टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीचं वाराणसीतील पोस्टर
  • Sat , 19 August 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नरेंद्र मोदी अमित शहा अहमद पटेल राहुल गांधी हरिश वर्मा

१. भाजप पुढील पाच-दहा नव्हे, तर ५० वर्षांसाठी सत्तेवर आला आहे. हीच भावना कार्यकर्त्यांमध्ये असेल तरच देशात परिवर्तन शक्य आहे, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बोलून दाखवला आहे. कार्यकर्त्यांना आता आराम करण्याचा अधिकार नाही. देशात जर सकारात्मक बदल पाहायचे असतील तर न थकता, न थांबता ठरवलेल्या दिशेनं पुढे जावे लागेल, असंही ते म्हणाले.

अरे बापरे, फारच धडकी भरवता राव तुम्ही! गोरखपूरच्या घटनेसारख्या घटना होतच असतात, हे विधान बहुधा अशाच आत्मविश्वासातून आलं असणार. जनतेनं आपल्याला आता ५० वर्षांसाठी निवडलंय, याची खात्री असेल, तर कार्यकर्त्यांनी खरं तर पंचवीसेक वर्षं फक्त आराम आणि इनकमिंगची मोजदादच केली पाहिजे. प्रमोद महाजन नावाचे एक दिवंगत नेते होऊन गेले तुमच्या पक्षाचे. त्यांनाही, तुमच्याच पक्षाच्या, पण, तुमच्यापेक्षा खूपच बऱ्या राजवटीमुळे अख्खा भारत देश झगमगून निघाल्याचा भास व्हायला लागला होता… निवडणुकीत डोळयांसमोर काजवे चमकल्यावर झगमगाटाचा अन्वयार्थ त्यांना समजला होता. 

.............................................................................................................................................

२. “ राज्यसभा निवडणुकीत तुम्ही भाजप अध्यक्ष अमित शहांच्या नाकावर टिच्चून विजय मिळवलात. आता तशीच कामगिरी विधानसभा निवडणुकीतही करा. भाजपला हरविण्याचे शिवधनुष्य स्वीकारा,’’ असे सांगत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोनिया गांधींचे प्रभावशाली राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याकडे गुजरात विधानसभा निवडणुकीची सर्व सूत्रं सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अमित शहा विरुद्ध अहमद पटेल या राजकीय व्यवस्थापनातील दोन धुरीणांमधील संघर्षांचा भाग दोन गुजरात विधानसभेच्या आगामी निवडणुकीत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. पटेल यांच्याबरोबर असलेल्या कथित मतभेदांच्या पार्श्वभूमीवर राहुल यांच्या निर्णयाने अनेकांना धक्का बसला.

राहुल यांनी गेल्या कित्येक महिन्यांमध्ये घेतलेला हा पहिला सेन्सिबल निर्णय असावा. पंतप्रधान आणि भाजपच्या पक्षाध्यक्षांसाठी गुजरात म्हणजे नाक आहे. ते कापून अपशकून करण्याचं अशक्यप्राय धाडस काँग्रेस करणार असेलच, तर ते फक्त पटेल यांच्या सूत्रचालनातच होऊ शकतं, याचं भान त्यांना त्या मानाने वेळेत आलेलं आहे. अर्थात, ही लढाई मुद्द्यांची नसून दोन्ही पक्षाच्या बदनाम व्यवस्थापकांमधली गुद्द्यांची लढाई आहे, हे काही फार चांगलं लक्षण म्हणता येणार नाही.

.............................................................................................................................................

३. सैन्याचं आधुनिकीकरण करण्याची गर्जना मोदी सरकारनं केली असली तरी प्रत्यक्षात या प्रयत्नांना हादरा बसला आहे. संरक्षण मंत्रालयानं भूदलासाठी ४४ हजार ‘लाईट मशिन गन’ खरेदीची निविदा रद्द केली असून दोन वर्षात तिसऱ्यांदा सैन्यानं शस्त्रास्त्र खरेदीचा प्रस्ताव रद्द केला आहे. मशिन गन खरेदीची निविदा सुमारे १३ हजार कोटी रुपयांची होती.

सैन्याचं आधुनिकीकरण याचा अर्थ शस्त्रास्त्र खरेदी असा कसा होतो? मोदी आणि इतर पंतप्रधानांमध्ये काही फरक आहे की नाही? दिवसाला चार सूट बदलत ते अहोरात्र परदेश दौरे करतात ते का सैन्याच्या अशा आधुनिकीकरणासाठी? ते सर्व देशांवर जरब बसवतायत. एकदा ती बसली की चीन असो वा पाकिस्तान, मुळात कोणीही आपल्याकडे डोळे वटारून पाहण्याची हिंमतच करणार नाही. बाकीची किरकोळ खुसपटं सांभाळायला जेम्स बाँड डोवल आहेतच. लढाई या संकल्पनेचंच आधुनिकीकरण करतायत ते… त्यातून आपसूक सैन्याचं आधुनिकीकरण होऊन जातंच.

.............................................................................................................................................

४. छत्तीसगडमध्ये भाजप नेत्याच्या गोशाळेतील जवळपास २०० गायींचा उपासमारीमुळे आणि योग्य वेळेत उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाला आहे. ही गोशाळा भाजपचे नेते हरिश वर्मा यांच्या मालकीची आहे. २०० गायींपैकी २७ गायींचा मृत्यू उपासमारीनं झाला असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. इतर गायींच्या मृत्यूमागील कारणाबद्दल अद्याप तरी कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं.

उत्तर प्रदेशात मुलं दगावली ती कशानं, याचं नेमकं कारण काय, हे सर्वोच्च न्यायालयानं विचारण्याची पाळी येते, ते ठीक आहे. शेवटी मुलंच आहेत ती! अशीही दगावत असतातच. पण, या तर पवित्र गोमाता आहेत. २०० गुणिले ३३ कोटी इतक्या देवांशीच संबंधित विषय आहे हा. इथं नेमकं उत्तर मिळालं पाहिजे. २७ गायी उपासमारीनं मेल्या असणार आणि बाकीच्या बहुधा शोकातिरेकानं गेल्या असणार. गायीच्या मांसाच्या नुसत्या संशयानं माणसं कापायला निघणारे माथेफिरू गोगुंड कुठे आहेत? २०० मातांच्या हत्येची काय शिक्षा देणार ते वर्माला?

.............................................................................................................................................

५. वाराणसी या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदारसंघातून बेपत्ता असल्याचं पोस्टर शहरात लावण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. हे पोस्टर कोण लावलं आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. लाचार, हताश काशीवासियांनी हे पोस्टर लावलं आहे, असं त्यावर लिहिलेलं आहे. पोलिस पोस्टर लावणाऱ्यांचा शोध घेत आहेत. ‘जाने वह कौन सा देस जहां तुम चले गए’, असं लिहिलेल्या पोस्टरवर मोदींचं छायाचित्र आहे. वाराणसीत यांना मत मागताना शेवटचं पाहिलं होतं. तेव्हापासून ते बेपत्ता आहेत. ते बेपत्ता असल्यामुळे नाईलाजानं गुन्हा दाखल करावा लागत आहे, असं या पोस्टरवर लिहिलं आहे.

काशी के वासियों, लाइन में आओ… तुमच्या पुढे संसद आहे, देशवासी आहेत, अनेक घटनांमधले पीडित आहेत… त्या सगळ्यांनाही हाच प्रश्न पडलेला आहे… दोन ‘मन की बात’च्या प्रसारणांमधल्या काळात पंतप्रधान नेमके कुठे बेपत्ता असतात? ते जिथं कुठे असतील तिथं देशहिताचाच विचार त्यांच्या मनात असतो आणि ते श्वासोच्छवास आणि अन्य नैमित्तिक दैहिक आन्हिकेही देशहितासाठीच करत असतात, याबाबतीत मात्र कोणीही मनात संदेह बाळगू नये.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......