अखिलेश यादव : घराणेशाहीला नव्या वळणावर नेणारा ‘आज’चा नेता
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव
  • Wed , 04 January 2017
  • उत्तरप्रदेश Uttar Pradesh समाजवादी पार्टी Samajwadi Party मुलायमसिंह Mulayam Singh Yadav अखिलेश यादव Akhilesh Yadav शिवपाल यादव Shivpal Yadav

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांच्या विरोधात दस्तुरखुद्द मुलानं – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केलेलं बंड घराणेशाहीच्या राजकारणाकडे नव्यानं पाहायला लावणारं ठरावं. एरवी आपल्या देशात घराणेशाहीच्या राजकारणात बाप, आई, काका आपल्या घरातल्या दिवट्यांकडे सत्तेतली पदं सोपवतात. मुलं ती पदं वडीलधाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे सांभाळतात. या मुलांची बुद्धी, विचार, चालचलन, वर्तन हे बेताबाताचंच असतं. त्यामुळे ते निमूटपणे वागतात. ऐतोबासारखा सगळा राजकीय व्यवहार करतात. आयत्या पिठावर रेघोट्या मारायच्या असल्याने या वारसांना वेगळे काही पराक्रम करण्याची जरुरीही नसते. त्यांच्यामध्ये वेगळं काही मांडायची, करून दाखण्याची प्राज्ञा, हिंमतही नसते. बंड करण्याची, वेगळी चूल मांडण्याची तर बातच वेगळी!

घराणेशाहीच्या या रिवाजाला छेद देणारं राजकीय वर्तन अखिलेश यादव करत आहेत. ते मुलायम यांच्या मर्जीनेच मुख्यमंत्री झाले खरे, पण त्यांनी बापाच्या पावलावर पाऊल टाकण्याचं पहिल्यापासून नाकारलं होतं. मुलायम समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांच्या वैचारिक तालमीत तयार झाले. ते मूळ सैफइ या खेडेगावातले. छोट्या शेतकऱ्याचा हा मुलगा शिक्षक झाला. त्याला कुस्तीचा नाद होता. शिक्षकाची नोकरी करता करता त्याला समाजवाद्यांची सायकल पसंत पडली. मागास यादव जातीतला हा शिक्षक समाजवादी आंदोलनात पुढे नेता बनला.

मुलायम हे कधीच विचारवंत नेते नव्हते, पण त्यांची संघटक म्हणून शक्ती वाखाणण्याजोगी होती. स्वत:च्या संघटन कौशल्याच्या बळावर ते समाजवादी पक्षात पुढे आले. नंतर जनता पार्टीत तगडे नेते बनले. यादव आणि मुस्लीम अशा दोन्ही समूहांना त्यांचं नेतृत्व भावलं.

मुलायम यांच्या व्यक्तिमत्त्वात एक महान विरोधाभास पहिल्यापासून भरून राहिला आहे. ते दोन टोकाच्या माणसांना धरून ठेवू शकतात. एकाच वेळी एखादा साधू-बुवा त्यांच्या बैठकीत लिलया वावरू शकतो. त्याचबरोबर एखादा गुन्हेगार, दलाल, माफियाही त्यांच्या कार्यालयात संचारू शकतो. साधू आणि गुन्हेगार दोघंही मुलायम यांना ‘नेताजी’, ‘बडेभाई’ म्हणून निष्ठा अर्पण करू शकतात. मुलायम यांची मर्जी संपादन करण्यासाठी साधू, गुन्हेगार यांनी एकच पात्रता धारण करणं गरजेचं असतं. ती म्हणजे त्यांनी मुलायमवादी म्हणून स्वत:ला घोषित करावं लागतं.

अशा महान विरोधाभासी मुलायम यांनी जनता दलाच्या फाटाफुटीनंतर समाजवादी पार्टी काढली. स्वत:ला ‘नेताजी’ म्हणून घोषित केलं अन नाना तडजोडी करत, विविध राजकीय डाव टाकत उत्तरप्रदेशात स्वत:चं नेतृत्व स्थापन केलं. व्होट बँक निर्माण केली. काँग्रेस, भाजप, बसप यांना मागे टाकत साडेचार वर्षांपूर्वी समाजवादी पक्ष त्या राज्यात सत्तेवर आला. अर्थात त्या यशात अखिलेश यांच्या चेहऱ्याचाही मोठा वाटा होता. अखिलेश यांनी समाजवादी पक्षाचा जुना तडजोडवादी, गुंड-माफिया यांना पोसणारा, नावाला समाजवादाचा जप करणारा पक्ष म्हणून असलेला बदलौकिक दूर करून ‘विकासवादी तरुणांचा पक्ष’ अशी या पक्षाची प्रतिमा निर्माण केली.

मुलायम यांनी लहानभाऊ शिवपाल यादव यांच्याऐवजी अखिलेश यांना मुख्यमंत्री होऊ दिलं. आणि तिथंच त्यांनी स्वत:चा खड्डा खोदला. अखिलेश हे परदेशात शिकून आलेले आहेत. स्वत:च्या मर्जीने आंतरजातीय लग्न केलेले आहेत. त्यामुळे ते पारंपरिक यादव नेत्यासारखं वागणार नव्हते. मुलायम यांचा महान विरोधाभासी स्वभाव त्यांच्याजवळ नाही. शिवाय नव्या काळाचं भान त्यांना आहे. म्हणून त्यांनी कधीही गुंड, माफिया, गुन्हेगारांना जवळ वावरू दिलं नाही. उत्तरप्रदेशचा मुख्यमंत्री म्हणजे जवळपास अर्धा पंतप्रधान. मोठं राज्य, मोठी सत्ता. या सत्तेनं अखिलेश यांना जबर आत्मविश्वास दिला. त्यांच्या वागण्यात, देहबोलीत, बोलण्यात ते दिसतं.

या जबर आत्मविश्वासातूनच त्यांनी बापाविरोधात बंड केलं. तात्कालिक कारण म्हणून अमरसिंग आणि काका शिवपाल यांच्या विरोधातली नाराजी, निवडणुकीतल्या तिकिटांच्या समर्थकांच्या याद्या हे विषय ऐरणीवरचे असले तरी बापाची वाट मंजूर नाही हाच खरा मुद्दा आहे.

मुलायम आता ७५ वर्षांचे आहेत. आजारपणाने त्यांचं शरीर तसं थकलंय. गेली दोन वर्षं ते फारसे सक्रिय नव्हते. त्यामुळे त्यांचे अमरसिंग, जयाप्रदा यांसारखे खटपटे चेले शिवपाल यांच्याभोवती गोळा झाले. या तिकडीत मुलायम यांची दुसरी पत्नी सामील झाली. या चौकडीनं अखिलेश यांचा बंदोबस्त करण्याचे अनेक उपाय करून पाहिले, पण त्याला अखिलेश पुरून उरले.

या चौकडीतला अमरसिंग हा भयानक सौदेबाज माणूस. त्याचं कौशल्य असं की, अफाट कर्तबगारीच्या भरवशावर कुणालाही मॅनेज करू असा त्याचा स्वभाव बनलेला आहे. सर्वपक्षाशी या माणसाची मैत्री आहे. त्या बळावर त्याने स्वत:चं उपद्रव मूल्य वाढवलेलं आहे. मुलायम यांना राजकारणात हा माणूस सतत उपयुक्त म्हणून ठरत आला आहे.

मुलायम या चौकडीला घेऊन पारंपरिक पद्धतीचं राजकारण रेटू पाहत होते. ते मान्य करत नाही म्हणून त्यांनी अखिलेश यांची नाकेबंदी करून पाहिली. पण आता अखिलेश यांनी स्वत:ची राजकीय जमीन कर्तबगारीनं तयार केली आहे. त्या बळावरच त्यांनी बंड करण्याचं धाडस केलं.

साडेचार वर्षांत अखिलेश यांनी विकास करणारा माणूस म्हणून सामान्य लोकांत किती स्थान मिळवलं आहे, हे येत्या निवडणुकीत दिसेल. आता बंड तर झालंच आहे. समाजवादी पक्ष खरा कुणाचा? यादव-मुस्लीम व्होटबँकेचे धनी कोण? याचा निकाल येत्या उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत लागेल. सध्या सायकल कुणाची हा मुद्दा किरकोळ आहे. सत्तेचा कल कुणाला मिळो न मिळो, पण या बंडाने घराणेशाही राजकारणाला नव्या वळणावर नेऊन ठेवलं, हा या बंडाचा खरा अर्थ आहे.

लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......