टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • उद्धव ठाकरे, अल्पेश ठाकोर, नारायण राणे, राधेश्याम मोपलवार आणि उदित राज
  • Thu , 28 December 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya अल्पेश ठाकोर Alpesh Thakor नारायण राणे Narayan Rane उद्धव ठाकरे Uddhav Thackeray उदित राज Udit Raj राधेश्याम मोपलवार Radheshyam Mopalwar

१. गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील अनाचार संपवण्यासाठीच आपण, जिग्नेश मवाणी आणि हार्दिक पटेल यांनी झंझावात निर्माण केला. यामुळे भाजपची पीछेहाट झाल्याचा दावा गुजरातचे नवनिर्वाचित आमदार अल्पेश ठाकोर यांनी एका कार्यक्रमात केला. भाजपच्या एकाधिकारशाहीमुळे देशातील संसदीय लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उभारलेल्या लढ्याला साथ देऊन महाराष्ट्र भाजपमुक्त करण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला. देशात अराजक माजले असून दलित, अल्पसंख्याक वर्ग दहशतीखाली जगत आहे. भारतीय संविधानानं दिलेल्या अधिकारांची पायमल्ली होत आहे. ठरावीक वर्गाच्या हितासाठी बहुसंख्याक जनतेला वेठीस धरले जात आहे. हा प्रकार संविधानाला धोकादायक आहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.

अल्पेश, जिग्नेश आणि हार्दिक यांनी गुजरातमध्ये निर्माण केलेला झंझावात काही खोटा नव्हता, पण, तो कशाचा होता, याचा विचार निवडणुकीनंतर किमान ते तरी करणार आहेत की नाही? आज भाजपला संपवण्याच्या समान उद्दिष्टानं त्यांना एकत्र आणलं आहे. मात्र, एकत्रित वाटचालीचा समान कार्यक्रम जातीपातींच्या राजकारणात कसा निर्माण करणार? शिवाय लोकशाहीत विरोधी पक्ष संपवण्याची भाषा लोकशाहीचा आत्माच न गवसलेले, अपरिपक्व आणि कोत्या बुद्धीचे राजकारणीच करू शकतात. त्यांचं अनुकरण करण्याची गरज काय?

.............................................................................................................................................

२. कोट्यवधी रुपयांच्या जमीन व्यवहारांमध्ये गुंतलेल्या राधेशाम मोपलवार या वादग्रस्त अधिकाऱ्याची चौकशी लवकर संपवून या अधिकाऱ्याला अभय देण्याबरोबरच त्यांची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. अशा अधिकाऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एवढं प्रेम का, असा सवाल काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. मुख्यमंत्री काही ठरावीक अधिकाऱ्यांच्या प्रभावाखाली गेल्याची टीकाही विरोधकांनी केली आहे. पावसाळी अधिवेशनातच मोपलवार यांची चित्रफीत समोर आली होती. सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यावर आपण लगेचच या पदावर परतू, असं मोपलवार सर्वांना सांगत होते.

काही अपरिग्रही मंडळी पैशाला हात लावत नाहीत. ती पैसे स्वत:जवळ बाळगत नाहीत. तरीही त्यांचे सगळे जीवनव्यवहार आरामात सुरू असतात. कारण, त्यांच्यासाठी त्यांचेच पैसे खर्च करण्याकरता त्यांनी नेमलेला पगारी माणूस सावलीसारखा सतत त्यांच्याबरोबरच असतो. त्याच्यामुळे यांचा जीवनव्यवहार चालतो आणि अपरिग्रहाचं व्रतही तुटत नाही... मुख्यमंत्री आणि मोपलवारांशी याचा संबंध काही नाही, सहज आठवलं.

.............................................................................................................................................

३. एकेकाळी ‘बामसेफ’ या कडव्या दलित संघटनेशी नातं सांगणारे दिल्लीतील भाजप खासदार डॉ. उदित राज हे जवळपास बंडखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेले आहेत. डॉ. राज हे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अनुसूचित जाती-जमातींच्या अखिल भारतीय महासंघातर्फे आयोजित सभेत म्हणाले की, सरकारी नोकऱ्यांमधील भरती बंद केली आहे आणि आऊटसोर्सिंगच्या नावाखाली कंत्राटीकरण करून दलित, आदिवासींचा नोकऱ्यांमधील हक्क पद्धतशीरपणे डावलला जात आहे. बढत्यांमधील आरक्षणातही खोडा घातला जात आहे. याविरुद्ध आत्ताच एकत्र आलो नाही तर नंतर पश्चातापाची वेळ येईल. त्यांनी थेटपणे मोदी सरकारचा उल्लेख करण्याचे टाळलं; पण आपलं ‘लक्ष्य’ लपवण्याचा प्रयत्नदेखील केला नाही. केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांच्यावर टीका करताना डॉ. राज म्हणाले, ‘राज्याला कोणताच धर्म नसतो. म्हणून तर राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख आहे. तो वगळण्यास ठाम विरोध आहे. उद्या लोकशाही शब्द वगळण्याची मागणी कराल. भारतामध्ये तुम्हाला काय धर्मशाही आणायची आहे का?’

राज यांना आता झालेला साक्षात्कार मनोज्ञ आहे. बामसेफची पार्श्वभूमी असताना त्यांनी भारतीय जनता पक्षात मुळात प्रवेश कसा केला? या पक्षाची आणि त्याच्या मातृसंस्थेची विचारधारा काय आहे, त्यांची उद्दिष्टं काय आहेत, याची त्यांना तेव्हा कल्पनाच आली नव्हती, यावर विश्वास ठेवणं कठीण आहे.

.............................................................................................................................................

४. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एका तक्रारीवरून महाबळेश्वरमधील एक रिसॉर्ट सील केलं गेलं आहे. प्रख्यात उद्योजक अविनाश भोसले यांच्या बंगल्यात मुक्कामाला असताना शेजारच्या रिसॉर्टमध्ये रात्री दहानंतर मोठ्या आवाजात संगीत वाजत होतं, त्यानं उद्धव यांना त्रास झाला. उद्धव यांच्याकडून ‘विनंती’ केली गेल्यानंतरही संगीताचा आवाज कमी केला गेला नाही. आता या रिसॉर्टमध्ये परवानगीपेक्षा अधिक खोल्या आणि अन्य अनियमितता आढळल्या आणि ते सील केलं गेलं.

उद्धव ठाकरे यांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो, हे ऐकून राज्यात अनेक लोक खुसुखुसू ते खो खो हसले असतील. धर्माच्या आणि प्रांताच्या नावाखाली एकाहून एक उच्छादी उपक्रम आयोजित करणाऱ्या आणि सर्व उच्छादी उत्सवांना परंपरेच्या नावाखाली संरक्षण देणाऱ्या पक्षाच्या नेत्यांचे कान खरं तर तयार झालेले असायला हवे होते. तसं झालं नसेल तर या सगळ्याच धर्मवादी नेत्यांच्या निवासस्थानाबाहेरच सर्व उच्छादी उत्सव सगळ्या धांगडधिंग्यासह साजरे करून त्यांचे कान किटवले पाहिजेत.

.............................................................................................................................................

५. मराठी माणसांना न्याय देण्यासाठी शिवसेनेची निर्मिती होती; परंतु मराठी माणसाला अद्याप न्याय मिळालाच नाही. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढला आहे, असं प्रतिपादन या पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी नाशिकमध्ये केलं. ते म्हणाले, आज सर्वच जण म्हणतात की मुंबई मराठी माणसाची आहे. परंतु तरुणांनो, विचार करा मुंबईच्या आर्थिक उलाढालीत मराठी माणूस कुठे आहे?

राणे यांच्या भाषणातला ‘एका’ हा शब्द कंपोझिटरनं खाल्ला की रिपोर्टरनेच लिहिलेला नाही? कोकणातून मुंबईत आलेल्या एका मराठी माणसावर अन्याय झाला, म्हणून राणे यांना हा पक्ष काढावा लागला आहे. आधी एका पक्षानं मुख्यमंत्री बनवून नंतर अपमानित केलं. दुसऱ्या पक्षानं मुख्यमंत्रीपदाचं आमिष दाखवून झुलवत ठेवलं. आता तिसऱ्या पक्षानं प्रवेशही दिला नाही आणि विधिमंडळातही प्रवेश दिला नाही. त्यामुळे पक्षरूपी चुटकीभर सिंदूरानं आपणच आपला मळवट भरून घेण्याची पाळी या मराठी माणसावर आली आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......