‘झिम्मा’ : ‘मला आवडला,’ असं म्हणणाऱ्या पुरुषांनी पुन्हा विचार करावा आणि मग पूर्ण जबाबदारीनं हे विधान करावं
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
हेमंत कर्णिक
  • ‘झिम्मा’ या सिनेमाचं एक पोस्टर
  • Mon , 13 December 2021
  • कला-संस्कृती मराठी सिनेमा झिम्माJhimma हेमंत ढोमे Hemant Dhome सिद्धार्थ चांदेकर Siddharth Chandekar निर्मिती सावंत Nirmiti Sawant सुचित्रा बांदेकर Suchitra Bandekar मृण्मयी गोडबोले Mrinmayee Godbole क्षिती जोग Kshitee Jog सुहास जोशी Suhas Joshi सोनाली कुलकर्णी Sonalee Kulkarni सायली संजीव Sayali Sanjeev

इतकं चपखल नाव क्वचित सापडतं! ‘झिम्मा’ हा एक बायकांचा पारंपरिक खेळ आहे. आणि अनेकींनी मिळून खेळायचा खेळ आहे. या नुसत्या नावात चित्रपटाचा अर्धाअधिक आशय व्यक्त होतो!

जगण्याच्या लढाईतल्या छोट्या छोट्या विजयांची ही गोष्ट आहे. कोणीच महापराक्रम करत नाही की, कुठे क्रांती होत नाही की, कोणी कोणाला चितपट करत नाही. मात्र या छोट्या छोट्या विजयांची बेरीज मोठी आहे. म्हणजे दोन अधिक तीन ही बेरीज पाच न होता पन्नास होत आहे, हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य. हे कसं, ते पाहू.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

काही गृहीतकं. बायका ही एक ‘दलित’ जात. हे जग पुरुषांचं आहे. पुरुषांच्या आसऱ्यानं बायकांनी जगावं, आनंदी रहावं, पराक्रम करावेत. पुरुषाला केंद्रस्थानी ठेवून बाई पुरुषाच्या, किंवा अनेक पुरुषांच्या डोक्यावर मिरेसुद्धा वाटू शकते. पण ती जर एकूण पुरुषजातीला न जुमानण्याची भूमिका घेणार असेल, तर तिची खैर नाही. चित्रपटातल्या सात बायकांना अंतर्यामी हे माहीत आहे. काहींना हे दुय्यमत्व जगावं लागत आहे, तर काही इथंतिथं स्वातंत्र्याची टोपी घालून मिरवत आहेत. लंडनला फिरायला जातात, याचा अर्थ त्या सुखवस्तू आहेत. त्यांच्या जगण्याच्या मूलभूत गरजा भागल्या आहेत. चित्रपटातली गोष्ट गरजा भागण्याच्या पुढची आहे. बाईला मनोमन खुपणाऱ्या, अपमानित करणाऱ्या, शब्दांत पकडता येईल, अशा नसणाऱ्या खऱ्या-खोट्या जुलमाभोवतीची ही गोष्ट आहे. आणि टॉलस्टॉय म्हणतो त्याप्रमाणे ‘सर्व सुखी माणसं एकाच प्रकारे सुखी असली; तरी प्रत्येक दु:खी माणसाचं दु:ख वेगळं असतं, त्याचं स्वत:चं असतं.’ इथल्या सगळ्या बायका दु:खी आहेत, असं नाही; पण प्रत्येकीच्या मनात काहीतरी सल आहे, काही अधुरेपण आहे.

एकीला आत्मविश्वास सापडतो, एकीला अती प्रेमळ जोडीदार नकोसा होऊ लागलेला असतो, त्यातून मार्ग मिळतो. एकीला शोध लागतो की, काही बंधनं आपली आपणच स्वत:वर घालून घेतलेली असतात. एक जण सोशल मीडियावर मित्र झालेल्याला भेटायला निघून जाते आणि तिच्या तशा जाण्याचं दुसऱ्या एकीला फार म्हणजे फारच अप्रूप वाटत राहतं!

सर्वसाधारणपणे एका चित्रपटात नायक-नायिकेबरोबर आणखी एक दोन कथाप्रवाह असणं दुर्मीळ नाही; इथं सात आहेत! नायक-नायिका असं कोणीच नाही. अशा स्थितीत सात स्वतंत्र कथाप्रवाह एकाच वेळी मांडणं, हे अतिशय अवघड काम आहे. तसं करताना ‘एक प्रवेश संपला, दुसरा सुरू’ असा तुटकपणा जाणवणं सहज शक्य आहे. पण इथं तसं होत नाही. एकीची गोष्ट सुरू असते आणि बघता बघता ती दुसरीच्या गोष्टीला टेकू/खो देते. त्यातूनच तिसरीची गोष्ट पुढे सरकू लागते. आणि यात आपण एका जंक्शनवर उतरून गाडी बदलून दुसरीकडे चाललो आहोत, असं अजिबात होत नाही. अर्थात, यात कोणाचीच गोष्ट मध्यवर्ती होत नसल्यानं शेवटी एक ‘फील गुड स्किट’ बघितल्यासारखं काहींना वाटू शकेल; पण वर म्हटल्याप्रमाणे सात जणी मिळून एक गंभीर आशयाचा गोफ विणतात, हे समजा उघड जाणवलं नाही, तरी नेणीवेत नक्की रुजत असणार.

‘झिम्मा’ या नावाला धरून असलेलं गाणं चित्रपटभर अधूनमधून वाजत राहतं आणि त्या आशयाकडे लक्ष वेधत राहतं. किमान मला तरी तसं सतत होत राहिलं. ते गाणं नसतं, तर त्या घातपाती आशयापर्यंत पोचायला मला वेळ लागला असता.

हो, हा चित्रपट पंचमस्तंभी आहे. पोटात शिरून घातपात करणारा आहे. ‘मला आवडला,’ असं म्हणणाऱ्या पुरुषांनी पुन्हा विचार करावा आणि मग पूर्ण जबाबदारीनं हे विधान करावं. सर्व वयाच्या बायका हा चित्रपट प्रचंड एन्जॉय करतात, असं मी ऐकून होतो; त्याचा प्रत्यक्ष प्रत्ययसुद्धा घेतला. आता हा योगायोग नव्हे की, संपूर्ण चित्रपटात पुरुषाची बाजू उजवी ठरली, खरी ठरली, बाईला पडतं घ्यावं लागलं, याचं एक उदाहरण मला आठवत नाही. बाईचं सदा वरचढ ठरणं, हे नॉर्मल नाही. आता, ‘आजही ९९ टक्के चित्रपटांमध्ये पुरुषच वरचढ ठरताना दिसतो आणि त्याला हे उत्तर आहे,’ असं एखादी बाणेदार बाई म्हणेलही; पण व्यवस्था पुरुषप्रधान आहे, हे लक्षात घेतलं, तर पुरुष वरचढ ठरणं, हेच अपेक्षित आहे! न्याय-अन्याय बाजूला ठेवले, तर तशीच रूढी आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

म्हणजे कसं, तर बंडबिंड केलं किंवा शिकलीसवरली किंवा नावबिव कमावलं, तरी बाईनं पुरुषावर कुरघोडी करता कामा नये. आणि अशी ‘शिकवण’ चित्रपटानं, टीव्ही मालिकेनं, नाटकानं दिली; तर त्यात पुरुषाला दिलेलं झुकतं माप वावगं ठरत नाही. कारण सगळी समाजव्यवस्थाच पुरुषाला झुकतं माप देण्याकडे झुकली आहे. असं दाखवणं, असा संदेश देणं हे नॉर्मलच आहे. आणि उलट केलं, तर ते कितीही बरोबर, न्याय्य असलं; तरी ते ‘वेगळं’, लक्षणीय होय.

थोडं तपशिलात जायचं, तर प्रकाश झाच्या ‘मृत्युदंड’ या चित्रपटात पुरुषत्वहीन, परंतु अरेरावी नवऱ्याची बायको परगावी जाते आणि गर्भवती होऊन परतते… तेव्हा तिला नवी अस्मिता गवसते; कारण खोट तिच्यात नसून नवऱ्यात आहे, याचा बिनतोड पुरावाच तिला मिळतो. पण हे प्रेक्षकांना पसंत पडलं नाही. अगदी चित्रपट पाहणाऱ्या बायकांनासुद्धा. नवऱ्याशिवाय दुसऱ्या पुरुषाशी संग करणं, तो मिरवणं आणि थेट नवऱ्यालाच आव्हान देणं, या एकावर एक कडी करणाऱ्या कृत्यांपैकी एकही भारतीय जनमानसाला मान्य होणं शक्य नव्हतं. त्यात बायकादेखील आल्या.

‘झिम्मा’मध्ये मात्र एका दृश्यात दोन तरुण मुली निस्संकोचपणे एका पुरुषासमोर सॅनिटरी पॅडबद्दल चर्चा करतात आणि त्याच्या उपस्थितीमुळे अवघडून जाण्याऐवजी त्याचीच टिंगल करतात! आता, ‘मृत्युदंड’पासून आजपर्यंत काळ बदलला, असं म्हणता येतं, हे खरं; पण हा प्रसंग बघताना ज्याप्रकारे थिएटरमधल्या बायका प्रचंड खिदळतात, ते पाहता त्यांना या प्रसंगातून बंधमुक्ततेची, आकाशात भरारी घेतल्याची अनुभूती मिळते, यात शंका नाही.

अशा कितीतरी लहान-लहान विषयांना ‘झिम्मा’ स्पर्श करतो. मैथिली आणि कबीर एकमेकांच्या जवळ येताहेत, असं दिसू लागतं आणि ती वाग्दत्त नवऱ्याला सोडून कबीरची होणार की काय, असं वाटू लागतं. पण तसं होत नाही. ते ‘मित्र’ होतात! आकर्षक तरुण आणि आकर्षक तरुणी एकमेकांच्या जवळ येतात, याचा अर्थ त्यांच्यात शारीरिक आकर्षण निर्माण होणारच, या निसरड्या अपेक्षेला थप्पड बसते.

आणि बाई-पुरुष यांच्यात असंही नातं असू शकतं, या मूल्याचं बीज रुजतं. आज कॉलेजवयात असलेल्या पिढीला यात कदाचित नवल वाटणार नाही; पण चित्रपट, मालिका यांचा प्रेक्षकवर्ग असलेल्या थोड्या मोठ्या (ते खूप मोठ्या) वयाच्या बायकांच्या हे पचनी पाडणं, हे कौशल्य आहे.

आणि त्यात घातपात आहे!

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

एक जण होणाऱ्या बायकोला म्हणतो, ‘मला तुझी सतत आठवण येते,’ आणि ती उत्तरते, ‘मला माझी स्पेस हवी आहे! ती दे, सारखा सोबत राहू नकोस!’ वास्तविक पारंपरिक स्थिती उलट आहे. लग्न झाल्यावर बायका नवऱ्याच्या मंत्रीमंडळात ‘होम मिनिस्टर’ होण्यात धन्यता मानतात! संसारात रममाण होतात. नवऱ्याच्या, मुलाबाळांच्या, कुटुंबाच्या जीवनात स्वत:ला विरघळवून टाकतात. नवरा त्याची स्पेस व्यवस्थित सांभाळत असतो. तो मित्रांबरोबर जातो, पितो, त्याला सार्वजनिक जीवन असू शकतं, नोकरीधंद्याच्या निमित्तानं तो दिवस-दिवस बाहेर असतो, वगैरे. बायको त्याच्या परतण्याकडे डोळे लावून घराची जबाबदारी सांभाळते. दिवसेंदिवस हे असं असण्याचं प्रमाण कमी होत चाललंय; पण अजून बहुसंख्येचं मानस याच दिशेला झुकलेलं आहे. नवरा-बायको दोघं नोकरी करत असले; तरी मित्रांच्या बायका एकमेकींच्या मैत्रिणी व्हाव्यात, अशी अपेक्षा असते. एका ठिकाणी काम करणाऱ्या बायकांचे नवरे मित्र होणं ऐकिवात नाही!

म्हणून स्पेस मागणारी बाई हा घातपात आहे! असे प्रसंग चित्रपटभर आहेत. घातपात चित्रपटात नाही; चित्रपट पाहून त्याला उत्स्फूर्तपणे दाद देणाऱ्या बायकांच्या मनात उमलतो आहे.

हा चित्रपट ‘बायकांचा’ आहे, हे कोणीही म्हणेल. यातल्या बायका कर्तृत्ववान, कुठल्याशा क्षेत्रात उच्च प्रतीचं कौशल्य असलेल्या नाहीत. या अर्थी त्या सामान्य आहेत. लंडनच्या ट्रिपमध्ये अचानक कुणाच्या अंतरंगातलं चित्रकलेचं, गायनाचं, यँव-त्यँवचं महान कौशल्य जागं होतं आणि मग ती जग जिंकायला निघते, असलं काहीही होत नाही.

पण एक गोची किंवा लबाडी आहे. यातली एकही बाई मुरकत नाही! अख्खं अस्तित्व पुरुषाचं लक्ष वेधण्याभोवती गुंफणारी नाही. पुरुषासारखं होणं, पुरुषाची बरोबरी करणं, एकापेक्षा अधिक पुरुषांना वश करणं, यात बुडालेल्या अनेक बायका स्त्रीवादीसुद्धा ठरू शकतात; पण इथली एकही बाई, या प्रकारची स्त्रीवादी नाही. एक इंदू आहे, जी सुरुवातीला तशी आहे की काय, असा संशय येतो; पण ती आजी आहे! सर्वांत वयस्कर आहे! तिला तिच्यावर लादलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या नकोशा झाल्या आहेत आणि त्या धुमसणाऱ्या बंडाच्या भावनेतून ती काहीबाही करू बघते, पण ते तेवढंच.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

.................................................................................................................................................................. 

ही लबाडी नाही का? बायका-बायका एकत्र येतात आणि पुरुषाला निस्संदर्भ करून मजा करू लागतात! नटतात, मुरडतात, शॉपिंग करतात, भांडतात; बायकांकडून जे जे (परंपरेला) अपेक्षित आहे, ते ते वर्तन करतात; फक्त एक गोष्ट सोडून. एकूण विश्वाच्या मध्यभागी पुरुषाला ठेवणं कमी कमी करत जातात. त्यांना पुरुषांविना मोकळं जगण्याचा नवा अर्थ सापडतो.

प्रचलित व्यवस्थेविरुद्ध हा घातपात आहे!

एक सांगायला हवं. चित्रपट मुळीच निर्दोष नाही. काही पात्रांचा मानसिक प्रवास तर्काला पटत नाही. रंग काहीसे जादा खेळकर आहेत. लंडनचा भूगोल यात एक महत्त्वाचं पात्र होऊ शकलं असतं, पण तसा प्रयत्न जाणवत नाही. परंतु या सगळ्या गोष्टी चित्रपटाच्या घातपाती स्वरूपासमोर फिक्या, बिनमहत्त्वाच्या ठरतात.

चित्रपट पूर्णपणे व्यावसायिक आहे. त्यात कुठेही ‘आर्ट फिल्म’चा आव नाही. एकेकाला जेव्हा काहीतरी ‘ज्ञान’ होतं, तेव्हा ते सोप्या शब्दांत स्पष्टपणे ऐकू येतं. त्यात काहीही तरल, सांकेतिक नाही. पटकन कळेल, अशा स्वरूपात हे जीवनविषयक संदेश नसते; त्याऐवजी तिथं ‘दिग्दर्शक दिसला असता’, तर ‘झिम्मा’ लोकप्रिय ठरण्याबरोबर जास्त नावाजला गेला असता.

तसं नसल्यानं ‘झिम्मा’ अगदीच पंचमस्तंभी, घातपाती ठरतो! संस्कृतिरक्षकांनी याची नोंद घ्यावी!

..................................................................................................................................................................

लेखक हेमंत कर्णिक ‘अक्षर’ या दिवाळी अंकाचे एक संपादक आणि स्तंभलेखक आहेत.

hemant.karnik@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......