प. बंगाल : तिरंगा ते भगवा व्हाया लाल
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Wed , 12 June 2019
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar ममता बॅनर्जी Mamata Banerjee तृणमूल काँग्रेस Trinamool Congress

स्वातंत्र्यपूर्व काळापासून प. बंगाल आणि क्रांती, पर्यायाने हिंसा असे समीकरण चालत आहे. गांधींच्या अहिंसात्मक आंदोलनाच्या प्रभाव काळातही प. बंगालमध्ये सशस्त्र क्रांतीच्या तत्त्वज्ञानाने भारलेले अनेक होते. नेताजी सुभाषचंद्र बोस हे बहुमताने निवडून येऊनही गांधींच्या सांगण्यावरून त्यांना नेहरूंचा रस्ता मोकळा करावा लागला. त्याला पार्श्वभूमी होती, नेताजींच्या सशस्त्र क्रांतीच्या तत्त्वज्ञानाची. पुढे याच ध्यासातून आपला मार्ग शोधताना त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाच्या फायली अधूनमधून राजकीय लाभासाठी वरखाली करून पुन्हा तशाच ठेवल्या जातात!

विद्रोहाचा हा वारसा बंगालने आजतागायत अनेक क्षेत्रांत जपलाय. संगीत, चित्रकला, शिल्प, नृत्य, नाट्य, रंगभूमी, चित्रपट, साहित्य अशा जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत क्रांतिकारी बदल बंगालच्या भूमीने, तेथील लोकांनी घडवले. कम्युनिस्टांना पाय रोवायला अत्यंत संपृक्त अशी ही भूमी. कम्युनिस्टांनी त्याचा योग्य तो फायदा घेत स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ असलेली काँग्रेसची सत्ता काबीज केली. नुस्ती काबीज केली नाही, तर पंचवीस वर्षं एक पक्ष, एक मुख्यमंत्री हा विक्रमही केला. (अजूनही तो अबाधित आहे.) या पंचवीस वर्षांत भारताच्या राजकारणात विविध राज्यांच्या राजकारणात अनेक चढउतार आले, पण बंगाल लाल बावट्याखाली स्थिर राहिला.

काँग्रेसच्या राजवटीत नक्षलवादाचा उदय व विस्तार झाला. फिडेल, चे, गव्हेरा यांच्या गारुडाच्या त्या काळात नक्षलबाडी नावाच्या गावातून चारू मुझुमदारांनी सुरू केलेली सशस्त्र क्रांतीची चळवळ त्रिपुरामार्गे महाराष्ट्रातून खाली आंध्र प्रदेशापार्यंत पोहचली. महाराष्ट्राचा विदर्भाचा कोपरा सोडला तर या चळवळीचा तितकासा प्रभाव जाणवला नाही, राहिला नाही, मात्र आंध्रमध्ये ती चांगलीच फोफावली. नाही म्हणायला महाराष्ट्रात युक्रांत, दलित पँथरसारख्या युवकांच्या सळसळत्या संघटनांमध्ये नक्षलवादाच्या संशयाने नेतृत्व, कार्यकर्ते यांना फुटीच्या पातळीवर मात्र नेऊन ठेवले. नक्षलवादाच्या हादऱ्याने व्यवस्था हादरण्यापेक्षा इथल्या संघटनांतच स्फोट घडले!

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4901/Startup-marnarach-mi-udyojak-honarach-mi

...............................................................................................................................................................

काँग्रेसकडून कम्युनिस्टांनी सत्ता हस्तगत करून ती प. बंगाल, त्रिपुरा आणि केरळ या तीन राज्यांत अखंड ठेवली. मागच्या विधानसभा निवडणुकीत लालचे भगवे झाले. केरळमध्ये हा प्रयोग चालला नाही. पण आता बंगालचा त्रिपुरा करायचा चंगच भाजपने बांधलाय.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे भाजपचा सामना कम्युनिस्ट अथवा काँग्रेसशी नाही, तर कधी काळी काँग्रेसच्या तरुण तुर्क असणाऱ्या ममता बॅनर्जींच्या तृणमूलशी आहे.

ममता बॅनर्जी काँग्रेस श्रेष्ठींकडून अनुकूल प्रतिसाद मिळत नसल्याने काँग्रेसमधून बाहेर पडल्या. कारण त्यांची लढाई होती, काँग्रेससारख्याच केडर बेस कम्युनिस्ट पार्टीशी. फरक इतकाच होता, काँग्रेसचं देशभराचं केडर सत्ताकांक्षी होऊन विरोधाच्या पातळीवर सुस्त झालं होतं. याउलट ज्योती बसूसारखा चेहरा मुख्यमंत्रीपदी असल्याने, ग्रासरूटपर्यंत काम असल्याने आणि अखंड सत्तेमुळे सामदामदंडभेद नीतीचे तत्त्व कम्युनिस्टांनीही अंगिकारले होते. त्यांच्या शिस्तीची दहशत झाली होती. या व्यवस्थेचे एकमेव वैशिष्ट्य, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नव्हते की संपत्ती संचयाचे ओंगळवाणे प्रदर्शन. दुसरे वैशिष्ट्य कम्युनिस्टांनी आपल्या तत्त्वज्ञानाला मुरड घालून दुर्गापूजेत घेतलेला सक्रिय सहभाग!

ममता बॅनर्जींची लढाई हत्ती आणि मुंगीसारखी वाटायची. शेवटी त्यांनी काँग्रेसचा त्याग करत कम्युनिस्टांच्या ग्रासरूटचे बंगाली भाषांतर ‘तृणमूल’, हे नाव घेत स्वत:चा नवा पक्ष काढला. काँग्रेसी पंरपरेत वाढल्याप्रमाणे काँग्रेस सोडून बाहेर पडून वा पक्ष स्थापणारे, नव्या पक्षाच्या नावात ‘काँग्रेस’ ठेवतात, तसे ममतांनी ‘तृणमूल काँग्रेस’ असे नाव ठेवले (हे म्हणजे कम्युनिस्ट व काँग्रेसचे कॉकटेलच!) पक्षचिन्हही ‘गवताची कांडी’.

सुरुवातीला असमान वाटणारी लढाई ममतांनी पुढे निकराची केली. त्यांचे व्यक्तित्व चिडखोर, किरकिरे असले तरी त्यांची सादगी आणि फकिरी (साध्वी नव्हे!), यासोबत त्यांची कळकळ बंगाल्यांना भिडली आणि त्यांनी काँग्रेस व कम्युनिस्टांना एकाच वेळी धडा शिकवू पाहणारे ममतादीदींचे बियाणे बंगालच्या भूमीत रुजवले!

(काँग्रेसमधून बाहेर पडून स्वबळावर सत्ता आणण्याचा पराक्रम जो आपल्या हेवीवेट पवारसाहेबांना आजवर जमला नाही, तो ममतादीदींनी आजवर कायम ठेवलाय. असाच पराक्रम परवा जगन रेड्डींनी केला. महाराष्ट्रात कधी होतो बघूया. कारण पवारांप्रमाणे तो दुसरे हेवीवेट बाळासाहेब ठाकरेंनाही जमला नाही. ठाकरेंची दोन्ही धाकटी पाती तो करू शकतील? ठाकरे कुटुंब काँग्रेसशी संबंधित नाही, पण मग त्या पातळीवर करुणानिधी, जयललिता, एनटीआर, चंद्राबाबू, नवीन पटनाईक यांना जमले, ते त्याच प्रांतवादावर ठाकरेंना आजवर जमलेले नाही!)

काँग्रेसमध्ये असल्यापासूनच ममतादीदी शीघ्रकोपी आणि सतत रस्त्यावरच्या आंदोलनाच्या मोड व मूडमध्ये असतात. (याचाच शांत किंवा संभ्रमित अवतार म्हणजे केजरीवाल!) आज सत्तेत इतकी वर्षे घालवल्यानंतरही त्या पटकन रस्त्यावर उतरतात! त्यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासून कम्युनिस्टांशी जी खुनशी हातापायी केली, ती रग त्यांच्यातही सत्ताधारी झाल्यानंतर कायम आहे.

काँग्रेसने कम्युनिस्टांशी पंचवीस वर्षं लढतानाच बंगालात शस्त्रे टाकली होती. ममताच्या आगमनानंतर ते गर्भगळीतच झाले. उत्तर प्रदेश, बिहारप्रमाणे बंगालात त्यांचा हरवलेला सूर त्यांना आजतागायत सापडलेला नाही.

काँग्रेस, कम्युनिस्ट, तृणमूल या त्रिकोणात भाजप हा चौथा राष्ट्रीय व केडर बेस पक्ष लांबवरही दिसत नव्हता. जरी भाजपआधीच्या जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी असले व काश्मिरात त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला असला तरी बंगालात संघ, भाजप फारसे रुजले नव्हते. संघाने ईशान्य भारतात पाय रोवून बाहेरून नाकाबंदी करत आणली. त्याचा परिणाम २५-३० वर्षांनी त्रिपुरात झाला! २०१४च्या मोदी विजयानंतर संघ-भाजपचे प्रथम लक्ष्य काँग्रेस, तसेच कम्युनिस्ट मुक्त भारताचे आहे. त्रिपुरात त्यांनी ते एकहाती जमवले. त्यासाठी त्यांनी तिथल्या काँग्रेससह इतर विरोधी पक्षीयांना कमलांकित उपरणे घालून निवडून आणले आणि त्यांच्या सामर्थ्यावर कमळांची तळे वाढवली.

‘मोदी पर्व-२’च्या अजेंड्यावर आता ममतादीदी, त्यांचा तृणमूल आणि बंगाल आहे. भाजपसाठी बंगाल म्हणजे दुसरे जेएनयूच! एकदा त्याचा डावा, पुरोगामी, बुद्धिवादी, क्रांतिकारी चेहरा बदलून रवींद्र संगीताच्या जागी रामलीला आणि दुर्गापूजेच्या समांतर कृष्णलीला आणली की, मग दसऱ्याचे संचलनही दिमाखात करता येणार! स्वातंत्र्यपूर्व काळ व स्वातंत्र्योत्तर काळातला तिरंगा, नंतरचा लाल रंग प. बंगालमधून हद्दपार करून तिथे भगवा फडकवायचा निर्धार मोदींपेक्षा अमित शहांनी भाजपाध्यक्ष असतानाच केलाय. आता तर ते केंद्रीय गृहमंत्री झाले! (शहांचा दबदबा असा की, त्यांनी कार्यभार स्वीकारताच पाच राज्यांचे राज्यपाल दिल्लीत पोहचले. त्यात प. बंगालचे राज्यपाल अहवालासह. संविधानिक दर्जाने गृहमंत्र्याने राज्यपालांना भेटायचे की, राज्यपालांनी गृहमंत्र्यांना?) अमित शहा यांच्यासाठी सोपी गोष्ट आहे, ती ममतादीदींचा उतावळा व किरकिरा स्वभाव. त्याची चुणूक शहा-मोदींना लोकसभेच्या यशाने दिसली आहे.

जी चूक काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केली, तीच चूक ममतादीदी करताहेत. मोदी-शहांनी ममतांना राजकीय विषयावर नाही तर धार्मिक मुद्द्यांवर घेरलेय. मग तो दुर्गापूजा, ईद मिलाद असो की जय श्रीरामचा नारा असो. धार्मिक धुव्रीकरणात स्थलांतरित, तरुण नवमतदार आणि उदारीकरणाचा लाभार्थी नवश्रीमंत हा पहिला आकर्षित होतो. त्याला स्वातंत्र्य चळवळ, नक्षलवाद, बंगाली अस्मिता, भाषा हे मुद्दे आधीच्या पिढीइतके जीवन-मरणाचे वाटत नाहीत. संगणकीकरण, माध्यम स्फोट आणि नव्या डेटा युगाने केलेल्या आक्रमणाचा फायदा, सेक्युलर काँग्रेस अथवा पोथिनिष्ठ कम्युनिस्टांना तंत्रविज्ञान म्हणूनही करण्याचे सुचले नाही. मात्र संघ-भाजपने या आधुनिक तंत्रज्ञानातून जयश्रीराम, गोरक्षा, पोहचवले. आता ते दुर्गा आणि राक्षस या प्रतिमेचं भारत-पाकिस्तान पर्यायाने मुसलमान असे नवे चित्र प्रसारित करतील. कदाचित तस्लीमा नसरीनना राजकीय आश्रय देत सलमान रश्दीचे पुस्तकही खुले करतील. नेताजींचा तीनशे फुटी पुतळा आणि श्यामाप्रसादांचे भव्य स्मारक! बंगाली संस्कृती लवकरच हिंदू बंगाली संस्कृती म्हणून पुढे आली तर आश्चर्य वाटायला नको!!

परिवर्तनाचा गड समजला जाणारा महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकर असं कीर्तन करणाऱ्या काँग्रेस (राष्ट्रवादी)कडून संघ-भाजपने थेट वारकरी पंथात प्रवेश करून काढून घेतलाच आहे. वारकरी संप्रदायाचा भगवा आणि शिवरायाचा भगवा सनातनी भगव्यात बदललाय.

प. बंगालचा क्रांतिकारक लाल रंगही आता त्याच वाटेवर आहे.

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......