल्या. लखनौ, दिल्ली, हैदराबाद. प्रत्येक ठिकाणी स्वतः दिलीपकुमार गेले. मुस्लीम ओबीसींना सवलती देण्याचा निर्णय शरद पवार यांनी प्रथम घेतला, तेव्हा मुस्लीम ओबीसींच्या सवलती आणि सर्टिफिकेटचा प्रश्न विलासरावांनी सोडवला, तेव्हा आणि युतीच्या काळात रद्द झालेल्या सवलती गोपीनाथ मुंडे यांनी पुनर्स्थापित केल्या, तेव्हा त्यामागची खरी ताकद दिलीपकुमार यांचीच होती!

शब्बीर अन्सारी, हसन कमाल, जहीर काझी, मी आम्ही सारे त्या चळवळीत होतो. पण दिलीपकुमार पाठीशी नसते, तर मुस्लीम ओबीसींना न्याय मिळाला नसता. हिंदू ओबीसी आणि मुस्लीम ओबीसी एक कसे आहेत, एका जातीचे, एका बिरादरीचे कसे आहेत, हे त्या वेळी मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांना सांगताना दिलीपकुमार म्हणाले, ‘छगन भुजबळ माळी आहेत आणि मी बागवान. म्हणजे माळीच. जात एक. सवलत त्यांना मिळते, मग बागवानाला का नको?’ शरद पवार आणि छगन भुजबळ यांचे डोळे त्या क्षणी विस्मयचकीत झाले होते.

त्यांच्या सामाजिक जाणिवांच्या मागची प्रेरणा होती डॉ. आंबेडकर. त्या आधीचा आणखी एक प्रसंग आहे. मुंबई विद्यापीठ अंतर्गत फुटबॉल टुर्नामेंटमध्ये दिलीपकुमार खालसा कॉलेजकडून खेळत होते. सामना जिंकल्यावर टीमच्या कॅप्टनने बाबूने संध्याकाळी सगळ्यांना घरी जेवायला बोलावलं. बाबूने स्वतः कोंबडी शिजवली होती, पण जेवायला फक्त दिलीपकुमार पोचले. टीममधलं अन्य कुणीच आलं नाही. दिलीपकुमारांनी बाबूला विचारलं, ‘अरे, इतर कुणी का नाही आलं?’ विजेत्या टीमचा कॅप्टन बाबू म्हणाला, ‘युसुफभाई, मी दलित महार आहे. माझ्या हातचं ते कसं खातील?’ तो प्रसंग सांगताना दिलीपकुमारांच्या डोळ्यात पाणी होतं. गळा भरलेला होता.

आणखी एक प्रसंग आहे. अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते, तर नवाज शरीफ पाकिस्तानचे. भारत-पाकिस्तान समोरासमोर ठाकले होते. प्रसंग मोठा बाका होता. अचानक बांद्रा पाली हिलला दिलीपकुमार यांच्या घरात फोन खणखणला. खुद्द वाजपेयी बोलत होते. त्यांनी तातडीनं दिल्लीला बोलावलं. डॉ. जहीर काझी यांना घेऊन दिलीपकुमार थेट दिल्लीला पोचले. ते त्यांचे जवळचे मित्र. काझींच्या घरात आणि सासरी स्वातंत्र्यसैनिकांची समाजवादी परंपरा. त्यांचे सासरे मोहिद्दीन हॅरिस दिलीपकुमारांचे मित्र. त्यामुळे काझींवर दिलीपकुमारांचा फार भरवसा.

वाजपेयींनी दिलीपकुमारांना सांगितलं की, ‘तुम्ही हे करू शकता?’ थेट नवाज शरीफांना फोन गेला. पलीकडे दिलीपकुमारांचा आवाज ऐकून नवाज शरीफ एकदम चाट पडले. ते दिलीपकुमारांचे प्रचंड फॅन. त्यांचे अनेक सिनेमे, डॉयलॉग आणि गाणी त्यांना पाठ. दिलीपकुमारांच्या शब्दांनी जादू केली आणि पुढचं भयावह युद्ध थांबलं. दिलीपकुमारांची शिष्टाई कामाला आली!

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

मुस्लीम ओबीसींच्या आंदोलनामुळे दिलीपकुमार, शब्बीर अन्सारी, हसन कमाल, डॉ. झहीर काझी या सगळ्यांशी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची दोस्ती जमली. राज्यसभेची निवडणूक होती. अल्पसंख्याक कोट्यातून बरेच काँग्रेसजन प्रयत्नात होते, पण विलासरावांना वाटत होतं की, दिलीपकुमारांनी राज्यसभेवर जावं. त्यांनी त्यांच्याशी मला बोलायला सांगितलं. दिलीपकुमार म्हणाले, ‘अरे, या निवडणुकीत घोडेबाजार होतो. मी कुठून पैसे आणू?’ मी विलासरावजींना फोन लावून दिला. ते मस्त हसले. म्हणाले, ‘दिलीपसाब, आप को कुछ नहीं करना है, जिम्मेदारी मेरी हैं.’ विलासराव त्याच दिवशी दिल्लीला निघाले होते. सोबत प्रदेशाध्यक्ष गोविंदराव आदिक होते. दिलीपकुमारांचं नाव सांगताच सोनिया गांधी यांनी आनंदानं मान्य केलं.

विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. त्या वेळी मंत्रीमंडळात स्थान मिळावं म्हणून आमदार असलेले हुसेन दलवाई यांनी बरेच प्रयत्न केले होते. पहिल्या पाचात त्यांचा समावेश झालाही. पण तोही एक मोठा किस्सा आहे. सोनिया गांधींनी दिलीपकुमार यांना विचारलं, ‘हुसेन दलवाई हे नाव कसं आहे?’ दिलीप कुमारांच्या डोक्यात सिनिअर हुसेन दलवाई होते, वसंतदादा पाटील यांच्यासोबत मंत्रिमंडळात असलेले. दिलीपकुमारांचे ते जुने मित्र. त्यांनी एका क्षणात सोनियाजींना सांगितलं, ‘हुसेन दलवाई बिलकुल चांगला माणूस आहे. राष्ट्र सेवा दलात वाढलेला आहे. सज्जन आहे. बिलकुल त्यांना करा.’

हुसेन दलवाई हे नाव पक्कं झालं, पण ज्युनिअर हुसेन दलवाई दिलीपकुमारांना माहीत नव्हते. ज्युनिअर हुसेन दलवाई म्हणजे युक्रांदवाले. अलीकडच्या काळात ते राज्यसभेवरही होते. हमीद दलवाई यांचे भाऊ. त्यावरून काँग्रेसमधल्या काही मुस्लीम नेत्यांनी दिल्लीत आक्षेप घेतला. तेव्हा दिलीपकुमारांनी मला विचारलं, ‘अरे, माझ्या डोक्यात ते सेवा दलाचे हुसेन दलवाई होते. हे हुसेन दलवाई कोण?’ मी म्हटलं, ‘हे युक्रांदवाले.’ ते म्हणाले, ‘हे मला माहीत नव्हतं. मला वाटलं हे सेवा दलवाले हुसेन दलवाई आहेत. म्हणून मी सोनियाजींना तात्काळ हो म्हटलं.’

मी हसलो आणि म्हटलं, ‘तुमची जुन्या हुसेन दलवाईंसोबत कशी दोस्ती?’ ते म्हणाले, ‘ते हुसेन दलवाई माझे जुने मित्र. जुन्या सेवा दलातल्या बऱ्याच लोकांना मी व्यक्तिगत ओळखतही होतो. त्यामुळे माझ्या  डोळ्यात ते नाव राहिलं.’ ते सिनियर हुसेन दलवाई या हुसेन दलवाईंचे काका, चिपळूणमधले आणि सेवा दलाच्या पहिल्या पिढीतले. कोकणामधली बहुतेक मुस्लीम मंडळी सेवा दलात सुरुवातीपासून होती. त्यांचं आणि सेवा दलाचं योगदान दिलीपकुमारांना माहीत होतं.

दिलीपकुमारांचं प्रेम हा माझ्यासाठी फार मोठा ठेवा आहे. भेंडी बाजारात घांची म्हणजे मुस्लीम-तेली समाजाच्या पुढाकारानं झालेल्या ओबीसी मेळाव्यात त्यांच्या हातून झालेला सत्कार मी कधीच विसरू शकणार नाही. लखनौच्या मुस्लीम-ओबीसी परिषदेत माझ्याबद्दल ते किती प्रेमानं बोलले! औरंगाबाद, जालना दिलीपकुमार असले की, मोठ्या सभा होत. त्यांच्या सोबतीचे हे क्षण विसरता येणार नाहीत.

दिलीपकुमार यांच्या या दीर्घ आयुष्यात त्यांना साथ होती ती सायरा बानोंची. त्या त्यांच्या धर्मपत्नी. पण अखेरच्या दिवसांमध्ये त्या जणू त्यांच्या आई बनल्या होत्या. लहान मुलासारखी त्या त्यांची काळजी घेत होत्या. त्यांच्या अनेक सामाजिक उपक्रमात भाग घेत होत्या. लोकांना मदत करत. सायरा बानोंनी आपलं सगळं आयुष्य दिलीपकुमारांना समर्पित केलं. अभिनेत्री म्हणून त्या मोठ्या आहेतच, पण जीवनसाथी म्हणून त्यांनी दिलेली साथ त्याहून मोठी आहे. त्या सतत दिलीपकुमारांच्या सोबत राहत. एक क्षणही अंतर देत नव्हत्या. दिलीपकुमारांचं वय ९८ झालं होतं. गेल्या काही वर्षांत त्यांचं फिरणं मुश्किल झालं होतं. अंथरुणावर पडून होते. आठवणी पुसल्या जात होत्या.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

त्यांची शेवटची भेट आठवतेय. ताज एंडला झालेल्या रितेश-धीरज देशमुख यांच्या रिसेप्शनला ते आले होते. मला पाहताच त्यांनी माझा जो हात पकडला – ‘माय फ्रेंड कपिल, कपिल करत.’ ते हात सोडायलाही तयार नव्हते. मोठ्या मुश्किलीनं मी त्यांचा हात हळूच काढून पुन्हा सायराजींच्या हातात दिला. तो प्रसंग मला आठवला की, आजही गलबलल्यासारखं होतं. कारण दिलीपकुमार तेव्हा हरवत चालले होते.

ते हिंदी सिनेमातले दिग्गज खरेच, पण त्यांच्यातला माणूस, त्यांच्यातला देशभक्त त्याहून खूप मोठा होता. विचारानं ते पक्के समाजवादी. पक्के सेक्युलर आणि तितकेच आधुनिकही. मुस्लीम समूहातल्या पस्मांदा तबक्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. तितकंच हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी.

दिलीपकुमार यांना खरं तर ‘भारतरत्न’ किताब मिळायला हवा होता. अर्थात मिळाला नाही म्हणून त्यांचं महानत्व काही कमी होत नाही. त्या महामानवाला माझा अखेरचा सलाम.

.............................................................................................................................................

‘नेहरूंचा नायक दिलीपकुमार : आविष्कार भारतीयत्वाचा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5174/Nehruncha-Nayak-Dilip-Kumar

..................................................................................................................................................................

लेखक कपिल पाटील आमदार, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त आणि ‘लोक भारती’चे अध्यक्ष आहेत.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......