टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • राहुल गांधी, बँक युनियन, टोमॅटो, व्हॉटसअॅप आणि हरिश रावत
  • Wed , 21 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या राहुल गांधी Rahul Gandhi नोटाबंदी Demonetisation हरिश रावत Harish Rawat उर्जित पटेल Urjit Patel नरेंद्र मोदी Narendra Modi

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी कपडे बदलतात तसे रिझर्व्ह बँक नियम बदलत आहे. पंतप्रधानांनी देशाला वचन दिले होते की ३० डिसेंबरपर्यंत बँकांमध्ये पैसे जमा करता येतील; पण आता तोही नियम बदलला. पंतप्रधानांच्या शब्दाला वजन असायला हवे, पण त्यांनी १२५ वेळा नियम बदलले. : राहुल गांधी

अहो, आम्ही तर असं ऐकलंय की ऊर्जितभाय रोज सकाळी पंतप्रधानांना फोन करून केम छो, ढोकळा-फापडा खाल्ला की नाही, वगैरे चौकशी करतात आणि मग दोघांमध्ये पैज लागते- आज हे जास्त वेळा नियम बदलणार की, ते त्याहून जास्त वेळा कुर्ते बदलणार. रोज संध्याकाळी क्लीनचिटमास्टर अमितभाय माहिती मागवून घेऊन दोघांना समसमान 'गुण' जाहीर करतात म्हणे!

…………………………….

२. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँका आणि कर्मचाऱ्यांना होत असलेल्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना आणि अखिल भारतीय बँक अधिकारी संघटनेने सरकारविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार, येत्या २८ डिसेंबरला ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येतील. त्यानंतर बँक संघटनांतर्फे २९ डिसेंबरला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना निवेदन देण्यात येणार आहे.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ३० तारखेला या महाघोटाळ्याचा पहिला अध्याय संपेल आणि बँक कर्मचाऱ्यांना आंदोलन पुकारण्याचं काही कारणच उरणार नाही. बँकांची विश्वासार्हता तळाला नेणाऱ्या आणि बँक कर्मचाऱ्यांना वेठीला धरणाऱ्या या उपक्रमात रोज नवनवे नियम काढून सरकारच्या ताटाखालचं मांजर बनलेल्या रिझर्व्ह बँकेने बँक कर्मचारी आणि ग्राहकांना जो मनस्ताप दिला, त्याविरोधात खरोखर आवाज उठवण्याची वेळ कधीच टळून गेली. आता हा अभिनय कशाला?

…………………………

३. सरकारी मुस्लिम कर्मचाऱ्यांना नमाज पठणासाठी दोन तासांचं मध्यंतर देण्याच्या निर्णयावर वाद निर्माण झाल्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत यांनी सर्वधर्मियांना प्रार्थना करण्यासाठी छोट्या मध्यंतंराची किंवा शॉर्ट ब्रेकची संकल्पना मांडली आहे.

एकदा चूक झाली की दुसरी करायची म्हणजे पहिली चूक बरोबर ठरते, असं काहीतरी गणित शिकवलंय का रावतांच्या शाळेत? सरकारी कर्मचाऱ्यांनीच नव्हे, तर सेक्युलर देशातल्या सगळ्याच धर्मीयांनी आपापला धर्म हा खासगी पातळीवर जपला पाहिजे. ज्याला कामात धर्मपालनाचे चोचले सुचत असतील, त्याने नोकरीचा राजीनामा देऊन धर्मसेवेला वाहून घ्यावं.

………………………….

४. नोटाबंदीनंतर देशभरात मागणीत झालेली घट अजूनही कायम असल्याने कांदा, टोमॅटोला मातीमोल भाव मिळत आहे. शेतमालाचे भावही घसरले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. टोमॅटोला किलोमागे केवळ एक रुपया भाव मिळाल्याने गिरणारे येथे शेतकऱ्याने माल न विकता तो रस्त्यावरच फेकून दिला.

शहरांमध्ये मात्र लोकांना ही नोटाबंदीमुळे निर्माण झालेली चंगळ वाटते. आपल्याला २० रुपये किलो मिळणारी भाजी शेतकऱ्याला किलोमागे काय उत्पन्न देत असेल, असा विचार करण्याची गरज या बांधवांना भासत नाही. भक्त मंडळींना तर दोन-पाच वेळा बँकेच्या लायनीत उभं राहण्याच्या त्रासापलीकडे 'सामान्य जनते'ला काहीच त्रास झाला नाही, असे दिव्य शोधही लागत आहेत. आज टोमॅटो फेकताय, उद्या काय फेकायचं, तेही आजच ठरवून ठेवायला हवं.

……………………………

५. व्हॉट्सअॅप ग्रूपमधल्या एखाद्या सदस्याने ग्रूपमध्ये आक्षेपार्ह मजकूर टाकला तर त्यासाठी यापुढे त्या समूहाच्या अॅडमिनला जबाबदार धरण्यात येणार नाही, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.

याच निकालाच्या आधारे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी जाहीर केलेल्या निर्णयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरता येणार नाही, असा युक्तिवाद भाजपच्या प्रवक्त्यांकडून पाठ करून घेतला जातो आहे म्हणे! पटेलांच्या फोनवरूनही तेच पोस्ट टाकत असले म्हणून काय झालं?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......