‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कृषिचिंतन’ : शेतकऱ्यांच्या हिताचा विचार देणारा ग्रंथ
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
कपिल नरवाडे
  • ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कृषिचिंतन’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 29 June 2018
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कृषिचिंतन DR. BABASAHEB AMBEDKARANCHE KRUSHICHINTAN माधव जाधव Madhav Jadhav लोकायत प्रकाशन Lokayat Prakashan

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कृषिचिंतन’ हे पुस्तक डॉ. माधव जाधव यांनी संपादित केलंय. ते  आ. बाळापूर, जि. हिंगोली येथील नारायणराव वाघमारे कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत. हे पुस्तक बाबासाहेबांच्या कृषिविषयक विचारांचं आणि कार्याचं यथाशक्ती प्रतिपादन करतं. डॉ. जनार्दन वाघमारे, प्रा. जैमिनी कडू, प्रा. यादव गायकवाड, डॉ. प्रकाश मोगले, डॉ. अनंत राऊत, डॉ. शेषराव माहिते, प्रा. उत्तम सूर्यवंशी आदी अनेक तज्ज्ञ मान्यवरांनी या पुस्तकासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कृषिचिंतनाचा विविध लेखांद्वारे आढावा घेतलाय. या पुस्तकातून बाबासाहेबांचे आर्थिक विचार, जल व ऊर्जानीती, कृषिविषयक विचार व भूमिका, शेतीचे प्रश्न, समकालीन शेती व शेतकरी, शेती आंदोलनं व श्रमिकांचे प्रश्न, कृषिचिंतन आणि मराठी साहित्य अशा विविधांगी पैलूवर चर्चा करण्यात आलीय.

डॉ. बाबासाहेब हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होतं. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, कायदेपंडित, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्याशिवाय इतर अनेक क्षेत्रांतील त्यांची मुशाफिरी न भुतो न भविष्यती अशी आहे. त्यांनी केलेल्या विविधांगी कामाची, त्यांच्या अभ्यासाची, भाषणांची आणि लिखाणाची व्याप्ती पाहिली की, आपली छाती दडपून जाते.

डॉ. बाबासाहेबांनी जीवनाच्या साऱ्याच क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचं काम केलं. अफाट अशी ज्ञानसंपदा निर्माण केली. ती केवळ तत्त्वज्ञानाच्या स्वरूपाची नाही तर व्यक्तीसाठी आणि पर्यायानं समाजासाठी रचनात्मक ठरणारी आहे.

त्यांच्या एकूण लिखाणांपैकी आणि कामापैकी सर्वांत प्रभावी व त्यांच्या अनुयायांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वज्ञात बाब म्हणजे त्यांचं दलितोद्धाराविषयीचं काम. ज्यांच्यासाठी ते अव्याहतपणे झटले. संविधानाच्या माध्यमातून त्यांना माणूस म्हणून जगण्याचा व्यावहारिक अनुभव दिला. त्यामुळे दलित, बहुजन तर त्यांना देवच मानतात यात काही दुमत नाही.

परंतु डॉ. बाबासाहेबांनी केवळ त्यांच्या जातीबांधवांसाठीच काम केलं असं नाही. स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी, त्यांना पुरुषांच्या बरोबरीनं समानतेनं जगण्यासाठीही त्यांनी काम केलं. नव्हे त्यासाठी सत्तेचा त्याग केला. भारतीय अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास करून त्यातील प्रश्नांचं विश्लेषण केलं आणि त्यावर उपायही सुचवले. भारतीय शेतीचे प्रश्न व त्यावर उपाय, शेतमजुरांचे प्रश्न व उपाय, नदीजोड प्रकल्प, ऊर्जा धोरण, कामगारांचं जीवन सुकर होण्यासाठी उपाययोजना अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी प्रभावी काम केलं.

पण डॉ. बाबासाहेबांनी त्यावेळी मांडलेले विविध प्रश्न व त्यावरील उपाययोजनांवर अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी ते प्रश्न आजही तसेच आहेत. उलटपक्षी आज त्या प्रश्नांची तीव्रता प्रचंड वाढलीय. तत्कालीन प्रश्नांवरचे बाबासाहेबांचे विचार आजही सुसंगत ठरतात. म्हणूनच हे विचारधन अधिक वेगानं आणि मोठ्या स्तरावर पोहचणं गरजेचं आहे. त्यासाठी विविध पातळ्यांवर काम होणं आवश्यक आहे. हे पुस्तक नेमकं त्याच अनुषंगानं महत्त्वाचं आहे.

समग्र बाबासाहेब हे भावनिक पातळीवर नाही तर वैचारिक पातळीवर समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्यांनी केलेल्या विविधांगी कामाचा व विचाराचा सर्वव्यापी प्रचार व प्रसार झाला पाहिजे. ज्या वेळी हा विचार प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचेल आणि प्रत्येक माणूस कोणत्याही पूर्वग्रहानं त्या विचाराकडे न पाहता त्यांच्या विवेकाला आवाहन करण्याची संधी देईल, त्यावेळी हा विचार त्यांना नक्कीच आपल्या प्रगतीचा वाटेल. 

निवडणुकांच्या वेळी सगळ्याच पक्षांना डॉ. बाबासाहेब आठवतात आणि आठवतं त्यांनी दलितांचं उजाळलेलं जीवन. मग त्याचाच धोशा लावून त्यांनी कसं फक्त दलितांसाठीच काम केलं हे पटवलं जातं. डॉ. बाबासाहेबांनी जातीभेद मोडीत काढण्यासाठी केलेलं काम उत्तुंग आहे. तरी तिचा केवळ स्वार्थासाठी उल्लेख व प्रचार होतो. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी लोकांसमोर केवळ अर्धसत्य मांडलं जातं.

‘सत्तेसाठी काहीही’ अशा डॉ. बाबासाहेब नव्हेत, तर सर्वच महामानवांना जाती-धर्माच्या चौकटीत बंद केलं जातंय. डॉ. बाबासाहेबांनी दलितांशिवाय इतरांसाठी काय केलंय, हा बाळबोध प्रश्न विचारणाऱ्या प्रवृत्तीपासून ते त्यांचं सर्वांगीण काम माहीत असणाऱ्या, पण ते लोकांसमोर न येऊ देता त्यांची फक्त आणि फक्त दलितांचे नेते एवढीच संकुचित प्रतिमा लोकांसमोर मांडणाऱ्या प्रवृत्ती, इतके टोकाचे विचार मांडले जात आहेत. यातील दुसऱ्या प्रवृत्तीवर काही इलाज नाही, पण पहिल्या प्रवृत्तीसाठी आपण निश्चितच काहीतरी करू शकतो. आणि अगदी हाच विचार लक्षात घेत बाबासाहेबांचे काम व विचार या लोकांसमोर मांडण्याच्या भूमिकेतून हे पुस्तक आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम डॉ. जाधव यांनी केलंय.

आजच्या व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या युगात माणसं मेढरांसारखं वागायला लागलीयत. ‘आला मॅसेज की केला फॉरवर्ड’ हा अनेकांचा विरंगुळा झालाय. एक वेळ हा प्रकार परवडला, पण दुसरा प्रकार अतिशय घातक आहे. तो म्हणजे या समाजमाध्यमावरचं ज्ञान (?) हेच अंतिम सत्य समजणारे लोक. या लोकांची जडणघडण अतिशय धोक्याच्या वळणावर आहे. व्हॉट्सॲप आणि फेसबुकवरचं ज्ञान टोकाची मतं घडवत आहेत. अशा या संकटाच्या काळात एका महापुरुषाचे विचार व काम लोकांपर्यंत पोहचवण्याचा उपक्रम खरंच स्तुत्य आहे.

अर्थशास्त्राच्या प्राध्यापकानं करायचं काम जाधव यांच्यासारख्या मराठीच्या प्राध्यापकानं केलं, त्याबद्दल जाधव यांचं अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा.

.............................................................................................................................................

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कृषिचिंतन : संपादक - डॉ. माधव जाधव,

लोकायत प्रकाशन, सातारा,

पाने – २०८, मूल्य – २२० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4434

.............................................................................................................................................

लेखक कपिल नरवाडे हे महाराष्ट्र शासनात सहायक कक्ष अधिकारी आहेत.

kapiln48@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......