शिवाजी महाराजांचा नेमका जन्मदिनांक कोणता?
पडघम - सांस्कृतिक
डी. व्ही. आपटे – एम. आर. परांजपे
  • ‘शिवाजी महाराजांचा जन्मदिनांक’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि छ. शिवाजी महाराज यांचं एक शिल्प
  • Tue , 19 February 2019
  • पडघम सांस्कृतिक शिवाजी महाराज Shivaji Maharaj शिवजयंती Shivjayanti

शिवाजी महाराजांचा नेमका जन्मदिनांक कोणता? कित्येक वर्षं महाराष्ट्रात या विषयावर वादविवाद सुरू होता. बखरकारांनी निरनिराळे जन्मदिनांक दिले. त्यामुळे या प्रश्नाची गुंतागुंत वाढली. सरतेशेवटी तीन समकालीन पुरावे मिळाले - ‘जेधे शकावली’, ‘शिवभारत’ आणि ‘जोधपूर कुंडली’. या तीन समकालीन दस्ताऐवजांनी हा प्रश्न सोडवला. आणि सरतेशवेटी शिवजन्मदिनांक निश्चित झाला. तो कशा प्रकारे? हा इतिहासही मनोरंजक आहे. १९२७ साली डी. व्ही. आपटे – एम. आर. परांजपे यांनी ‘Birth Date of Shivaji’ या नावाची छोटीशी पुस्तिका लिहून हे सगळे पुराव्यासह मांडले. त्याचा मराठी अनुवाद २१ सप्टेंबर २०१७ रोजी ‘शिवाजी महाराजांचा जन्मदिनांक’ या नावाने ज्येष्ठ विज्ञानलेखक मोहन आपटे यांनी केला आहे. अभिषेक टाइपसेटर्स अँड पब्लिशर्स यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तिकेतील हा संपादित अंश…

.............................................................................................................................................

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी कै. वि. का. राजवाडे यांनी ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या श्रृखंलेतील चौथा ग्रंथ प्रसिद्ध केला. ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांनी सतराव्या शतकाच्या पूर्वार्धातील अनेक प्रश्नांचा उहापोह केला आहे. कारण त्या काळातील शिवाजी महाराजांचा जन्म ही सर्वांत महत्त्वाची घटना होती. कै. राजवाडे यांना उपलब्ध असलेल्या निरनिराळ्या बखरींमध्ये शिवाजी महाराजांच्या जन्मतारखांमध्ये फारच तफावत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कित्येक बखरीत १६२७ हे वर्ष आणि एप्रिल हा महिना दिलेला होता. या शिवाय सप्ताहातील दिवस, दिवसाची वेळ आणि वर्षाचे नाव या बद्दल सर्व बखरींमध्ये कुठीलच एकवाक्यता नव्हती.

१४ एप्रिल १९०० या दिवशी लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’मध्ये याच विषयावर एक लेख प्रसिद्ध केला. त्यामध्ये त्यांनी लिहिले, “या महत्त्वाच्या विषयावरील उलटसुलट विधाने वाचून दु:ख होते. परंतु वस्तुस्थिती नाकारण्यात अर्थ नाही. परंतु, संशोधकाला पुरेसा ताप देणारा व त्याचे कौशल्य पणाला लावणारा हा प्रश्न आहे.”

ते आपल्या लेखात म्हणतात, “सुमारे २७५ वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या शिवाजीसारख्या महान व्यक्तीच्या जन्मदिनांकाबद्दल इतकी अनिश्चितता असावी, ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. परंतु सम्राट नेपोलियन किंवा ड्यूक ऑफ वेलिंग्टन यांचेही जन्मदिनांक याहीपेक्षा अधिक निश्चितपणे माहीत नसतील. ज्यावेळी महाराजांचा जन्म झाला त्यावेळी कुणीही असा अंदाज केला नसेल की, ते मराठा साम्राज्याचे संस्थापक होतील. त्यामुळे त्यावेळी जी काही दस्तऐवजे उपलब्ध होती, त्यात अनेक गोंधळात टाकणारी विधाने असावीत याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. बहुदा ती प्रस्थापित विरोधी असावीत किंवा ढोबळ गणितावर आधारित असतील.”

एक महत्त्वाचा शोध

अशा प्रकारे हा प्रश्न (महाराजांचा जन्म) प्रदीर्घ काळपर्यंत अनुत्तरित राहिला. श्री. राजवाडे यांना वैशाख शुद्ध पंचमी शके १५४९, हा दिनांक पसंत होता. लोकमान्य टिळकांचा वैशाख शुक्ल प्रतिपदा शके १५४९ (६ एप्रिल १९२७चा ‘केसरी’) हा दिनांक स्वीकारण्याकडे कल होता. परंतु, तिथी संबंधात अनिश्चितता होती. आजपर्यंत वर्ष आणि महिना चुकीचे असतील (शके १५४९, वैशाख) याबद्दल कुणीही शंका घेतली नव्हती.

१९१६ साली एके दिवशी लोकमान्य टिळकांनी त्यांना नव्याने शोध लागलेल्या ‘जेधे शकावली’ या जेधे घराण्याच्या नोंद वहीवरील एक टिपण वाचले. त्यामुळे एका अज्ञात गोष्टीवर चांगलाच प्रकाश पडला. त्या दिवशी लोकमान्य टिळकांनी घोषित केले की, ‘शिवाजी महाराजांचा जन्म शके, १५५१, शुक्ल संवत्सर, शुक्रवार, फाल्गुन वद्य तृतीया’ या दिवशी झाला. याचा अर्थ १९ फेब्रुवारी १६३० असा महाराजांचा जन्मदिनांक ठरतो.

एका लांब अरूंद पोर्तुगीज कागदावर ‘जेधे शकावली’ लिहिलेली आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूंना लिहिलेली २२ पृष्ठे असून २३ वे पृष्ठ अर्धेच लिहिले आहे. शकावलीत शके १५४० ते १६१९, म्हणजे सन १६१८ ते १६९७ या काळातील कालक्रमानुसार कमी-अधिक प्रमाणात हकिगत दिली आहे. भोर संस्थानातील कारी या खेड्याचे देशमुख श्री दयाजीराव सर्जेराव उर्फ दाजीसाहेब जेधे यांनी १९०७ साली शकावलीचे हस्तलिखित लोकमान्य टिळकांना दिले. परंतु तो काळ अशांततेचा होता. (बंगालच्या फाळणी विरोधात चाललेल्या चळवळीचा काळ) त्यामुळे हस्तलिखित भलत्याच ठिकाणी ठेवले गेले. १९१५ साली शकावलीचे मालक यांनी हस्तलिखित पुन्हा मागेपर्यंत ते विस्मृतीत गेले होते. मंडळाला त्याची प्रत सुपूर्त करताना लोकमान्य टिळक यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, “श्री. जेधे यांच्या जवळ असलेले हस्तलिखित सुमारे १५० वर्ष जुने आहे आणि ते लेखकाने जेधे कुटुंबियांसाठी दुसऱ्या हस्तलिखितावरून तयार केले आहे. श्री. राजवाडे यांनी ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १८ : क्रमांक ५’ या ग्रंथात प्रसिद्ध केलेल्या मूळ अपूर्ण कालक्रमासारखेच ते हस्तलिखित होते. अनेक अभ्यासकांनी ‘जेधे शकावली’ची छाननी केली आहे. त्यामधील जवळजवळ सर्व नोंदी अचूक असल्याचे लक्षात आले आहे. त्यातील बहुतांश भाग शिवाजी महाराजांच्या काळात हयात असणाऱ्या कुणीतरी लिहिला आहे. (कालक्रमातील शेवटी नोंद सन १६९७ सालची आहे. त्यावेळी महाराजांचा मृत्यू होऊन १७ वर्षे झाली होती.) तसेच लेखकाला विश्वसनीय अधिकृत दस्तऐवज पाहण्याची मुभा असावी असे दिसते.”

‘जेधे शकावली’बद्दल लिहिताना प्रो. जदुनाथ सरकार म्हणतात, “जेधे शकावली हा शिवाजी आणि त्यांचे पूर्वज यांचा सर्वांत बहुमोल व विश्वसनीय समकालीन दस्तऐवज आहे. प्रत्येक उदाहरणात अचूक दिनांक दिला आहे. शकावली १९१८ साली प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे त्यात आधुनिक काळात मुद्दाम फेरफार केले असण्याची शक्यता नाही…”

अशा प्रकारे ‘जेधे शकावली’ हा एक अमूल्य शोध होता. परंतु, त्याचे योग्य मूल्य समजण्यासाठी चार वर्षांचा काळ लागला. लोकांना त्याचे महत्त्व लक्षात आल्यावर कित्येकांच्या मनात महाराजांच्या जन्मदिनांकाच्या संबंधात, काही प्रश्न नैसर्गिकरित्या उभे राहिले.

‘जेधे शकावली’ बरोबर आहे काय? वर्तमान इतिहास ग्रंथात दिलेले १६२७ हे वर्ष नसून १६३० असू शकेल काय? शके १५५१ किंवा सन १६३० या वर्षाला अनुकूलता दर्शविणारा ‘जेधे शकावली’ हाच एकमेव पुरावा नसून, अन्य दस्तऐवजात तशी नोंद असू शकेल, यावर लवकरच लक्ष केंद्रित करण्यात आले. कारण त्याचे लेखन अलीकडचे (सन १९०३) असून समांतर इंग्रजी वर्ष १६२८ दिले असून ते चुकीचे आहे.

याच काळात तंजावर ग्रंथालयातील ‘शिवभारत’ या अत्यंत मौल्यवान संस्कृत ग्रंथाचा पत्ता लागला. त्यामध्ये शिवाजी महाराजांचे संस्कृत भाषेत काव्यात्मक वर्णन आहे. ते कवी परमानंद यांनी लिहिले असून महाराज हे त्याचे आश्रयदाते होते. ग्रंथातील काव्यात्मकता सोडल्यास सर्व दृष्टीने तो समकालीन व अत्यंत विश्वसनीय दस्तऐवज होता. ‘जेधे शकावली’त दिलेलाच महाराजांचा जन्मदिनांक या ग्रंथात दिला आहे.

कै. श्री. खरे, चांदोरकर आणि दिवेकर यांनी १९२१ साली सन १६३० हे वर्ष योग्य असल्याचे मोकळेपणाने स्वीकारले. ‘केसरी’चे संपादक श्री. ज.स. करंदीकर यांनी १९२४ साली आपल्या संपादकीयात त्या दिवसाचे समर्थन केले. त्या वेळेपर्यंत वैशाख शुक्ल २ या दिवशी शिवजन्म दिन साजरा केला जात होता. त्याऐवजी यापुढे महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य ३ या दिवशी साजरा करावा असे त्यांनी आपल्या लेखात प्रतिपादन केले.

जोधपूर शहरातून पुष्टिकरण

शके १५५१ किंवा सन १६३० या वर्षाला नवनवीन पुरावे जमा होत असतानाच संशोधकांना नशिबाने दिलासा दिला आणि त्यांच्या हातात सर्वांत विश्वसनीय पुरावा आला. किंबहुना या मतभेदासाठी तो अंतिम शब्द होता. जोधपूर येथील एका ज्योतिषाकडून महाराजांची कुंडली हस्तगत करण्यात संशोधकांना यश आले.

कुंडल्या कुटुंबानुसार व्यवस्थित लावल्या आहेत. जसे, मुसलमानांच्या (मोंगल सम्राट, राजपुत्र, सरदार), जोधपूरचे राठोड, बिकानेर आणि किशनगड, अम्बर आणि जयपूर येथील कछवा, चितोड आणि उदयपूरचे राजा, शिरोळीचे देवर, जयसलमेरचे भट्टी, घोर, बुंदी आणि कोरा येथील हाडा व जोधपूर राज्यातील मुहुमोत्तो मुहत, सिंघरी, पांचोली, ब्राह्मण वगैरे.

उदयपूरच्या राज्यांमध्ये शिवाजी महाराजांची कुंडली समाविष्ट केली आहे. याचा अर्थ, संग्रह करणाऱ्याने महाराजांची गणना उदयपूर (मेवाड) राजघराण्यामध्ये केली आहे. सामान्यत: एका पानावर ६ कुंडल्या आहेत. प्रत्येक बाजूला ३ अशी त्यांची रचना आहे. ज्या पानावर महाराजांची कुंडली आहे त्यामध्ये तीन कुंडल्या आहेत. त्यातील पहिली राणा जयसिंहाच्या पत्नीची आहे. बाई गंगा ही बुंदीच्या हाडा सत्रुशालची कन्या होती. दुसरी अमरसिंह या राणा जयसिंहाच्या पुत्राची आहे आणि तिसरी महाराजांची आहे. त्यातील तंतोतंत बरोबर शब्द पुढीलप्रमाणे आहेत –

|| संवत १६८६ फागूण वदि ३ शुक्रे ३. घटी ३०\९ राजा शिवाजी जन्म: || र.१०\३३ ल. ४\२९

स्पष्टीकरण

टिपण फागुण = फाल्गुन | वदि = वद्य (कृष्णपक्ष)

उ. घटि ३०\९ सूर्योदयादिष्ट घटि ३०\९

र. = स्पष्ट सूर्य | ल. = स्पष्ट लग्न

राजपुतान्यातील राजपुत्रांच्या वगैरे सर्व कुंडल्या उत्तरेतील (पौर्णिमांत) पंचांगांनुसार आहेत. पण महाराष्ट्रातील कुंडली मात्र दक्षिणेकडील (अमावस्यांत) पंचांगांनुसार आहे. संवत १६८६ फाल्गुन वदि ३; शुक्रवार, १८ फेब्रुवारी सन १६३० या दिनांकाशी बरोबर जुळते.

दक्षिणी पंचांगांनुसार शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वदि ३ शुक्रवार, सूर्यादयानंतर ३० घटी ९ पळे म्हणजे संध्याकाळनंतर थोड्याच वेळात झाला…

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Nikkhiel paropate

Wed , 20 February 2019

शककर्ते शिवराय या ग्रंथात देखील मा. विजय देशमुख यांनी शिवाजी महाराजांची जन्मदिनांक ही १९ फेब्रुवारी १६३० असल्याचे प्रमाणवार सिध्द केले आहे.


Gamma Pailvan

Tue , 19 February 2019

चांगला माहितीपूर्ण लेख! -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

बिहारमधील एसआयआर : मतदार यादीची पडताळणी की मताधिकाराची पुनर्परीक्षा? महाराष्ट्रात चाललेल्या एसआयआर प्रक्रियेत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जाणे गरजेचे आहे

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क प्रत्यक्षात बजावता यावा याची खात्री करणे, हे निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी मतदार यादी हे एक साधन आहे. अंतिम उद्दिष्ट नाही. मृत व्यक्तींची नावे वगळणे आवश्यक आहे. दुबार नोंदी काढणे आवश्यक आहे. मतदार यादी अचूक ठेवणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियांचा अंतिम हेतू मतदाराला मतदानापासून वंचित करणे, हा नसून त्याचा मतदानाचा हक्क सुरक्षित करणे हा असतो.......

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......