टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नरेंद्र मोदी, शिवसेना, बाबा रामदेव, रविशंकर प्रसाद आणि स्वामी कौशलेंद्र प्रपन्नाचारी फलाहारी महाराज
  • Mon , 25 September 2017
  • विनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी शिवसेना बाबा रामदेव रविशंकर प्रसाद आणि स्वामी कौशलेंद्र प्रपन्नाचारी फलाहारी महाराज

१. माणसाच्या शरीराची रचना ४०० वर्षं जगता येईल, अशा पद्धतीची आहे. मात्र चुकीच्या जीवनशैलीमुळे माणूस मृत्यूला निमंत्रण देतो, असे योगगुरू रामदेव बाबा यांनी म्हटलं. सकस आहार आणि योग्य व्यायामाच्या मदतीनं आजार आणि औषधांपासून दूर राहण्याचं आवाहनही त्यांनी लोकांना केलं. आपण चुकीच्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित विकार आणि इतर आजारांना निमंत्रण देतो. त्यामुळे जीवनमान कमी होतं. आपण डॉक्टर आणि औषधांवर अवलंबून राहू लागतो, असं रामदेव बाबा म्हणाले.

बाबांची थिअरी नेहमीप्रमाणे भारी आहे. नेहमीप्रमाणेच तिला प्रॅक्टिकलचा काही आधार नाही. बाबा जिथं योगविद्या शिकले, त्या मठात आणि हिमालयाच्या परिसरात त्यांच्या मते निर्दोष जीवनशैली जगणारे खूप साधुबाबामहाराज आहेत. त्यांच्यातले कोणी सव्वाशे वर्षाच्या वर मजल मारत नाहीत आणि आजारी पडले की, अॅलोपथीच्याच प्रगत उपचारांचा आधार घेताना दिसतात. जिथं सर्वोत्तम जीवनमान उपलब्ध आहे, त्या देशांमधलं आयुर्मानही अजून शंभरीच्या आसपासच घुटमळतंय. माणसाचं शरीर ४०० वर्षं जगू शकतं, हे संशोधन बाबांनी गंभीरपणे योग्य मंचावर सप्रमाण मांडलं असतं, तर भारत आज एका नोबेल पुरस्काराचा धनी असला असता.

.............................................................................................................................................

२. वाढती महागाई आणि पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीविरोधात शिवसेना मुंबईत रस्त्यावर उतरली. ठिकठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली असून आझाद मैदानात शिवसेना नेते अनिल देसाई आणि खासदार अरविंद सावंत निषेध मोर्चात सहभागी झाले होते. ‘नहीं चाहिये अच्छे दिन; कोई लौटा दे मेरे बीते हुएँ दिन’, ‘नको तो गॅसचा नखरा, बाई आपला चुला बरा’, ‘बहुत हुई पेट्रोल- डिजल के महंगाई की मार, अब उखाड के फेक दो भाजप सरकार’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला.

देशभरात वाढती महागाई आणि पेट्रोल- डिझेलचे गगनाला भिडलेले दर यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. जनतेमधील या असंतोषाला शनिवारी शिवसेनेनं वाचा फोडली. शिवसैनिकांनी मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील केली. आदित्य ठाकरेदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. निवडणुकीत जे आश्वासन दिलं ते पूर्ण केलंच पाहिजे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.

हे आंदोलन पाहणारे सामान्य नागरिक बिचारे फोनवरून गेल्या दोन दिवसांतच अशी काय महागाई वाढली आहे आणि असे कशाचे दर वाढले आहेत, याची चौकशी करत होते. गेले अनेक महिने जनता वेगवेगळ्या त्रासांनी हैराण झालेली असताना हे कागदी वाघ लुटुपुटूच्या, भाषणाभाषणांच्या लढाया लढून दाखवत होते. आता सत्तासमीकरणं बदलत चालली, तसे देशातल्या सरकारविरोधी हवेवरही हेच स्वार व्हायला निघाले आहेत. इतकं पटत नाही, तर आधी बाणेदारपणे सत्तेतून बाहेर पडा आणि मग आंदोलनं करा.

.............................................................................................................................................

३. भाजपसाठी व्होटबँकेचं राजकारण आणि निवडणुकीतील विजयापेक्षा देशाचा विकास महत्त्वाचा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं. पशुधन आरोग्य मेळावा आयोजित केल्याबद्दल मी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन करतो. पशू आम्हाला मत देत नाही, मात्र तरीदेखील आम्ही त्यांचीही सेवा करतो, असं मोदींनी नमूद केलं. उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता आवश्यक असते. बहुसंख्य आजारांचं कारण अस्वच्छता असतं. आता ग्रामीण भागात शौचालयांसाठी मोहीम सुरू झाली असून हे चित्र दिलासादायक आहे. देशात आजही अनेकांकडे हक्काचं घर नाही. अशा लोकांना २०२२ पर्यंत हक्काचं घर देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

मोदी इतकं सगळं बोलले तरी वाराणसीतले लोक म्हणे नाराजच होते... ते ज्या गतीनं हे सरकार करतंय, ते सरकार करतंय, हे सरकार देणार, ते सरकार देणार, असं सांगत होते; त्या गतीनं गाडी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये भरण्यापर्यंत जाईल, अशी त्यांची अटकळ होती. पण, तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काही मोदी बोललेच नाहीत. शौचालयाचा वापर करण्यासाठी आधी पोटात काही भर असावी लागते, त्या बाबतीतही ते काही बोलल्याचं दिसत नाही. बाकी काही पशूंना आपले मतदार नसलेल्या माणसांपेक्षाही अधिक महत्त्व दिलं की, झापडबंद धार्मिकांच्या मतांचा मेवा मिळतो, हे मोदी यांच्या परिवाराला उत्तम प्रकारे माहिती आहे, हे मतदारांनाही नीटच कळून चुकलं आहे.

.............................................................................................................................................

४. स्वामी कौशलेंद्र प्रपन्नाचारी फलाहारी महाराज या अलवारमधील स्वयंघोषित अध्यात्मिक गुरूला बलात्काराच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे. छत्तीसगडमधील २१ वर्षीय तरुणीनं त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. न्यायालयानं ६० वर्षीय बाबा फलाहारी यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. ऑगस्टमध्ये पीडित तरुणी बाबा फलाहारी यांची भेट घेण्यासाठी आश्रमात गेली होती. तिचा पहिला पगार बाबा फलाहारी यांना अर्पण करण्यासाठी ती आश्रमात आली होती. सात ऑगस्टला बाबांनी खोलीत बोलावून आपल्यावर बलात्कार केला आणि या प्रकाराची वाच्यता न करण्याची धमकीही दिली, असं पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे.

बाबा-गुरू करणारे लोक एवढ्या आध्यात्मिक पॉवरबाज गुरूंकडूनही काहीही शिकत नाहीत, हे अशा घटनेमधून अधोरेखित होतं. पूर्वीच्या काळी पांढऱ्या मारुती कारमधून आलेल्या गुंडांचं पोलीस निर्जन ठिकाणी एन्काउंटर करत. त्यात सगळे गुंड वर्मी नेम लागून मरत आणि पोलिसांपैकी एखाद्याच्या बोटाला वगैरे निसटती गोळी चाटून जात असे. तेवढ्याच साचेबंदपणे बाबांच्या आश्रमात भक्तिणी आशीर्वादासाठी जातात, बाबा खासगी खोलीत बोलावतात आणि ‘कृपाप्रसाद’ देऊन पाठवतात. हे लक्षावधी वेळा होऊनही भक्तिणी बाबांच्या पायावर डोकं ठेवायला एकट्यानं जायच्या काही थांबत नाहीत.

.............................................................................................................................................

५. काही न्यायालयं सरकार चालवण्याची जबाबदारी पार पाडताना दिसत आहे. ही चिंतेची बाब आहे. न्यायालयांनी न्यायदानाचं काम करावं, आम्हाला जनतेनं निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांनी सरकार चालवण्याची जबाबदारी आमच्यावर सोडावी, असं प्रतिपादन केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केलं. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं शुक्रवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. जे निवडून आलेत त्यांची जबाबदारी शासन चालवण्याची आहे. त्यामुळे न्यायालयानं त्यात लक्ष घालू नये, असं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या अधिकाराबाबत सरकार आणि न्यायालय एक मसुदा तयार करत आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यावर असतानाच रविशंकर प्रसाद यांनी हे वक्तव्य केल्यानं त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

आता न्या. अभय ओक यांचंच उदाहरण घ्या. लोकभावनेचा आदर करण्याची जबाबदारी असलेलं लोकनियुक्त सरकार रात्रभर धिंगाणे घालण्याची परवानगी देत असताना त्यांनी ‘बीच में’ फांदा मारला आणि सायलेंट झोन की काय त्यांचा मुद्दा पुढे आणला. हे सरकार शांततेनं जगू पाहणाऱ्या बहुसंख्याकांचं प्रतिनिधित्व करत नाही, ते धिंगाणेबाज उत्सवप्रेमींचं सरकार आहे, इतकंही न्यायाधीशांना कळू नये. थांबा आता. रिटायर झाल्यावर अशा न्यायाधीशांना राज्यपालपदावर, राजदूतपदांवर वगैरे नियुक्ती होण्याचा चान्सच देणार नाही आम्ही लोकप्रतिनिधी!

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......