‘सिंहासन – २’ लिहिण्याची /चित्रित करण्याची क्षमता असलेला कुणी लेखक/पत्रकार/दिग्दर्शक  दिसतोय या नाट्यमय काळात?
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Fri , 29 November 2019
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar सिंहासन Sinhasan सामना Samna अरुण साधू Arun Sadhu मुंबई दिनांक Mumbai Dinanak जब्बार पटेल Jabbar Patel विजय तेंडुलकर Vijay Tendulkar

सध्या महाराष्ट्रात जे काही चालू आहे, ते पाहून अनेकांना ‘सिंहासन’ या चित्रपटाची आठवण होत असेल. जब्बार पटेल दिग्दर्शित व विजय तेंडुलकर लिखित या चित्रपटाचे कथानक बेतले होते प्रसिद्ध मराठी-इंग्रजी पत्रकार, कथा-कादंबरीकार अरुण साधू यांच्या ‘मुंबई दिनांक’ आणि ‘सिंहासन’ या दोन कादंबऱ्यावर. साधूंच्या मूळ चित्रदर्शी भाषेला तेंडुलकरांनी पडद्याच्या भाषेत दोन्ही कादंबऱ्यांचे बेमालूम मिश्रण करून गुंफले आणि ‘सामना’ या पहिल्याच चित्रपटाच्या यशस्वी पदार्पणासह जब्बार पटेल यांनी ‘सिंहासन’ही ऑल टाईम ग्रेट सिनेमाच्या पंक्तीत नेऊन ठेवला. विशेष म्हणजे साधू व तेंडुलकर हे दोघेही तत्कालीन वृत्तपत्रीय पत्रकार होते. आपल्या नोकरीतील दैनंदिन नित्यनूतन घटना व अनुभव यांचा अत्यंत कसदार वापर या दोघांनी आपल्या सृजनात्मक लिखाणात केला. आज असे किती पत्रकार आपल्याला दिसतात, ज्यांच्यामध्ये ही क्षमता आहे?

तेंडुलकर-साधू ज्या काळात पत्रकारिता करत होते, तो काळ मुद्रित माध्यमांचा म्हणजे मुख्यत्वे वर्तमानपत्रांचा होता. वर्तमानपत्रेही काळ्या शाईत स्वस्त न्यूजप्रिंटवर छापली जायची. ऑफसेट छपाईचा काळ अवतरायचा होता. पण या काळ्या शाईत छापल्या जाणाऱ्या बातमीला, वृत्तांताला, लेखाला वा इतर मजकुराला सोन्यापेक्षा अधिक मूल्य होते.

टिळक-आगरकरांची नावे घेतल्याशिवाय आजही मराठी पत्रकारितेचा इतिहास सुरू होत नाही की, संपत नाही. पण आज ज्या प्रकारची पत्रकारिता आपण अनुभवतोय, ती पाहता टिळक-आगरकर तर लांबच राहिले, पण आचार्य अत्रे, ग. त्र्यं. माडखोलकर, अनंत भालेराव, गोविंद तळवलकर, ह.रा. महाजनी, माधव गडकरी यांच्या काळात जी पत्रकारिता होती, ती तरी आज उरली आहे का?

त्यात २४ तास वृत्तवाहिन्यांनी सुरुवातीचे नावीन्य गमावल्यानंतर दशकभरापूर्वीच भूताखेतासह, जन्म, राशी, कुंडली यासह जो काही धिंगाणा घातला, तो भारतीय परिवर्तन व विवेकी चळवळींना पराभूत करणारा ठरला. २०१४नंतर तर पत्रकारितेचे स्वातंत्र्य लिलावातच निघाले. यात वृत्तवाहिन्या आघाडीवर, तर मागील दाराने मुद्रित माध्यमेही.

मराठीपुरता विचार केला तर मुद्रित माध्यमे आजही बऱ्यापैकी आश्रित परिघाच्या बाहेर आहेत. त्यातही आपण अधिक नैतिक व इतरांना भुक्कड समजणाऱ्या टेंभेकरांचीही भूमिका सोयीनुसार बदलते. काय लिहायचे, काय नाही लिहायचे यातले गुप्त तह चाणाक्ष वाचक ओळखतातच. वृत्तवाहिन्यांवर बौद्धिक दिवाळखोरीचा रात्रंदिन उत्सवच चालू असतो. नमुन्यादाखल एक - 

आत्ताची सर्वांत मोठी बातमी

अजित पवार यांची गाडी पार्किंगमधून काढून गेटजवळ आणलीय. अजित पवार आता बाहेर पडतील. पण ते कुठे जातील हे पाहणे इंटरेस्टिंग असेल!

मुद्दा असा, एका मोठ्या कादंबरीचा, चित्रपटाचा ऐवज समोर दिसत असताना हे आव्हान समर्थपणे पेलेल असा लेखक/पत्रकार नजरेसमोर येत नाही.

तरीही थोडा विचार करता ज्येष्ठांपासून सुरुवात करायची तर रंगनाथ पठारे हे नाव समोर येतं, कारण ‘ताम्रपट’ व आता ‘सातपाटील कुलवृत्तांत’मधून त्यांनी दमसास सिद्ध केलाय. अशाच दमसासातले दुसरे नाव विश्वास पाटील. पण आरोप-प्रत्यारोपापलीकडे जाऊन त्यांच्या लिखाणाची नीट समीक्षाच झालेली नाही.

पत्रकारांत ज्येष्ठांत सुरेश द्वादशीवार यांच्याकडे तो दमसास दिसतो.

या ऐवजाचे ललित रूपांतर न करता घटनाक्रमासह नोंद करून त्याला वेगळ्या दस्ताऐवजाचे रूप कुमार केतकर देऊ शकतात. पण एकेकाळी ‘ज्वालामुखीच्या तोंडावर’ हा ग्रंथ लिहिलेले केतकर आज तितक्या उत्साहाने लिहू शकतील का? शिवाय ठाम भूमिका घेतल्याने पत्रकार म्हणून जी तटस्थता लागते, ती ते कितपत ठेवू शकतील?

नंतरच्या पिढीत विनय हर्डीकर, जयदेव डोळे, निखिल वागळे, हेमंत देसाई, प्रकाश अकोलकर, सुरेश भटेवरा, गिरीश कुबेर असे दस्तऐवजीकरण करू शकतील. त्यांचेही ग्रह-पूर्वग्रह आहेत, पण अभ्यास, आकलन, विश्लेषण, शैली याबाबत या सर्वांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे.

उत्तम कांबळे, संजय आवटे यांच्या लिहिण्याच्या क्षमता आहेत. पण सुचलं आणि लिहिलं यामध्ये जो चिंतनासाठी काळ द्यावा लागतो, ते तो कितपत देतील याबद्दल शंका वाटते.

नव्या पिढीत खूप नावे आहेत. पत्रकार-कथाकार समर खडस, जयंत पवार, मिलिंद किर्ती, प्रविण दशरथ बांदेकर, राजन गवस, सतीश तांबे, रमेश इंगळे उत्रादकर…

दस्ताऐवजीकरण करणारे लेखन विनोद शिरसाठ, रवि आमले, राम जगताप, मुकेश माचकर, अतुल कुलकर्णी, प्रताप आसबे, समीरण वाळवेकर, विजय चोरमारे, अशा पैकी कुणी हे काम करेल?

लेखिकांमध्ये राही भिडे, संध्या नरे पवार, वैशाली रोडे, मॄणालिनी नानिवडेकर, दीप्ती राऊत, अलका धुपकर, शिल्पा कांबळे, कल्पना भोसले, यांच्यासह नीरजा वा प्रज्ञा दया पवार आव्हान स्वीकारतील?

चित्रपटात महेश मांजरेकर, निशिकांत कामत, गजेंद्र अहिरे (त्यांनी मध्ये ‘सिंहासन-२’ची घोषणाही केली होती) सुमित्रा, सुनील, उमेश गिरीश कुलकर्णी, गिरीश मोहिते, शिवाजी लोटन पाटील, अजित शिरोळे, प्रवीण तरडे, राजेश मापूसकर अशी अनेक नावे आहेत.

मुद्दा आहे हे नाट्य समजून घेऊन पक्षीय मत-मतांतरांच्या पलीकडे जाऊन महाभारतासारखे या सत्तानाट्याचे पापुद्रे दाखवून मूळ ‘सिंहासन’च्या पुढे जाणारी गॉडफादरसारखी उत्कंठावर्धक तरीही समग्र मांडणी यातून कोण करू शकेल?

गेल्या पाच वर्षांत ज्या पद्धतीने सरकारपसंद चित्रपट तयार झाले, तशी भाटगिरी विरहित एक उत्तम कलाकृती करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, हे मात्र खरं.

राजकीय आपत्ती कलात्मक इष्टापत्ती म्हणून पहायची, साधायची कधी नव्हे ती अनेक वर्षांनी मराठीत संधी आलीय. ती साधेल कुणीतरी ही आशा.

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sun , 01 December 2019

आयशप्पत संजय पवार, तुमची यादी वाचून लई करमणूक झाली. तुम्ही अशाही पद्धतीने मनोरंजन करता हे पाहून अंमळ गंमत वाटली. तुम्ही राजू परुळेकर हे नाव ऐकलंय का? अनेक प्रसिद्ध लोकांच्या अनेक मुलाखती घेऊन त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रस्तुत यादीत त्यांचं नाव नसल्याचं पाहून जास्तीची करमणूक झाली. असो.

आपला नम्र,
गामा पैलवान


ramesh shinde

Fri , 29 November 2019

"‘सिंहासन – २’ लिहिण्याची /चित्रित करण्याची क्षमता असलेला कुणी लेखक/पत्रकार/दिग्दर्शक दिसतोय या नाट्यमय काळात?" या प्रश्नाचे उत्तर जे असेल ते असो. परंतु, संजय पवार यांनी आता असे लेख पाडण्याचे काम थांबवणे मराठी समाजाच्या दृष्टीने व पुरोगामी चळवळीच्या दृष्टीने इष्ट ठरेल! त्यांच्यात निरीक्षणाचीही अथवा विश्लेषणाचीही क्षमता दिसून येत नाही. सदरहू लेखात केवळ नावांची जंत्री देऊन काय साधले, महाशय? आपल्याला भविष्यातही सदरलेखनासाठी मंच उपलब्ध होतील, पटकथा लिहिण्याची कामे मिळतील, मराठी साहित्याच्या पुरोगामी वर्तुळात आपले स्थान अबाधित राहील, अशी तजवीज करण्यासाठीच एवढी नावे लिहिली काय? श्री. पवार यांच्या लेखांमध्ये अनेकदा तथ्यांचा अपलाप झाल्याचे दिसून आले आहे. त्यांनी थोडा दम धरणे गरजेचे आहे. अन्यथा स्वतःसह सर्व पुरोगामी विचारांच्या चळवळीचा ते तेजोभंग करतील, हे सुज्ञास सांगावायला नको!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......