मराठ्यांना जागं करू पाहणारी संस्था
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
श्याम देशपांडे
  • अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचं संस्थेचं बोझचिन्ह आणि पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 22 October 2016
  • श्याम देशपांडे Shyam Deshpande अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद Akhil Bharatiya Maratha Shikshan Parishad

डॉ. सौ. शोभा बाळासाहेब इंगवले यांनी लिहिलेलं ‘अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, स्वरूप आणि कार्य’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. हे पुस्तक लिहून लेखिकेनं एक महत्त्वाचं काम केलं आहे. सध्या महाराष्ट्रात मराठा समाजामध्ये मोठी घुसळण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या पुस्तकाचं महत्त्व अधिकच आहे.

इतिहासाची जाणीव आपल्याकडे पूर्वीपासूनच फार कमी असलेली दिसते. महाराष्ट्राचा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक ठेवा अत्यंत संपन्न असला तरी त्याची ओळख करून देणं आपल्याला फारसं पसंत पडत नाही. खरं तर कोणाचाही इतिहास हा त्या त्या काळातील माणसांच्या कर्तृत्वाचा लेखाजोखा असतो. त्यामुळे या इतिहासातून त्या त्या वेळी त्या त्या माणसांनी केलेलं कार्यकर्तृत्व अभ्यासता येतं. परंतु असं दस्ताऐवजीकरण करण्यात आपण कमी पडतो. त्यामुळे आपला हा संपन्न वारसा फारसा लोकांपुढे येत नाही. इंगवले यांनी मात्र अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या स्वरूप आणि कार्याविषयी लिहून एक चांगलं संदर्भ पुस्तक वाचकांच्या हाती दिलं आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला आपल्या पूर्वजांनी केलेल्या उज्ज्वल कार्याची ओळख तर होतेच, पण त्यांचं कार्यकर्तृत्वही लक्षात येतं.

महात्मा जोतीराव फुले, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी वि.रा.शिंदे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापासून प्रेरणा घेऊन अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेची अधिकृत स्थापना १९०७ मध्ये झाली. शिक्षणाचा प्रसार आणि समाजाची उन्नती हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ही परिषद स्थापन करण्यात आली. तिच्या कार्याचा परिचय नवीन पिढीला व्हावा आणि ही पिढी कुणाच्या खांद्यावर उभी आहे, हे कळावं या उद्देशानं इंगवले यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद ही संस्था अतिशय महत्त्वाची समजली जाते. म. फुले आणि शाहू महाराज यांच्या प्रेरणेतून या संस्थेची स्थापना झाली असली तरी पुढे डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, मामासाहेब जगदाळे, भाऊसाहेब हिरे, काकासाहेब वाघ इत्यादींनी त्यापासून प्रेरणा घेऊन बहुजन समाजाचा विकास घडवून आणण्याचं महत्त्वाचे कार्य केलं आहे. आज या संस्था महाराष्ट्राच्या वैभवात भर टाकणाऱ्या ठरल्या आहेत. 

इंगवले या अ.भा.म.शिक्षण परिषदेच्या पुणे येथील श्री शाहू मंदिर महाविद्यालयाच्या प्राचार्या आहेत. त्यांनी अ.भा.म.शिक्षण परिषदेनं केलेलं काम अतिशय जवळून अनुभवलेलं आहे. त्यामुळे याच विषयावर त्यांनी आधी प्रबंध लिहिला. प्रस्तुत पुस्तक  हे त्याचंच पुस्तकरूप आहे. पाच प्रकरणं आणि तीन परिशिष्टं असा २४० पानांचा भरगच्च मजकूर असलेलं हे पुस्तक आहे. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेची स्थापना होण्यापूर्वीची पार्श्वभूमी सुरुवातीलाच लेखिकेनं सांगितलेली आहे. म.फुले यांच्या सत्यशोधक चळवळीतून बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी लढणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांची फौज निर्माण झाली. या सर्वांच्या एकत्रिकरणासाठी आणि अधिक व्यापक व प्रभावी सामाजिक विकास करण्यासाठी अ.भा.म. शिक्षण परिषदेची आवश्यकता भासू लागली. श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनीही बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसाराकडे लक्ष दिलं. फुल्यांपासून प्रेरणा घेऊन पुण्यातील नामवंत वकील भाऊसाहेब म्हस्के यांनी मराठा समाजात शिक्षणाच्या प्रसारासाठी ‘डेक्कन असोसिएशन’ची १८५८ ला स्थापना केली. इथपासून ते पुढे अ.भा.म.शि.परिषदेची स्थापना होईपर्यंतचा थोडक्यात इतिहास या पुस्तकात आलेला आहे.

अ.भा.म.शि.परिषदेची स्वरूप, वाटचाल, वैचारिक दिशा आणि कार्य या चार प्रकरणांत विस्तृत चर्चा करण्यात आलेली आहे. या पुस्तकामध्ये मी, अ.भा.म.शि.परिषदेची पार्श्वभूमी; ‘शिक्षण’ व ‘मराठा’ शब्दांची व्यापकता, संस्थेवरील सत्यशोधक विचारांचा प्रभाव, अधिवेशनाच्या माध्यमातून संस्थेनं केलेलं कार्य यांचा थोडक्यात आढावा घेतला आहे. ‘ही संस्था म्हणजे शैक्षणिक, सामाजिक परिवर्तनासाठी निर्माण झालेली एैतिहासिक चळवळ होती आणि शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचा प्रसार होणं हा तिचा उद्देश होता’ असं लेखिकेनं आपल्या मनोगतात म्हटलं आहे. प्रस्तुत पुस्तकाला सुप्रसिद्ध साहित्यिक, ग्रामीण साहित्य चळवळीचे भाष्यकार डॉ. वासुदेव मुलाटे यांची दीर्घ प्रस्तावना लाभलेली आहे. त्यात डॉ. मुलाटे यांनी अ.भा.म.शि.परिषदेच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेऊन या संस्थेनं केलेलं कार्य किती महत्त्वाचं आहे हे विषद केलेलं आहे. ‘‘अ.भा.म.शि.परिषदेच्या स्थापनेची पार्श्वभूमी म्हणजे एका समान ध्येयानं प्रेरित होऊन मराठा समाज बांधवांनी केलेली ती एक सामाजिक परिवर्तनाची चळवळच होती. कोणतीही चळवळ ही अन्याय, अत्याचार, शोषण, सकारण अभावग्रस्तता, परिवर्तनाची आवश्यकता, नवनिर्मितीची, क्रांतीची आस या निर्माण होते. ती जशी एक नकारात्मक, विरोधात्मक, सामूहिक, सांघिक प्रतिक्रिया असते, तशीच ती समूहगटाच्या, समाजगटाच्या आत्मभानातून केलेली कृती असते. चळवळीमध्ये अनेकांचा मिळून एक विचार एक ध्येय एक आवाज अपेक्षित असतो. चळवळीत विचार महत्त्वाचा असतो,’’ असं डॉ. मुलाटे यांनी आपल्या प्रस्तावनेत नमूद करून अ.भा.म.शि.परिषदेच्या झालेल्या संपूर्ण अधिवेशनाचं, तिथं झालेल्या भाषणांचं सविस्तर विश्लेषण केलं आहे.

१९०७-१९७४ या कालावधीत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर अ.भा.म.शि.परिषदेची एकंदर ३५ अधिवेशनं झाली. या अधिवेशनातील स्वागताध्यक्षांपासून ते अधिवेशनाच्या अध्यक्षांपर्यंत सर्वांनी अतिशय मूलभूत विचार मांडले. लेखिका म्हणते, ‘‘ही अधिवेशने अत्यंत नियोजनपूर्वक, महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देवून घेण्यात आली. या अधिवेशनातून तत्कालीन सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, वाङ्ममयीन, भावनिक वास्तवावर प्रकाश टाकून वर्तमान स्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यकालीन बहुजन समाजाच्या विकासासाठी करावयाच्या प्रयत्नांवर भर देण्यात आला आहे. अधिवेशनात विविध क्षेत्रांतील विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते प्रतिभावंत असल्यामुळे संस्थेच्या रचनात्मक कामाला नवी दिशा मिळाली. त्यामुळे त्या अधिवेशनातील विचारांना अतिशय महत्त्व प्राप्त झाले.’’

३० डिसेंबर १९०७ मध्ये खासेराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं अधिवेशन पार पडलं. यावेळी कोल्हापूरचे भास्करराव विठोजीराव जाधव हे स्वागताध्यक्ष होते, तर मुंबईमध्ये येथे १९ जानेवारी १९७४ ला पार पडलेल्या ३५ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष लोकनेते बाळासाहेब देसाई होते. या सर्व अधिवेशनांतील स्वागताध्यक्षांपासून ते अध्यक्षापर्यंतच्या सर्वांच्या भाषणाची नोंद घेऊन त्यांनी मांडलेल्या विचारांची दखल घेतली आहे.

पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टं दिलेली आहेत. अ.भा.म.शि.परिषदेच्या अधिवेशनांची सूची आणि अ.भा.म.शि.परिषद पुणे या संलग्न शाखेचा परिचय त्यात दिला आहे. एका उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन एका विशाल समाजाला जागं करण्याचं अवघड काम अ.भा.म.शि.परिषदेच्या मंडळींनी केलं आहे. आज वर्तमानातील परिस्थितीचा विचार केला तर खेड्यापाड्यांतून विविध प्रकारच्या शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालयं आणि शिक्षण केंद्रं मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहेत. या संस्थांमधून विविध प्रकारचं शिक्षणही देण्यात येतं. प्रस्तावनाकार डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या मनात जो प्रश्न निर्माण झाला तोच प्रश्न माझ्याही मनात निर्माण होतो. तो म्हणजे, अ.भा.म.शि.परिषदेच्या कार्यकर्त्याजवळ जी समाज जाणीव आणि निष्ठा होती तेवढी आणि तशीच या नव्या संस्थापकांकडे असेल का? तिथं शिक्षण घेणाऱ्या नव्या पिढीला आपल्यासाठी श्रम करणाऱ्या आधीच्या पिढीबद्दल माहिती असेल का? या प्रश्नांची जाणीव करून देणारं हे महत्त्वाचं पुस्तक आहे. ते मराठा समाजातील मुलांनी अवश्य वाचायला हवं.

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद : स्वरूप व कार्य - डॉ. सौ. शोभा बाळासाहेब इंगवले, स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद, पाने – २४०, मूल्य – ४०० रुपये.

 

लेखक मराठवाड्यातील ग्रंथप्रेमी व स्तंभकार आहेत.

deshpande.shyam07@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......