‘बहादूर थापा आणि इतर कविता’ : लेबल न लावलेली किंवा न लागलेली कविता
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
गणेश कनाटे
  • ‘बहादूर थापा आणि इतर कविता’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Fri , 08 June 2018
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस बहादूर थापा आणि इतर कविता ‌Bahadur Thapa aani Itar Kavita संतोष पद्माकर पवार Santosh Padmakar Pawar साधना प्रकाशन Sadhana Prakashan

लेबल लावलेली कविता अनेकदा कविता नसते. तसेच, कविता लिहिण्यासाठी लिहिलेली कविता अनेकदा कवितापण घेऊन येते, कविता येतच नाही. ती हरवून जाते.

‘ग्रामीण कविता’ या लेबलासह येणारी कविता अनेकदा नागर जाणीवेच्या खिडकीतून आत येते, तर तथाकथित ‘शहरी’ आणि ‘महानगरीय’ लेबल लावून येणारी कविता ही ग्रामीण भागातून विस्थापित होऊन आलेल्या कवीची महानगरीय पसाऱ्यानं उडालेल्या गोंधळाची नोंद मात्र असते.

काही ग्रामीण लेबलांच्या कविता निव्वळ ग्राम्य असतात, तर काही महानगरीय कविता या निव्वळ शहरी प्रतीकं आणि प्रतिमांच्या वर्णनात अडकून जातात.

असंच काहीसं घडतं दलित आणि स्त्रीवादी ही लेबलं लावलेल्या कवितांच्या बाबतीतही. दलित लेखकांनी आपल्या आत्मकथनांनी मराठी साहित्यात आणलेली ऊर्जा, नवा अनुभव, नवी कथनशैली, साहित्याच्या मध्यमवर्गीय जाणिवा तोडून-फोडून काढण्याची क्षमता आता थंडगार झालेली आहे. आजकाल बरेच दलित लेखक या गारठ्यातच ‘माचीसच्या काड्या’ पेटवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

या सगळ्या प्रकारात मी लेबल न लावलेली, कवितापणाचा नट्टापट्टा न केलेली कविता शोधत असतो आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर कवितेचं उत्पादन होत असताना, निराश होत असतो. म्हणून एक वाचक म्हणून मी लेबलं लावलेली कविता वाचायचं टाळतोच.

हे माझं अल्पमती निरीक्षण मांडण्याला कारण म्हणजे ‘बहादूर थापा आणि इतर कविता’ हा संतोष पद्माकर पवार यांचा संग्रह. ही लेबल न लावलेली किंवा न लागलेली कविता आहे, असं माझं मत आहे. परंतु यातील गद्यात्मक शैलीमुळे कुणी जर तिला कविता हे लेबल नाकारलं तरीही साहित्यकृती म्हणून तिचं वेगळेपण आणि महत्त्व कमी होणार नाही. 

११ जून २०१५ साली साधना प्रकाशनानं प्रकाशित केलेला हा संग्रह मी मोजून दोन वर्षांनंतर म्हणजे आता वाचला. संतोष पवार हे मराठी साहित्यक्षेत्रातलं ओळखीचं नाव आहे, पण मीच मुळी या क्षेत्रातला आऊडसायडर असल्यानं माझी त्यांची ओळख नाही, त्यांना मी कधी भेटलेलोही नाही. पण त्यांचा फोन नंबर मिळवून नुकताच त्यांच्याशी या संग्रहाबद्दल बोललो.

कारण मला हा संग्रह खूप म्हणजे खूप आवडला आणि मनापासून वाटलं की या रचनांबद्दल आपण आपल्यापुरतं लिहिलं पाहिजे. या रचनांबद्दल कविता वाचणाऱ्यांशी, त्यावर लिहिणाऱ्यांशी बोललं पाहिजे. याची काही मला वाटतात ती कारणं अशी -

१) या रूढार्थानं ज्याला कविता म्हणतो तशा कविता नाहीत. या रचना कवितापणाचे ज्ञात आकृतिबंध आणि प्रचलित भाषा वापरत नाही. म्हणून त्यांची साहित्यात प्रकारनिश्चिती करावी लागेल. (हे काम प्रशिक्षित समीक्षकांचं!)

२) या संग्रहातील सर्व २५ रचना म्हणजे २५ काव्यात्म व्यक्तिचित्रणं आहेत. इथं एक प्रश्न पडेल आणि त्याचं उत्तर शोधावं लागेल की, मग पवारांना सरळसरळ गद्य व्यक्तिचित्रणाचा प्रकार सोडून काव्यात्मतेकडे का वळावंसं वाटलं?

३) अशा काव्यात्म व्यक्तिचित्रणाची फलश्रुती काय?

या मुद्द्यांची चर्चा व्हायला हवी.

हे मानवी दुःखाचं सूक्ष्म वाचन आहे

या रचनांचं एक वैशिष्ट्य जे त्यांना अतिशय वाचनीय करतात ते आहे - कवीची मानवी दुःखाचं सूक्ष्म वाचन करण्याची क्षमता.

पवार यांनी जी २५ व्यक्तिचित्रणं या निमित्तानं शब्दबद्ध केलेली आहेत, त्यापैकी बहुतांश इतकी जिवंत आहे की ती सरळ भिडतात. They prick you!

सोनी, चांगू किसन रणमळे, हिराबाई जाफरमियाँ, बाळू पिराजी, गुजाबाई धनगरीन, कमलबाई भानुराव भानुसे आणि फ्रँकी ही व्यक्तिचित्रणं वाचणाऱ्याला नजर हटवू देत नाही. ती सरळ तुमच्या हृदयाला हात घालतात.

पण ती केवळ भावसंवेद्य नाहीत. त्यात सभोवतालचं सूक्ष्म निरीक्षण आहे. ही दुःखग्रस्त माणसं कधी व्यवस्थेनं लुबाडली गेली आहेत, तर कधी जातिव्यवस्थेच्या आगीत होरपळलेली आहेत, तर कधी माणसातल्या वासनेनं घेतलेले बळी आहेत.

पवार यांच्या कवितेतली माणसं (ही या नावाची माणसं अस्तित्वात आहेत, असं पवार सांगत होते. त्यांनी थोडी ‘पोएटिक लिबर्टी’ घेतली आहे, पण म्हणून काल्पनिक पात्रं उभी केली नाहीत.) या दुःखांना सामोरं जाताना बहुतांशी दुःखाच्या डोळ्यात डोळे घालून, पाय रोवून उभी राहणारी माणसं आहेत. ते - 

जे सोसत नाही असले, तू दुःख मला का द्यावे?

- असा प्रश्न विचारणारी अगतिक माणसं नाहीत.

अशी माणसं शोधून त्यांच्या जीवनाचा सहृदय पट पवार वाचकांपुढे मांडतात, हे मला महत्त्वाचं वाटलं.

पण एक निरीक्षण असंही मांडता येईल की, जे मला पवार यांनीच लक्षात आणून दिलं- यात एकही खलवृत्तीची व्यक्ती नाही. खरं तर असायला हवी होती.

मानवी जीवनातली खलवृत्ती ही जन्मजात आहे, आपल्या गुणसूत्रांतच ती आहे की, ती जन्मानंतर होणारा संस्कार आहे की, एका विशिष्ट परिस्थतीत दिला गेलेली मानवी प्रतिसाद आहे, हे समजायला त्यातून मदत झाली असती. मी तर पवार यांना अशी विनंती करेन की, त्यांनी तशा व्यक्तिचित्रणांचाही एक संग्रह अवश्य काढावा, जेणेकरून मानवी जीवनाच्या सुष्ट-दुष्ट अशा दोन्ही प्रेरणांचा अधिक चांगला काव्यात्म शोध घेता येईल.

तसंच या व्यक्तिचित्रणांची एक स्पष्ट मर्यादा आहे. ती म्हणजे एखाददुसरा अपवाद वगळला तर यातून व्यवस्थागत शोषण, हिंसा, कुरूपता, विद्रुपीकरण ठळकपणे पुढे येत नाही. बहुतांश रचनांमध्ये ते व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवरच राहून जातं आणि शोषण, हिंसा आदींचे व्यापक, जागतिक व्यवस्थागत रूप अधोरेखित होत नाही. ते घडलं असतं तर या कवितांची महत्ता अजून वृद्धिंगत झाली असती.

अर्थात हे माझं व्यक्तिगत आकलन आणि मत आहे. कुणी सहमत होईलच, असं नाही.

या कवितेची प्रशिक्षित समीक्षकांनी दखल घेऊन तिच्याबद्दल माझ्यासारख्या असंख्य सामान्य वाचकांचं प्रबोधन करायला हवं, असंही वाटलं. कारण साप्ताहिक ‘साधना’तून सदर म्हणून छापून येत असताना आणि नंतर पुस्तकरूपानं प्रकाशित झाल्यावरही, हे पुस्तक बऱ्याच वाचकांच्या पसंतीस उतरलेलं आहेच.

संतोषजींना पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

.............................................................................................................................................

या कवितासंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4429

.............................................................................................................................................

लेखक गणेश कनाटे मराठी साहित्याचे अभ्यासक आहेत.

gankanate@gmail.com
.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......