टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • ममता बॅनर्जी, अमित शहा, नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, न्या. प्रकाश टाटिया आणि अनिल गलगली
  • Mon , 21 August 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या ममता बॅनर्जी Mamata Banerjee नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah न्या. प्रकाश टाटिया Prakash Tatia अनिल गलगली Anil Galgali उद्धव ठाकरे Uddhav Thackeray

१. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शेलक्या शब्दांत टीका करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या एका विधानानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ‘नरेंद्र मोदींना माझा पाठिंबा असला तरी मी अमित शहांच्या विरोधात आहे’, असं बॅनर्जींनी म्हटलं आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), नोटाबंदी अशा विविध मुद्द्यांवरून मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवणाऱ्या ममता यांनी मोदींविरोधात नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसलं. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, ‘मी मोदींचं समर्थन करते, पण अमित शहांना माझा विरोध आहे. मी पंतप्रधानांना जबाबदार ठरवत नाही. मी त्यांना का जबाबदार ठरवावं? पण त्यांच्या पक्षानं जबाबदारीने वागले पाहिजे.’ ‘देशात हुकूमशाहीचं वातावरण असून एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरकारी कामात हस्तक्षेप करत आहेत’, असा दावा त्यांनी केला.

माझं मोदींना समर्थन आहे, पण शहांना विरोध आहे, अशी भूमिका म्हणजे मला एक मूर्ती डाव्या बाजूने छान वाटते, समोरून काही आवडत नाही, असं म्हणण्यासारखं आहे. मोदी-शहा अभिन्नत्वाला सुरुंग लावण्याचाच हा प्रकार आहे. अमित शहा हे मोदींना न विचारून, त्यांच्या आज्ञेविना, परवानगीविना सरकारी कामांमध्ये हस्तक्षेप करत असतील का? या देशात मोदी आणि शहा अशी दोन वेगवेगळी सत्ताकेंद्रं आहेत, असा अपप्रचार करण्याचाच हा प्रयत्न आहे ममताबाईंचा.

.............................................................................................................................................

२. हिंदुत्वाबाबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या प्रखर भूमिकेतूनच हिंदुत्वाचा विचार देशात रुजला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या शिवसेना-भाजपला एकेकाळी जे लोक अस्पृश्य समजत होते, तेच आज सत्ता असल्यानं ‘आ गले लग जा’चा कार्यक्रम करत असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तर एखादी भूमिका घेतल्यानंतर त्याच्यामागे ठामपणे उभं राहणं, हे बाळासाहेबांचं वैशिष्ट्य होतं, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं. शिवसेनाप्रमुखांच्या मुलाखतींचा दस्तावेज असलेल्या ‘एकवचनी’ या खासदार संजय राऊत यांच्या द्विखंडीय संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात हे नेते बोलत होते.

बाळासाहेब हे कसलेले राजकारणी होते, त्यामुळे लवचीक होते, याची असंख्य उदाहरणं त्यांच्या चरित्रात सापडतील. दरवेळी घेतलेली नवी भूमिका आधीच्या भूमिकेपेक्षा ठामपणे मांडण्याचं कसब त्यांना अवगत होतं. अन्यथा, संजय दत्तसारखा देशद्रोही एका रात्रीत उभरता सितारा बनला नसता. शिवसेना आणि भाजप यांच्याशी अनेकांनी घरोबा केला, तसा त्यांनीही सत्तेसाठी अनेकांशी पाट लावला आहे... ती ती विचारसरणी पटल्यामुळे त्या युती आणि आघाड्या झाल्या का? शिवसेना आणि भाजपशी सोयरिकी ही फक्त तात्कालिक सोय आहे, तो हिंदुत्वाच्या विचारधारेला दिलेला कौल वगैरे नाही.

.............................................................................................................................................

३. लिव्ह-इन रिलेशनशिप हे ‘अपवित्र नातं’ आहे, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच राजस्थान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलं असतानाच, आता त्या राज्याच्या मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांनीही लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणजे एक प्रकारे ‘सामाजिक दहशतवाद’ आहे, असं विधान केलं आहे. पुढे कुणालाही कोणतीही सूचना न देता दोन लोक अशा प्रकारे एकत्र राहून समाजाची प्रतिष्ठा धोक्यात आणण्याचं काम करतात. तसंच समाजातील वातावरण दूषित केलं जात आहे, असं ते म्हणाले. या संदर्भात कायदा करण्याची गरज असून ‘लिव्ह-इन’साठीही नोंदणी बंधनकारक करावी, अशी मागणी त्यांनी केली. ‘लिव्ह-इन’ हा सामाजिक दहशतवाद आहे. समाजाची प्रतिष्ठा धोक्यात आणणारी ही ‘संस्था’ आहे, असंही ते म्हणाले.

राजस्थान पंधराव्या शतकातून सोळाव्या शतकात आला, तर त्याचा मोठा सोहळा करता येईल ना साजरा? या देशात ‘नररत्नांची खाण’ या उपाधीला पात्र ठरण्यासाठी अनेक राज्यं आणि केंद्र सरकारमध्ये मोठी चढाओढ सुरू असली, तर या बाबतीत राजस्थानच्या पासंगालाही कोणी पुरणार नाही, यात शंका नाही. या मध्ययुगीन विचारसरणीचा देशभर सुरू असलेला प्रचार फलद्रूप होऊन सगळा देश हळुहळू राजस्थानच्या बरोबरीला जाईल, तेव्हाच तो पुण्यवान आणि पवित्र होईल, यात शंका नाही.

.............................................................................................................................................

४. राज्य सरकारच्या अखत्यारीतील सह्याद्री राज्य अतिथीगृहाचा वापर पाककृती स्पर्धेसाठी करण्यात आला असून, नियम मोडणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, तसंच संबंधितांकडून व्यावसायिक भाडं वसूल करण्यात यावं, अशी मागणी माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मलबार हिलवरील सह्याद्री राज्य अतिथीगृहाचा वापर आणि बैठकांबाबत स्पष्ट शासन परिपत्रक असतानाही आयएएस वाइव्हज असोसिएशन या सनदी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या संघटनेने त्याचा गैरवापर केला, असा आरोप गलगली यांनी केला आहे.

गलगली यांचे बोलविते धनी कोण आहेत, हे नीट तपासून पाहण्याची गरज आहे. ही पाककला स्पर्धा सनदी अधिकाऱ्यांमध्येच आयोजित करण्यात आली होती आणि त्यात एक अधिकारीच विजेते ठरले आहेत, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या पत्नींना या अतिथीगृहाचा ‘लाभ’ मिळत राहिला, तर हळुहळू अशा स्पर्धा भरवून त्या सर्व प्रकारचं घरकाम यजमानांच्या गळ्यात मारतील, अशा भीतीपोटी आयएएस अधिकाऱ्यांनीच गलगली यांना, नेहमीच्या सवयीने, कागदपत्रं पुरवली असतील, अशी दाट शंका आहे.
.............................................................................................................................................

५. नोटाबंदीचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्यानंतर एकाएकी ‘पंतप्रधान जनधन योजने’तील खात्यांना महत्त्व प्राप्त झालं होतं. नोटाबंदीच्या पन्नास दिवसांत या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा झाल्यानं केंद्र सरकारचे डोळे विस्फारले होते. मात्र, नोटाबंदीनंतर केवळ सहा महिन्यांतच खात्यातील रकमेला पाय फुटले असून, १९ जुलै २०१७अखेर खात्यातील रकमेत दहा हजार कोटींची घट झाली आहे. एकीकडे रकमेत घट झाली असली तरी जानेवारी ते जुलै २०१७ या कालावधीत जनधन खात्यांमध्ये ३.२ कोटी खात्यांची भर पडली आहे. जानेवारीमध्ये २५.८ कोटींवर असणारी जनधनच्या खात्यांची संख्या आता २९.१ कोटींवर गेली आहे.

नोटबंदी ही अनपेक्षितपणे काळा पैसा पांढरा करून घेण्याची सर्वांत यशस्वी योजना ठरली आहे. की तसंच अपेक्षित होतं, कोण जाणे! भविष्यात पुन्हा लहरी महंमदाची लहर फिरून काही तसाच प्रसंग ओढवला तर हाताशी असावीत, म्हणून प्रत्येक शेठनं आपल्या चाकरांच्या नावे खाती उघडून ठेवली असणार. काळ्याचे पांढरे करण्याची इतकी सुलभ योजना दुसरी कुठून तयार होणार?

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......