जल थल मल : निसर्ग आणि पर्यावरण प्रेमीच्या संग्रही असावेच असे पुस्तक!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
दिपेश जाधव
  • ‘जल थल मल’चे मुखपृष्ठ
  • Fri , 12 July 2019
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस जल थल मल Jal Thal Ma सोपान जोशी Sopan Joshi

इतिहासात थोडे मागे डोकावून पाहिले तर हवेतील कार्बन-डायऑक्साईड हा घटक प्रदूषणास जबाबदार मानला जात नसे. पण गेल्या काही शतकांच्या मानवीय हस्तक्षेपामुळे आज कार्बन-डायऑक्साईड वायू-प्रदूषणाचे मुख्य कारण मानला जातो. तसेच काहीसे मानवी मलाच्या बाबतीतही आहे. असे नेमके काय घडले, ज्यामुळे आज मानवी मल-मूत्र जल-प्रदूषणाच्या अनेक कारणांपैकी एक मुख्य कारण समजले जाते? त्यामुळे फक्त पाण्याच्या स्त्रोतांनाच नुकसान पोहोचले आहे की, अजूनही काही घडत आहे? या विषयांचा अभ्यासपूर्ण मागोवा लेखक सोपान जोशी आपल्या ‘जल थल मल’ या पुस्तकांतून घेतात. हे पुस्तक जुलै २०१६मध्ये ‘गांधी शांती प्रतिष्ठान’ने हिंदीमध्ये प्रकाशित केले. जवळपास दोन वर्षांच्या मेहनतीनंतर नागपूरच्या प्राजक्ता अतुल आणि मित्रमंडळी यांनी हे पुस्तक मराठीत अनुवादित केले. ‘ट्री इम्प्रिंट्स’ने हे पुस्तक मराठीत प्रकाशित करून अभ्यासपूर्ण मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.

मलामुळे होणारे पाण्याचे प्रदूषण, हा या पुस्तकाचा विषय आहे असे एखाद्याला वाटू शकते. पण तसे नसून जल, थल (जमीन मुख्यतः माती) आणि मल यांचा एकमेकांशी असणारा संबंध हा या पुस्तकाचा मूळ विषय आहे. लेखक या तीन तत्त्वांची सामाजिक अंगाने ऐतिहासिक आणि वैज्ञानिक चौकशी करत त्यांच्यातील संबंध प्रस्थापित करतो. बहुतेकदा अशा पद्धतीने संबंध प्रस्थापित करताना लेखकाला तटस्थ भूमिका घ्यावी लागते. त्यामुळे लेखन रुक्ष होण्याची शक्यता वाढते. पण लेखकाची विषयाबद्दल असलेली आस्था आणि तळमळ लेखनाला धार देते. ‘स्वच्छता मंदिरातील वेदीवरील बळी’ या प्रकरणात लेखक सोपान जोशी गटार साफ करणाऱ्यांविषयी लिहिताना म्हणतात, कुठलीही व्यक्ती इतके किळसवाणे व धोक्याचे काम केवळ नाईलाजास्तवच करते. आपल्या शहरांमध्ये इतके लाचार लोक मिळणे अवघड नाही. तसेच दुसऱ्याच्या गतिकतेचा फायदा उचलणाऱ्यांचीही कमतरता नाही.’

जल-थल-मल यांतील संबंध पूर्वापार आहेत. ते पुढेही असणार आहेत. मानवाच्या उपभोगी आणि असंवेदनशील वृत्तीमुळे या संबंधांमध्ये बदल होतो आहे आणि त्याचा फटका मानवालाच बसणार हे नक्की. यासाठी लेखक एकपेशीय सूक्ष्मजीवापासून ते विशालकाय देवमाशापर्यंत, भारतातील खेड्यांपासून ते लंडनच्या गटारापर्यंत, आजपासून ते अब्ज वर्षांपूर्वीपर्यंतचे दाखले देतात. लेखक विषयानुसार सूक्ष्मातिसूक्ष्म दुनिया उलगडून दाखवतो, तसेच गरज पडल्यास विशालकाय पृथ्वीचा पसारा आपल्या समोर मांडतो. या सतत होणाऱ्या झूम-इन, झूम-आऊटमुळे हे पुस्तक वाचकाला खिळवून तर ठेवतेच पण विचार करायलाही भाग पाडते.

नुसतेच प्रश्न न मांडता ‘जल थल मल’ त्या प्रश्नांवर काही उपायही असल्याचे दाखले देते. ‘मैलापाण्याचे सोनेरी सत्य’ हे प्रकरण बंगालच्या मासेमाऱ्यांनी केलेल्या मैलापाण्याच्या सुयोग्य वापराविषयी भरभरून बोलते. हा प्रयोग कसा आणि का यशस्वी झाला, याविषयी स्थानिकांचे योगदान किती महत्वाचे हे ओघवत्या शैलीत आल्यामुळे हे प्रकरण वाचनीय झाले आहे. तसेच भारतातील मूसिरी नगरपरिषदेत यशस्वी झालेल्या इकोसॅन शौचालयाच्या प्रयोगाविषयी लिहिले आहे. एकीकडे यशस्वितेचे दाखले देत असताना मंगोलियात अयशस्वी ठरलेल्या याच इकोसॅन शौचालयाच्या प्रयोगाविषयी लिहायला लेखक मागे-पुढे पाहत नाही. त्यामागील स्पष्टीकरणही लेखक देतात. यामुळे एकूणच पुस्तकाची विश्वासार्हता वाढते.

बहुतेकदा पुस्तकाच्या शेवटी संदर्भ लिहिताना लेखकांची लेखणी तोकडी पडते किंवा त्यांना कदाचित ते अनावश्यक वाटत असावे असे मला वाटते. त्यामुळे वाचकही वरवर नजर फिरवून पुस्तक संपवतात. पण या पुस्तकात संदर्भ लिहिताना विशेष मेहनत घेतल्याचे जाणवले आणि संदर्भ प्रकरणसुद्धा मूळ पुस्तकाइतकेच वाचनीय झाले आहे. म्हणूनच तुमचे मुख्य पुस्तक जरी वाचून झाले तरी संदर्भ वाचावयास विसरू नका.

‘जल थल मल’ या मूळ हिंदी पुस्तकातील काही प्रकरणे वाचल्यामुळे मराठीत हे पुस्तक कसे अनुवादित होईल याविषयी वाचक म्हणून मला फार उत्सुकता होती. परंतु प्राजक्ता अतुल यांनी हे काम लीलया पार पाडले आहे. विषयातील क्लिष्टता भाषेत न उतरल्यामुळे विषय सोपा झाला आहे. पुस्तकातील मराठीवर दिवाकर मोहनी यांच्या शुद्धलेखन तत्त्वज्ञानाचा प्रभाव असल्यामुळे वाचताना सतत काही छपाई चूक झाली आहे का असे वाटते. नंतर मात्र त्याची सवय होते.

पुस्तकाच्या लेखनातून विषयाचा जसा सखोल अभ्यास जाणवतो तसा तो सोमेश कुमार यांच्या चित्रांमधून दिसतोही. पुस्तकात असलेले प्रत्येक चित्र लेखनाला पूरक असेच आहे. वाचताना ही चित्रे वातावरण निर्मितीचे काम चोख बजावतात. तसेच स्वतंत्र कलाकृती म्हणूनही आपली छाप सोडून जातात. त्याचप्रमाणे पुस्तकासाठी निवडलेला रंगही विषयसूचक आहे.

पुस्तकावर कोणत्याही प्रकारचा अधिकार मूळ लेखकाने दाखवलेला नाही. मराठी अनुवादित पुस्तकाने तीच परंपरा कायम ठेवली आहे. बौद्धिक संपत्तीचा विकास तिला आपल्या दावणीला बांधण्यापेक्षा मुक्त करण्यात आहे याची समज आजच्या काळात या लेखकांनी आणि प्रकाशकांनी दाखवल्यामुळे त्यांचे विशेष कौतुक.

अमेरिकन दूरचित्रवाणीवरील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व फ्रेड रॉजर रिसायकलिंगवर (कचरा पुनर्वापर) भाष्य करताना म्हणतात, अनेकदा जेव्हा आपल्याला वाटते की आपण एखाद्या गोष्टीच्या शेवटाला किंवा अंतिम टप्प्याला येऊन पोहचलो आहोत तेव्हा खरे तर आपण एका वेगळ्या गोष्टीच्या आरंभाशी उभे असतो.’ हे विधान आणखी पुढे नेल्यास लक्षात येते की मानवी मल-मूत्र कचरा नसून साधन आहे. आणि त्याचा पुनर्वापर झालाच पाहिजे. त्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न होणे गरजेचे आहे. म्हणूनच प्रत्येक निसर्ग आणि पर्यावरण प्रेमीच्या संग्रही असावेच असे हे पुस्तक- ‘जल-थल-मल’!

............................................................................................................................................................

लेखक दिपेश जाधव इंजिनीअर आहेत व ‘प्रथम’ या शिक्षणविषयक संस्थेत कार्यरत आहेत.

dipesh89jadhav@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......