बी. एन. देशमुख : आचार-विचाराचा समाजवादी विचारवंत
संकीर्ण - श्रद्धांजली
व्ही. एल. एरंडे
  • माजी न्यायमूर्ती बी. एन. उर्फ बलभीमराव नरसिंहराव देशमुख (१९ जानेवारी १९३५ - २८ मे २०२०)
  • Sat , 30 May 2020
  • संकीर्ण श्रद्धांजली बी. एन. देशमुख B. N. Deshmukh

माजी न्यायमूर्ती बी. एन. उर्फ बलभीमराव नरसिंहराव देशमुख यांचं २८ मे २०२०च्या मध्यरात्री दीर्घ आजारानं निधन झालं. १९ जानेवारी १९३५मध्ये तुळजापूर तालुक्यात एका छोट्या खेड्यात जन्मलेल्या देशमुख यांनी तब्बल सहा दशकं महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात व्यतित केली. १९६३मध्ये बॅरिस्टर पदवी घेऊन भारतात परतल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आपल्या वकिली व्यवसायाला सुरुवात केली. तेव्हापासून परवापर्यंत त्यांनी आपलं आयुष्य बहुजन समाजाच्या कल्याणासाठी आचार-विचारांच्या पातळीवर सार्थकी लावलं.

समाजवादी विचारसरणीच्या पर्यावरणात जन्म घेतलेले देशमुख शेकापचे माजी राज्यसभा सदस्य भाई नरसिंहराव यांचे चिरंजीव आणि मराठवाड्यातील शेकापचे ज्येष्ठ नेते भाई उद्धवराव पाटील यांचे भाचे होते. लहानपणापासूनच देशमुख यांच्यावर शेकापच्या विचारसरणीचे, पर्यायाने समाजवादी विचारांचे संस्कार झाले. ते आयुष्यभर त्या विचारांशीच बांधील राहिले.

मागील अर्धशतकात महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात अनेक बदल झाले. पक्षीय राजकारणात देखील अनेक चढउतार झाले. यशवंतराव चव्हाणांनी ‘बेरजेचे राजकारण’ व ‘बहुजनवाद’ या गोंडस नावाखाली शेकापमध्ये फूट पाडून त्यांना काँग्रेसवासी बनवले. मात्र अशाही परिस्थितीत भाई उद्धवराव पाटील व नरसिंहराव देशमुख आयुष्यभर पक्षाशी एकनिष्ठ राहिले. याच संस्कारात वाढलेल्या देशमुख यांनीदेखील शेकाप व समाजवादी विचारधारेशी कधीही प्रतारणा केली नाही.

एक प्रसिद्ध वकील, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालयाचे वकील अशा अनेक पदांवर त्यांनी काम केलं. खरं पाहता तो काळ पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा यांसाठी अत्यंत अनुकूल होता, मात्र या क्षेत्रातही देशमुख यांनी आपली बहुजनवादी वैचारिक ठेवण शाबूत ठेवत सर्वसामान्य शेतकरी, मजूर कष्टकरी यांच्या कल्याणासाठी आपली हयात खर्ची घातली.

न्यायमूर्ती असतानादेखील सर्वसामान्य पीडितांना न्याय देण्यासाठी आपल्या पदाचा वापर केला. आपली जन्मभूमी मराठवाडा आहे याचा अभिमान बाळगून औरंगाबादला उच्च न्यायालयाचे खंडपीठ होताच त्यांनी मुंबई सोडली आणि औरंगाबादला वकिली व्यवसाय सुरू केला. तत्पूर्वी औरंगाबादला मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं म्हणून सतत प्रयत्नांची पराकाष्ठा केली. १९८२मध्ये जेव्हा खंडपीठ झालं, तेव्हा देशमुख विधानपरिषदेचे सदस्य होते.

या सभागृहातदेखील त्यांनी १९७८-१९८४ या काळात अनेक प्रश्नांवर सरकारला धारेवर धरलं. प्रचंड व्यासंग, समाजवादी बाणा आणि सर्वसामान्य समाजाबद्दल टोकाची तळमळ ही स्वभावगुणवैशिष्ट्यं त्यांच्या ठायी असल्यामुळे सभागृहातदेखील प्रचंड दबदबा त्यांनी निर्माण केला. वकिली व्यवसाय निष्ठेनं सांभाळत शेकापचेदेखील तनमनधनानं ते काम करत.

१९८६मध्ये सर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालयात सह-न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि १९८७मध्ये ते कायम न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले. पुढे तब्बल एक दशक त्यांनी न्यायदानाचं नि:पक्षपातीपणे काम केलं. एक निर्भीड न्यायाधीश म्हणून त्यांना ओळखलं जात असे. अनेक प्रसंगी कुणाचाही मुलाहिजा न ठेवता त्यांनी निर्णय दिले. समाजवादी तत्त्वज्ञानापासून ते कधीही विचलित झाले नाहीत.

१९९७मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर काही काळ त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. तिथंही महाराष्ट्रीय जनतेच्या न्यायासाठी सतत झगडले. वयाची ७५ वर्षं पूर्ण केल्यानंतर त्यांनी वकिली व्यवसायातून निवृत्ती स्वीकारली आणि औरंगाबादला स्थायिक झाले. नंतरच्या काळात जनता विकास परिषदेत सक्रिय राहून काम केलं. मराठवाड्यातील असमतोल, पाणीप्रश्न, विकासाचे प्रश्न हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते. अगदी वयाची ८३ वर्षं त्यांनी सतत समाजाची सेवा करण्यात व्यतीत केली. मागील दोन वर्षांपासून ते आजारी होते. वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं, हे खरं असलं तरी एक सच्चा समाजवादी-सत्यशोधक आपण गमावला. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

.............................................................................................................................................

लेखक व्ही. एल. एरंडे माजी प्राचार्य व राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

vlyerande@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......