‘तणस’ : स्थानिक ते जागतिक अशा समकालीन वास्तवाची जाण करून देणारी कादंबरी!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
राजेंद्र गायकवाड
  • ‘तणस’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Fri , 19 July 2019
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस तणस Tanas महेंद्र कदम Mahendra Kadam

महेंद्र कदम यांची ‘तणस’ ही कादंबरी नुकतीच मुंबईच्या लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केली आहे. स्थानिक ते जागतिक असा समकालीन प्रवास उलगडणारी ही कादंबरी आहे. सतीश भावसार यांनी तिचे आकर्षक व उदबोधक मुखपृष्ठ रेखाटले आहे.

विसाव्या शतकाच्या अखेरीस आगंतुकपणे शिरकाव केलेल्या जागतिकीकरणाच्या मूळ संकल्पनेला मध्यवर्ती ठेवून कादंबरीकाराने लेखन केले आहे. जागतिकीकरणाचे फायदे-तोटे, यांत्रिकीकरण, औद्योगिकीकरण याची अर्थशास्त्रीय पद्धतीने बरीचशी चर्चा सातत्याने होत आली आहे. परंतु या सर्व व्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या सामान्य माणसाच्या जीवनावर - मग तो शहरी असेल किंवा ग्रामीण - नेमकेपणाने काय परीणाम झाला, याची चर्चा अभावानेच होताना दिसते. जागतिकीकरणाच्या प्रभावातून दुर्लक्षित राहिलेल्या नेमक्या याच धाग्याला पकडून कादंबरीकाराने नायक-नायिकांच्या दैनंदिन जगण्यातून, वागण्यातून आणि कृतीतून जागतिकीकरण उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

ही कादंबरी ग्रामीण व शहरी पार्श्‍वभूमीवर रेखाटण्याचे दिव्य कादंबरीकाराने पेलले आहे. कादंबरीचा नायक दिनकर त्याच्या कुटुंबाची गावाकडील तुटलेली नाळ आणि शहरामध्ये राहूनही शहरालगतच्या टेकडीविषयी त्याच्या मनात असलेली ओढ, टेकडीभोवतीच्या अनेक रहस्यमय हालचाली, त्याची स्वत:विषयीची स्वगतपर मनोगते बोलकी आहेत.

जागतिकीकरणामुळे सभोवतालचा परिप्रेक्ष्य झपाट्याने बदलत जातो. साधारण बुद्धिमत्ता लाभलेला दिनकर रोजीरोटीसाठी वाहन व्यवसायाकडे आकर्षित होतो. व्यवसायाच्या अनुषंगाने येणारी सगळ्या प्रकारची व्यसने दिनकरला लागतात. आज प्रत्येक शहरालगत अशी  वाहनतळे विकसित झाली आहेत. सामान्य माणूस त्याच्याकडे लक्ष देत नाही, परंतु लेखकाने वाहनतळाला बोलके केले आहे. वाहनतळाच्या उदरात असंख्य घटना गाडल्या गेल्या आहेत, त्यांना बोलतं करून लेखकाने एक नवीन प्रयोग केला आहे. वाहनतळावर एकमेकांना भेटणारी वेगवेगळी माणसं, वाहन मालक, चालक, प्रवासी, व्यावसायिक, पुढारी, संघटना, जीपवाले-ऑटोवाले यांच्यातील स्पर्धा आणि मनोज, चिंतामणसारखे सुशिक्षित तरुण, त्यांचे त्यांच्या कुटुंबातील वास्तववादी जीवन यांचा लेखकाने चांगला आढावा घेतला आहे. कादंबरीकाराने समकालीन अवैध प्रवासी वाहतुकीचे अचूक आणि नेमकेपणाने वर्णन केले आहे.

जीपला झालेल्या अपघाताने दिनकरच्या जीवनाला वेगळे वळण लागते आणि तो अर्थकारणाचे केंद्र असणार्‍या पतसंस्थेमध्ये नोकरीला लागतो. सर्वसामान्यांना सहजासहजी अर्थसहाय्य उपलब्ध होण्यासाठी उदयास आलेल्या पतसंस्था कशा सर्वसामान्यांचे आणि कर्मचार्‍यांचे शोषण करतात, याचे वास्तवादी विवेचन कादंबरीत येते. उत्तमराव, त्यांचा मुलगा अमर, पंत, बाजीरावसारखे तरुण, त्याचे वडील शिवाजीराव काळे, दिनकरची गहाण शेती, त्यांच्या एनओसीसाठी त्याची अमरने केलेली फरफट हे प्रसंग वास्तववादी झाले आहेत. पतसंस्थेचे फुगे आणि त्यातून हवा निघून गेल्यानंतरची स्थिती हे सर्व भयानक होते. आभासी अर्थव्यवस्थेचा फुटलेला फुगा लेखकाने यानिमित्ताने वाचकांसमोर मांडला आहे.

दिनकरमधील तथाकथित स्पार्क ओळखून त्याच्या प्रेमात पडून अर्धांगिनी बनलेली उर्मिला हे या कादंबरीतील एक महत्त्वाचे पात्र ठरते. दिनकर, त्याचे आई-वडील, उर्मिला अशा छोट्या कुटुंबातील नाना कळा, एकमेकांविषयीची कमालीची तुसडी भूमिका, आर्थिक प्रश्‍नांची सोडवणूक करता करता झालेली फरफट, त्यामुळे दैनंदिन जीवनावर झालेले परिणाम, त्यातच परिस्थितीपुढे हतबल होऊन दिनकरचे सातत्याने नैराश्याच्या गर्तेत जाणे, हे जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे हतबल झालेल्या कुटुंबव्यवस्थेचे वास्तव आहे. एक प्रश्‍न मिटवला की दुसरा निर्माण होणे, एकातून मार्ग काढेपर्यंत दुसर्‍याचे काय करायचे असे अनेक अनुत्तरित प्रश्‍न वाचकांना विचार करायला भाग पाडतात. पती-पत्नीमधील प्रेम, विरह, समर्पण, संवाद यांमुळे कादंबरीची उंची वाढवते. प्रसंग उभे करणे, प्रसंगानुरूप संवाद ही कादंबरीची जमेची बाजू आहे. वैश्‍विक घटनांमुळे भारतीय कुटुंबव्यवस्थेवर झालेले प्रहार दिनकरच्या कुटुंबाच्या रूपाने लेखकाने ठळकपणे मांडले आहेत.

कादंबरीतील सर्व पात्रं लक्षात राहण्याजोगी व प्रातिनिधिक आहेत. त्यांच्या असण्याने कादंबरीचं कथानक सजलं आहे. उर्मिलेचे वडील पंत, त्यांची महत्त्वाकांक्षा, अर्थकारणी व राजकारणी लोकांशी त्यांना सलगी करावीशी वाटणं, हे अफलातून आहे. शिक्षणसंस्थेची रचना, तिथली स्पर्धा, उर्मिलेनं बापाच्या मनाविरोधी केलेलं लग्न, तरीही पडद्याआडून लेकीला मुख्याध्यापिका बनवतानाची बापाची घालमेल यातून उर्मिलेल्या कुटुंबाचंही यथायोग्य वर्णन लेखकाने केलं आहे.

महेंद्र कदमांनी ‘तणस’च्या निमित्तानं जागतिक पातळीवरील घडणार्‍या घटनांचा स्थानिक पातळीपर्यंत उमटत जाणारा प्रभाव रेखाटला आहे. समकालावरती आधारित वास्तववादी कथानक, ओघवती लेखनशैली, भाषिक माधुर्य, प्रसंगानुरूप ग्रामीण बोलीभाषेचा आलेला वापर, उत्तम संवाद, स्थल-काळानुरूप सुसंगत घटनाक्रम, व्यक्तीचित्रं ही या कादंबरीची काही बलस्थानं वाटतात. जीवनातील चढउतारामुळे सातत्यानं हताश, उत्साही होणार्‍या नायकांच्या व्यक्तिमत्त्वातील घालमेल चिंतनीय वाटते. नव्हे ती समकालीन सर्वच तरुणांपुढील गंभीर समस्याच होऊन बसली आहे, असं वाटतं.

.............................................................................................................................................

'तणस' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4906/Tanas

.............................................................................................................................................

लेखक प्रा. डॉ. राजेंद्र गायकवाड विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय (टेंभुर्णी. ता. माढा. जि. सोलापूर) येथे इतिहास विभागप्रमुख आहेत.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......