ही कादंबरी आहे किंवा नाही? हे पुस्तक आहे किंवा नाही? हे तुम्ही वाचल्यावर ठरवा.
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अंगद तौर
  • 'बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या' या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 07 September 2019
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस Mahesh Leelapandit बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या Barkulya barkulya shtorya प्रसाद कुमठेकर Prasad Kumthekar

गोष्टी ऐकत आपण मोठं झालो. एक होता राजा. एक होती राणी. अकबर-बिरबल. इसापनीती. भूतखेत आणि बरंच काही. इतिहासाच्या पुस्तकात माणसाची गोष्टही होती. पण गोष्टीबरोबर आपण ‘ष्टोऱ्या’ही ऐकल्यात. ष्टोरी वेगळी अन् गोष्ट वेगळी.

लहानपणी आपला एखादा दोस्त व्हिडिओत पिच्चर पाहून यायचा. मग आपण त्याला विचारायचो, कसा होता पिच्चर? तो म्हणायचा, ‘पिच्चर भारी होता, पण मी त्यातलं मेन मेन सांगतो तुला. सगळी ‘ष्टोरी’ सांगितल्यावर तुला पिच्चर बघायला काही मजा येणार नाही.’ सगळं उघड न करता गुपित लपून ठेवते कोपऱ्यात, ती असते ष्टोरी. किंवा एखादा जवळचा माणूस बोलता बोलता सहज म्हणतो, “थांब अरे, खरी ष्टोरी मी तुला सांगतो.” या उलट गोष्टी तर कुणी कुणाला सांगतं. गोष्टींची पुस्तकं असतात. पण ‘ष्टोऱ्यां’ची पुस्तकं वाचली आहेत का तुम्ही? गोष्टी कधी कधी खोट्या असतात, पण ष्टोऱ्या मात्र अस्सल!

प्रसाद कुमठेकर हा लेखक आपल्याला अशाच बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या सांगत राहतो. ही कादंबरी आहे किंवा नाही? हे पुस्तक आहे किंवा नाही? ते तुम्ही वाचल्यावर ठरवा. पण हे जे काही आहे, ते हातात घेतलं की, तुम्ही संपेस्तोवर खाली ठेवू शकत नाही. हे वाचून झाल्यानंतर येणारी अस्वस्थता शब्दबद्ध करणं अवघड आहे. आजी अचानक आजारी पडली की म्हणायची, मला कसंतरीच होतंय. आजीला कसंतरी होतंय म्हणजे काय होतंय हे फक्त आजी आणि डॉक्टर दोघांनाच कळायचं. ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ वाचून कसंतरी होणं काय असतं, याचा अनुभव येतो.

वाट पाहूनही एसटी वेळवर येईना म्हणून नाईलाजानं शेवटी कदरलेला एखादा माणूस काळीपिवळीच्या अंगाला लोंबकाळतो. अन मग एसटीला, व्यवस्थेला अन शेवटी स्वतःच्या जिंदगीला शिव्या देत राहतो. तिथं त्यालाही असाच एखादा कदरलेला माणूस भेटला. दोघांच्या गप्पा रंगल्या. व्यथेच्या. सुखःदुखाच्या. वाऱ्याचा भरारा. तुटलेल्या डांबरी रस्त्यावर हेलकावे खात पोटात खड्डे पाडत जीप अंतर कापतीये. त्यात त्यो माणूस म्हणतो, ‘‘सगळे पक्कं धरा रे. खाली पडलोत तर हे जीपवाले आपल्याला काहीच देत नसतेत. एसटीवाले म्हणतेन एवढी दम नव्हती का? लोकं म्हणतेन कुठं नांगुर हाणायला जायचं होतं एवढ्या घाईत? पार जीपच्या बोकांडी जाऊन बसले. तवा आपणंच एकमेकांचा आधार झालं पाहिजे. मी या लोखंडी पिंजऱ्याला धरतो. तुम्ही मला धरा. अन् बोनटवर बसलेला पोऱ्या तुम्हाला धरीन. आपण पॅक धरू एकमेकायला.” शेवटी स्टॉप येतो. गावच्या वाटेला दोन्ही माणसं आपापल्या मार्गानं निघून जातात. एकमेकांकडे बघत.

बारकुल्या ष्टोऱ्या आपल्याकडे असंच बघत राहतात. तिरहाईत मध्यस्थासारखं. खोलवर. लई गच भरलेल्या इहरीत दणा दणा आपटून शेंदल्यावर वंजळीत नितळ गारढन पाणी येतं, तशा या आपल्याला मोकळं करतात. त्या जीपवाल्यांच एकमेकांशी नातं नसताना ते एकमेकांना जीव लावतात, घटकाभर का होईना. या ष्टोऱ्याही आपल्याला जवळच्या वाटाव्यात इतक्या नितळ आहेत.

प्रत्येकाच्या अभिव्यक्तीचा आपल्याला नितांत आदर आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीनं नवमाध्यमाच्या उदयातून प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा, आजूबाजूचं विश्व समजलं आहे, हे सांगायचा जो अवकाश निर्माण झाला आहे, त्यातूनच एकीकडे प्रत्येकाला कवी, लेखक किंवा पत्रकार  झाल्याचा आभास निर्माण होण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढली आहे.

तर दुसरीकडे, ‘मागच्या दशकात जागतिकीकरण सक्षमपणे मराठी साहित्यात उमटलंच नाही. असंवेदनशील जाणिवांमध्ये मराठी साहित्य अडकून पडलं आहे. त्याचं सोफेस्टिकेशन झालं आहे. आजची तरुणाई वाचत नाही. ती तंत्रज्ञानाच्या आहारी गेलीये.’ असं बोलणारा एखादा झापडबंद प्राध्यापकी समीक्षेच्या आहारी गेलेला कोणी मनुष्य तुमच्याकडे आला तर त्याला हे पुस्तक वाचायला सांगा.

या पुस्तकानं सगळं प्रेमानं अन शिस्तीत मोडायला घेतलंय. पहिल्यांदा भाषा. थेट उदगिरी. भाषा ही प्रमाण, अप्रमाण, शुद्ध आणि अशुद्ध कशाला म्हणायचं ते आम्ही ठरवणार, अशी मक्तेदारी मूठभर लोकं धरून बसल्यासारखं होण्याच्या काळात प्रसाद कुमठेकर उदगिरी भाषेला कवटाळून बसलाय. अख्ख्या कादंबरीत. वानरीन पिल्लाला पोटाशी धरून बसावं तसं!

पण म्हणून एखादी अवघड बोली तुमच्या गळी उतरवली आहे. बळंच, असंही नाही. तुम्हाला अडेल, समजणार नाही, असं अवघड यात काही नाही.

असो. तर दुसरा मुद्दा असा की, या लेखकानं कादंबरीचे सगळे एका चौकटीतले प्रस्थापित फॉर्म मोडीत काढलेत. ही कादंबरी बारकुल्या ष्टोऱ्यांमध्ये विभागलेली आहे. त्यातले निवेदनकर्ते पुरुष आहेत वेगवेगळे. ते बदलतात अचानक. सुरुवातीला थोडं गरबडल्यासारखं होतं. पण नंतर ही वेगळ्या प्रकारची बदलती निवेदनशैली सवयीची होत जाते. अन हे सगळं तुमचं-आमचं वाटायला लागतं.

कादंबरीत अनेक माणसंयेत, वेगवेगळ्या वयाची, छटाची. सहज कुणाला गावाची आठवण यायली असं म्हणलं का, लोकं विचारतेत मंग शहरात कशाला आलास? कच्च्याबच्च्या शिक्षणानं बोळवण होऊन फाटक्या खिशानं पुण्यातल्या एफसी रोडवर गोऱ्या गोमट्या पोरी पाहून मग मन  बावचाळल्यावानी झालेली, मेसचं खाऊन खंग्री झालेली अन् ठावठिकाणा शोधत इतं-तितं मरमर करणारी पोरं आहेत या पुस्तकात.

गावाकडंच्या घरातलं स्त्रीसबलीकरण कांद्यापोह्याच्या प्लेटातंच अडकलंय म्हणून बेजार होणारा पुरुषही यात आहे. ‘देअर आर नो बॅड स्टुडंट बट ओन्ली बॅड टीचर’ असं ‘कराटे किड’ पिच्चरमधलं वाक्य पुन्हा आठवावं, शिक्षणव्यवस्थेला आपण पुन्हा प्रश्न विचारावेत अशी शाळकरी पोरं या ष्टोऱ्यात आहेत. नोकरी एकं नोकरी न करता गावाकडे स्टार्टअप उभारायला झटणारी, वास्तवाने बेजारलेली नान्या अन् सुश्या बेरोजगारीच्या प्रश्नाला अन समाजव्यवस्थेच्या ढुंगणानाला चिमटा घेतेत. यात बापाच्या ‘हो’ ला ‘हो’ म्हणणारे लेक आहेत. तर बापाला प्रश्न विचारून बापाशी विद्रोह करणारे पोरंही आहेत. फसव्या जाती अभिमानाच्या चौकटीत अडकलेल्या खोट्या अस्मिता, एकत्र कुटुंब व्यवस्थेच्या, गावगाड्याच्या निव्वळ नॉस्टेलिजिक आठवणी यात नाहीत, तर शहर जवळ करताना येणारी अपरिहार्यता त्यातून आलेलं तुटणंजुळणं आणि गावात जे भंपक वाटतंय त्याला प्रश्न विचारणं असं दोन्हीही यात आहे. नोकरी करून झुरायंच का शेती करून मरायचं हा अंगावर येणारा येड्या काटेरी बाभळीचा प्रश्नही आहे. यात ‘ती’ आहे. त्याला कधीच न भेटलेली. अनेकींच्या लग्नात ‘मुबारक मुबारक’ गाण्याच्या तालावर बुंदी वाढणारा ‘तो’ आहे.

भूत, वर्तमान अन् भविष्यकाळ या व्यतिरिक्ततही माणसाच्या आयुष्यात काळ असतात, हे या ष्टोऱ्या वाचल्यावर कळतं. जागतिकीकरण उशाला घेऊन जन्मलेल्या आमच्या नव्या पिढीचं जुन्या पिढीशी अंतर वाढण्याऐवजी दोन पिढ्यांना एकत्र आणण्याचा लेखकाचा प्रयत्न नेमका साधला आहे.

आपण ज्याच्यावर उभे आहोत, त्याकडे तिरकसपणे बघायची इष्टाईल ही प्रत्येक ष्टोरीत अन एकूणच अख्ख्या कादंबरीत कायम आहे. नितळ व्यक्ती, घटना अन् प्रसंगांना तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही बारकुल्या ष्टोऱ्या वाचायला पायजेल.

प्रसाद कुमठेकर यांची ही कादंबरी वाचल्यावर तुम्हालाही वाटत राहतं की, या गोष्टी आपुनबी जगलोत. आपलंही काहीतरी तुटत गेलं. वाहवत गेलं. जे परत कधी मिळालं नाही. आपल्या लहानपणी कोणाचा तरी नोकियाचा जुनाट फोन आपल्या हातात आला. त्यातला अळीचा गेम खेळत आपण मोठे झालो. अळी जेवढी मोठी झालीये तितकं तिला वळणं आणि भिंतीच्या कोपऱ्याला धडकू न देणं हे अवघड होतं. ती अळी मरू नये अशी हुरहूर वाटायची. ती हूरहूर आपल्याला हे पुस्तक संपताना होते.

तर बारकुल्या ष्टोऱ्या काय आहेत, याचं उत्तर, एका वाक्यात उत्तरे द्या, शास्त्रीय कारणे द्या किंवा रिकाम्या जागा भरा असं देता येत नाही. अमुक लेखकाची तमुक कादंबरी मानवी जीवनाचे बदलते कंगोरे एका वेगळ्या प्रतलावर नेऊन बदलत्या काळातला संघर्षमय प्रवास व नात्यांची घुसमट अधोरेखित करते किंवा पद्यप्राय तपशीलाला गद्यात बसवतील असे प्रचंड ताण, अध्यात्माची प्रचंड बेहोशी ही लेखकाची वैशिष्ट्ये आहेत.

या पुस्तकाला मनोगत आहे तेही बारकुलं. अनुक्रमणिका नाही. पाहिजे ती ष्टोरी आपल्याला वाचता आली असती पान नंबर पाहून असं वाटेल, पण तेही तितकंस गरजेचं नाही हे तुम्हाला शेवटी पटेल.

.............................................................................................................................................

'बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या' या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा - 

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4339

.............................................................................................................................................

अंगद तौर

angadpt@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......