जर कोणाला ‘महात्मा’ ही उपाधी घेण्याचा अधिकार असेल, तर तो केवळ महात्मा फुले यांनाच आहे!
पडघम - सांस्कृतिक
जगन कराडे
  • महात्मा फुले
  • Sat , 24 April 2021
  • पडघम सांस्कृतिक जोतीराव फुलेJyotirao Phule महात्मा फुले Mahatma Phule स्त्रीशिक्षण जात-धर्म भेदभाव ब्राह्मणेतर चळवळ ब्राह्मण्य

‘मराठी समाजशास्त्र परिषदे’च्या वतीने ११, १२ आणि १३ एप्रिल २०२१ रोजी ‘फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात आली होती. त्यात १२ एप्रिल रोजी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. जगन कराडे यांनी ‘महात्मा फुले यांचे राष्ट्रविकासातील योगदान’ या विषयावर दिलेल्या व्याख्यानाचा हा शब्दांकित व संपादित अंश…

..................................................................................................................................................................

फुल्यांच्या जन्मतारखेबाबत संभ्रम होता. त्यांचे सहकारी नारोबाजी पानसरे पाटील यांनी ‘महात्मा फुले यांचे अमर जीवन’ या नावाने एक पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी फुल्यांची जन्मतारीख ११ एप्रिल १८२७ अशी नोंदवली आहे. महाराष्ट्र शासनाने ही तारीख २००६ साली ग्राह्य धरली. तेव्हापासूनच फुल्यांची जयंती ११ एप्रिल रोजी संपूर्ण देशभर साजरी केली जाऊ लागली.

महात्मा फुले यांनी सामाजिक परिवर्तनासाठी केवळ वैचारिक योगदान दिले नाही, तर कृतिशील कार्यक्रमही दिला. त्यामुळेच भारतात ‘आधुनिक युगा’ची सुरुवात झाली. फुल्यांचे सामाजिक परिवर्तनाचे विचार स्वीकारल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही.

एकोणिसावे शतक हे भारतीय समाजशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कारण याच शतकात १८४८ साली कार्ल मार्क्स यांनी ‘कम्युनिस्ट मेनिफेस्टो’ प्रसिद्ध केला आणि जगभरातील कामगारांना एकत्र  येण्यासाठी आवाहन केले. याच कालखंडात फुल्यांनी मुलींची पहिली शाळा काढली. म्हणजेच फुले यांनी सामाजिक परिवर्तनासाठी केवळ वैचारिक योगदान दिले नाही, तर कृतिशील कार्यक्रमही दिला.

भारताचा एक राष्ट्र म्हणून ज्या वेळेस आपण विचार करतो, तेव्हा भारताला अजूनही राष्ट्र म्हणावे का, या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होते. कारण राष्ट्रासाठी जे घटक लागतात, ते आपल्याकडे आहेत का, याचे उत्तर नकारात्मक येते. भारतीय समाज जाती-धर्म अशा अनेक भेदांमध्ये विभागलेला आहे. ते संपुष्टात आल्याशिवाय राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होऊ शकत नाही. राष्ट्र उदयास येण्यासाठी समता व बंधुता ही मूल्ये महत्त्वाची असतात. लोकांमध्ये कोणती जागृती करायची की, ज्यामुळे ते राष्ट्रीय विकासात योगदान देऊ शकतील, या अनुषंगाने फुल्यांनी केलेले कार्य खूप महत्त्वाचे आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आपल्याला प्रामुख्याने दोन कालखंडाचा विचार करावा लागतो. पहिला कालखंड आहे - १८४८ ते १८६५. या कालखंडात फुल्यांचे कार्य स्त्री-दास्य विमोचन, शिक्षण आणि दलित उद्धार या त्रिसूत्रीभोवती गुंफलेले होते. या कालखंडात बाळशास्त्री जांभेकरांच्या ‘दर्पण’ या वृत्तपत्रात महात्मा फुले यांनी स्त्री-शिक्षण, बालविवाह, केशवपन अशा विविध प्रश्नांवर पत्रे, टिपणी, लेख लिहिले. या वैचारिक लेखातून त्यांनी हा संदेश दिला की, सामाजिक विषमता निसर्गाने नाही, तर मानवाने निर्माण केलेली आहे.

दुसरा कालखंड आहे १८६५ ते १८९०. या काळात व छोट्या पुस्तिका फुल्यांनी शेती व धर्मचिकित्सा या अनुषंगाने कार्य केले. त्यासोबतच शेतकरी, अनुसूचित जाती, आदिवासी, कामगार वर्ग यांचे संघटन करण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्या कालखंडात अनेक समाजसुधारक होते. तेही वेगवेगळ्या स्वरूपाचे काम करत होते. परंतु फुल्यांचे योगदान सगळ्यात अग्रभागी होते.

अलीकडच्या काळात गेल ऑम्व्हेट ‘वासाहतिक काळातील सांस्कृतिक बंड’ या ग्रंथात त्या स्पष्टपणे नमूद करतात की, उत्तरेकडे समतेचा विचार त्या काळात उदयास आलेला नव्हता, मात्र दक्षिणेकडे विशेषतः दक्षिण भागांमध्ये महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी अधिक प्रमाणात झाल्या आणि त्या अनुषंगाने इतर अनेक राज्येही विकसित होत गेली. म्हणून समतेचा विचार दक्षिणेकडे अधिक सरकलेला दिसतो.

त्या काळातील समाजसुधारकांची नोंद घेतली तर महात्मा फुले यांचे नाव आघाडीवर होते. १८ व्या-१९ व्या शतकात जो काही परिणाम झाला, तो फुल्यांच्या विचारांमुळे झालेला दिसतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांना आपले गुरू मानले होते. त्या काळातील इतिहासाचे पुनर्लेखन ज्यांनी-ज्यांनी केले, त्यांनी हे स्पष्टपणे नमूद केलेले आहे की, तत्कालीन समाजव्यवस्था जुलमी, अन्याय करणारी व शोषक स्वरूपाची होती. समाजामध्ये धर्म, चातुर्वर्ण्य, कर्मकांड, शेती, शेतकरी व लिंगभेद यावर आधारलेली भेदभावाची व्यवस्था होती. तिला नष्ट करण्यासाठी फुल्यांचे अतिशय महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

२००५ साली सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आहे. त्यात सात न्यायमूर्तींनी हे मान्य केले आहे की, भारतीय समाज अनेक जातींमध्ये विभागला गेला आहे. भारतात एकूण ६४४६ जाती आहेत. या जातींमध्ये अनेक उपजाती आहेत. या भेदभावावर आधारित व्यवस्थेमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची भावना होती. अशा या जाती व वर्णभेदभावासंदर्भात प्रश्न विचारणारे फुले हे पहिले समाजसुधारक होते. म्हणून त्या काळातील इतिहासाचे पुनर्लेखन करताना त्यांच्या विचारांचा त्या काळातील समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था, नैतिकता व मूल्यव्यवस्था या अनुषंगाने विचार करणे महत्त्वाचे आहे. जी समाजव्यवस्था व धर्मव्यवस्था व्यक्तीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत नसेल, ती न स्वीकारण्याचा अधिकारदेखील माणसाला असला पाहिजे, असे फुल्यांचे मत होते.

स्त्रीवादी दृष्टीकोन

फुल्यांनी १८४८ ते १८५२ या कालखंडामध्ये सबंध स्त्रीवर्ग डोळ्यासमोर ठेवून महत्त्वाचे कार्य केले. ज्या वेळेस युरोपियन देशांमध्ये स्त्रीला मतदानाचा हक्क द्यायचा की नाही, यावर चर्चा व गदारोळ सुरू होता, त्या वेळेस भारतामध्ये स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा हक्कदेखील नाकारलेला होता. फुल्यांच्या मते, स्त्री ही कोणत्याही जाती वा वर्गातली असो, तिला भेदभावाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे त्यांनी स्त्रियांना आत्मसन्मानाने जगण्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांनी काढलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेमध्ये नऊ मुली शिक्षण घेत होत्या, त्यापैकी सहा ब्राह्मण समुदायातल्या होत्या.

यावरून आपल्याला हे लक्षात येते की, फुल्यांचा ब्राह्मण समुदायाला नव्हे, तर ‘ब्राह्मण्यवादा’ला विरोध होता. ताराबाई शिंदे यांच्या ‘स्त्री-पुरुष तुलना’ आणि केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर यांच्या ‘मर्दांनो नाके कापून घ्या’ या पुस्तकांमध्ये त्या काळातील स्त्रियांचे प्रश्न व त्यांचे होणारे शोषण याचे सविस्तर विश्लेषण केलेले आहे. फुल्यांच्या काळामध्ये स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात शोषण होत होते, तसेच त्यांना सामाजिक भेदभावाची वागणूकही दिली जात होती. विशेषत्वाने विधवा स्त्रियांचे केशवपन करण्याची जी पद्धत होती. ही पद्धत ब्राह्मण समाजामध्ये अधिक प्रमाणात होती.

फुल्यांनादेखील अनेक वेळा भेदभावाची वागणूक मिळाली होती. ब्राह्मण मित्राच्या लग्नात मिळालेली वागणूक हे त्यापैकीच एक उदाहरण. असे असले तरी फुल्यांनी स्वतःच्या विचारांमध्ये व कृतींमध्ये हा भेदभाव कधीच येऊ दिला नाही. उलट हा भेदभाव दूर करण्यासाठी त्यांनी जात-धर्मापलीकडे जाऊन काम केले. केशवपनासारखी जाचक रूढी नष्ट करण्यासाठी त्यांनी तळेगाव ढमढेरे या गावातील न्हावी समाजाला संप घडवून आणण्यासाठी तयार केलं होतं. ही त्या काळातील एक फार मोठी घटना होय. म्हणून महात्मा फुले यांचा स्त्रीवादी दृष्टिकोन समतेची बाजू मांडणारा आहे.

१९व्या शतकामध्ये जे जे समाजसुधारक ब्रिटिश शिक्षण व ब्रिटिशांच्या सहवासात आले, त्यांच्या ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की, आपल्या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये असलेली भेदभावाची व्यवस्था अतिशय चुकीची आहे. नंतरच्या काळात महिला सुधार कार्यक्रमाअंतर्गत अनेक समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणाबद्दल व स्त्रियांच्या हक्काबद्दल जे काही कार्य केले, ते फुल्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे होते.

शैक्षणिक योगदान

आज हे मान्य झालेले आहे की, शिक्षण परिवर्तनाचे साधन आहे. फुल्यांच्या कालखंडामध्ये त्यांच्या समकालीन असलेले जे सुधारक होते, त्यांनी केवळ आपल्या कुटुंबातील आई व बहीण यांना कोणत्या  प्रश्नांना सामोरे जावे लागते, एवढेच पाहून त्या दिशेने चळवळ नेण्याचा प्रयत्न केला. मात्र फुल्यांनी त्या पलीकडे जाऊन समाज सुधारण्याचा विचार केला. शिक्षण घेणे हा प्रत्येक मानवाचा हक्क आहे आणि म्हणून प्रत्येकाला शिक्षण घेता आले पाहिजे, असा विचार त्यांनी मांडला. 

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

१८८२ साली फुले पुणे महानगरपालिकेचे सभासद होते. त्या काळातच हंटर कमिशन आले. त्याला फुले ज्या पद्धतीने सामोरे गेले, ते वाखाणण्यासारखे होते. ब्रिटिशांनी या पूर्वी शिक्षणाच्या ‘झिरपण्याचा सिद्धान्त’ (फिल्टर डाऊन) मांडलेला होता. त्याला फुल्यांनी विरोध केला होता. युरोपियन राष्ट्रांमध्ये चर्चच्या माध्यमातून वरच्या वर्गातील उच्चशिक्षित व्यक्तींकडून खालच्या वर्गापर्यंतल्यांना किमान धार्मिक शिक्षण घेता यावे म्हणून शिक्षण दिले जात होते. परंतु भारतामध्ये अनेक सामाजिक भेदभाव होते आणि एका विशिष्ट वर्गाकडे शिक्षणव्यवस्थेचे सर्व हक्क एकवटलेले असल्यामुळे शिक्षण खालच्या स्तरापर्यंत जाणे शक्य नव्हते. म्हणून फुल्यांनी या थिअरीला विरोध केला होता. 

‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले’, असे ते म्हणत असत. आज विद्यापीठांद्वारे व महाविद्यालयांद्वारे जे शिक्षण दिले जाते, ते खरेच योग्य आहे? फुल्यांना अभिप्रेत असलेली विद्या आज आपण घेत आहोत काय? कारण बहुतांश व्यक्ती शिक्षित होत असल्या तरी अज्ञानी आहेत. आजच्या शिक्षण व्यवस्थेमधून मानवी मूल्य नष्ट होत आहेत.

फुल्यांचा भर पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञानावर जास्त होता. मोडी लिपीचे शिक्षण, कृषीविषयक शिक्षण, निसर्गशिक्षण, नीतीमूल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक शिक्षण आदींचा अंतर्भाव प्राथमिक शिक्षणात केला जावा, असे त्यांचे मत होते. आजही फुल्यांचे शैक्षणिक विचार अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण आज जरी आपण सर्व जाती व धर्माच्या व्यक्तींना शिक्षण घेण्याचा हक्क देत असलो किंवा कागदोपत्री तसे निदर्शनास येत जरी असले तरीही अनेक जातीवर्गातल्या व्यक्तींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे कामही सुरूच आहे. म्हणून खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माण करायचे असेल तर फुल्यांचे शैक्षणिक विचार अंमलात आणणे गरजेचे आहे.

शिक्षणाचे ध्येय व तत्त्वे ठरवण्याच्या अनुषंगाने आतापर्यंत आपल्या देशांमध्ये अनेक शिक्षण आयोग आलेले आहेत. परंतु या आयोगांमध्ये शिक्षणविषयक ध्येय, तत्त्व व मूल्यांचा अभाव असलेला दिसतो. जो अभाव फुल्यांच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये नव्हता. म्हणून जर आपल्याला पुढे जायचे असेल तर फुल्यांनी घालून दिलेले शिक्षणविषयक ध्येय व मूल्य यांचा अवलंब करावाच लागेल.

शिक्षणव्यवस्था समाजपरिवर्तनाचे एकमेव साधन आहे, असे आपण म्हणतो आणि म्हणूनच आपण त्यावर वेगवेगळे आयोग नेमतो. अशाच पद्धतीचे आयोग आपल्या राजकीय व्यवस्थेवरसुद्धा नेमण्याची गरज आहे. कारण आजच्या आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आपली ध्येये व मूल्ये यांचा विचार न करता एका विशिष्ट समुदायासाठी काम करत आहेत. ही बाब आपल्या राष्ट्रीय विकासामध्ये मोठा अडसर ठरत आहे.

सत्यशोधक समाज

सत्यशोधक समाजाद्वारे एका नवीन समाजव्यवस्थेची निर्मिती करणे, ही त्या काळातील मोठी घटना होती. त्या कालखंडात समाजावर धर्माचा प्रचंड प्रभाव होता. अशा काळात धर्माची चिकित्सा करणे, धार्मिक बाबींचे टीकात्मक विश्लेषण करणे आणि धर्मामुळे निर्माण झालेल्या मानवी असमानतेला विरोध करणे, हे एक अतिशय कठीण कार्य होते. जे फुल्यांनी केले. समाजातले जातीय व धार्मिक भेद संपवून सर्वजण समतेने एकत्र नांदावेत, हाच सत्यशोधक समाजबांधणीमागचा फुल्यांचा विचार होता.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

डॉ. घनश्याम शहा यांनी आपल्या ‘Social Movements in India’ या ग्रंथामध्ये दोन चळवळींचा उल्लेख केलेला आहे. एक धार्मिक सुधारणावादी चळवळ आणि दुसरी पर्याय निर्माण करणारी चळवळ. सत्यशोधक समाज हीदेखील प्रस्थापित समाजव्यवस्थेला पर्याय म्हणून निर्माण झालेली चळवळ होय. फुल्यांनी सुरू केलेली वैचारिक चळवळ आजच्या समाजव्यवस्थेपर्यंत पोहोचलेली आपल्याला दिसते. आज अनेक विवाह सत्यशोधक समाज पद्धतीने होताना दिसतात. महात्मा फुल्यांनी त्या काळात जे काही विचार मांडले, ते विचार नंतरच्या काळामध्ये शाहूमहाराजांनी त्यांच्या संस्थानात रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी फुल्यांच्या विचार व कार्याचा अंगीकार करणाऱ्या ‘विचारे’ नावाच्या व्यक्तीच्या नावावरून कोल्हापूरमध्ये एका ठिकाणाला ‘विचारेमळा’ हे नाव दिलेले आहे. भारतात पर्याय निर्माण करणाऱ्या चळवळीचा पाया फुल्यांनी घातलेला आपल्याला दिसतो आणि या चळवळीमुळेच सामाजिक न्याय, आंतरजातीय विवाह या बाबी समाजामध्ये रुजायला लागल्या होत्या.

शेतीविषयक विचार

फुल्यांनी शेतीविषयक महत्त्वाचे विचार मांडले होते. वर्तमानात दिल्लीच्या सीमेवर जी शेतकऱ्यांची चळवळ सुरू आहे, त्याकडे बघितले तर मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. एकीकडे आपण म्हणतो की, भारत कृषिप्रधान देश आहे आणि शेती येथील प्रमुख व्यवसाय आहे. मात्र दुसरीकडे शेती करणाऱ्या शेतकऱ्याला समाजामध्ये मानाचे स्थान मिळत नाही. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला १५० दिवस उलटून गेले आहेत. परंतु अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही…

१८८८ साली ड्यूक ऑफ कॅनॉट यांच्या आगमनाप्रीत्यर्थ हरि रावजी चिपळूणकर यांनी मेजवानी आयोजित केली होती. त्या मेजवानीस फुले शेतकऱ्यांचा वेष परिधान करून गेले असता, त्यांना प्रवेशद्वारावरच अडवण्यात आले होते. मग चिपळूणकरांना स्वतः येऊन फुल्यांना आत घेऊन जावे लागले. याचाच अर्थ ब्रिटिश काळातही शेतकऱ्यांना अडवण्यात आले होते, आणि आजही आपल्या समाजव्यवस्थेत शेतकऱ्यांची अडवणूक होतानाच दिसते.

फुल्यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती व प्रश्न याविषयी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या ग्रंथामध्ये सविस्तर विवेचन केलेले आहे. त्यांचा शेठजी-भटजी या व्यवस्थेला विरोध होता. ते स्पष्टपणे म्हणत, ‘माझा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्यवादाला आहे’. या अनुषंगानेच त्यांनी ब्राह्मणेत्तर चळवळ पुढे नेलेली दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेस केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर यांनी या सत्याग्रहामध्ये ब्राह्मणांना सोबत घेऊ नये असे म्हटले, तेव्हा बाबासाहेब  त्यांना असे  म्हणाले  होते की, ‘माझा विरोध  ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्यवादाला आहे. ब्राह्मण्यवाद म्हणजे अशी मानसिकता ज्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठत्व व भेदभाव आहे.’

फुल्यांचे ‘शेतकऱ्यांचा आसूड’ आणि ‘ब्राह्मणांचे कसब’ हे दोन्ही ग्रंथ शेतकऱ्यांच्या सामाजिक जीवनाचे विवेचन करणारे आहेत. शेतकरी त्या काळात कशा पद्धतीने अंधश्रद्धेमध्ये अडकलेला होता, त्याचे धर्माच्या नावावर कशा पद्धतीने शोषण केले जात होते, याचे वर्णन या ग्रंथांमध्ये केलेले आपल्याला पाहायला मिळते. शेतकऱ्यांना या अंधश्रद्धेच्या व्यवस्थेतून बाहेर काढण्याचे काम फुल्यांनी केले.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

शेतकऱ्यांसोबतच त्या काळात कामगारांचीही अवहेलना मोठ्या प्रमाणात होत होती. म्हणून कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी नारायण मेघाजी लोखंडे यांच्यासारख्या कार्यकर्त्याची बांधणीही केली. लोखंडे यांनी पहिली कामगार चळवळ उभारली. ही चळवळ उभारण्यामागे फुल्यांचाच विचार होता, असे म्हणावे लागेल. आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये, समाजव्यवस्थेमध्ये, शिक्षणव्यवस्थेमध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या प्रकारचे परिवर्तन होणे अपेक्षित आहे, याविषयी महात्मा फुल्यांनी भरपूर लेखन केलेले आहे. फुल्यांचे विचार समाजसुधारणेच्या संदर्भात क्रांतिकारक होते.

फुल्यांना ‘महात्मा’ ही उपाधी लावावी की नाही, याविषयी काही जण असे म्हणतात की, ‘महात्मा’ या शब्दाचा संबंध ‘आत्म्या’शी आहे, म्हणून ती उपाधी लावू नये. परंतु फुल्यांनी केलेल्या क्रांतिकारक अशा सामाजिक कार्याचा गौरव म्हणून १८८८मध्ये त्यांना ही उपाधी मुंबई येथील जाहीर सत्काराच्या कार्यक्रमामध्ये प्रदान करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या प्रसंगी एक व्यक्ती समोर आली आणि तिने असे म्हटले की, ‘हा व्यक्ती धर्मविरोधी वर्तन करतो अशा व्यक्तीला ‘महात्मा’ ही उपाधी दिली जाऊ नये.’ तेव्हा काशीबाई नावाची विधवा स्त्री समोर आली आणि म्हणाली, “समाजव्यवस्थेने मला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले होते, अशा वेळी महात्मा फुले यांनी माझा जीव वाचवला. माझी सेवा सुश्रुषा केली आणि माझी प्रसूती झाल्यानंतर माझ्या मुलाला, ‘यशवंत’ला दत्तक घेतले. एवढं मोठं कार्य फुले करू शकतात. म्हणून जर कोणाला ‘महात्मा’ ही उपाधी घेण्याचा अधिकार असेल, तर तो केवळ फुले यांनाच आहे.”

शब्दांकन - प्रियदर्शन भवरे (बारवाले महाविद्यालय, समाजशास्त्र विभाग प्रमुख, जालना) आणि

डॉ. मंजूषा नळगीरकर (श्री. संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय, फुलंब्री, जि. औरंगाबाद).

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा