कविता ‘शिकविण्यापेक्षा’, तिचं ‘राजकारण’ का होतंय?
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • दिनकर मनवर यांचा कवितासंग्रह
  • Tue , 09 October 2018
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar दिनकर मनवर Dinkar Manvar पाणी कसं अस्तं दृश्य नसलेल्या दृश्यात

कवी दिनकर मनवर यांच्या ‘पाणी कसं अस्तं’ या कवितेवरून, खरं तर त्या कवितेतल्या एका ओळीवरून आणि ओळीतल्या दोन शब्दावरून अस्मितेचं जे राजकारण तापलंय, ते आजच्या सोशल मीडियाच्या आक्रस्ताळी, विखारी, बेबंद, विवेकहीन प्रवृत्तीला साजेसंच आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, जग पुढे नेतं किंवा ते पुढे नेण्यासाठी वापरावं असं अभिप्रेत असतं. पण भारतात सध्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मुसक्या आवळून, त्याच्यावरच स्वार होत टोळीयुगाकडे जाण्याचा प्रवास सुरू आहे.

‘पाणी कसं अस्तं’ ही दिनकर मनवर यांची पाण्यावरची कविता त्यांच्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या कवितासंग्रहात आहे. ती यंदा मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्षाला अभ्यासाला आहे. विद्यापीठाची एक स्वायत्त समिती पुस्तकांची निवड करत असते. ज्यात साहित्य कळणारे लोक असतात. विद्यापीठानं त्यांना सर्वाधिकार दिलेले असतात. आता ही कविता अभ्यासाला कधीपासून आहे, याचा तपशील मिळालेला नाही. असो. कालच्या रविवारी प्रमुख दैनिकांत त्यावर लेख आलेत. सोशल मीडियावर समर्थक आणि विरोधक यांचं तुंबळ युद्ध चालू आहे. दरम्यान दिनकर मनवरांनी माफी मागून कविता अभ्यासातूनच काढून घेतलीय. थोडक्यात मनवरांनी त्यांच्यातल्या लेखकाची झुंडीनं केलेलेली हत्या स्वीकारलीय.

बातम्या, लेख, चर्चा यात ती पूर्ण कविता (सोशल मीडिया) कुठे छापलेली आढळली नाही, वा आमच्या वाचनात आली नाही. लेखातसुद्धा ती ओळ, त्या आक्षेपार्ह ओळी, विशिष्ट शब्द अशा पद्धतीनं ज्यावर आक्षेप आहे, ती कविता अथवा ओळ कुणी दिलेली नाही. विस्तारभयास्तव दैनिकांनी ती छापणं टाळलं असावं.

रेखाचित्र - संजय पवार

आपण पहिल्यांदा ‘पाणी कसं अस्तं’ ही पूर्ण कविता वाचू.

पाणी कसं अस्तं

पाणी हा शब्द
मला कसाही उच्चारण्याची मुभा नाहीए,
मी ऐकू शकत नाही पाण्याचा आवाज
मी चालून जाऊ शकत नाही पाण्याच्या पायरीवरून

पाणी कसं अस्तं आकाशासारखं निळंशार
किंवा अंगठा छाटल्यावर उडालेल्या
रक्ताच्या चिळकांडीसारखं लालसर
पाणी कसं अस्तं स्वच्छ पातळ की निर्मळ?

काळं असावं पाणी कदाचित
पाथरवटानं फोडलेल्या फाडीसारखं राकट काळं
किंवा आदिवासी पोरीच्या स्तनांसारखं जांभळं
किंवा पाणी हिरवं नसेल कशावरून ?
(पाणी कसं अस्तं हे मला अजूनही कळू दिलेलं नाहीये)

जे तुंबवून ठेवलेलं अस्तं तळ्यात ते पाणी अस्तं?
पोहऱ्यानं पाणी उपसून घेतलं तर विहिरीतलं पाणी विटतं?
पाणी धारदार वाहतं झुळझुळतं मंजुळ गाणं गातं ते पाणी अस्तं?
गढूळ, सडकं, दूषित, शेवाळलेलं, गटारीतलं, मोरीतलं
या पाण्यावरचे निर्बंध अजूनही उठविले गेले नाहीत काय?
पाणी ढगातून बरसतं तेच फक्त पाणी अस्तं?
नि दंगल घडवतं ते पाणी नस्तं?

पाणी पावसातून गळतं जमिनीवर
बर्फ वितळल्यावर पसरतं पठारावर
नदीला पूर आल्यावर वेढून घेतं गावं
धरण फुटल्यावर पांगापांग करतं माण्सांची
ते पण पाणी पाणीच अस्तं?

पाणी स्पृश्य अस्तं की अस्पृश्य?
पाणी अगोदर जन्माला आलं की ब्रह्म?
पाणी ब्राह्मण अस्तं की क्षत्रिय की वैश्य?
पाणी शूद्र अस्तं की अतिशूद्र?
पाणी निव्वळ पाणीच असू शकत नाही का
या वर्तमानात?

आणि पाणी वरचं खालचं झालं केव्हापास्नं
की कुणाच्या हात लावण्यानं ते कसं काय बाटतं?
पाणी नदीतलं, नाल्यातलं, ओढ्यातलं, विहिरीतलं
पाणी तळ्यातलं, धरणातलं, सरोवरातलं, समुद्रातलं
पाणी ढगातलं, माठातलं, पेल्यातलं, डोळ्यातलं
हे पाणी कुणाच्या मालकीचं अस्तं?

पाणी नारळात येतं
छातीच्या बरगड्यात साचतं
फुप्फुसातून पू होऊन स्त्रवतं
पोटात पाण्याचा गोळा होऊन राहतं
ईश्वराचा कोणता देवदूत हे पाणी न चुकता सोडत अस्तो?

पाणी पारा अस्तं की कापूर?
जे चिमटीत पकडता येत नाही
नि घरंगळून जात राहतं सारखं
किंवा कापरासारखं जाळून जातं झर्कssन

पाणी हा शब्द फक्त एकदाच मला उच्चारू द्या
निव्वळ पाण्यासारखा.

तर अशी ही पूर्ण कविता. नामदेव ढसाळ यांच्या ‘माण्साने’ या कवितेचा प्रभाव जाणवणारी. यातील

‘काळं असावं कदाचित

पाथरवटानं फोडलेल्या फाडीसारखं राकट काळं

किंवा आदिवासी पोरीच्या स्तनासारखं जांभळं

किंवा पाणी हिरवं नसेल कशावरून?

(पाणी कसं अस्तं हे मला अजूनही कळू दिलेलं नाहीये)’

या कडव्यातील ‘किंवा आदिवासी पोरीच्या स्तनासारखं जांभळं’ या ओळीवर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि श्रमजीवी संघटना यांनी तीव्र आक्षेप घेत ही कविता वगळावी, शिवाय कवी, कुलगुरू आणि शिक्षण मंडळावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलीय. जिल्हानिहाय आंदोलन करून निवेदनं दिली गेलीत. श्रमजीवी संघटनेनं कवीला ‘माथेफिरू कवी’ असं म्हटलं आहे. विद्यापीठानं चौकशीची आदेश देत पुढील कारवाई करण्याचं ठरवलं आहे.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

...............................................................................................................................................................

कविता तृतीय वर्ष मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे. मुंबई विद्यापीठाच्या कक्षेतील ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात काही प्रमाणात आदिवासी विद्यार्थी, इतर शहरी विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेतात. आदिवासीबहुल नंदुरबार, धुळे, गडचिरोली, मरा‌ठवाड्याचा आंध्र सीमेकडचा भाग येथील आदिवासी मुलामुलींच्या तुलनेत मुंबईला जवळ ठाणे, पालघर, रायगड भागातील मुलं-मुली महानगरी जीवनाशी परिचित आहेत. त्यामुळे ‘आदिवासी पोरीचा स्तन’ असा कवितेतील उल्लेख त्यांना लगेच शरमेनं माना खाली घालायला अथवा अंगचोर करणारा वाटण्याची शक्यता तशी कमीच आहे. कारण मुंबई विद्यापीठ व मुंबई शहर याच्याशी त्यांची सांस्कृतिक जानपहचान असणारच.

त्यामुळे या संघटनांचा आदिवासी मुलींना काय वाटेल अथवा इतर त्यांच्याकडे कसं पाहतील, हा आक्षेप तार्किक वाटत नाही. शिकताना अनेक गोष्टी समजून घ्याव्या लागतात.

याच न्यायानं मग छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकताना संपूर्ण महाराष्ट्रातील मुसलमान मुला-मुलींना काय वाटत असेल? उलट त्यांना तर ‘लांड्या’, ‘अफझलखान’, ‘औरंगजेब’ अशी विशेषणं लावली जातात सर्रास. मस्तानी शिकताना काय वाटत असेल? मग उद्या त्यांनी हा इतिहास वगळा म्हणायचं? आजवर ते म्हणाले?

आदिवासी स्त्रीच्या कष्टाचं, दैन्याचं, दु:खाचं, शोषणाचं वर्णन करणारं साहित्य - ज्यात कविताही आल्याच- त्याप्रमाणे तिच्या सौंदर्याचं, निर्व्याज प्रेमाचं वर्णन करणारं ‘अजिंठा’ (ना. धों. महानोर)सारखं दीर्घ काव्यही उपलब्ध आहे. ज्यावर चित्रपटही आला. ‘रेला रे’ या चित्रपटात आदिवासी जीवन आलंय. त्यासाठी स्त्री कलाकरांनी चोळी न वापरता पदरानंच भूमिका साकारल्यात. एरव्ही हे अंगप्रदर्शन ठरलं असतं. पण इथं ते रीत म्हणून येतं. आदिवासींच्या परंपरा, लग्नपद्धती, जोडीदार निवड, काडीमोड हे ‘प्रगत’ म्हणून पाहतात. घोटुल असेल किंवा ‘मी कात टाकली, मी रात टाकली, मी मोडक्या संसाराची बाई लाज टाकली’ ही आदिवासी स्त्रीची मोकळी भावना आता शहरी स्त्रिया घटस्फोटानंतर वापरू लागल्यात. कुसुमाग्रज ते ना. धों. महानोर, ते अगदी भालचंद्र नेमाडे यांच्या कविता, कादंबरीतून आदिवासी स्त्रियांच्या सौंदर्याची, देहांची वर्णनं आहेत. ती आजवर ‘कलात्मक’च मानली गेलीत. मग मनवरांच्या कवितेतील ‘जांभळे स्तन’ अश्लील, मानहानीकारक का वाटावेत? हे रंगसूचक विधान नैसर्गिक की अनैसर्गिक? यात स्त्रीत्वाचा नेमका अपमान कसा काय होतो?

संपूर्ण कविता वाचल्यावर ते ‘जांभळे स्तन’ लक्षात राहतात का कवी पाण्यावर जे प्रवाही भाष्य करतो ते?

आक्षेप घेणाऱ्यांत श्रमजीवी संघटना असावी याचं आश्चर्य वाटतं. श्रमजीवीचे विवेक पंडित हे साठोत्तरी साहित्य व ७४ नंतरच्या जनआंदोलनातून पुढे आलेलं नेतृत्व आहे. त्यांना साहित्य व समाज आणि साहित्य व सौंदर्य, त्याचं उपयोजन याची जाण आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ‘जांभळे स्तन’पाशी न अडता पूर्ण कविता व त्यातल्या कवीच्या वर्ग, वर्ण व पाणी संघर्षावर लक्ष केंद्रित करायला सांगावं. आज कुणा कवीच्या कवितेतल्या एका ओळीतल्या दोन शब्दांपेक्षा आदिवासी मुलांच्या अस्मितेचा प्रश्न राज्यभरातल्या आश्रमशाळा, वसतीगृह, शिष्यवृत्त्यांचे प्रश्न इथं जास्त महत्त्वाचा आहे. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत आदिवासी मुलं-मुली लोककला शिकताहेत, काही पीएच.डी. झालेत, शिकवताहेत, तिथं लावणी शिकताना जी स्त्री देहाची, शृंगाराची वर्णनं येतात, त्यामुळे तिथले विद्यार्थी चेकाळतात का विद्यार्थिनी शरमेनं मान खाली घालतात? एकदा डॉ. गणेश चंदनशिवेंना विचारायला काय हरकत आहे?

मराठीला विद्यार्थी मिळत नसताना महाविद्यालयंच काय, विद्यापीठातील मराठीचे वर्ग बंद पडायच्या मार्गावर असताना ‘साहित्य’ साहित्यबाह्य कारणांनी बाद करून आपलं राजकारण तापवू पाहणाऱ्यांना विद्यार्थी शरण जातात हे समजू शकतो, पण शिकवणारे प्राध्यापकही त्यात सहभागी व्हावेत? विद्यापीठ यांना पगार ‘शिकवण्यासाठी’ देते की, अंतर्गत ‘राजकारण’ करण्यासाठी?

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Ajinkya Koliwa

Tue , 09 October 2018

कविता काढून टाकण्याची निसंशय काही गरज नव्हती. पण फक्त आदिवासींच्या पोरींच्या स्तनाचाच रंग जांभळा असू शकतो का ??


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......