सद्यःस्थितीमध्ये आपला देश नेमक्या कोणत्या दिशेने जात आहे, याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे!
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
शैलेंद्र लेंडे
  • प्रातिनिधक चित्र
  • Sat , 03 October 2020
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लोकशाही Democracy करोना Corona नोम चॉम्स्की Noam Chomsky

सध्या जगभर करोनाने थैमान घातले आहे. संपूर्ण मानवजातीकरता अतिशय चिंताग्रस्त स्वरूपाचा हा काळ आहे. अशा प्रकारच्या संकटाची कल्पना कधी कुणी केली नसेल. या संकटावर मात करण्यासाठी आपण सामूहिकपणे प्रयत्न करत आहोत. मात्र त्याच्या सततच्या वाढत्या आलेखामुळे तनामनातून भयभीतही झालेलो आहोत. थोडक्यात आपण एका भयंकर शंका-कुशंकांच्या युगामध्ये वावरत आहोत. हे संकट बहुमुखी स्वरूपाचे आहे. करोनाच्या याच संकटकाळात आणखी काही संकटे जगावर आलेली आहेत.

त्याबद्दल जगभरातले अनेक विचारवंत बोलू-लिहू लागले आहेत. युवाल नोव्हा हरारी व नोम चॉम्स्की या जागतिक विचारवंतांनी आज-उद्याच्या काही संकटांविषयी चिंता व्यक्ती केली आहे. अमेरिकेतील अत्यंत नावाजलेले भाषावैज्ञानिक, समाजवैज्ञानिक आणि समाजहितैषी विचारवंत नोम चॉम्स्की यांनी आजच्या काळासंबंधी व या काळाच्या अपरूपासंबंधी गंभीर स्वरूपाची मांडणी केली आहे.

त्यामुळे त्याविषयी जाणून घेणे गरजेचे आहे. त्यातील एक संकट भारतीय समाजवास्तवाशी व भारतीय राजकारणाशीही जोडलेले आहे. करोनाचे महासंकट येत्या काळात नाहीसे होणार असले तरी आणखी भीषण संकटे या जगावर येऊ घातली आहेत. त्यापासून जगाची सुटका होणे कठीण असल्याचे नोम चॉम्स्की यांनी म्हटले आहे.

येत्या काळात जागतिक तापमानवाढीचे संकट अटळ असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे संपूर्ण जगभर भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे. त्याची पदचिन्हे आपणास अधूनमधून पहावयास मिळत असतात. या तापमानवाढीच्या संकटामुळे निसर्गाचे संतुलन ढासळेल आणि या ढासळणाऱ्या संतुलनाला सावरणे दुष्कर स्वरूपाचे असेल, असे त्यांनी म्हटले आहे.

या संकटाबरोबरच त्यांनी आणखी एका संकटाकडे जगाचे लक्ष वेधले आहे. हे दुसरे संकट म्हणजे अण्वस्त्रयुद्धाचे. येत्या काळात जगाला आण्विक युद्धाला सामोरे जावे लागेल की काय, या प्रकारची आशंका त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या विविध देशांतील सत्ताधाऱ्यांची सीमाविस्तार व स्वआकांक्षाविषयक जी भूमिका पहावयास मिळतेय, त्यातून त्यांची युद्धाची खुमखुमी उघड होतेय. अशा प्रकारची खुमखुमी कधी अण्वस्त्रयुद्धाच्या दिशेने प्रवास करेल, हे सांगता येत नाही, असे नोम चॉम्स्की यांचे म्हणणे आहे.

या दोन महासंकटांबरोबरच आणखी एक संकट संपूर्ण जगावर आले असल्याचा उल्लेख नोम चॉम्स्की यांनी केला आहे. हे तिसरे महासंकट म्हणजे जगातील लोकशाही व्यवस्थांसमोर उभे ठाकलेले हुकूमशाहीचे सावट. आजच्या घटकेस जगभरातील विविध देशांमध्ये लोकशाही नावापुरतीच शिल्लक राहिली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे आणि ते जास्त चिंतित करणारे आहे.

..................................................................................................................................................................

या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा - 

https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma

..................................................................................................................................................................

अनेक देश लोकशाहीवादी मूल्यांच्या बाजूने उभे राहण्यासाठी तत्पर वाटत असले तरी त्यांच्यापुढे हुकूमशाही वृत्ती मूलभूत अडथळा म्हणून उभी ठाकली आहे, अशा प्रकारची भूमिका चॉम्स्की यांनी मांडली आहे. त्यांच्या मतानुसार जगभरातील लोकशाही यंत्रणा आतून पोखरून गेल्या आहेत.

अमेरिकेतील अध्यक्षीय स्वरूपाची आणि भारतातील संसदीय स्वरूपाची लोकशाही, या जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही व्यवस्था. मात्र अमेरिकेमध्ये ज्या प्रकारे शासन चालवले जात आहे आणि ज्या प्रकारची ध्येयधोरणे राबवली जात आहेत, त्यातून तेथील लोकशाहीसमोर प्रचंड मोठे आव्हान निर्माण झाल्याचे वास्तव चॉम्स्की यांनी अधोरेखित केले आहे. अमेरिकेतील लोकशाही व्यवस्था हुकूमशाहीमध्ये रूपांतरित होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

तसेच काहीसे आव्हान भारतातदेखील निर्माण झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतातील लोकशाही व्यवस्था वरवरच्या डोलाऱ्याप्रमाणे असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. त्यांच्या मते भारतातल्या लोकशाहीसमोर प्रचंड मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. त्यांच्यासारख्या जागतिक पातळीवरील विचारवंताने व्यक्त केलेली ही भीती आपल्याला विचार प्रवृत्त करणारी आहे. जगातील एक फार मोठा विचारवंत भारतीय लोकशाहीच्या समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांबद्दल बोलतो, तेव्हा त्याचा आपण गंभीरपणे विचार करायला हवा. गेल्या ७० वर्षांत भारतातील लोकशाही सुरळीतपणे चालू असली तरी ती आतून खिळखिळी होत गेली आहे, अशा प्रकारची भावना चॉम्स्की यांनी व्यक्त केली आहे. 

लोकशाही हा आधुनिक कालखंडातील भारताचा व भारतीय समाजजीवनाचा सर्वांत मोठा वारसा आहे. हा वारसा प्रतीकात्मक स्वरूपाचा नाही तर तो येथील समाजजीवनाला सतत गतिशील व विकासशील करत आलेला आहे. लोकशाहीच्या बळावरच भारतीय जनतेला सर्वांगीण विकासाची व हक्कसंरक्षणाची ग्वाही मिळालेली आहे. त्यामुळे लोकशाहीचे जतन करण्याची जबाबदारी भारतातल्या सर्व नागरिकांच्या खांद्यावर येते. सुजाण, समंजस व सुशिक्षित नागरिकांवर ही जबाबदारी विशेषत्वानेच येते.  

नोम चॉम्स्की यांनी व्यक्त केलेल्या भीतीनुसार लोकशाहीसमोर हुकूमशाही, सरंजामशाही, भांडवलशाही आणि धर्मवादी वृत्ती अशी गंभीर आव्हान निर्माण झाली आहेत. या आव्हानांना दूर करण्यासाठी कसून प्रयत्न करावे लागतील. जेव्हा देशातील लोक स्वतंत्रपणे विचार करतात व स्वतंत्र वृत्तीने त्या विचारांचा आविष्कारही करतात, तेव्हाच त्या देशातील लोकजीवनाचे स्वातंत्र्य सिद्ध होते. स्वतंत्रपणे विचार करणे, स्वतंत्र वृत्तीतून विचारांचा आविष्कार करणे आणि स्वतंत्र मनोवस्थेमधून देशाला पुढे नेणे, हे कोणत्याही देशातील नागरिकांचे एक महत्त्वाचे असे कर्तव्य असते. कारण लोकशाही केवळ वरवरची, शाब्दिक व आवाजी असून चालत नाही. नाटकी व मुखवटेबाज लोकशाही तर कुठल्याच उपयोगाची नसते. लोकशाहीचे नाटक करणे म्हणजे खऱ्याखुऱ्या लोकशाहीला संपवण्यासारखेच...

.................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आपल्या देशातील लोकशाही जगासाठीदेखील मानबिंदू ठरलेली आहे. त्यामुळे तिला व तिच्या मूलभूत यंत्रणांना शाबूत ठेवणे देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. लोकशाहीवर आधारलेल्या देशपातळीवरील सर्व प्रकारच्या संस्थांना सांभाळणे आणि त्यांच्यातील लोकशाही आशय जिवंत ठेवणे, हे आपले सामूहिक स्वरूपाचे कर्तव्य आहे. थोडक्यात भारतीय लोकशाहीचा गाभा मूलभूत स्वरूपात कायम ठेवणे आणि तिचा मूलाधार असलेल्या राज्यघटनेला जिवंत ठेवणे अत्यावश्यक आणि निकडीचे झालेले आहे.

या देशाचा लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोककल्याणकारी, स्वातंत्र्यवादी, सामाजिक न्यायवादी असा चेहरा कायम ठेवण्याची गरज कधी नव्हे इतक्या तीव्रतेने निर्माण झालेली आहे. या लोकशाहीचे आपण जर निग्रहपूर्वक जतन केले नाही, तर आपली देशस्थिती व समाजस्थिती दुभंगून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व टाळायचे असेल तर या देशाची लोकशाही मूळ स्वरूपात कणखरपणे व ताठपणे कायम ठेवावी लागेल. नोम चॉम्स्की यांनी व्यक्त केलेल्या लोकशाहीविषयक चिंतनामधून आपणास सद्यःस्थितीमध्ये हाच बोध घेता येतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

जगाच्या पाठीवरील सर्वांत मोठी लोकशाही असलेला देश, अशी भारताची प्रतिमा आहे. अमेरिकेसारखा बलाढ्य देशदेखील लोकशाही मानणारा आहे. आणखीही काही देशांमध्ये लोकशाही आहे. मात्र त्या सर्वांमध्ये भारताचे वेगळेपण वैशिष्ट्यपूर्ण आहे. ७० वर्षांपूर्वी जेव्हा लोकशाही प्रस्थापित झाली, तेव्हा आपला देश लोकशाहीच्या मूल्यांशी फारसा जोडलेला नव्हता. तो वासाहतिक गुलामीतला आणि त्या मानसिकतेमधूनच पुढे आलेला होता. जात, धर्म, वर्ण, वर्ग, लिंग इत्यादी विविध प्रकारच्या भेदांमध्ये विभागलेला होता. ब्रिटिशपूर्व काळात भारतीय समाजाची मानसिकता बव्हंशी सरंजामी वृत्तीची होती. पण हा देश स्वातंत्र्यानंतर या सर्व प्रकारच्या भेदांपासून जाणीवपूर्वक दूर जाण्यासाठी प्रतिबद्ध झाला. मात्र सद्यःस्थितीमध्ये आपला देश नेमक्या कोणत्या दिशेने जात आहे, याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. शैलेंद्र लेंडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये प्राध्यापक आहेत.

shailendra.rtmnu@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 06 October 2020

डॉक्टर शैलेंद्र लेंडे,

काही विधानांवर भाष्य करेन म्हणतो.

१.

या देशाचा लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोककल्याणकारी, स्वातंत्र्यवादी, सामाजिक न्यायवादी असा चेहरा कायम ठेवण्याची गरज कधी नव्हे इतक्या तीव्रतेने निर्माण झालेली आहे.


का बरं अचानक अशी गरज निर्माण झाली? फाळणीच्या वेळेस असंख्य हिंदूंवर अत्याचार झाले. १९४८ साली निरपराध ब्राह्मणांना वेचून ठार मारण्यात आलं. १९७५ साली आणीबाणी लादण्यात आली. १९८५ साली निरपराध शीखांचं हत्याकांड घडवण्यात आलं. १९९० साली काश्मिरी हिंदूंना नेसत्या वस्त्रानिशी घरांतून रातोरात हाकलून देण्यांत आलं, त्यांच्या मुलीबाळी भ्रष्टवल्या, त्यांच्या नृशंस हत्या झाल्या. पण कोण्या माईच्या लाल विचारवंताला लोकशाही धोक्यात आलेली दिसली नाही. धर्मनिरपेक्षतेस नख लागलंसं वाटलं नाही. काश्मिरी हिंदू, शीख, ब्राह्मण यांच्यासाठी सामाजिक न्याय लुप्त झालाच नव्हता जणू.

मग आजंच असं काय नेमकं घडलं की अचानक उपरोक्त गरज तीव्र झाली?

२.
७० वर्षांपूर्वी जेव्हा लोकशाही प्रस्थापित झाली, तेव्हा आपला देश लोकशाहीच्या मूल्यांशी फारसा जोडलेला नव्हता. तो वासाहतिक गुलामीतला आणि त्या मानसिकतेमधूनच पुढे आलेला होता.


साफ चूक. भारतात १९४७ च्या बऱ्याच आधीपासनं निवडणुका होत होत्या. केंद्रीय व प्रांतिक सरकारं निवडून द्यायचा भारतीय जनतेला व्यवस्थित अनुभव होता. आंबेडकरांनी अध्यक्षीय लोकशाहीचा पुरस्कार न करता संसदीय लोकशाहीचा पुरस्कार केला. याचं कारण म्हणजे भारतीय जनता संसदीय लोकशाहीच्या प्रारुपाशी ( = model शी) परिचित होती.

बाकी, ते वासाहतिक गुलामगिरी वगैरे काँग्रेसच्या बाबतीत खरं असेल. सर्वसामान्य भारतीय जनतेच्या बाबतीत अजिबात खरं नाही.

३.
जात, धर्म, वर्ण, वर्ग, लिंग इत्यादी विविध प्रकारच्या भेदांमध्ये विभागलेला होता.


असा जगातला प्रत्येक समाज विभागलेला असतो. भारतात हे भेद आहेत हा काही भारताचा किंवा भारतीय जनतेचा कमीपणा नव्हे.

४.
ब्रिटिशपूर्व काळात भारतीय समाजाची मानसिकता बव्हंशी सरंजामी वृत्तीची होती.


याचा काही पुरावा आहे का? की उगाच आपली दिली एक लोणकढी थाप ठोकून?

असो.

बाकी लेख ठीकठाक.

आपला नम्र,
-गामा पैलवान


Arun Shinde

Sun , 04 October 2020

नोम चॉम्स्की यांच्या विचारांचा सूत्रबद्ध परिचय करुन देऊन वर्तमान धोक्यांबाबत सजग करणारा लेख. अशा प्रकारचे लेखन सर्वदूर पोचले पाहिजे. धन्यवाद.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा