माणसाने ‘उभ्या’ला ‘आडवे’ म्हणू नये, तसे ‘पाडवा’ या सणालाही पाडवा न म्हणता ‘गुढी उभारनी’ असे म्हणावे!
ग्रंथनामा - आगामी
सुधीर रा. देवरे
  • ‘आस्वाद : भावलेल्या कवितांचा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 13 March 2020
  • ग्रंथनामा आगामी आस्वाद : भावलेल्या कवितांचा सुधीर देवरे

‘आस्वाद : भावलेल्या कवितांचा’ हे डॉ. सुधीर रा. देवरे यांचे समीक्षेचे पुस्तक वर्णमुद्रा प्रकाशनाकडून लवकरच प्रकाशित होत आहे. त्यातील हे एक प्रकरण...

............................................................................................................................................................

बहिणाबाई चौधरी यांच्या ‘गुढी उभारनी’ या कवितेच्या प्रत्यक्ष आस्वादाआधी मूळ कविता -

गुढीपाडव्याचा सन

आतां उभारा रे गुढी

नव्या वरसाचं देनं

सोडा मनांतली आढी

गेलसालीं गेली आढी

आतां पाडवा पाडवा

तुम्ही येरांयेरांवरी

लोभ वाढवा वाढवा

अरे, उठा झाडा आंग

गुढीपाडव्याचा सन

आतां आंगन झाडूनी

गेली राधी महारीन

कसे पडले घोरत

असे निस्सयेलावानी

हां हां म्हनतां गेला रे

रामपहार निंघूनी

आतां पोथारा हे घर

सुधारा रे पडझडी

करीसन सारवन

दारीं उभारा रे गुढी

चैत्राच्या या उन्हामधीं

जीव व्हये कासाईस

रामनाम घ्या रे आतां

रामनवमीचा दीस

पडी जातो तो ‘पाडवा’

करा माझी सुधारनी

आतां गुढीपाडव्याले

म्हना ‘गुढी उभारनी’

काय लोकाचीबी तर्‍हा

कसे भांग घोटा पेल्हे

उभा जमीनीच्या मधीं

आड म्हनती उभ्याले

आस म्हनूं नही कधीं

जसं उभ्याले आडवा

गुढी उभारतो त्याले

कसं म्हनती पाडवा?           

गुढी पाडव्याचा सण असल्याने आज आपण सर्वजण गुढी उभारू या. गुढी पाडव्यापासून आपण मराठी नववर्षाची सुरुवात होते असे मानतो. म्हणून या नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर आपल्या मनात कोणाबद्दल आजपर्यंतची जी अढी निर्माण झाली असेल, गैरसमज असतील, ते विसरून जाऊ आणि नवीन वर्षाचा नवा विचार करू या, असे बहिणाबाई सुरुवातीलाच आवाहन करतात.

गेलसालीं गेली आढी                                                  

आतां पाडवा पाडवा                                                   

तुम्ही येरांयेरांवरी                                                    

लोभ वाढवा वाढवा

गेल्या साली म्हणजेच या मागच्या काळात आपल्या मनात एखाद्याबद्दल अढी निर्माण झाली असेलही. पण आज पाडवा हा शुभ दिवस नवीन वर्षाची सुरुवात घेऊन आल्यामुळे आपण सगळ्यांनी एक व्हावे आणि एकमेकांशी आपला लोभ वाढवावा, जुने मतभेद विसरून जावेत असे बहिणाबाई पुढे म्हणतात. (‘येरांयेरांवरी’ हा शब्द अहिराणीसह काही बोली भाषांमध्ये आढळतो. येरांयेरांवरी म्हणजे ‘एकमेकांवर’.)

अरे, उठा झाडा आंग     

गुढीपाडव्याचा सन   

आतां आंगन झाडूनी          

गेली राधी महारीन

आज पाडवा हा सण असल्यामुळे बहिणाबाई अगदी पहाटेच आजूबाजूला झोपलेल्या लोकांना आवाहन करतात, झोपेतून ऊठा, आंगण झाडा म्हणजे आळस झटका, अंघोळी करा. आत्ताच बाहेर राधी महारीन आंगण म्हणजे गल्ल्या झाडून गेली आहे. ज्या काळात कवयित्रीने कविता लिहिली, त्या काळी विशिष्ट एका गावी राधी महारीन नावाची महिला पहाटे गल्ल्या झाडत असावी. बहिणाबाईंच्या तत्कालीन काळातली विशिष्ट जीवन जाणीव, गावपरंपरा या कवितेत अधोरेखित झाली आहे (जातीयवाद नव्हे). 

कसे पडले घोरत                  

असे निस्सयेलावानी     

हां हां म्हनतां गेला रे       

रामपहार निंघूनी

ज्यांना कवयित्री झोपेतून उठायचे आवाहन करत आहे, ते लोक इतक्या सुंदर पहाटेला अंथरुणात घोरत पडले आहेत. निस्सायेल- निसवायेल हा शब्द अहिराणी बोलीभाषेसह अजून काही बोलींमध्ये आढळून येतो. त्याचा अर्थ आहे निर्लज्ज अथवा कोणतीही काळजी नसलेला. निष्काळजी माणसासारखे झोपून राहिल्यामुळे, घोरत पडल्यामुळे घरावर गुढी उभारायचा जो मुहूर्त असतो रामपहार- रामाची पहार- पहाट ‍तो मुहूर्त निघून चालला आहे, असे क‍वयित्री आपल्या कवितेत म्हणतात.

आतां पोथारा हे घर      

सुधारा रे पडझडी    

करीसन सारवन             

दारीं उभारा रे गुढी

घर पोतारणे ही एक लोकपरंपरा आहे. पूर्वी ग्रामीण भागात मातीची घरे असत. मातीच्या भिंती असत. अंगण, ओटा, घराची जमीन जशी शेणाने सारवली जात, तशा मातीच्या भिंती सणासुदीच्या दिवशी पांढर्‍याशुभ्र मातीच्या पाण्याने कापडाच्या साहाय्याने पोतारत असत- सारवत असत. त्याला ‘पोथारा हे घर’ असे बहिणाबाई म्हणतात. भिंतींच्या पडझडी झाल्या असतील तर त्या सुधारा, डागडुजी करा, सारवण करा आणि मग गुढी उभारा असे आवाहन कवितेत आहे. ‘घर’ या शब्दाचाही इथे प्रतीकात्मक अर्थ आहे. घर म्हणजे हे गाव, विश्व, व्यवस्था. ‘पडझडी सुधारा’ याचा लक्षणार्थ- व्यंगार्थही इथे दिसतो. नात्यागोत्यांमध्ये जर काही पडझडी झाल्या असतील तर या शुभ मुहूर्तावर त्या सुधारा. एकमेकांशी गोड व्हा, असा संदेश देण्याचा प्रयत्न कवयित्री करतात.

चैत्राच्या या उन्हामधीं 

जीव व्हये कासाईस        

रामनाम घ्या रे आतां        

रामनवमीचा दीस

चैत्राच्या सुरुवातीला पाडवा आणि लगेच नऊ दिवसांनी रामनवमी येते. चैत्र महिना म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यात जीव कासावीस होतो म्हणून रामनवमीच्या निमित्ताने तरी रामाचे नाव घ्या, म्हणजे जीवनातला नकोनकोसा उन्हाळाही थोडा हलका होईल, अशी पारंपरिक लोकसमजूत कवयित्री इथे उदधृत करतात.

पडी जातो तो ‘पाडवा’  

करा माझी सुधारनी

आतां गुढीपाडव्याले    

म्हना ‘गुढी उभारनी’

गुढी पाडव्याची गुढीच आपल्याशी बोलते आहे, अशी ही रचना असून पडतो तो पाडवा असा जर पाडवा या संज्ञेचा सरळ अर्थ असेल तर मला पाडवा असे न म्हणता ‘गुढी उभारनी’ असे म्हणावे, अशी सुधारणा करण्याचे आवाहन स्वत: पाडवा हा सण आपल्याला करताना दिसतो.

काय लोकाचीबी तर्‍हा            

कसे भांग घोटा पेल्हे    

उभा जमीनीच्या मधीं    

आड म्हनती उभ्याले

‘पाडवा’ हा शब्द जसा गुढीला छेद देतो, म्हणजे पाडवा याचा अर्थ पडून जाणे असा असूनही गुढी मात्र उभारली जाते. तसाच आड हा जमिनीच्या पोटात सरळ खोल असा उभा गेलेला असूनही लोक त्याला आड म्हणजे आडवा म्हणतात, अशी टिपणी कवयित्री करतात. आणि ज्या लोकांनी आड आणि पाडवा अशा उलट्या संज्ञा तयार केल्यात, ते लोक भांगेच्या नशेत होते की काय अशी आपली शंका बोलून दाखवतात. लोकपरंपरेने- लोकसंचिताने दिलेल्या संज्ञाच कशा विपरीत आहेत, याची चिकित्सा करत आपल्या काही पारंपरिक संज्ञा आणि कृती कशा परस्पर विरुद्ध आहेत, असे दाखवण्याचा प्रयत्न इथे कवयित्री करताना दिसतात.

आसं म्हनूं नही कधीं

जसं उभ्याले आडवा     

गुढी उभारतो त्याले         

कसं म्हनती पाडवा?

आणि म्हणून शेवटी कवयित्री आपल्या सगळ्यांना आवाहन करतात की, माणसाने उभ्याला आडवे म्हणू नये, तसे पाडवा या सणालाही पाडवा न म्हणता गुढी उभारनी असे म्हणावे. शेवटच्या दोन कडव्यांमध्ये बहिणाबाईंनी त्या काळीही ‘ब्लॅक कॉमेडी’ केली आहे, असे म्हणायला इथे वाव आहे.

............................................................................................................................................................

‘आस्वाद : भावलेल्या कवितांचा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5173/Aswad-Bhavalelya-kavitancha

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......