‘सुगीभरल्या शेतातून’ : हे संपादन भालेराव यांच्या कवितेचं पीक कसं जोमदार, दमदार आणि कसदार आहे, याचं मासलेवाईक उदाहरण आहे!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शरद ठाकर
  • ‘सुगीभरल्या शेतातून’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Thu , 15 April 2021
  • ग्रंथनामा शिफारस सुगीभरल्या शेतातून इंद्रजित भालेराव

‘सुगीभरल्या शेतातून’ हे सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या निवडक कवितांचं समीक्षक प्रा. रणधीर शिंदे यांनी केलेलं संपादन नुकतंच प्रकाशित झालं आहे. पिळवणूक आणि पाचवीला पुजलेलं अस्मानी-सुलतानी संकट हे कायम शेतकऱ्यांच्या नशिबी असले तरी भालेराव यांच्या कवितेतील शेतकरी याही परिस्थितीत रडगाणं गात बसत नाही. शेतकरी आत्मविश्वासानं जगला पाहिजे, कठीण परिस्थितीतही तो संकटांना तोंड देत उभा राहिला पाहिजे, यासाठी शेतकऱ्याचं आत्मबळ वाढवणाऱ्या कविता ते लिहितात.

शेतकरी जेव्हा त्याच्या खूप जवळच्या आत्मीयता असलेल्या पाहुण्याराहुळ्यांना, आपल्या मित्राला शेतातला वानवळा द्यायचा असेल तर तो पुन्हा डांभ्यात जातो. म्हणजे शेतातलं जे सर्वोत्कृष्ट पिकलेलं आहे, ते आपल्या प्रिय व्यक्तीला देतो. त्याच पद्धतीनं या संग्रहात भालेराव यांच्या निवडक १०६ कविता निवडलेल्या आहेत. हे संपादन भालेराव यांच्या कवितेचं पीक कसं जोमदार, दमदार आणि कसदार आहे, याचं मासलेवाईक आहे. 

‘मातीच्या मार्दवामुळेच’ या कवितेत डांभ्याचं पोषण कसं होतं, कठाळ्याला डांभा जसा आपल्याच मालकीचा वाटतो, तसाच तो गरीब गाईलाही आपला वाटतो, एवढंच नाही तर रानातली माणसं डांभ्या जवळच सापडतात किंवा चिमणी पाखरंही हमखास डांभ्यावरच असतात, हे सांगताना इंद्रजित भालेराव म्हणतात -

‘भाग्यवंताच्या शेतात 

 अनेक डांभे असतात 

 ज्याच अख्खं शेत डांभा 

असा बळीवंत एखादाच’ (पृ.१२५)

भालेराव यांनी शेती-मातीचीच कविता लिहिली, त्यामागचं कारण ते ‘दो जीवाची’ या कवितेतून सांगतात-

‘भर उन्हात जन्माला माती तोंडात घेऊन,

वाढलास एवढा तू धान मातीचं खाऊन

मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं

बाळा, माती लई थोर 

तिला कसं इसरावं’ (पृ.४८ )

या संग्रहामध्ये माझं ‘माहेर तुटलं’, ‘मीया मनलं’, ‘ऐक ऐक सूनबाई’, ‘उभ्या उभ्या आड रातर’, ‘जाय तुला बोलायचे न्हाय’, ‘लेकीचा जलम’, ‘माहेरचा झोका’, ‘सांग’ या कवितांतून माय-लेक, बाप-लेक, बहीण-भाऊ असे विविध नातेसंबंध उलगडतात. त्यासोबतच लेकीला, सुनेला कसं जगलं-वागलं पाहिजे, हे साध्या सोप्या भाषेत या कवितांमधून सांगितलं आहे. लेकीला पाहुणे पाहायला येणार असतात, तेव्हा आई ताडमाड वाढलेल्या लेकीला कवितेत काय म्हणते ते पहा -

‘काल मागीतली साय

मला मनलिस पोरी

जानं परायाच्या घरा 

नको होऊस आघोरी’ (पृ.६५ )

असा लेकीबाळीला सल्ला देतानाच ‘गावाकडं’ या कवितेत भालेराव म्हणतात -

‘काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता 

माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता’ (पृ.७०)

गावात उन्हातानात माणसं कशी कष्ट करतात, त्यांना शेती करताना किती यातना भोगाव्या लागतात, हे या कवितेतून सांगताना शेतकरी या भूमीचा मूळ अधिकारी असून त्याला आज कसं भिकाऱ्यासारखं काम मागत गावोगाव फिराव लागतंय हे सांगतानाच जागतिकीकरण आणि त्यामुळे बदलत गेलेला गाव, गावात आलेलं बकालपण, बदलत गेलेले माणसांचे स्वभाव, नातेसंबंध, बदललेल्या निसर्गानं शेती आणि शेतकरी जीवनावर झालेले परिणाम, हेही सांगितलंय. ‘गावपांढरी ओस झाली’, ‘जागतिकीकरण’, ‘मनाचे कुपोषण’ या कवितांमधून बदललेल्या गावाबद्दल बोलतानाच ते ‘होते विठूचे मंदिर’ या कवितेतून पुढील आशावाद व्यक्त करतात -

‘कुणी यावा भगीरथ | गंगा आणावी गावात |

आम्ही त्याच्याच नावात | देव शोधू ||’ (पृ.५७ )

गाव बदललं, गावातली माणसं बदलली तरी गवत बदलत नाही. भालेराव आपल्याला सहज सोप्या भाषेत गवताचे विविध प्रकार, त्यांची नावं, त्यांची वैशिष्ट्यं सांगतात. ते सांगतात -

‘कुठेही पडो कसंही पडो आपल्या अवतीभोवती

सृष्टी उभी करण्याची ताकत गवतात असतेच असते’ (पृ.१३७) 

‘याच्या हिरव्या’, ‘रानलहू आणि पानलहू’, ‘धान पूर्वी तनच होत’, ‘गवत’, ‘भुईवर पसरलेली’, ‘कावसाड –कसई’, ‘आवधान नावाचं’, ‘चालणारे बैल’, ‘गरोदर बाईच्या’, ‘दिवाळी आणि उन्हाळी’ या गवता संदर्भातल्या कवितांचाही समावेश या संग्रहात आहे.

‘सर्वांनाच बांधता यावीत’ या कवितेतून भालेराव यांच्यातला सर्वांचं भलं होण्यासाठी तळमळणारा कवी आपल्याला दिसून येतो. सर्वांना चौसोपी वाडे बांधता यावेत, सर्वांनाच दही-दूध-तूप-लोणी खायला मिळावं, गोठ्यात गाई अन् वासरं असावीत, सासुरवाशिणींना सासर-माहेर वेगळं वाटूच नये, गावाला तटबंदी नसावी किंवा आतबाहेर वेगवेगळ्या जातीधर्माच्या वस्त्या नसाव्यात, सर्वांनी गुण्यागोविंदानं नांदावं, असं गाव असावं असं भालेराव यांना वाटतं.

अशीच माणुसकीची शिकवण ‘दिवाळी’, ‘पावसा पावसा’, ‘बाप म्हणायचा’, ‘बैलांना वेळेवर’ या  कविताही देतात. सर्वांचं भलं चिंतणाऱ्या, सर्वांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या कविता भालेराव  लिहितात, पण शेवटी म्हणतात -  

‘व्हावा कोणता माणूस ज्याचे त्याने ठरवावे 

कानी व्हावे का कणीस ज्याचे त्याने ठरवावे’ (पृ.११० )

शेतात काही उत्पन्न होवो अगर न होवो शेतकरी नित्यनेमानं पाऊस पडला की, काळ्या आईची ओटी भरायचं काम करतो. त्याची शेतीनिष्ठा ढळू देत नाही. ‘शेतच ईमान’, ‘एकाचे दाने हजार’, ‘बापाची लोककथा’ या कवितांतून शेतकऱ्याची ही निष्ठा मांडलेली दिसते.    

काही शेतकरी आपल्या मालाला योग्य भाव मिळावा, शेतीला चांगले दिवस यावेत, कोणीतरी आपला तारणहार व्हावा म्हणून वेगवेगळ्या पुढाऱ्यांच्या मागेपुढे फिरतात, त्यांची कथा ‘हे निष्ठावान’, ‘बिल्ला’ या कवितेतून दिसून येते. पण थोडीशी लालूच दाखवून इथली व्यवस्था पुढाऱ्यालाच आपल्या दावणीला बांधते, त्यामुळे शेतकरी हिताचे निर्णय झालेले पाहायला मिळत नाहीत. म्हणून ते ‘खांदा’ या कवितेत म्हणतात -

‘खांदे घडवण्यात आपण अपयशी झालो

की आयते खांदे पळवण्यात ते यशस्वी’ ( पृ.१५०)

अशा पद्धतीनं पुढारी जरी शेतकऱ्याची साथ सोडणारे, बाजू न घेणारे असले तरी शेतकऱ्यांना आहे त्या परिस्थितीत हिंमतीनं लढण्याचं बळ देण्यासाठी शेतकऱ्याच्या पोराला ते म्हणतात -  

‘शीक बाबा, शीक लढायला शीक 

कुणब्याच्या पोरा,

आता लढायला शीक’ ( पृ.८२ )

कारण गपगुमान अन्याय सहन करत राहिलं तरी इथली व्यवस्था त्याचा विचार करणार नाही, त्यामुळे त्यांना नाईलाजानं म्हणावं लागतं -

‘सांगा माझ्या बापानं नाही केला पेरा,

तर तुम्ही काय खाल? धत्तुरा!’ ( पृ.८१ )

‘माझ्या वासराने’, ‘इडा पिडा टळो’, ‘उपाय’, ‘माती पाणी’, ‘दुःख असो जीवघेणे’, ‘फोटो’ या कविता शेतकऱ्यांचं आत्मबळ वाढवणार्‍या आहेत. भालेराव यांच्या कवितेतला शेतकरीच फक्त परिस्थितीशी लढणारा आहे, असं नाही तर त्यांच्या कवितेतील स्त्रियाही खंबीरपणे लढणाऱ्या आहेत. ‘रानातल्या उन्हातानात’, ‘किती टाकलं साऱ्यांन’, ‘कणगी सारखी भरलेली’ या कविता त्या संदर्भात वाचण्यासारख्या आहेत. ‘रानातल्या उन्हातानात’ या कवितेत ते म्हणतात -

‘रानावनातल्या उन्हातान्हात वाळलेल्या सासुरवाशिनी गोवऱ्या वेचते

आपल्या फाटक्या जिंनगानीचा पदर

एकदाचा खच्चून कंबरेला खोचते’ ( पृ.५५ )

‘आडलेली बाई सोडवताना’ ही जातधर्म विसरून सुईनपण करणाऱ्या सुईणीची कविता सामाजिक सलोखा शिकवणारी, बुद्धाचं शांतीचं तत्त्वज्ञान सांगणारी आहे.

या संग्रहाचे संपादक प्रा. रणधीर शिंदे यांनी स्वातंत्र्योत्तर काळापासून इंद्रजित भालेराव यांच्या कवितेपर्यंत मराठी कवितेचा आढावा घेणारी दीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. ती मुळातून वाचावी अशीच आहे. 

एकंदरीत नातीगोती सांभाळत ‘सुगीभरल्या शेतातून’ आनंदानं सुगीचे दान देणारी कविता या संग्रहात वाचायला मिळते. रविमुकुल यांनी सुंदर असं मुखपृष्ठ साकारलं असून सुरेश एजन्सी, पुणे यांनी हा संग्रह प्रकाशित केला आहे.

‘सुगीभरल्या शेतातून’ : संपादन - प्रा. रणधीर शिंदे

सुरेश एजन्सी, पुणे

पाने – १६०, मूल्य - २२० रुपये.

..................................................................................................................................................................

शरद ठाकर

sharadthakar17@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......