केवळ चारित्र्य आणि लोकांचा विश्वास, या बळावर कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी महत्कार्य केले!
पडघम - राज्यकारण
संजय करंडे
  • कर्मवीर मामासाहेब जगदाळे
  • Mon , 29 May 2023
  • पडघम राज्यकारण कर्मवीर मामासाहेब जगदाळे Karmaveer Mamasaheb Jagdale

कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचा उद्या, ३० मे हा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीचा हा विशेष लेख...

.................................................................................................................................................................

बहुजन समाज शिकला पाहिजे, तरच तो विचारशील होईल व आपली प्रगती करेल, हे जाणत महात्मा जोतीराव फुले यांनी सामान्य, बहुजन माणसांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. फुल्यांनी शिक्षणाने मती सुधारते आणि त्यातूनच प्रगती होते, हा सिद्धान्त बहुजनांना दिला.

तो  अंगीकारत कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर मामासाहेब जगदाळे, परमपूज्य बापूजी साळुंखे, डॉ. पंजाबराव देशमुख यांसारख्या कर्मवीरांनी शिक्षणसंस्था स्थापन करून गोरगरिबांच्या, बहुजनांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. या कर्मवीरांकडे फार मोठी संपत्ती नव्हती, पण त्यांच्यावर लोकांचा प्रचंड विश्वास होता. लोकांच्या सहभागातून व सहकार्यातूनच त्यांनी बोर्डिंगच्या स्थापना केल्या; शाळा, महाविद्यालये, विविध कल्याणकारी संस्था यांची स्थापना केली आणि शिक्षणासोबतच लोक जागृतीचे व शोषणाच्या विरुद्ध लढण्याचे कामसुद्धा केले.

कर्मवीर मामासाहेब जगदाळे हे या चळवळीतील एक सोनेरी पान. महात्मा ज्योतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापासून प्रेरित होऊन त्यांनी एक-दोन विद्यार्थ्यांच्या एका बोर्डिंगपासून आपल्या शिक्षणसेवेचे काम सुरू केले. त्यातून पुढे ‘श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी’ ही महाराष्ट्रात नावाजलेली व निरपेक्ष भावनेने काम करणारी शिक्षणसंस्था उभी राहिली.

एका माणसाने गावोगावी फिरून, धान्य गोळा करून, लोकांच्या सहभागातून शाळा, महाविद्यालये वसतिगृह उभारली. त्यात अनेक बहुजन, गरीब शेतकरी कुटुंबातील मुले-मुली शिकल्या. पुढे त्यांनी देश-विदेशात नावलौकिक मिळवला.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

स्वातंत्र्यपूर्व काळात ग्रामीण भागात शिक्षणाच्या सुविधा अजिबात उपलब्ध नव्हत्या. सामान्य, गोरगरिबांच्या मुलांसाठी, अस्पृश्य मुलांसाठी, मुलींसाठी म्हणावी तितकी शिक्षण पूरक मानसिकता समाजात वाढीला लागलेली नव्हती. साधे दहावीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठीसुद्धा सोलापूर, पुणे यांसारख्या ठिकाणी जावे लागत असे. जे गरिबांना त्या काळी अजिबात परवडणारे नव्हते. अशा कालखंडात एक अर्धपोटी माणूस सामान्यांच्या मुलांना पोटाशी धरतो, त्यांच्या पोटाची आणि डोक्याची भूक भागवतो, हे केवढे अनमोल कार्य!

एक चरित्रकार मामांविषयी लिहितात, “मुलांनी पोतं घेऊन दारोदार जावं आणि शेतकऱ्यांच्या बायकांनी सूप भरून, टोपली भरून धान्य पोत्यात टाकावं असं घडू लागलं. काही ठिकाणी ज्वारीनं भरलेलं पोतच उचलून न्या म्हणणारे शेतकरी भेटले, स्वतःच्या बैलगाड्या जुंपून लोक धान्य बार्शीला आणून पोहोचवायची मदत करू लागले. सण १९४० ते ४३च्या दरम्यान शेतकरी बंधूंनी १०९० पोती ज्वारी जमा करून दिली.” काय किमया असेल ही!

मामांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. त्यासोबतच छ. शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, महात्मा जोतीराव फुले यांच्या विचाराचा प्रभावही होता. त्यामुळे त्यांच्या कार्यामागे समाज उद्धार आणि लोककल्याण हीच कळकळ होती.

शिक्षण कार्यासोबतच कर्मवीर मामांनी अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेदाच्या उच्चाटनासाठीसुद्धा काम केले. त्याविषयी यशवंत इर्लेकर लिहितात, “देवावर अंधश्रद्धा ठेवून, दगडाचे देवावर दह्या-दुधाचा अभिषेक करणाऱ्या आणि भोपे व बडवे यांना पोसण्यासाठी देवापुढे पैसे ठेवणाऱ्या भाविकांवर त्यांचा राग होता. लहान मुलांना दूध दही द्या. त्यांना शिक्षण देऊन सुशिक्षित बनवा देवळांना देणग्या देण्याऐवजी शिक्षण संस्थांना द्या असा मामांचा आग्रह होता.”

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

जातीभेदासारख्या अनिष्ठ प्रथेला मामांनी आपल्या बोर्डिंगमध्ये छेद दिला. तिथे कोणत्याही प्रकारे धार्मिक, जातीय भेदभाव केला जात नसे. हे तत्कालीन काळात एक क्रांतिकारी पाऊल होते. बार्शीत ‘हरिजन सेवक संघा’मार्फतदेखील मामांनी जातीभेद निर्मूलनाचे कार्य केले आहे. या सेवक संघामार्फत जे कार्यक्रम राबवले जात, त्यामध्ये भाषणे व व्याख्याने देण्याऐवजी एकत्र जेवणाच्या पंगतीचा कार्यक्रम करण्यास मामा सांगत असत. त्यातून अस्पृश्यतेची प्रथा नष्ट होईल आणि जातीभेदाचे निर्मूलन होईल असे मामांना वाटत असे.

हरिजन सेवक संघाच्या २ ऑक्टोबर १९४५च्या बैठकीत हॉटेल व केशकर्तनालयात हरिजनांना प्रवेश मिळालाच पाहिजे, यासाठी एक चळवळ उभारण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली होती. मामा तिचे एक सदस्य होते. नंतर त्यांच्या पुढाकाराने सात हॉटेल्स दलितांसाठी खुली करण्यात आली. त्यांच्या या कार्याला अनेकांनी विरोध केला, पण मामा अगदी धीराने त्या सर्व विरोधाला सामोरे गेले.

मामांना शेतकऱ्यांबद्दल विशेष कळवळा होता. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा केंद्रबिंदू शेतकरीच होता. हमाल, आडतदार, व्यापारी, तोलाई, नाकेदार, रामोशी इत्यादी अनेक प्रकारचे लोक शेतकऱ्यांची फसवणूक-अडवणूक करायचे आणि त्यांना लुबाडायचे. ती पाहून मामांना प्रचंड चीड येत होती. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवता यावी व त्याची लूट थांबवता यावी, यासाठी १९३७ साली त्यांनी ‘तरुण शेतकरी संघाची’ स्थापना केली. त्यामार्फत काम करणारे स्वयंसेवक तरुण भाजी मार्केट, कडबा तळ, सरपन विक्री, आडत दुकाने, जनावरांचा बाजार इ. ठिकाणी काम करू लागले. ते शेतकऱ्यांना मदत करत व सर्व बाबींवर सूक्ष्म लक्ष ठेवून शेतकऱ्यांना लुबाडणूकीपासून वाचवत. परिणामी मामांवर अनेक मारामारीचे प्रसंगदेखील आले, परंतु ते मागे हटले नाहीत.

शेतकऱ्यांना भांडवलाचा तुटवडा पडतो. खाजगी सावकाराकडून कर्ज घेतल्यास तो भरमसाठ व्याजदर आकारतो. त्यातून शेतकरी कर्जमुक्त होऊ शकत नाही, याची मामांना जाणीव होती. म्हणून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी मामांनी त्या काळी वेगवेगळ्या पतसंस्था काढल्या. शेतकऱ्यांना दर्जेदार व खात्रीशीर बियाणे मिळावे, यासाठी वसतिगृहाच्या आवारात बी-बियाणे तयार करण्याचे काम केले आणि शेतकऱ्यांना रास्त दरात उपलब्ध करून दिले.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

‘दोन बोटांनी काम करणाऱ्यांपेक्षा दहा बोटांनी काम करणाऱ्यांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे’, असा मामांचा आग्रह होता. संत सावता माळी यांनी जपलेली ‘श्रमप्रतिष्ठा’ मामा आपल्या वसतिगृहातील  मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत असत. त्यांच्या वसतीगृहात श्रमदानासाठी राखीव वेळ ठेवलेली असायची. काही विद्यार्थी ‘कमवा आणि शिका’ या योजनेतून शिक्षण घेत असत. ‘श्रमाशिवाय जेवण नाही’ असे म्हणण्यासही मामा कचरत नसत.

“मनुष्य जितके कष्ट करील. तितकीच त्याची सहनशक्ती वाढेल. त्या प्रमाणात तो सदृढ व समर्थ होईल. भोजनात पौष्टिक, पाचक, वैविध्यपूर्ण परंतू संतुलित आहारावर त्यांनी भर दिला”, हे हर्बर्ट स्पेन्सर यांचे शिक्षणविषयक तत्त्वज्ञान मामांनी आपल्या वसतिगृहात अमलात आणले. त्यासोबतच काबाड कष्ट करणाऱ्या मजुरांचा, गवंडी, पाथरूड यांचा मामा आदर करत असत. संस्थेच्या विविध कार्यक्रमांदरम्यान त्यांचा शेला-पागोटे देऊन सत्कारही करत.

मामांचा कृतियुक्त शिक्षणाकडे कल होता. शिक्षणाने माणूस पूर्णत्वाकडे गेला पाहिजे, ही शिक्षणाकडून मानवी समुदायाची अपेक्षा असते. हेच साधारणपणे महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, राविन्द्रानाथ टागोर व महात्मा फुले यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचे सार होते. या सर्वांचा प्रभाव मामासाहेबांच्या शैक्षणिक-सामाजिक कार्य-कर्तृत्वावर दिसून येतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

“तत्त्वज्ञान तेच की, जे व्यवहारात उपयुक्त ठरते. जीवनातील समस्या सोडवण्यासाठी, जीवन अधिक सुंदर व प्रगत करण्यासाठी ज्याचा उपयोग होऊ शकतो. तसेच तत्वज्ञान हे केवळ पुस्तकातून प्राप्त होत नाही. ते अनुभवातून, कृतीतून, जीवनातून उदयास येते. जे प्रायोगिकतेच्या कसोटीस उतरेल, जे कृतीत, व्यवहारात, जीवनात उतरवता येईल, त्याच तत्त्वज्ञानाचा आपण स्वीकार करायला हवा,” असा मामांचा आग्रह होता.

१९७२ ते १९७४ या काळात महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला होता. लोक अत्यंत वाईट परिस्थितीतून जात होते. अन्नाचे व चाऱ्याचे प्रचंड दुर्भिक्ष होते. लोकांची उपासमार होत होती. जनावरे वाऱ्यावर सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्या वेळी मामांनी गवताच्या गाठी मागवून त्या शेतकऱ्यांना जनावराच्या चाऱ्यासाठी रास्त दरात पुरवल्या. दुष्काळात ८५०  विद्यार्थ्यांची व २५० मजूर स्त्रियांची आपल्या बोर्डिंगमध्ये राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली होती.

मामांनी स्वस्त धान्य दुकाने, शेतकरी पोल्ट्री फार्म्स, कामधेनु संवर्धन केंद्रे, विद्यार्थी ज्ञान विकास केंद्रे, आडत दुकाने, छत्रपती मुद्रणालय, कर्मवीर जगदाळे मामा हॉस्पिटल, साप्ताहिक ‘जीवनसंग्राम’ यांसारखे विविध उपक्रम सुरू केले. स्वतःकडे कोणत्याही प्रकारची संपत्ती नाही, केवळ चारित्र्य आणि लोकांचा विश्वास, हीच काय ती संपत्ती! त्याच बळावर मामांनी महत्कार्य केले.

मामांच्या सामाजिक, शैक्षणिक, कृषी, वैद्यकीय व आर्थिक क्षेत्रांतल्या योगदानाची दखल त्या वेळी दोन विद्यापीठांनी घेतली, त्यांच्या कामाचा गौरव केला. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद या त्यांना ‘डी. लीट.’ ही मानाची पदवी देण्याचे विद्यापीठाने जाहीर केले. त्या वेळी मामासाहेब अर्धांगवायूच्या आजाराने ग्रस्त होते. ते पदवीदान समारंभास हजर राहू शकत नव्हते. त्या वेळी मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. आर. भोसले, विद्यापीठाच्या विधी विभागाचे डीन सुखदेव शेळके, विद्यापीठ कार्यकारिणीचे मान्यवर सदस्य वसंतराव काळे, सुंदरराव गव्हाणे यांनी बार्शीला येऊन ही पदवी २४ फेब्रुवारी १९८० रोजी समारंभपूर्वक कर्मवीर जगदाळे मामांना प्रदान केली. त्यानंतर म. फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठानेही मामांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी बहाल केली.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

समाजसेवक अथवा समाजसुधारकाचे कार्य फळझाडासारखे असते. फळझाडाचे उत्पन्न हे केवळ त्याच्या फळाच्या उत्पन्नावरून मोजता येत नाही, तर त्या झाडाने उभ्या हयातीत मधुर फळासोबत किती उपजाऊ बीजे तयार केली असतील, याची मोजदाददेखील करावी लागेल. त्या बिजांमुळे त्या एका झाडाचे उत्पादन गुणाकार पद्धतीने वृद्धिंगत होत असते.

अगदी त्याच पद्धतीने महान सामाजिक कार्य करणाऱ्या माणसांचेसुद्धा असते. केवळ महान कार्य करून ती थांबत नाहीत, तर असंख्य मूल्यांची, नैतिकतेची, कर्तव्याची, निष्ठेची, सेवावृत्तीची, विचारांची, तात्त्विकतेची अथवा महान कार्याची बीजे त्यांनी तयार केलेल्या अथवा त्यांच्यापासून प्रेरित झालेल्या माणसांच्या माध्यमातून समाजात पेरली जातात. त्या व्यक्तीने केलेले कार्य समाजात गुणाकार पद्धतीने वृद्धिंगत होत असते. हेच सूत्र कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय कार्यात दिसून येते.

म्हणूनच आजही बार्शी, उस्मानाबाद परिसरात लोक मामांना ‘देव’ मानतात.

.................................................................................................................................................................

लेखक डॉ.संजय करंडे बार्शीच्या बी. पी. सुलाखे वाणिज्य महाविद्यालयामध्ये सहायक प्राध्यापक आहेत.

sanjayenglish@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा