‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ : गोंधळवणारा, सैरभैर करणारा, तरीही फुकाच्या मिरवण्याला महत्त्व देणारा कालखंड
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
मेघश्री दळवी
  • ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Fri , 08 November 2019
  • ग्रंथनामा शिफारस दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी Don Shatakanchya Sandhyavarchya Nondi बालाजी सुतार Balaji Sutar

बालाजी सुतार हे आजच्या लिहित्या लेखकांमधलं एक महत्त्वाचं नाव. नुकताच त्यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा ‘कथाकार शांताराम पुरस्कार’ जाहीर झाला आहे, तो यथोचितच म्हणायला हवा. त्यासाठी त्यांचं मन:पूर्वक अभिनंदन! ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ हा बालाजी सुतार यांचा या वर्षी प्रकाशित झालेला संग्रह. याच वर्षी त्याची दुसरी आवृत्ती निघाली ही बाब खास नोंद घ्यावी अशी. शब्द पब्लिकेशनचं हे पुस्तक वाचून पूर्ण केल्यावर चार जणांना आवर्जून सुचवावंसं वाटलं. असं काय आहे त्यात?

कथालेखनाचा काळ विसावं आणि एकविसावं शतक जोडणार्‍या पंचवीसेक वर्षांमधला. या काळात जगात उलथापालथ झालीच, भारतातही खूप बदल झाले. खासगीकरण, उदारीकरण, आणि जागतिकीकरण झालं! सोबत तंत्रज्ञान आपल्याकडे फार वेगानं आलं. डेस्कटॉपकडे नवलाईनं पाहणारी माणसं बघता बघता मोबाईल सहजतेनं हाताळायला लागली, इंटरनेट वापरून वेबवर विहरायला लागली. जगायच्या नव्या पद्धती समजून घ्यायला लागली. बाजारीकरणाला सरावली. शहराप्रमाणे निमशहरी भागातही या सगळ्या बदलाचे पडसाद उमटले. माणसं अस्वस्थ झाली, एकेकदा नक्की कशानं ते ठाऊक नाही अशा मन:स्थितीत अडकली. ‘विच्छिन्न भोवतालचे संदर्भ’ या कथेत म्हटल्यासारखे “सतत येणार्‍या बधिर कंटाळ्याचं काय करावे हे त्याला नीट उमगत नाही, एवढीच त्याची गोची आहे.” अशी गोची झालेली पात्रं या कथांमधून भेटत राहतात. सुतार यांचं कसब की, ते या पात्रांच्या आतलं आयुष्य नेमकं टिपून आपल्यासमोर मांडतात.

‘डहूळ डोहातले भोवरे’मधला हरिश्चंद्र एका विचित्र परिस्थितीतून जात आहे. एका बाईच्या आत्महत्येनंतर तो आपलं हतबल आयुष्य तपासून पाहतो. ‘राख झाल्या चितेचे तपशील शोधण्यात नंतर काय हशील होतं?’ हा प्रश्न सतावत असताना तो आपल्या परीनं एक उपाय काढू पाहतो. यातली शांताराम, व्यंकटी ही पात्र नेमकी उभी राहिली आहेत आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर हरिश्चंद्रचा डहूळला डोह आपल्या मनातही कुठकुठले प्रश्न उमटवून जातो.

सोशल मीडिया, त्यातलं आभासी जग आणि तिथली फसवी-तात्पुरती नाती हा विषय अलीकडे अनेक कथाकारांना खुणावत असतो. त्यातला फोलपणा ते आपल्या पद्धतीनं शोधत असतात. त्या प्रकारची संग्रहातली कथा ‘निळ्या चमकदार काळोखातले अप-डाऊन्स’. कम्प्युटरच्या निळसर चमकदार पडद्यामागचं जग निवेदिकेच्या आयुष्यात एक हलचल माजवून जाते. थोड्या काळापुरती. स्त्री-पुरुष नात्यांचा आदिम अर्थ कायम तोच असतो का, याचा निर्देश त्यात आहे. पण एक सर्वसामान्य स्त्री हेही शांतपणे पचवून पुढे जाते, हे विशेष लक्षात घेण्यासारखं.

अस्वस्थ, नव्या काळाला जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, स्वत:ची कोणतीही निश्चित आयडेंटिटी सापडत नसणारं असं एक वेगळं विश्व सुतार यांच्या लेखनात आहे. निमशहरी किंवा शहरातल्या अपरिचित भागातल्या माणसांचं. तंत्रज्ञान तिथं पोचलंय, बातम्या आणि इतर माहिती, व्हिडिओचं जग हाताशी आहे. आयुष्यातल्या अपरिहार्य घटना वा तडजोडी निमूट घेतल्या जात आहेत. पण त्याच वेळी एक बिनकामाचा निवांतपणा आहे आणि त्याचं काय करायचं हे निश्चित नसल्यासारखी ही माणसं रोजच्या आयुष्यात काही अर्थ शोधू पाहत आहेत. ‘विच्छिन्न भोवतालचे संदर्भ’मधला राघव असाच. एका कम्प्युटर सेंटरवर नोकरी करणारा. फारसं काही न घडणारं आयुष्य, त्यातली काही माणसांच्या आतल्या दु:खाशी आपलं दु:ख उगीचच ताडून पाहणारा. ज्या काळाविषयी हा संग्रह आहे, त्यावर जास्त न बोलता भाष्य करणारी ही कथा आहे.

साहित्याचं जग खूप भावत आहे, कविता करणं सुरू आहे, पण त्या स्वप्नवत जगात शिरताना वास्तव जग इतकं सहज नाही सोडता येत, हे ‘दोन जगातला कवी’ या कथेत अत्यंत प्रभावीपणे आलं आहे. या कथेतला कवीसंमेलनाचा माहोल, सादरीकरणावरून राजाचा उद्वेग, तिथले श्रोते आणि कवी, कवितेवरची चर्चा, त्याच वेळी आपली इतर कर्तव्य सांभाळण्याची राजाची तगमग प्रचंड जिवंतपणे आलीय. ‘पर्सनल इज युनिव्हर्सल’ याचा क्षणोक्षणी प्रत्यय कथेत येत राहतो.

‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथेचा कालावधी मोठा आहे, आणि एकूणच कॅनव्हासदेखील बरंच काही कवेत घेणारा. १९९२च्या दंगली. त्यात बिलालचा संदर्भ. मग पुढे २००८मध्ये पाण्याच्या प्रश्नावरचं राजकारण आणि गावपातळीवरचं समाजकारण. नंतर २०१३मध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्येमागचं अर्थकारण, आणि २०१७मधली हलवून टाकणारी टिपणं. रूढार्थानं कथा नसलेल्या या नोंदी एका संवेदनशील मनानं टिपलेल्या आहेत. बालाजी सुतार यांच्या लेखनात एक वेगळं सामर्थ्य जाणवतं ते यासारख्या कथांमुळे. 

शिक्षणक्षेत्रातला बजबजाट आणि त्यानं निर्माण केलेले उच्चशिक्षितांचे चमत्कारिक प्रश्न हे आजचं वास्तव. विशेषत: शिकून चांगली नोकरी करून कुटुंबाला वर काढण्याच्या उद्देशानं कष्ट करून घेतलेलं शिक्षण आणि त्याची प्रत्यक्षातली किंमत हे प्रखरतेनं दिसतं ते तालुका किंवा निमशहरी पातळीवर. सोबत आज त्यात पैशांचं साधन बनलेल्या शिक्षणसंस्था आणि स्पर्धा परीक्षा केंद्रं हे ‘पराभवच्या बखरीतली काही पानं’ या कथेतून सामोरं येतं. धर्म, जातीयता, पैसा, सत्तेच्या अमर्याद वापराखाली भरडले जात कसल्याही कामाला जुंपलेले शिक्षक-प्राध्यापक, स्त्री-पुरुष संबंधांमध्ये एकीकडे येत चाललेला मोकळेपणा, पण दुसरीकडे न टाळता येणारं गावकुसातलं पारंपरिक आयुष्य अशा पार्श्वभूमीवर निवेदकाची पराभूत आणि भ्रमनिरास झालेली स्थिती विलक्षण विदारकतेनं येते.

‘अमानवाच्या जात्यातला पाळू’ या कथेत तालुक्याचा गाव आहे. त्यात जातीय ध्रुवीकरण आहे. तिथल्या करीमनगर वस्तीतली अनुबाई ही उद्योगी स्त्री करीमभाईच्या पोरग्याला धरून आहे. कथेला पदर वस्तीतल्या अनेक गोष्टींचे आहेत. पुढे या पोराचा मृत्यूनंतर आणि तिच्या निष्क्रिय नवर्‍याच्या मृत्यूनंतर वस्तीपलीकडील जगाचे. पुरुषाची नजर ओळखून राहणारी अनुबाई पुन्हा पुन्हा त्याच नजरेच्या परिघात येत राहते. पुढे तर जातीधर्माच्या राजकारणात एक प्यादं होऊन. ही समस्या नवी नाही, पण इथली संयत हाताळणी अस्सल आहे. एकूणच सुतार यांचं लेखन कमालीच्या काटेकोरपणे संयम राखून आहे, आणि ते त्यांचं बलस्थान आहे.

थिजलेल्या निरुद्देश आयुष्याचे संदर्भ वारंवार आले तरी या कथा निराशावादी सूर काढत नाहीत. तिथं राजकारण आणि समाजजीवन आहे, तसं स्वीकारलेलं दिसतं. माणसं बंड वगैरे करून उठत नसली तरी आयुष्य पूर्ण फोलदेखील नाही मानत. कधीतरी घेतलेला शकूचा रसरशीत अनुभव आठवत राहणारा ‘पराभवच्या बखरीतली काही पानं’मधला निवेदक आयुष्यातल्या पोकळ्या समजून उमजून राहताना दिसतो.  ‘संधिकाळातले जहरी प्रहर’कथेतला निवेदक बर्‍यापैकी निरुत्साहात आहे, काहीच बदलत नाही या संभ्रमात आहे. नव्या शतकाच्या पहाटेदेखील त्याला फार काही वाटत नाही. हीच कदाचित या संग्रहाचं निदर्शक संकल्पना म्हणावी लागेल.

या संग्रहातल्या आठ कथा अतिशय वेगवेगळे विषय कौशल्यानं हाताळणार्‍या आणि तरीही एका धाग्यात बांधता येतील अशा, संक्रमणाचा काळ आणि त्यातली बदलती नाती यांच्या संदर्भात माणसांचं आजचं आयुष्य तपासणार्‍या आहेत. या बदलत्या काळात स्त्री-पुरुष संबंधांचे बदलते आयाम, त्यांचं डळमळतं समीकरण, यासोबत एकूणच एकमेकांना जोखून बघणारी नाती आहेत. अगदी मित्रा-मित्रांमधला अलिप्तपणा आणि कोरडेपणा जाणवणारा. हात राखून जेवढ्यास तेवढे संबंध हीच बहुधा या काळाची लक्षणीय ओळख. हा गोंधळवणारा, सैरभैर करणारा, तरीही फुकाच्या मिरवण्याला महत्त्व देणारा कालखंड अनुभवला असेल तर हे सशक्त लेखन अधिकच भिडत जातं.

या कथा आजच्या डोळस लेखकाच्या आहेत. लेखनात प्रयोग करण्यासाठी लागणारी सर्जनशीलता त्याच्याकडे आहे. पण लेखकाला जे सांगायचं आहे ते प्रयोगांमध्ये कुठेच झाकोळून जात नाही हे विशेष. केवळ प्रयोगात अडकून राहणं टाळणारी वस्तुनिष्ठता असल्यानं बालाजी सुतार यांच्या कथा निश्चितच आश्वासक ठरतात.

शीर्षकात अस्वस्थ शब्द नसला तरी दोन शतकांच्या मध्यावरचा तो सांधा आणि त्यावरची माणसं अस्वस्थ आहेत. त्यांचं सूक्ष्म निरीक्षण आणि ताकदीनं मांडणी दिसून येणारं हे लेखन आपल्यालाही अवस्थ करून सोडतं यात शंकाच नाही.

............................................................................................................................................................

‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथासंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4781/Don-Shatakanchya-Sandhyawarchya-Nondi

............................................................................................................................................................

लेखिका मेघश्री दळवी विज्ञानकथालेखक व समीक्षक असून आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.

meghashri@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......