आता आमचे प्रिय नमोजी दाढीचे काय करणार, हा मोठा कुतूहलाचा विषय ठरणार आहे...
संकीर्ण - व्यंगनामा
श्रीनिवास जोशी
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Mon , 10 May 2021
  • संकीर्ण व्यंगनामा नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah ममता बॅनर्जी Mamata Banerjee भाजप BJP तृणमूल काँग्रेस Trinamool Congress

आम्ही अमितजींना भेटलो, तेव्हा ते थोडे चिडलेले होते. अमितजी खरं तर एक शांत व्यक्तिमत्त्व म्हणून आम्हाला परिचित आहेत. बंगालमधील पराभवामुळे चिडचिड करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. आपण बोलताना आपल्या पक्षाला दोनशेच्या वर जागा मिळतील असे म्हणलो आणि विरुद्ध पक्षाला २०० जागा मिळाल्या, हासुद्धा चिडचिड करण्याचा मुद्दा नाही. सेनापतीच जर आम्हाला कमी जागा मिळतील, असे म्हणू लागला तर मतदार आपले मत वाया जाईल, या भीतीने दुसऱ्या पक्षाला मत नाही का देणार? त्यामुळे आपल्या पक्षाच्या बाजूचे अंदाज वर्तवावेच लागतात! निकाल लागल्यानंतर होणारी ‘चेष्टा’ही सहन करावी लागते! सहन करायची म्हणजे काय, तर ‘दुर्लक्ष’ करायचं. राजकारणात लोक चेष्टा करणार!! आपण लोकांना ‘पप्पू’ म्हणालो तर लोक आपल्याला ‘चाणक्य म्हणणार’!!! इलाज नाही. 

निवडणुकीचा निकाल आणि स्वतःची चेष्टा, या दोन्ही गोष्टी निकालात निघाल्यावर चिडचिड व्हावी अशी राहिली कोणती गोष्ट? आम्हीही थोडे विचारात पडलो.

अमितजींची चिडचिड झाली की, त्यांच्या कपाळावर एक सूक्ष्म आठी पडते. आम्ही गेलो, तेव्हा अमितजींसमोर एक फाइलींचा ढीग होता. अमितजी रागाच्या भरात सटासट सह्या करत होते. आम्ही आल्यावर आमच्यासमोर जायफळ घातलेली कॉफी आणि वर्ख लावलेले पिस्ते आले. आम्ही शांतपणे पिस्ते आणि कॉफी यांचा स्वाद घेत वाट बघत राहिलो. फायली संपल्यावर अमितजींनी वर पाहिले आणि आमच्याकडे बघत एकदम म्हणाले – ‘आमने एक बात कहो शिरूभाई, किसी के दाढी का मजाक उड़ाना अच्छी बात हैं? ते सारू बाबत छे?’

‘बिल्कुल नथी’, हिंदीला गुजरातीची फोडणी देत आम्ही म्हणालो.

बंगालच्या पराभवानंतर आमच्या नमोजींच्या दाढीची जी चेष्टा भारतभर उडवली गेली, त्याने आम्हीसुद्धा अत्यंत व्यथित झालो आहोत. दाढी वाढवायची की नाही आणि वाढवायची असेल तर ती किती हा फक्त आणि फक्त नमोजींचा निर्णय आहे. त्यावर कुणी किती बोलायचे याला मर्यादा आहेत. खरं तर नमोजी यांनी दाढी वाढवणे आणि बंगालची इलेक्शन यामध्ये काहीही संबंध नव्हता. नमोजी कविवर्य टागोरांसारखे दिसायचा प्रयत्न करत आहेत, ही हूल विरोधकांनी उठवली. आपण बंगालच्या इलेक्शनसाठी दाढी वाढवली आणि आपला पक्ष पडला तर लोक चेष्टा करतील, एवढी साधी गोष्ट नमोजींसारख्या चणाक्ष नेत्याच्या लक्षात आली नसेल का? बंगालच्या इलेक्शनचे कारण असते, तर नमोजींनी दाढी वाढवलीच नसती, हे आम्हालाही पक्के माहीत आहे आणि अमितजींही पक्के माहीत आहे. त्यामुळेच या चेष्टचे दुःख जास्त होते आहे.

एका कार्टुनवाल्याने तर ढगामधून लांब दाढीवाले गुरुदेव टागोर लांब दाढीवाल्या नमोजींना अतिशय शांतपणे वस्तारा देत आहेत, असे कार्टुन काढले. आजकालच्या या इलेक्ट्रॉनिक युगात अशा गोष्टी व्हायरल व्हायला कितीसा वेळ लागतो? भारतभर हशा उसळला. लोकांना हसू आले तरी आम्हाला आणि अमितभाईंना अजिबात हसू आले नाही. कार्टुन काढणे आणि त्या कार्टुनला खदाखदा हसणे, हे अभिव्यक्तीस्वातंत्र्यात मोडते, हे आम्हाला आणि अमितभाईंना मान्य आहे. पण काही मर्यादा असायला हव्यात की नकोत? आपल्या हसण्याने अत्यंत वरच्या पातळीवर किती मोठे प्रॉब्लेम तयार होतात, हे चेष्टा करणाऱ्या लोकांना कळत नाही. कार्टून काढणाऱ्यालाही कळत नाही आणि त्या कार्टूनला हसणाऱ्या लोकांनाही कळत नाही.

..................................................................................................................................................................

ऑनलाईन आत्मचरित्र लेखन कार्यशाळा

नोंदणीसाठी पुढे दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म भरा -

https://forms.gle/HaYhWs7Wy8Dvwbfo6

अधिक माहितीसाठी संपर्क - ७७७४०३२६८०, ९८८१९०१८२१

..................................................................................................................................................................

आता विचार करा, हा हशा उडाल्यानंतर नमोजींनी आपल्या दाढीचे काय करायचे? आता त्यांनी दाढी काढली तरी हशा उडणार आणि नाही काढली तरी हशा उडणार. शिवाय दाढी हा असा प्रकार नाही की, त्याचे गुपचूप काहीतरी केले आणि प्रश्न मिटवला.

बरे कोर्टातही जाता येत नाही. कोर्ट म्हणणार की, तुम्हाला दाढी वाढवण्याचे किंवा काढण्याचे अभिव्यक्तिस्वातंत्र आहे आणि लोकांना कार्टुन काढून हसण्याचे अभिव्यक्तिस्वातंत्र आहे.

काही तरी खुस्पट काढून केस करावी म्हटले तर ‘बॅड पब्लिसिटी’ होणार. ‘न्यू यॉर्क टाईम्स’,‘ वॉशिंग्टन पोस्ट’, ‘ल माँद’, ‘द ऑट्रेलियन’, ‘द सिंगापूर टाईम्स’ सगळे म्हणणार हे काय, भारताच्या स्ट्राँग-मॅनला साधा विनोद सहन होत नाही? ते ‘असाही शिंबून’ नावाचे वर्तमानपत्रसुद्धा मोदीजींविरुद्ध सतत काहीबाही लिहीत असते. इकडे भारतातल्या कुणालाही जपानी भाषा येत नाही. त्यामुळे कुणालाच काही कळत नाही, हे एक बरे आहे.

एक साधी दाढी पण किती लचांड लागतात माणसाच्या मागे!

बंगालच्या पराभवानंतर नमोजींनी दाढी ठेवली तर काय होईल आणि नाही ठेवली तर काय होईल, याची कॅलक्युलेशन आम्ही आणि अमितजी मनातल्या मनामध्ये करत राहिलो. अमितजी आणि आमचे ट्युनिंग चांगले आहे. एकमेकांच्या मनात काय चालले आहे, हे आम्हा दोघांना नेमके कळते. अमितजी म्हणाले – ‘ए शिरूभाई मैं जो सोच रहा हूँ आप वहीं सोच रहे हो ना?’

आम्ही होकारार्थी मान हलवली आणि अमितजींना म्हणालो की, आपल्या नमोजींना आता लांब दाढी ठेवावीच लागणार. लोक हसले तरी ठेवावी लागणार आणि नाही हसले तरी ठेवावी लागणार.

अमितभाई यावर हसले आणि म्हणाले, ‘तमे साचा छो! यू आर राईट!’

शेवटी तसं बघायला गेलं तर नमोजींनी बंगाल इलेक्शनचा विचार करून दाढी वाढवली नाही, हे सत्य आहे. नमोजी हे ऋषितुल्य आहेत आणि त्यांनी दाढी वाढण्याचे तेच एकमेव कारण आहे. दाढी वाढवली नाही तर तो ऋषी कसला?

खरं तर दाढीवर एवढी चर्चा व्हायलाच नको आहे. पण शेवटी ‘इमेज मॅनेजमेंट’ हासुद्धा विषय महत्त्वाचा आहेच की!

बंगालमध्ये झाले ते गेले आणि गंगेला मिळाले, असे म्हणून विषय संपत नाही, हे सत्य आहे. दाढीमुळे एक नवाच प्रश्न उभा राहिला आहे. यूपीमध्ये पुढच्या वर्षी इलेक्शन आहेत. त्यात पराभव पदरी आला तर काय करायचे? लोकांना आता दाढीची चेष्टा करायची सवय लागली आहे. यूपीमध्ये पराभव झाला तर लोकांना किती चेव येईल. बेसुमार चेष्टा होईल. इमेजची तलवार दुधारी असते. इमेजमुळे इलेक्शन येतात आणि जातात पण! एखादी इलेक्शन आल्या-गेल्याचे काही विशेष नसते. इलेक्शन येत आणि जात असतात, दाढी मात्र कायम राहते, हा मुख्य प्रश्न आहे.

अमितजी हाच विचार करत असावेत, कारण त्यांच्या अंगावर सूक्ष्म शहारा आल्यासारखे दिसले. ते जरा अस्वस्थ झाल्यासारखे दिसले. ते एकदम उठले आणि त्यांनी आमचा निरोप घेतला. आम्हाला ते म्हणाले की, ‘अमे थोडी वार पछी मळीशूं’. थोड्या काळाने भेटणेच योग्य होते. तोपर्यंत या भयंकर प्रश्नावर काही तरी उपाय सापडला असता. त्या क्षणी डोके खाजवून काहीच होणार नव्हते. पण, प्रश्न सोडवायला लागणारच होता, हे आमच्या दोघांच्याही डोक्यात पक्के होते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आम्ही तिथून निघालो आणि फ्लाईट पकडून तडक ममता दीदींकडे कोलकात्याला गेलो. दीदी त्यांच्या हरीश चॅटर्जी स्ट्रीटवरच्या घरी होत्या. आम्ही आल्याचा निरोप दिल्यावर त्यांनी लगोलग आम्हाला त्यांच्या स्टडीमध्येच बोलावले. अत्यंत प्रसन्नतेने म्हणाल्या – ‘ऐशो ऐशो निबाशबाबू!’ म्हणजे, या या निवासबाबू!

त्या काली मातेचे पेंटिंग करत होत्या. कालीने आपल्या हातात एका निळ्या रंगाच्या राक्षसाचे मुंडके धरले होते. आणि एका शिंगे असलेल्या राक्षसाला पायाखाली दाबले होते. ते सगळे चित्र बघून आम्ही मनात म्हणालो – ‘अरे बापरे!’

आमची अवस्था बघून त्या म्हणाल्या – ‘आपनी की नर्भस?’

आम्ही म्हणलो, ‘नाही, नर्व्हस बिल्कुल नही’. आम्ही कसेबसे हसलो.

त्या दोन आकृत्यांकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या – ‘उभय दानोब!’

उभय दानोब म्हणजे दोघेही राक्षस आहेत. आम्ही गप्प बसलो.

दीदीवरून कितीही टफ वाटल्या तरी अत्यंत कलासक्त आहेत. त्यांच्या चित्रात कल्पकता भरपूर असते. मनानेही त्या अत्यंत कोमल आहेत. अतिशय प्रेमाने त्या आम्हाला म्हणाल्या – ‘आपनी पांतुया खाबेन?’

पांतुया ही बंगाली मिठाई आम्हाला अत्यंत प्रिय आहे.

ब्रेकफास्टला स्पेशल मूड म्हणून राधाबोल्लभी नावाची पुरी आणि आलूर दोम होता. मजा आली. दीदींचे पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोरसुद्धा ब्रेकफास्टला आमच्याबरोबर होते.

दीदींचा पाय प्लास्टरमधून बाहेर आला होता. मी दीदींना तुमचा पाय ठीक आहे ना, असे बंगालीमध्ये विचारले – ‘आपनार पा ठीक आछे?’

यावर दीदी आणि प्रशांतजी प्रसन्न हसले.

दीदी म्हणाल्या, ‘मोदीजीने दाढी बढाली, हमने हमारा पाँव प्लास्टर में डाल दिया’.

प्रशांतजी म्हणाले, ‘इमेज खेला’. (इमेज का खेल)

असे होते होय! तरी आम्ही विचार करत होतो की, निवडणुकीचा रिझल्ट लागल्या लागल्या व्हीलचेअर वरच्या दीदी तुरुतुरू कशा चालायला लागल्या?

इमेज ऑफ ‘आहतो बाघ’! प्रशांतजी म्हणाले.

‘आहतो बाघ’ म्हणजे जखमी वाघीण. मजा होती. जखमी वाघिणीची इमेज बनवली गेली. मोदी, शहा, सगळे केंद्र सरकार, बेसुमार ओतलेला पैसा, सीबीआय आणि ऐन वेळी सोडून जाणारे मित्र, अशा सगळ्यांशी एकट्याने लढणारी जखमी वाघीण.

दीदी स्वयंभू आहेत. त्यांच्यामागे कुणी पुरुष ‘मेंटॉर’ नाही. कुणा पुरुषाच्या सपोर्टवर त्या उभ्या आहेत, असे कुणी म्हणू शकत नाहीत. स्वतःच्या पायावर उभी असलेली एकटी वाघीण!

दीदी म्हणाल्या, ‘वो टागोर बन के आ गये तो हम ‘आहतो बाघ’ बन गये. उन्होंने लोगों की मोन में शोम्मान पैदा करने का कोशिश किया, तो हमने लोगोके मोन में शोहोनुभूती तैयार की. कौन जीतेगा बोलो निबाशबाबू? शोम्मान के शोहोनुभूती?’

‘शोम्मान’ म्हणजे आदर आणि ‘शोहोनुभूती’ म्हणजे सहानुभूती.

आदर विरुद्ध सहानुभूती असे द्वंद्व असेल तर मतदार ज्या व्यक्तीविषयी सहानुभूती वाटते आहे, तिलाच मत देणार, सरळ होते. आदर माणसाला जितका हलवतो, त्याच्यापेक्षा सहानुभूती कितीतरी जास्त हलवते.

गुरुदेव टागोर यांच्यासारखा दिसणारा बाहेरचा गुजराती माणूस विरुद्ध आपल्या बंगालची जखमी वाघीण, अशी लढत झाली.

‘उन्होंने प्रभु श्रीराम और हनुमान का नारा दिया, तो हमने मां दुर्गा की कसम खाई. हम चंडी पाठ करते है. उसके सिवा बाहर नहीं निकलते ग्रिहके.’

प्रशांतजी म्हणाले, ‘बंगाल में स्त्री शक्ती की अहमियत बड़ी है.’

प्रशांतजींचे खरे होते. श्रीरामापेक्षा दुर्गा बंगाली माणसाच्या हृदयाच्या जास्त जवळची. प्रशांतजी पुढे म्हणाले, ‘दीदी चंडीपाठ करती है ये झूठ है, ऐसा प्रचार किया इन लोगों ने.’

हे मात्र चुकीचे होते. दीदी गेली कित्येक वर्षे रोज चंडी पाठ करत आहेत, हे आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहत आलो आहोत. जे खरे आहे ते खरे आहे. नमोजींनी दाढी टागोर यांच्यासारखे दिसण्यासाठी वाढवलेली नाही, हे मी दीदी आणि प्रशांतजी यांना सांगितले. त्यावर ते दोघेही जोरात हसले. दीदी खरंच रोज चंडीपाठ करतात, हे आम्ही एकदा नमोजी आणि अमितजी यांना स्पष्ट सांगणार आहोत. त्यावेळी ते दोघेसुद्धा असेच हसतील, हे आम्हाला माहीत आहे. आम्हाला कुणाकडून मैत्रीशिवाय काही नको असते, म्हणून आम्ही स्पष्ट बोलू शकतो. नाहीतर आमचे कोणी ऐकून घेतले असते?

दीदी आणि प्रशांत किशोर विरुद्ध मोदी आणि अमितजी असा बुद्धिबळाचा सामना झाला.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

प्रशांतजी म्हणाले, ‘दीदीजीने गए दस वर्षों से स्त्री शक्ती को नर्चर किया हैं. स्कूल में जानेवाली हर एक लड़की को स्कॉलरशिप मिलती है. हर गरीब लड़की को शादी के लिए पच्चीस हजार रुपया मिलता हैं. मोदीजीने कुकिंग गॅस देकर महिलाओंके हृदय में प्रवेश करने की कोशिश की. दीदीजीने लड़कियों के शिक्षा की और शादी की चिंता मिटा दी. आपही बोलिये महिलाओं को क्या ज्यादा अच्छा लगेगा?’

दीदी गालातल्या गालात हसत होत्या. ‘खेला होबे’ ही तृणमूलची घोषणा होती. त्याचे इंग्रजी भाषांतर होते 'लेट अस प्ले' आणि मराठी भाषांतर होते – ‘होऊन जाऊ द्या!’

वरची चर्चा ऐकल्यावर ‘खेला होबे’चा एक वेगळाच अर्थ आमच्या लक्षात आला. हा सगळा वेगळाच खेळ सुरू होता तर!

घर सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीला दीदी आता दर महिन्याला तिच्या ‘कामाचा पगार’ देणार आहेत. प्रत्येक विधवेला पेन्शन देणार आहेत. नोकरी आणि कामासाठी घराबाहेर राहणाऱ्या स्त्रियांसाठी होस्टेल बांधणार आहेत. प्रशांतजी सांगत होते आम्ही ऐकत होतो. ते म्हणाले, स्त्रियांसाठी आपण काही केले तर त्या प्रामाणिकपणे आपल्याला मत देतात. पुरुषांचे तसे नसते. पुरुष पक्ष फार बदलतात.

ये बीजेपीवाले इलेक्शन कैसे खेलते हैं हमें मालूम हैं, प्रशांतजी पुढे म्हणाले, बहोत हाइप करते हैं. इतना हाइप करते हैं की लोगों को लगता हैं की, अब इनके सिवा इस दुनिया में उनका कोई तारणहार बचाही नहीं हैं. इसलिये हम भी किसी से कम नहीं हैं, ये बताने के लिये हमने नारा दिया -  खेला होबे!

उन लोगोने ‘हिंदू एकता’ का नारा दिया, तो हमने ‘बांग्ला एकता’ का नारा दिया. दीदी सांगत होत्या.

बीजेपीच्या प्रत्येक चालीला योग्य प्रतिचाल केली गेली. तृणमूलकडे कार्यकर्त्यांचे जाळे होते. बीजेपीने तृणमूलचे नेते फोडून ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न केला. मतुआ आणि राजवंशी या मागास जातींची अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न झाला.

आम्ही म्हटले – ‘दीदी, तृणमूल पर गुंडागर्दी के आरोप हो रहें हैं.’ आम्ही चेहरा गंभीर ठेवला होता. दीदी म्हणाल्या – ‘देखो निबाशबाबू, ताली एक हातसे बजती नहीं. योगी आदित्यनाथ आकर यहाँ बोले - इलेक्शन रिझल्ट के बाद तृणमूल के गुंडे जान की भीक मांगेंगे.’ दीदींनी त्यांच्या सेक्रेटरीला बोलावून २ मार्च २०२१ चा ‘अमर उजाला’ या हिंदी वृत्तपत्राचा अंक मागवून घेतला.

तो पेपर आम्हाला दाखवत दीदी म्हणाल्या – ‘एइ देखून निबाशबाबू. ये देखो निबाश बाबू. ये यूपी का न्यूज पेपर क्या बोल रोहा हैं.’

आम्ही पेपर बघितला तर त्यात खरंच तृणमूलच्या गुंडांना जिवाची भीक मागावी लागेल, असे आदित्यनाथ म्हणाल्याची बातमी होती.

दीदी पुढे म्हणाल्या – ‘एक बात बताओ निबाशबाबू, बीजेपी अगर जीत जाती तो तृणमूल के कार्यकर्ता के जॉन को खतरा कौन पैदा करनेवाला था?

आम्हाला शांत राहावे लागले.

दीदी पुढे म्हणाल्या – ‘हमने आपको बांग्ला का पेपर नहीं दिखाया. नहीं तो आप बोलते दीदीने छोपवाया हैं. इसलिये हमने आपको योगीजीके यूपी का हिंदी पेपर दिखाया हैं.’

आम्ही यावर काय बोलणार?

हिंसेचा विषय आल्यापासून प्रशांत जी अस्वस्थ झाले होते. त्यांच्या सुदैवाने दीदींनीच विषय बदलला. त्या म्हणाल्या, ‘हम खाली बोलता नाही हैं. सिर्फ बोलने वाले लोगों के दिन अब नही रहे हैं.’

प्रशांतजींनी याला दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘दीदींनी सरकार खरच जनतेच्या जवळ नेले. ‘दुआरे सॉरकार’ म्हणजे सरकार तुमच्या दारी. रेशनकार्ड असो, जातीचा दाखला असो, जमिनीचे कागद असो - लोकांना सगळे कागद घरपोच मिळू लागले आहेत. ‘दीदी के बोलो’ या नावाची हेल्पलाइन उघडली गेली. ‘दीदी के बोलो’ म्हणजे दीदीशी बोला. तुम्ही तुमचे प्रश्न डायरेक्ट दीदींना लिहून पाठवायचे. ते प्रश्न सोडवले जातात.

आम्ही विचार केला, ही बाई कशातच ऐकत नव्हती. इमेज खेला म्हणू नका, धर्म आणि जातीचे राजकारण म्हणू नका, देश आणि प्रांतिक अस्मिता चेतवून केले जाणारे विभाजनाचे राजकारण म्हणू नका, व्होटबँक पॉलिटिक्स म्हणू नका, जनतेसाठी सॉलिड काम करणे म्हणू नका - सगळ्याच बाबतीत ती पुढे राहिली.

प्रशांतजी म्हणाले – ‘मोदीजी और अमितजी २०१४ के बाद एक स्मार्ट पॉलिटिक्स इंडिया में ले आये. आज दीदीजीने स्मार्ट पॉलिटिक्स का एक और व्हर्जन लॉंच किया हैं इंडिया में.’

दीदी मनापासून हसल्या. बुद्धिबळाच्या खेळात विरोधकाचे सगळे डाव ओळखून विजय मिळवल्याचा एक खोडकर आनंद असतो. तो खोडकर आनंद दीदींच्या चेहऱ्यावर दिसत होता. पश्चिम बंगालच्या दक्षिण-पूर्व भागात केवळ पाच टक्के मुसलमान आहेत. त्या हिंदूबहुल भागातल्या जागासुद्धा दीदींनी आरामात जिंकल्या होत्या. तो आनंद मोठा आहे, असे दीदी म्हणाल्या.

थोड्या गप्पा झाल्या. दीदींचा निरोप घेऊन आम्ही बाहेर पडलो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

टॅक्सीमध्ये बसून आम्ही विमानतळाकडे निघालो. इलेक्शनमध्ये इमेजेसचे मोठे महत्त्व असते. दाढी असो, पायाला घातलेले प्लास्टर असो अथवा पावसात भिजत भाषण देणारे शरद पवार यांचा फोटो असो.

राजकारणात इमेजेसचा खूप विचार केला जातो. फक्त इमेज तयार करून चालत नाही. काम करावेच लागते. नाहीतर कुठलीच इमेज काम करू शकत नाही. पण एक गोष्ट तितकीच खरी असते की, कामापेक्षा इमेजेसची चर्चा खूप जास्त होते. इमेजच्या बाबतीत राजकारण्यांना फार क्रिएटिव्ह राहावे लागते.

आता आमचे प्रिय नमोजी दाढीचे काय करणार, हा मोठा कुतूहलाचा विषय ठरणार आहे. भारताची आजची परिस्थिती पाहता दाढी हाच एक आधार त्यांच्यासाठी उरणार आहे, असे म्हणण्यास जागा आहे. एकदा लोक रागावले की, पूर्वी ज्या इमेजेसचे त्यांना कौतुक वाटत असे, त्याच इमेजेसचा त्यांना राग येऊ लागतो. इमेज ही दुधारी तलवार आहे हेच खरे. असो. उद्याचे कुणी सांगितले आहे? परंतु, परिस्थिती जर अशीच राहिली तर आपल्याच दाढीच्या झोळात पाय अडकून पडण्याची नौबत आमच्या प्रिय नमोजींवर येऊ शकते.

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......