तुडवण : ग्रामीण महाराष्ट्रातील सुशिक्षितांच्या जगण्याची काटेरी शोकात्म व्यथा
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
सुरेन्द्र रावसाहेब पाटील
  • ‘तुडवण’चे मुखपृष्ठ
  • Fri , 21 February 2020
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस तुडवण Tudavan कैलास दौंड Kailas Daund

काही वर्षांपूर्वी बारावीनंतर डी.एड. केले की, तरुणांना मास्तरकीच्या चांगल्या संधी होत्या. बारावीनंतर दोन वर्षं झाले की, मुलं मास्तरकी करत जीवनमान बदलू लागली. मग डी.एड. कॉलेजेसचा बाजार इतका वाढला की, हजारो डी. एड. पदवीधारक बाहेर पडू लागले. त्यातून शासनाची धोरणं बदलली. डी एड. नंतर सीईटी, मग टीईटी पास केल्यानंतरही लाखोंचे डोनेशन दिल्यानंतरच त्यांचा विचार होऊ लागला. गरीब तरुणांसाठी हे अडचणीचं होते. पुढे अशा जागा भरणंही जवळजवळ थांबलं. त्यातून बेकारांची फौज गावोगावी निर्माण झाली. हजारो रुपये घालून शिकलेल्या या तरुणांच्या कुटुंबाची मुलाकडून घराला वर आणण्याची जी अपेक्षा असते, ती पाण्यात जायला लागली. त्यामुळे तरुणांचीच नव्हे त्या पूर्ण कुटुंबाची मानसिक, आर्थिक तुडवण व्हायला लागली. यातून प्रश्नांच्या साखळ्या वाढतच चालल्या.

कैलास दौंड हे वर्तमानाला थेटपणे भिडणारे कादंबरीकार. ‘पाणधुई’, ‘कापूसकाळ’ या कादंबरीनंतर ‘तुडवण’ या कादंबरीतून त्यांनी अनेक सुक्ष्म प्रश्नांच्या ताण्याबाण्यानं मांडली आहे. ही नारायण या डी. एड.धारक सुशिक्षित तरुणाच्या कुटुंबाची शोकांतिका आहे. नवनाथ, राधाक्का, नारायणची पत्नी यांची नारायणसोबत झालेली परवड वाचकांना सुन्न करून टाकते. हेच चित्र आजच्या शिक्षण व्यवस्थेतून येत असेल, तर अशा शिक्षणाचे फलित हेच काय, असा सवालही मनात आल्याशिवाय राहत नाही.

वडील नवनाथ नोकरीच्या डोनेशनसाठी जमीन विकायला तयार होत नाहीत, म्हणून नारायण रागाने घर सोडतो. चंदनचोरी करणाऱ्या टोळीत तो सामील होतो, परंतु त्यात त्याचे मन धजावत नाही. शिक्षणातून हाती काही लागत नाही, म्हणून तो आपला मार्ग बदलतो. नारायण उल्हासनगर गाठतो. तिथं गाडी शिकायच्या इच्छेने क्लीनर म्हणून सिंधी शेठकडे राहतो. तिथं अर्धपोटी राहत, गॅरेजमध्ये डास उंदराच्या सान्निध्यात तो दिवस काढतो. आपण गाडी शिकून लायसन मिळवावे, गाडीवर किंवा जमल्यास बसचा ड्रायव्हर व्हावे, अशी स्वप्ने त्याला पडतात.

दरम्यान त्याला गावाकडे मेव्हण्याने ठरवलेल्या मुलीबरोबर लग्न करावे लागते. लग्नानंतरही तो परत गाडीच्या लायसनसाठी गाव सोडून उल्हासनगरला जातो. जीवनात बायको आल्यामुळे त्याची टेम्पो घेऊन गावात स्थिर व्हायची इच्छा बळावते. त्यासाठी आई राधाक्क्का पती नवनाथला बळजबरीने जमीन विकायला भाग पाडते. टेम्पो घेतल्यावर आपले कुटुंब वरती येईल, असं नारायणला वाटतानाच उद्विग्न नवनाथ रागाने घर सोडून गावातून बेपत्ता होतो. एकानंतर एक संकटांत भरच पडते आणि त्या कुटुंबाच्या जगण्याची जी तुडवण होते, ती कैलास दौंड यांच्या शब्दांत वाचावी अशीच आहे.

या कादंबरीतून कोरडवाहू शेतीतले अनेक प्रश्न बारकाव्यानं आलेले आहेत. निरुपयोगी शिक्षणप्रणाली, बेभवशाची शेती, राजकारण, विकासापासून वंचित असलेल्या बकाल वाड्या-वस्त्या, छिन्न गावपरिसर, शहरी चमकदमक, कौटुंबिक घुसमट, भ्रष्टाचार, व्यक्तीप्रवृत्ती, मानवी हव्यासाचं छोट्याच प्रसंगातून केलेलं अचूक चित्रण लेखकाने प्रभावीपणे दाखवले आहे.

कादंबरीत रोह्यला, जमनी, तुकाराम, रुपली, भास्कर तोडकर, विष्णू ही काही पात्रेही आपापली स्वप्न, दु:खे, रागलोभ घेऊन कादंबरीला आकार देतात. कादंबरीत अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी परिसरारातली बोलीभाषा कादंबरीतल्या प्रसंगाला पूरक अशीच आहे. परिसरातले शब्द, वाक्प्रचार, म्हणी जागोजागी आल्यानं निवेदन प्रवाही झाले आहेत. उदाहरणार्थ पुढील म्हणी बघा- ‘उठ रे चिंदा, त्योच धंदा’, ‘काय मह्या घरात आन् वक मह्या दारात’ इत्यादी.

कादंबरीतली बोलीभाषा या कादंबरीचे बलस्थान म्हणावे लागेल. लेखनात चित्रमयता असल्याने प्रसंग ठळकपणे समोर उभे राहतात, कादंबरीत संवाद कमी आणि निवेदन अधिक आहे. काही वेळा तर ते दोन पानी  दीर्घ येते, परंतु त्यामुळे कथनाची लय बिघडत नाही किंवा विस्कळीत वाटत नाही. कारण कादंबरीचे दमदार निवेदन व वाचनीयता हे तुडवणचे वैशिष्ट्य आहे.

गाव आणि शहरं प्रश्नाने वेढली आहेत. जगण्याच्या लढाया दोन्हीकडे चालूच आहेत. गाव-शहरात  आता विशेष अंतर नाही. गावात मत्सर हेवेदावे, सत्शील माणसे, सारेच आहे. मंदिराच्या सप्ताहासाठी लोक पट्टी करतात, परंतु शाळा डिजिटल करायच्या खर्चासाठी शिक्षक बाहेरगावी जाऊन पट्टी मागतात, अशा अनेक विसंगती लेखक मांडतो. गावी इतरांसाठी हळहळणारी माणसे आहेत, तोंडापुरतं झटणारी माणसं आहेत. तशी भास्कर तोडकरसारखी पोटात पाप ठेवणारी उलट्या काळजाची माणसे आहेत. शिक्षणातून नोकरीची अपेक्षा ठेवणे तरुणांनी सोडून दिलंय, ते आपल्या कुवतीनुसार जगण्याचे मार्ग शोधत आहेत. संघर्ष करत आहेत.

कैलास दौंड यांचा नारायण शिक्षणव्यवस्थेला दोष न देता जगण्याचा लढा चिवटपणे लढतोच. तो कापसाच्या गाड्यावर रोजंदारीनं जातो, ट्रकवर क्लीनर होतो, आजच्या तरुणाईचे हे प्रतिनिधीक रूप लेखकाचे वेगळेपण आहे. तो मास्तरकीच्या नोकरीची आशा सोडून अनेक पर्याय शोधतो, हे मला महत्त्वाचे वाटते.

कादंबरीत अनेक नाट्यमय प्रसंग आहेत, परंतु त्यास अनावश्यक न वाढवता तटस्थपणे लेखक पुढे जातो. राधाक्कावर अत्याचाराचा प्रसंग झाल्यानंतर नवनाथ, नारायण, जमिनीची मानसिक आंदोलने टिपायला लेखक विसरला की, संपादनात ती वगळलीत, हे मला समजले नाही. कारण राधाक्का हे महत्त्वाचे पात्र या प्रसंगानंतर खूपच वेगळे होऊन जाते. या प्रसंगाचे वर्णन अतिशय कौशल्याने लेखकाने हाताळले आहे. कुटुंबाची आंदोलने स्पष्टपणे यायला हवी होती.

‘तुडवण’ ही आजच्या तरुण पिढीची काटेरी शोकात्म व्यथाच आहे. ही जेव्हा संपली तेव्हा प्रचंड अस्वस्थ झालो. नारायणबाबत घडलेला शेवटचा प्रसंग वाचताना काळजात कालवाकालव झाली. तो प्रसंग सांगणे इथे उचित नाही, तो मुळातून वाचावा.

‘तुडवण’ शिकलेल्यांच्या प्रश्नाविषयी सजग करते. यामध्ये एक अख्खा गाव अनेक प्रश्नाच्या सोबतीनं ठळकपणे उभा राहतो. जो तुमचा माझा कोणाचाही असू शकेल. गाव, दुष्काळ, कोरडवाहू शेतकऱ्याची जगण्याची धडपड, शिक्षणव्यवस्थेतील फोलपणा, तरुणांचं अंध:कारमय भविष्य, नातीगोती, रिवाज, पैशासाठी पायदळी चाललेली माणुसकी, याचे विस्मयकारक जग या कादंबरीतून लेखकाने उभे केले आहे. हे जग आजच्या वर्तमानाचेच भयावह प्रतिबिंब आहे.

सतीश भावसार यांनी रंगवलेले कादंबरीचे आशयपूर्ण मुखपृष्ठही वेधक आहे. निष्पर्ण होत जाऊन मोडलेलं झाड आजच्या तरुणाईचं प्रतीकात्मक रूप चित्रकारानं छान रंगवलंय. गावामागे काळा डोंगर, युवकाच्या भोवती उदास करडा रंग त्यानी सूचकपणे वापरला आहे.

.............................................................................................................................................

‘तुडवण’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5176/Tudawan

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......