टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • रघुराम राजन, शिवाजी महाराज आणि अमित शहा
  • Mon , 11 September 2017
  • विनोदनामा टपल्या रघुराम राजन Raghuram Rajan शिवाजी महाराज Shivaji Maharaj अमित शहा Amit Shah उद्धव ठाकरे Uddhav Thackeray सचिन खेडेकर Sachin Khedekar जेनएनयू JNU

१. ‘शिकागो विद्यापीठानं रजा नाकारल्यामुळे आपण रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नरपद सोडलेलं नाही, सुरू केलेली कामं पुढे नेण्यासाठी या पदावर आणखी काही काळ काम करण्याची माझी इच्छा होती, पण सरकारनं मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे मला अमेरिकेत परत जावं लागलं,’ असं स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिलं आहे. ते म्हणाले, ‘रिझर्व्ह बँकेत आणखी काम करून बँकांचा कारभार आणखी स्वच्छ करण्याचं आपलं उद्दिष्ट होतं, पण सरकारनं तीन वर्षांची मुदत गेल्या वर्षी चार सप्टेंबरला संपल्यानंतर मुदतवाढीचा प्रस्ताव दिला नव्हता. मी मुदतवाढीसाठी सरकारच्या दाराशी गेलो नाही, पण बँकांची अनुत्पादित कर्जं कमी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पदावर राहण्याची तयारी दर्शवली होती.’

राजनबाबू, या सगळ्या जर-तरच्या गोष्टींना काहीच अर्थ नाही. तुम्हाला बँका स्वच्छ करायच्या होत्या, त्यांना अर्थव्यवस्था ‘साफ’ करायची होती. डॉ. मनमोहन सिंहांच्या लायब्ररीत डोकावण्याऐवजी ते त्यांच्या न्हाणीघरात डोकावले. त्यातून अर्थज्ञान कितीसं लाभणार? पण, एकंदर ‘प्रयोग’ करण्याची हौस दांडगी. त्यात अर्थशास्त्रात काही गम्य असलेल्या आणि त्या बाबतीतल्या अर्धवटांचे अर्धवट आदेश पाळण्याची तयारी नसलेल्या कोणाचाही अडथळाच झाला असता.

.............................................................................................................................................

२. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास गुजराती भाषेतून लिहिणार आहेत. त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून विविध पुस्तकांचा अभ्यास त्यांनी सुरू केला आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिली आहे. सहस्रबुद्धे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीही ते त्यांच्यावर गुजरातीमधून पुस्तक लिहिणार आहेत. महाराजांची सुरतेची लूट एवढंच चित्र गुजरातमध्ये रंगवलं जात आहे. हे चित्र बदलण्यासाठी ते पुस्तक लिहिणार असून गेल्या सहा महिन्यांपासून विविध विषयांच्या पुस्तकांचा त्यांनी अभ्यासही सुरू केला आहे.’

अरे देवा! महाराजांवर फारच मोठा दुर्धर प्रसंग ओढवला म्हणायचा. आता त्यांच्या नावाखाली कोणत्या नव्या पुड्या बांधल्या जातील, ते सांगता येत नाही. अर्थात त्यांच्या हयातीत आणि त्यांनंतरही, खासकरून गेल्या साठ-सत्तर वर्षांत, महाराजांवर आप्तस्वकीय म्हणवणाऱ्यांनीच असे अनेक दुर्धर प्रसंग आणले होते. त्यातून हा रयतेचा राजा सहीसलामत निसटून पुन्हा पुन्हा उजळून निघाला आहे. विद्यमान चाणक्याची मुत्सद्देगिरी त्यावर डाग लावण्याइतकी मोठी नाही.

.............................................................................................................................................

३. भाजपची मुंबईतील मोर्चेबांधणी आणि शिवसेनेतील आमदार, नगरसेवक, शाखाप्रमुख यांच्यामध्ये स्थानिक पातळीवर सुरू असलेले वाद यामुळे त्रस्त ‘मातोश्री’ला आता, आतापर्यंत अडगळीत पडलेल्या, कार्यालय प्रमुखांचं स्मरण झाले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यालय प्रमुखांना जवळ करत शिवसेनेला नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्या आहेत. तर कार्यालय प्रमुखांमार्फत स्थानिक पातळीवरील अनेक बित्तंबातम्यांचे खलिते ‘मातोश्री’वर पोहोचते होण्याच्या शक्यतेने स्थानिक नेत्यांच्या पोटात भीतीनं गोळा उठला आहे. ‘मातोश्री’च्या या खेळीमुळे कार्यालय प्रमुख विरुद्ध शिवसेनेतील स्थानिक पदाधिकारी असा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

स्थानिक पातळीवर सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये सामंजस्य असेल, तर पक्षप्रमुख राज्य कुणावर आणि कशावर करणार? असंही त्यांच्या हातात आता उरलंय काय? राज्याच्या सरकारमध्ये, केंद्र सरकारमध्ये राहायचं आणि वर आपणच प्रमुख विरोधक असल्याच्या थाटात सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेऊन खऱ्या विरोधकांना डोकं वर काढू द्यायचं नाही, हा खेळ खेळण्याशिवाय कसलीही भूमिका उरलेली नाही. स्थानिक पातळीवरच्या मांडवळ्या आता वेगळ्या ‘शाखां’कडे जायला लागल्या आहेत. अशा वेळी स्थानिक पातळीवरचा मुख्य आधार असलेले कार्यालय प्रमुख आठवणारच.

.............................................................................................................................................

४. चित्रपटानं हसवावं, गुदगुल्या कराव्यात, एवढ्यापुरतीच मनोरंजनाची कल्पना सीमित झाली आहे, असं मत प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांनी रविवारी व्यक्त केलं. विचार मांडणारा, अंतर्मुख करायला लावणारा चित्रपटही करमणूक करतो, ही संकल्पना बाद झाली आहे. त्यामुळे चित्रपट कसा पाहावा हे शिकवत रसास्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे आयोजित चित्रपट रसास्वाद कार्यशाळेचं उद्घाटन खेडेकर यांच्या हस्ते झालं, तेव्हा ते बोलत होते. ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक डॉ. श्यामला वनारसे यांनी संपादित केलेल्या ‘चित्रपट रसास्वाद : काही मूलभूत संकल्पना’ या डीव्हीडी संचाचं प्रकाशन करताना खेडेकर म्हणाले की, आपल्याकडे मनोरंजनाची संकल्पना खूप मर्यादित आहे. गंभीर चित्रपट दाखवा, परंतु हसत खेळत दाखवा, असं प्रेक्षकांना वाटते. त्यातूनच दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण चित्रपट तयार व्हावेत, अशीही मागणी केली जाते. दुसरीकडे मनोरंजनाने भरलेले चित्रपट चालत नाही. एवढंच नाही, तर राष्ट्रपतिपदक विजेत्या ‘रिंगण’ चित्रपटाला यश मिळत नाही. चांगले गुणात्मक चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. अशाही परिस्थितीत गेल्या दोन दशकांत मराठी चित्रपटांनी मोठं यश मिळवलं आहे. मात्र, चित्रपट कसा पाहावा हे शिकवण्याचं काम अशा कार्यशाळांमधून होतं. त्यामुळे गुणात्मक चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढण्यास मदतच होते.

केवळ चित्रपटच नाही, तर जगण्याच्या अन्य सगळ्याच क्षेत्रांमध्ये ही उथळ मनोरंजनाची अपेक्षा प्रबळ होऊन बसली आहे. लोकांना राजकारण, समाजकारण या सगळ्यामध्ये सगळं काही असं हलकं फुलकं करून हवं असतं. तसं करणारे लोक यशस्वी होतात. ज्यांचं जगणं इतकं उथळ आहे, त्यांच्या मनोरंजनाच्या कल्पना सखोल कशा असतील? मात्र, म्हणून आशयघन सिनेमे बनण्याचं थांबता कामा नये. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वस्त आणि प्रभावी प्रसार आणि प्रचाराची सोय झाली आहे. नवी पिढी अधिक दृक्साक्षर आहे. त्याचा फायदा घ्यायलाच हवा.

.............................................................................................................................................

५. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या (जेएनयूएसयू) निवडणुकीत एकीकृत डाव्या आघाडीनं चारही जागा मोठ्या मताधिक्यानं जिंकल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डाव्या आघाडीच्या उमेदवार गीता कुमारी यांनी अभाविपच्या निधी त्रिपाठी यांचा ४६४ मतांनी पराभव केला. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत एआयएसएच्या सिमोन झोया खान (१८७६) यांनी अभाविपचे दुर्गेश कुमार (१०२८) यांचा पराभव केला. सरचिटणीसपदी डाव्या आघाडीचे दुग्गिराला श्रीक्रिशा तर सहसचिवपदी डाव्या आघाडीचे शुभांशु सिंग (१७५५) निवडून आले. या विजयाचे श्रेय विद्यार्थ्यांना जातं, कारण लोकशाहीवादी संस्थांचं रक्षण केलं जावं असं लोकांना वाटतं, असं गीता कुमारी म्हणाल्या.

डाव्या आघाडीचा विजय झाला, यापेक्षा, जवळपास ५० टक्क्यांच्या फरकानं का होईना अभाविप दुसऱ्या क्रमांकावर आहे, ही यातली लक्षणीय बातमी आहे. जेएनयूसारख्या ठिकाणी दोन हजार मतदात्यांपैकी नऊशे ते हजार मुलांना भाजपच्या विचारधारेवर शिक्कामोर्तब करावंसं वाटतंय, ही यातली मुख्य घडामोड आहे. आता थोडी रणगाड्यांची साथ मिळाली की, हे समर्थन वाढून मधला पल्ला पार करू शकेल.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......