टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री ज्याँ मार्क आयरॉल्ट, नरेंद्र मोदी, वासुदेव देवनानी, अखिलेश यादव, नवज्योत सिंग सिद्धू आणि सुखबीर सिंग बादल
  • Wed , 18 January 2017
  • विनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi ज्याँ मार्क आयरॉल्ट Jean-Marc Ayrault वासुदेव देवनानी Vasudev Devnani अखिलेश यादव Akhilesh Yadav नवज्योत सिंग सिद्धू Navjot Singh Sidhu सुखबीर सिंग बादल Sukhbir Singh Badal

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीबाबत घेतलेला निर्णय साहसी आणि कौतुकास्पद आहे. मोदींच्या या निर्णयावरूनच समजते की, ते करबुडवेगिरीला चाप बसविण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी समर्पित आहेत. भारताची वाटचाल योग्य दिशेने होत आहे. : फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री ज्याँ मार्क आयरॉल्ट

अभिमानाने छाती भरून आली ना? हे ज्याँ महोदय 'व्हायब्रंट गुजरात' (हो हो, तोच उपक्रम जिथे चारशेहून अधिक शालेय शिक्षकांना काल्पनिक कंपन्यांचे सीईओ बनवून हजर करण्यात आलं होतं गर्दी दाखवण्यासाठी) या व्यापारी संमेलनासाठी आले होते. भारतात आधीच हजाराहून अधिक कंपन्या असलेल्या फ्रान्सला अपारंपारिक ऊर्जा आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात भारतात गुंतवणूक करायची इच्छा आहे, ‘मेक इन इंडिया’ ही त्यांना त्यांच्या व्यवसाय वृद्धीची संधी वाटते, म्हणून काय झालं? जे अभिमानास्पद आहे, ते अभिमानास्पद आहे.

चित्र - सतीश सोनवणे

२. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या समाजवादी पक्षाच्या वादात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची सरशी झाली आहे. समाजवादी पक्षाच्या सायकल या चिन्हावर पिता मुलायम सिंह आणि पुत्र अखिलेश यांनी दावा सांगितला होता. निवडणूक आयोगाने अखिलेश यादव यांच्या बाजूने निकाल दिला आहे.

यात आश्चर्य काय? 'बाबा, माला सायकल हव्वी, आत्ताच्या आत्ता!' असा हुकूम चिरंजीवांनी सोडल्यानंतर कोणत्या बापाची टाप असते तो नाकारण्याची? कॅरियरवर बसलेल्या पोराला सीटवर बसवून आपण चालत्या सायकलवरून पायउतार होऊन जाण्याची कसरत मुलायमसिंहांनी या वयात, अशा देहविस्तारासह किती चपळाईने केली, याचं कौतुक करायला हरकत नाही.

…………………………..…………………………..

३. सर्वसमावेशक विकासाच्या निकषांवर तयार करण्यात आलेल्या जगातील ७९ विकसित राष्ट्रांच्या यादीत भारताला ६०वे स्थान मिळाले आहे. जागतिक आर्थिक मंचाने म्हणजे वर्ल्ड इकनॉमिक फोरमने प्रकाशित केलेल्या ‘समावेशक वाढ आणि विकास अहवाल २०१७’मध्ये समावेशक विकास निर्देशंकात भारताला चीनपेक्षा खालचे स्थान तर मिळाले आहेच; पण या यादीत पाकिस्तानही भारताच्या वरच्या क्रमांकावर आहे. धोरणकर्त्यांकडून तयार करण्यात येणारे विकासाचे प्रारूप आणि विकास मोजण्याच्या निकषांमधील त्रुटी याला कारणीभूत आहेत.

अरे देवा, काय ही किचकट डोकेदुखी! एक अक्षर कळेल तर शपथ! यापेक्षा सौ करोड हिंदुस्तानी सीमेवर उभे राहून अमुक गोष्ट करतील, तर पाकिस्तानचं तमुक होऊन जाईल, ही जुमलेबाजी किती सोपी, किती सुटसुटीत!

…………………………..…………………………..

४. सर्वच प्राण्यांना श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन लागतो, उच्छवासातून कार्बन डाय ऑक्साइड बाहेर सोडला जातो. पण, उच्छवासातूनही ऑक्सिजनच देणारा गाय हा एकमेव प्राणी आहे. : राजस्थानमधील शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषीविषयक समितीने २००६ मध्ये दिलेल्या अहवालानुसार गायी-म्हशींसारखी गवत चरणारी जनावरं मिथेन, कार्बन डायऑक्साइड यांसारख्या वायूंच्या उत्सर्जनाला जबाबदार असतात, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. चाऱ्याचं पचन होत असताना ढेकरच्या माध्यमातून हा वायू बाहेर पडत असतो, असं हा अहवाल सांगतो. पण, 'राजीव दीक्षित स्कूल ऑफ एव्हरीथिंग इन द युनिव्हर्स'चे विद्यार्थी असलेल्या देवनानी यांनी केलेलं हे मौलिक संशोधन पाश्चिमात्यांचे डोळे उघडून त्यांच्या मेंदूला काही गोजन्य ऑक्सिजनचा पुरवठा करील, अशी आशा आहे. गाय कोणत्या भागातून ऑक्सिजन देते आणि देवनानी महोदय त्या भागाजवळ काय करत असतात, एवढं फक्त जाहीर व्हायला हवं.

…………………………..…………………………..

५. नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना भाजपला ‘कैकयी’ आणि काँग्रेसला ‘कौसल्या’ म्हटले होते. सिद्धू यांच्या या विधानाचा समाचार घेताना सुखबीर सिंग बादल म्हणाले की, नवज्योत सिंग सिद्धू दररोज ‘आई’ बदलत असतात.

बादलसाहेब, नका एवढं जिवाला लावून घेऊ. हा धंदाच असा आहे. इथे कोणी ‘आई’ बदलत असतं, कोणी ‘बाप’. भाऊबंद तर काही विचारूच नका दिवसागणिक किती बदलतात ते!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......