‘तू जाऊन तीन तपं झाली’ : गावमातीतील माणसांच्या सत्त्वाचा शोध घेणारे काव्य 
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
इंद्रजित वीर
  • ‘तू जाऊन तीन तपं झाली’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Fri , 24 April 2020
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस तू जाऊन तीन तपं झाली Tu Jaun Tin Tapa Zali महेंद्र कदम Mahendra Kadam

कादंबरीकार, समीक्षक डॉ. महेंद्र कदम यांचा ‘तू जाऊन तीन तपं झाली’ हा पहिला काव्यसंग्रह. तसं पाहता ही एक दीर्घकविता आहे. काबाड कष्ट करूनही वेदना, हाल-अपेष्टेचे जगणे वाट्याला आलेली माणसं सत्त्व जपण्याचा वसा घेऊन संघर्षमय जीवन जगतात त्याचे हे काव्य. तीन तपापूर्वी अस्तंगत झालेल्या आईच्या आठवणींचा जागर व संघर्षमय जीवन जगत एकाकी पुढे आलेल्या कवीची कहाणी सांगणारे हे आत्मकाव्य आहे.

आईच्या आठवणी

बहात्तरच्या दुष्काळी परिस्थितीपासून ही कहाणी आरंभ करते. पर्जन्य छायेचा प्रदेश, सततचा दुष्काळी भाग हीच ओळख असणारा गाव. त्यामुळे अन्नपाण्याची वाणवा. माणसाच्या वाट्याला आलेले मरणासन्न महाकष्टप्रद जगणे. त्यात साथीच्या रोगात घरातल्या माणसाच्या जाण्याने घरादाराची होळी होते. एका घरात तीन भावंडांसह फक्त पणजी उरलेली असते. अशात वय नसताना घरातल्या थोरल्या पोराच्या लग्नाची सतरंजी अंथरली जाते आणि कवीची आई या घरात लग्न होऊन येते. याचे वर्णन करताना कवी म्हणतो -

“कुंकवाचा दगड।

आई बानं तुझ्या पदरात।

चंद्र म्हणून बांधला।

तू त्याला जपताना।

सुपाएवढं काळीज करीत।

संसार मात्र सावरीत आणला”

हलाखीच्या स्थितीत असलेल्या धन्याच्या घरात येणे तिच्यासाठी फारसे सुखदायक नव्हते. तरीही धन्याला जपतानाच सुपाएवढं काळीज करत संसारालाही सावरते. इथूनच आईच्या संघर्षमय जगण्याची सुरुवात होते. पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी नवऱ्याच्या बरोबरीने ती मोलमजुरीचा रस्ता धरते. पाठीला बाक आणणारी गवताची पेंडकी उचलण्यापासून ते खडी फोडण्याच्या कामापर्यंतची नानाप्रकारचे कष्ट ती उपसते. तरीही अनेकदा तिच्या वाट्याला उपासमारीची वेळ येते. कितीही दुःख वाट्याला आले तरी ती जगण्याला हसतहसत सामोरी जाते. याचे वर्णन करताना कवीने म्हटले आहे -

“उखणणं लिंपताना।

भिंतींवरचं पापुद्रं काढावेत शेलक्या हातानं।

तसं तू काढून टाकलंस तुझ्या चेहऱ्यांवरचं ।

आभाळवर्खी दुःख।”

दुःख, वेदना सोसत सख्यांसोबत ती काम करते. कष्टाच्या जोरावर गाण्यांचा हुंकार शिवारात पेरते. रानामातीचा गंध घरभर पसरते. भुंड्या माळावरचा एकेक दगड वेचून मातीला अंकुर फोडते. खोकडफळी रानात कणसांचा उत्सव साजरा करते. या सर्व कष्टदायक प्रवासात तिचं तरुणपण मात्र हरवते. बाळंतपणानंतर आलेल्या आजारपणातून अचानक एक दिवस ती आयुष्याचा किनारा गाठते. ही कहाणी केवळ कवीच्या आईचीच आहे असे नव्हे. थोड्याफार फरकाने दुःख, दारिद्रयात जगणाऱ्या ग्रामीण भागातील कैक स्त्रियांची आहे. यासंदर्भात कवीचे पुढील निवेदन समर्पक ठरते -

“तरीही,

तुला सांगतो, शहाबाई सुदाम कदम ही फक्त तुझीच कहाणी नव्हती।

यमुनाबाई, झुंबरबाई, कौतिकबाई अथवा ती कोणतीही बाई होती।                                          

परिस्थिती कितीही हलाखीची नाजूक टोकदार बनत गेली तरी सोशिक, सहनशील, संयमी, समंजस असलेली आई डगमगली नाही. ती नेहमी ठाम कणखरच होत गेली. याबाबतचे वर्णन करताना कवी म्हणतो-

“दिवसेंदिवस परिस्थिती बनत होती टोकदार।

तरीही तू होतीस ठाम उभी।

बेदरकार।”

अशी कणखर वृतीची आई शेजारधर्माच्या सुख-दुःखाला जागणारी होती. जातीपातीचा विचार न करता माणसाशी माणूस म्हणून वागणारी होती. नवऱ्या-मुलाबाळांसह भावा-बहिणीवर आभाळमाया करणारी होती. माणुसकी, ममत्वाची संवेदना तिच्यात ओतपोत भरून उरली होती. अंत्यदर्शनाच्या वेळी आलेल्या आया-बायांनी व्यक्त केलेल्या पुढील भावनांमधूनही तिच्यातील माणूसकीची, ममत्वाची भावना प्रकट होते-

“घरदार फुलासारखं जपायची ।

फाटक्या कापडांना टाकं घालून पोरं नीट ठिवायची।

आजारात काढलेली वैरण शेजारणीला द्यायची।

तोंडातला घास देऊन आडल्या-नडल्यांची भूक व्हायची।

कलू लागल्या खोपटाची आधार मेढी होवून जायची।”

असं हे ममत्वाचं छत्र हरपल्यानंतर कवी अतीव दुःखी होतो. मनासारखं आयुष्य जगण्याच्या ऐन उमेदीच्या काळातच तिचं जाणं कवीला हतबल करून टाकते. आपल्या आंतरिक भावना व्यक्त करताना कवी म्हणतो -

“पंधरा हे काय लग्नाचं आणि।

तीस हे काय तुझं जाण्याचं वय नव्हतं।

एखाद्याच्या पंखांना बळ मिळण्याच्या।

वयातच तू पंख मिटून घेतलंस।

कायमचं।”

आईला जाऊन तीन तपं झालीत. कवीही परिस्थितीवर मात करत एकाकी पुढं आला आहे. अशा स्थितीत आपली आई असती तर तिचं आणि आपलं नातं कसं राहिलं असतं, याची कल्पना कवी करतो. आई असती तर संवांदाचं पीक बहरल़ं असतं का, की सारचं करपून गेलं असतं, हा प्रश्न त्याला पडतो. कारण आईच्या पश्चात त्याचा ‘बा’शी संवाद हरवलेला आहे. घरामध्ये त्याचं मन कधीच रमलं नाही. फुललं नाही. त्याचं मन नेहमी आईच्या आठवणींमध्येच रमलयं म्हणून कवी म्हणतो-

“म्हणून कधीमधी वाटतं गेली ते बरं झालं।

किमान तुला आठवत जगता तरी आलं।

तुझी पोकळी भरून काढताना।

आठवांच्या पारंब्यांना चांदणं।

लगडून गेलं।”

अबोल बापाच्या दुःख, वेदनेचा हुंकार

मातीत राबून मातीमोल ठरलेला, व्यवहाराच्या गणितात कायम हरलेला, सगळ्यांच्या रोषांचा धनी ठरलेला बाप आयुष्यभर दुःख सहन करत जगला. तो माणसात कमी शेतामातीत, रानाफुलांमध्ये, शेळ्याकोकरांमध्ये अधिक रमला. त्याचा इतरांशी कमी अन् स्वतःचा स्वत:शीच आत्मसंवाद होत राहिला. याच कारण कोरडेच्या कोरडे पिकांशिवाय गेलेले हंगाम अन् खाणाऱ्या तोंडांची खांद्यावर असलेली जबाबदारी. कधी उपकाराची भाषा नाही. अबोल असला तरी नात्यातल्या माणसांना त्यानं कधी दूर लोटलं नाही. कधी परिस्थितीचा त्रागा केला नाही. जगायचं तर काबाडाचं धनी होऊन हेच त्याचं जगण्याचं सूत्र. प्रसंगी ‘आ रे’ला ‘का रे’ अन् जशास तसं वागणं.

असा धसमुसळा, कष्टाळू, अबोल, आत्ममग्न, कणखर, सडेतोड वृत्तीच्या बापाचं दर्शन ही कविता घडवते.

गावमातीतील माणसांच्या बदलत्या संवेदनांचे चित्रण

या दीर्घकवितेतून आई-बा व कवीच्या सत्त्व जपत संघर्षमय जगण्याची कहाणी ज्याप्रमाणे व्यक्त झाली आहे. तसेच गावमातीतील माणसांच्या बदलत्या संवेदनांचे चित्रणही अभिव्यक्त झाले आहे.

बहात्तरचा दुष्काळ वा तदनंतरच्या काळात पूर्वी माणसं एकमेकांच्या सुख दुःखात रमायची. अडीअडचणींना धावून जायची. आता मात्र तसं घडत नाही. माणसं संवाद हरवत चालली आहेत. दुरावत चालली आहेत, याची जाणीव कवीला प्रखरतेने होते. कवी जेव्हा गावाकडे घरी जात येत राहतो, त्या वेळी त्याला माणसं पूर्वीप्रमाणे रस्त्यावर दिलखुलास, मनमोकळं बोलताना दिसत नाहीत. जो तो आपापल्या घाईत, व्यवहारी जगण्याच्या मागे धावताना दिसतो. कुणी कुणाची ख्याली-खुशाली विचारात नाही. कवी म्हणतो-

“चहा टाकून ओट्यावरती।

कुणी कुणाला बोलवत नाही।

ख्याली-खुशालीच्या वार्तांची।

देवाण-घेवाण करीत नाही।”

आजकाल माणसं एकमेकांपासून दूरावत चालली आहेत. एकाकी होत आहेत. वृद्ध माणसं पूर्वी पारावर, झाडाखाली बसून सुख-दुःखं वाटायची पण आता तसं होताना दिसत नाही. दुष्काळ, अन्नधान्याची वाणवा असलेला एक काळ होता पण माणसं एकमेकांचा आधार व्हायची. काळीआई, मुकी जनावरं यांच्यात रमायची. आता मात्र माणसांना काळीआई वा मुक्या जनावरांची आस्था उरलेली दिसत नाही. याची खंत कवीला वाटते. कवी म्हणतो-

“नुसता डांबरी होत चाललेला गाव।

विसरत चालला आहे सारा संवेदनशील।

भाव।

अशा प्रकारे मायमाती, नातीगोती, माणसांबद्दलच्या संवेदना हरवत चालल्याची वेदना ही कविता व्यक्त करते.

सत्त्व पेरणाऱ्या कवीच्या संघर्षाची कहाणी

परिस्थितीवर मात करत, संघर्ष करत कवी एकाकी पुढे आला आहे. आता वयाची पंचेचाळीशी गाठत असताना अनेक प्रकारच्या पडझडीचा काळ त्यानं अनुभवलाय. बालवयातच आईच छत्र हरपल्यानंतर तिच्या जाण्यानं दुःखाचा डोंगर त्यानं अनुभवलाय. कुटुंबातील प्रत्येकासाठी अंधकारमय ठरू पाहणारा तो काळ. घरादाराला प्रचंड अवकळा आणणारा काळ हादरवून टाकणारा आहे. त्या काळाचे वर्णन करताना कवी म्हणतो-

“चारकोपऱ्यात चौघं बसून राह्यचो तास न् तास।

कुणीच नव्हतं सोबतीला नुसतं भास।”

अशा कठीण काळात भाऊबंदांनी वडलांची साथ सोडली. बहिणीची भाकरीसाठी कायमची शाळा सुटली. लहान्याचे हाल झाले. अशाही स्थितीत कवीने शिक्षणाची पाठ सोडली नाही. बिनातेलाची चटणी भाकरी एकट्यानं बसून खाली. मित्रांत मन रमेना अशा हालातीत पुस्तकांशी मैत्री केली-

“ह्या रोजमर्रा लढाईत शिक्षणाचं खरं नव्हतं।

केली पुस्तकांशी मैत्री अनेकदा।’

दिवाळी, उन्हाळ सुट्टीत प्रसंगी खडी फोडली. विहिरी, मुरुम खोदले. पुढे टेलरिंग काम केले. अशी अनेक कामं करत शिक्षण पूर्ण केले. यात बालपण हरवले पण शिक्षणाची कास कधी सोडली नाही.

“शिक्षणासाठी चाललेल्या वृथा वणवणीची।

फुल्यांच्या असूडानं करीत होतो नोंदवणी।

तरी उगवत राहिली रोज नवी वारूळलेणी।

घरातल्या उजेडाला सतत चिणत।

होत कोणी।”

अशा प्रकारे परिस्थितीवर मात करत काम व शिक्षणाची सांगड घालत शिक्षकपदापर्यंत कवी प्रवास करतो. या संघर्षाच्या काळात त्याच्या वाट्याला आलेली सुख-दुःखं, व्यथा-वेदना वर्गातील पोरांना आर्वजून सांगतो. पोरकेपणा वाट्याला आलेल्यांना नवी वाट दाखवण्यासाठी धडपडतो. कारण आईनं सत्त्व जपत सत्त्व पेरलं. तेच तो जपतो, तेच तो  पेरतो. कारण त्यानं दुधारक्तासह शोषून आईकडून तेच घेतलंय. म्हणून कवी म्हणतो-

“एक मात्र खरं।

दुधारक्तासह तुला शोषून घेताना।

माझ्यात जे उतरलंय।

ते प्राणपणानं जपत।

पोरांमध्ये पेरतोय।

मातीत पाय रोवून।

आभाळाकडं पाहताना।

कुणाचंच बोट रिकामं असू नये।म्हणून डोळ्यांत तेल घालून।

काळजी घेतोय।”

अशा प्रकारे ‘तू जाऊन तीन तपं झाली’ ही दीर्घकविता सत्त्व जपणाऱ्या आई-बा व ‘मी’च्या संघर्षाची कहाणी अभिव्यक्त करते.     

..................................................................................................................................................................

तू जाऊन तीन तपं झाली - महेंद्र कदम,

रेखाटन प्रकाशन, कोल्हापूर, पाने- ३६, मूल्य – ५० रुपये.

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......