मंत्रिमंडळ विस्तार की वडिलोपार्जित सत्तेचे हस्तांतरण?
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचं मंत्रिमंडळ
  • Wed , 01 January 2020
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar काँग्रेस Congress राष्ट्रवादी काँग्रेस NCP भाजप BJP शिवसेना ShivSena उद्धव ठाकरे Uddhav Thackeray शरद पवार Sharad Pawar संजय राऊत Sanjay Raut

अखेर महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत शपथ घेतलेल्या सहा मंत्र्यांसह हिवाळी अधिवेशनाच्या सप्ताहाचं सूप वाजल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार हे माहीत होतंच, तसा तो ३० तारखेला झाला.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे निवडणूकपूर्व आघाडीतले पक्ष. त्यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना व कवाडेंचा रिपब्लिकन गट होते. बच्चू कडू निकालोत्तर शिवसेनेसोबत आले, शिवसेना  कोट्यातून त्यांना मंत्रीपदही मिळालं.

हा मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याचं कारण मुळातच या निकालोत्तर झालेल्या आघाडीचं सरकार स्थापनेतच नुस्ताच वेळ गेला नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वांत नाट्यपूर्ण घटना या दरम्यान घडल्या. भाजपपासून फारकत घेत शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्यापासून हे तीन पक्ष सरकार बनवण्याची कसरत करू लागले. दोन्ही काँग्रेस व सेनेसाठीसुद्धा ही कसरत सोपी नव्हती. पण सेना आता माघारी फिरणार नाही, याची खात्री होताच शरद पवारांनी काँग्रेसची सूत्रं दिल्लीतून हलवली. पवारांना काँग्रेसमधले निर्णय कसे घेतले जातात, याची पुरेपूर कल्पना असल्यानं ते स्वत: पेशन्स ठेवून होते. त्यांनी सेनेला विशेषत: उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय स्तरावरचं राजकारणाचं बुद्धिबळ समजावून सांगितलं असावं. संजय राऊत वगळता कुणीच बोलत नव्हतं. निर्णायक क्षणी त्यांनी उद्धव ठाकरेंना ‘ठाकरी परंपरा’ बाजूला ठेवायला लावून थेट मुख्यमंत्रीपदाचीच जबाबदारी घ्यायला लावली. उद्धव ठाकरेंनी ती नाकारली असती, तर हे सरकार सत्तेतच आलं नसतं.

मुळात शिवसेना आदेशावर चालणारा प्रादेशिक पक्ष, राष्ट्रवादी राष्ट्रीय नोंद असलेला, पण महाराष्ट्रातच स्थिर झालेला आणि शरद पवारांभोवतीच केंद्रित झालेला पक्ष, तर काँग्रेस सर्वार्थाने राष्ट्रीय पक्ष- जो दिल्लीतूनच नियंत्रित होतो. असे तीन पक्ष एकत्र येणं, ही तशी अवघड प्रक्रिया पण शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी ती शांतपणे पार पाडली.

आयुष्यात प्रथमच संविधानिक पद तेही मुख्यमंत्रीपदासारखं, त्यातही महाराष्ट्रासारख्या राज्याचं स्वीकारणं उद्धव ठाकरेंसाठी आव्हानात्मक होतं. पण महिनाभरातील उलाढाली, उशिरानं झालेला मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासाठी थांबणं, या सर्व प्रवासात उद्धव ठाकरे संसदीय राजकारण शिकताहेत असं दिसतंय. त्यांच्यावर दबाव असूनही ते विचलित झालेले नाहीत.

मात्र या सरकारचा कणा शरद पवार व त्यांचा राष्ट्रवादी पक्षच राहणार, हे मंत्रिमंडळावरून दिसतंच आहे. खातेवाटपातही पवार चाणाक्षपणे योग्य ती खाती मिळवतीलच. शिवसेना व राष्ट्रवादीची निर्णय प्रक्रिया इथेच होत असल्यानं या दोन पक्षांत समन्वय लवकर घडताना दिसतोय. याउलट काँग्रेसचे निर्णय दिल्लीत होत असल्यानं शिष्टमंडळांच्या हवाई फेऱ्या नि श्रेष्ठींच्या ‘थंडा करके खाओ’ वृत्तीनं अनेक निर्णय रखडतायत. ही दिल्लीगिरी उद्धव ठाकरेंसाठी कायमची डोकेदुखी राहणार.

पण या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे स्वत:च्या मंत्रिमंडळात नव्या आश्वासक वाटेला जाताना अथवा मळल्या वाटेला नाकारताना काही दिसले नाहीत.

ज्या अजित पवारांनी सत्तास्थापनेत नाट्यपूर्ण हालचाली करून डाव विस्कटत आणला होता, त्यांनाच उपमुख्यमंत्री म्हणून स्वीकारावं लागलं. २००४ ते २०१४ या काळात राष्ट्रवादीचे जे चेहरे होते, तेच जवळपास सर्वच पुन्हा आलेत. काँग्रेसमधल्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा होती, पैकी अशोक चव्हाणांची ती इच्छा पूर्ण झाली तर पृथ्वीराज चव्हाणांना ती संधी मिळाली नाही. आघाडी सरकारच्या शेवटच्या पर्वात पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीला चाप लावण्याचा जो जोरदार प्रयत्न केला, त्याचं उट्टं पवारांनी आपले काँग्रेसमधले सूत्रधार हाताशी धरून काढलं, असं म्हणता येईल.

बाकी सामाजिक अभिसरणाचा धोरणात्मक इतिहास सेनेचा नाही. सर्व ठाकरे आम्ही जात, धर्म बघत नाही असं सांगत आले. पण ते धोरण कमी व संघटनात्मक अपरिहार्यता अधिक होती. साहजिकच या मंत्रिमंडळात दलित व स्त्रिया, तसंच अल्पसंख्याकांचं प्रतिनिधीत्व अल्पच दिसतं.

शिवरायांचं नाव सांगणाऱ्या सेनेला एकही महिला मंत्रीपदासाठी योग्य वाटू नये?

काँग्रेस-राष्ट्रवादीनं ती कसर अपवाद सिद्ध करण्यापुरती भरून काढली.

पण हे मंत्रिमंडळ म्हणजे ‘घराण्यांचे पाळणे हलवणारे मंत्रिमंडळ’ आहे. यात आदित्य ठाकरेंचा समावेश म्हणजे सरंजामी पद्धतीनं मांडीवर बसवण्याचाच प्रकार!

पवार, पाटील, देशमुख यांच्या जोडीनं आता तटकरे, कदम आदींच्या पुढच्या पिढ्या थेट मंत्रीच झाल्या. जयंत पाटलांचे भाचे प्राजक्त, त्यांचे आजोबा दहा वर्षं, वडील वीस, पंचवीस वर्षे आमदार होते. म्हणजे तीन ते चार लाखांच्या मतदारसंघात २५-३० वर्षं एकच घर लोकप्रतिनिधीपदासाठी लायक ठरलं?

महाराष्ट्रात असे अनेक मतदारसंघ म्हणजे लोकशाहीच्या मार्गानं स्थापन व स्थिर झालेली संस्थानं झाली आहेत. त्या मतदारसंघात त्या पक्षाच्या लोकांनी फक्त नव्या पिढीचे राज्याभिषेक करत रहायचे. पूर्वीच्या राजेरजवाड्यांप्रमाणे मुजरे करत राहायचे नि त्यांची मर्जी सांभाळत रहायचं!

मी जातपात मानत नाही, मी घराणेशाहीला विरोध करतो, असं ४० वर्षांच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे सतत सांगत आले. पण नियतीनं त्यांच्या घरातच त्याची रुजवात केली आणि आज ५० वर्षांनंतर त्यांचा मुलगा आणि नातू लोकशाही मार्गानं घराणेशाहीचे विस्तारकर्ते झालेत!

उद्धव ठाकरेंचं मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील काही घराण्यांच्या पुढच्या पिढीची ‘प्री-केजी स्कूल’ आहे. आता ही मुलं पदव्युत्तर होईपर्यंत याच शाळेत, याच अग्रक्रमानं आपली जागा राखून ठेवणार.

याला विस्तारशाही म्हणावं काय?

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......