वेबसीरीजची उलटी गंगा आणि दात कोरून पोटे भरणारी मनोरंजक पत्रकारिता
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Wed , 29 April 2020
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar बेवसीरीज Web series टीव्ही मालिका TV Serial टीव्ही पत्रकारिता TV journalism

वेबसीरीज हे भारतासाठी अगदी अलिकडचे माध्यम. म्हणजे जगभरातल्या वेबसीरीज इंटरनेट माध्यमातून निवडक भारतीय प्रेक्षक पाहत होताच. पण अ‍ॅमेझॉन व नेटफ्लिक्स हे आपल्या भारतीय घरातल्या दूरचित्रवाणी संचासह लॅपटॉप, टॅबलेट ते स्मार्टफोनवर अवतरले आणि या प्रचंड मोठ्या प्रेक्षक वर्गासाठी भारतीय वेबसीरीजची निर्मिती सुरू झाली. ती इंग्रजी, हिंदीसह मग हळूहळू सर्व प्रमुख प्रादेशिक भाषांतही सुरू झाली.

डिजिटल माध्यमाच्या वाढत्या प्रभावाने चित्रपट प्रदर्शन, वितरण व व्यवसाय यांची उतरती भाजणी सुरू झालेली होती. हिरोकेंद्रित आपल्या हिंदी व दक्षिणी चित्रपटसृ‌ष्टींनी या स्पर्धेतही १०० ते ७०० कोटींच्या कमाईचे विक्रम नोंदवले खरे, पण ते ‘हजारात दहा’ या प्रमाणात नोंदवले गेले. म्हणजे उरलेले ९०० निर्माते गर्तेत गेले. याच काळात आणखी काही चित्रपट तरले, ते होते छोट्या बजेटचे व छोट्या गावातली गोष्ट सांगणारे, स्टारपेक्षा अभिनेत्यांनी जिवंत केलेले. नव्या विषयांना हाताळणारे हे चित्रपट समांतर चित्रपटांसोबत बासू चॅटर्जी, सई परांजपे. हृषिकेष मुखर्जी, बासू भट्टाचार्य यांच्या सिनेमांची आठवण करून देणारे ठरले.

या पार्श्वभूमीवर अ‍ॅमेझॉन, नेटफिक्स यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला वेबसीरीजकडे वळवले. त्यांना प्रतिसादही लगेच मिळाला. त्याला कारणे दोन. पहिले उत्तम बजेट. प्रतिसाद मिळाला तर सीझन मागून सीझन करता येणार व दुसरे महत्त्वाचे कारण नुकतीच प्रौढ झालेली भारतीय चित्रपटसृष्टी भाषा, मांडणी व आविष्कारापर्यंत सेन्सॉरच्या कात्रीला विटलेली होती/आहे. वेबसीरीजला सेन्सॉरशिप नाही. त्यामुळे जो मुक्त वावर, विशेषत: हिंसा, लैंगिकता व शिवराळ भाषेला मिळणार होता, हे अधिकचे आकर्षण ठरले. यातून भारतीय लेखक, दिग्दर्शक व कलाकारांसह प्रेक्षकही अधिक प्रौढ होणार होता. वेबसीरीज हे सर्वार्थाने या युगाचे, पिढीचे माध्यम आहे भारतासाठी तरी.

त्यात पुन्हा काही वेबसीरीजसाठी गुन्हेगारी, हिंसा व लैंगिकता या प्रमुख अटीच होत्या. भारतीय अभिनेते / नेत्री यातला एक वर्ग हे सर्व करायला तयार होता आणि प्रेक्षकांनी सुरुवातीला दचकत व नंतर सरावाने स्वीकारले. बाकी आंबटशौकीन हा अमर वर्ग आहे, तो सर्वत्र, सदाकाळ राहणार तसा तो इथेही आहे. त्यांच्यासाठी बालाजी टेलिफिल्मसच्या ‘अल्ट’ या अ‍ॅपने खास सोय केल्याने तो वर्ग तिकडे स्थिरावला असावा.

या पसाऱ्यात मराठी वेबसीरीज चारदोन शिव्या, धुम्रपान, मदिरापान याच्यापलिकडे फारशा गेल्या नाहीत. त्यांचे विषयही काही फारसे वेगळे दिसले नाहीत. उलट काहींवरची पुणेरी छाप अनुत्साह वाढवणारीच ठरली. मराठी सिनेमाच जिथे अजून त्याअर्थाने ‘लार्जर दॅन लाईफ’ झाला नाही, तिथे मराठी वेबसीरीजही फारशी काही चमक दाखवू शकलेल्या नाहीत. वेबसीरीज म्हणजे महाकादंबरीसारखा ऐवज लागतो. मराठी वेबसीरीज लघुकथेपर्यंत मजल मारू शकलीय.

त्यात आता या वेबसीरीज मराठी वाहिन्यांवर दाखवणार! मराठी वाहिनीवरील कार्यक्रमांना सेन्सॉर लागतं. मग आता या वेबसीरीज बिप वाजवणार की, कापून चोपून मापात बसवणार?

यात निर्माता आर्थिक विचार करणार. अनेकदा डिजिटल माध्यमात तुम्ही तुमची कलाकॄती विकलीत की, ती माध्यमे चालवणाऱ्या कंपन्या त्याचे सर्वाधिकारच घेतात व नंतर ते कसेही ते अधिकार वापरतात. म्हणजे त्यांना साडी विकली तर ते त्याचे ड्रेस मटेरिअल किंवा ब्लाऊज पिस करूनही विकू शकतात. लेखक /दिग्दर्शक /कलाकार यांची अवस्था मुकी बिचारी कुणीही हाका अशी होऊन जाते. वेबसीरीज मराठी वाहिन्यांवर मालिकांसारख्या दाखवणे म्हणजे गंगा उलटी वाहून नेण्याचा प्रकार आहे. वेळ भरून काढण्यासाठी त्यांचा उपयोग करणे हे तर अनैतिकच आहे. ज्यांनी या वेबसीरीज बनवून घेतल्या त्यांनी आपल्या अधिकाराचा, स्वामित्व हक्काचा केलेला दुरुपयोग आहे.

हे मराठीबाबतच होऊ शकलं कारण मराठी वाहिन्यावरची मालिका व वेबसीरीज यातलं अंतर फारच पुसट आहे. हिंदी वेबसीरीज कुठल्या वाहिनीवर येऊ शकेल? शक्यता नाहीच. कारण त्यांनी त्या माध्यमाचा योग्य तो वापर केलाय. ते संकलित, संपादित स्वरूपात दाखवूच शकणार नाहीत. तर असे हे मराठी पाऊल पडते उलटे!

दुसरा एक मुद्दा मराठी मनोरंजन विश्वाशी संबंधितच.

सुजित सरकार म्हणून एक उत्तम दिग्दर्शक आहे. ‘मद्रास कॅफे’, ‘पिकू’, ‘पिंक’, ‘विकी डोनर’सारखे चित्रपट त्याच्या नावावर आहेत. संवेदनशील दिग्दर्शक आहे. त्याने नुकतंच एक ट्विट केलं की, आता करोनानंतर इंटिमेट सीन्स करणं शक्य आहे का? इंटिमेट म्हणजे शारिरीक जवळीक, चुंबन, आलिंगने इत्यादी. यात बेडसीनही आले, ज्याला आता भारतीय प्रेक्षक सरावलाय.

सुजितचं ट्विट हे मजेशीर होतं. कारण त्यात शेवटी तो म्हणतो- अन्यथा आपल्याला संहितेतच पर्याय शोधायला लागेल! अगदी या शब्दांत नाही तर साधारण मतितार्थ हाच. यावर लगेच संमिश्र प्रतिक्रियाही आल्या, पण सनसनाटी एकही नाही. ते ट्विट व त्या प्रतिक्रिया आजही तिथेच आहेत, ज्यांना वाचायच्या ते वाचू शकतात.

पण या ट्विटमुळे सध्या दात कोरून पोटे भरणाऱ्या मराठी वृत्तवाहिन्यांच्या मनोरंजन पत्रकारितेला एकदम शिरशिरी आली. सध्या मराठी नाटक, मालिका, चित्रपट व्यवसाय बंदच असल्याने प्रमोशन, रिव्ह्यू अशी कामे नसल्याने नोकर कपातीत मनोरंजनवाले गेले तर आश्चर्य वाटायला नको. अन्यथा त्यांना चेंबूरच्या भाजी मंडईत लॉकडाऊनचा फज्जा उडाला, अशा बातम्या देत रस्त्यावर यावे लागेल!

तर या वाहिनीने सुजित सरकारच्या हवाल्याने एक गरमागरम बातमी केली. स्टॉक इंटिमेट सीन्सचा मोंटाज व आता या दृश्यांचे काय होणार? कलाकार तयार होतील? असे छाती बडवल्यासारखे प्रश्न व्हॉईसओव्हरमध्ये. खरा विनोदी भाग पुढेच होता. यावर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्याही हाती लागेल तो/तीच्या. आता मुळात मराठीत बेडसीन म्हणजे फक्त बेडरूममध्ये बेडवर केलेला सीन असतो. पुरुष बनियनमध्ये व बाई गाऊनमध्ये हेसुद्धा खूप. अन्यथा आहे त्या कपड्यावर चादर ओढून घेतली की झालं!

मराठीत इंटिमेट सीन्स झालेच नाहीत असे नाही. पालेकरांच्या ८० च्या दशकात आलेल्या ‘आक्रित’मध्ये पारधी जमातीच्या स्त्री-पुरुषांची श्रृंगारदृश्ये कलात्मक रीतीने टिपली होती, तर अलिकडच्या ‘जोगवा’त चुंबन दृश्य होतं. पण एकुण तुरळकच उदाहरणे. अशी दृश्यं द्यायला आज स्त्री-पुरुष कलाकार तयार आहेत. तेवढी प्रगल्भता त्यांच्यात आहे. पण निर्माताच माघार घेतो, कारण मग चित्रपटाला ‘प्रौढांसाठी’ असं प्रमाणपत्र मिळाले तर फॅमिली ऑडिअन्स जातो आणि सॅटेलाईट राईटसमध्येही अडचणी येतात. त्यामुळे मराठीत फारशी नसलेली इंटिमसी पोटेभरू टीव्ही प्रतिनिधीने ओढूनताणून आणून बातमी उठावदार करायचा अत्यंत स्वस्त प्रयत्न केला.

दात कोरून पोटे भरणाऱ्यांना वेळ भरण्याशी मतलब असतो, तसा तो त्यांनी केला. पण सुजितच्या ट्विटवर दिया मिर्झासारख्या अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया फार संयत व सुबुद्ध आहे.

ती म्हणते- आपले कलाकार सजग आहेत. मुळात शूटिंग कधी सुरू होताहेत हाच कळीचा मुद्दा आहे. आणि चुंबन दृश्यापलिकडे शूटिंगला कार्यरत शंभर एक जणांचा समूह कसा वावरेल आणि इंटिमसी दृश्यातच निकटता असते?

मित्र-मित्र, आई-मुलगा, वडील-मुलगा यांच्यातील जवळीकही करोनानंतर काढून टाकायची?

दियाने जे वळण दिले, ते आमच्या मराठी प्रतिनिधीच्या डोक्यातही आले नाही. कारण सनसनीखेज बातमी व तीही सर्वांत प्रथम देण्याची घाई, आपले बांधव कस्टडीची हवा खाऊन आले तरी सुटत नाही!

यातून पत्रकारितेचा, मनोरंजनविश्व वृत्ताचा स्तर (हा तसा मोठाच शब्द झाला, अशा घाईखोरांसाठी!) आपण कुठे नेऊन ठेवतो व आपली पोटेभरू पत्रकारिता किती हास्यास्पद होते, हे त्यांना कळेल तो सुदिन!

..................................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......