माफ करा, न्या. लोया, तुम्ही नेताजी सुभाषचंद्र नाही!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • न्या. लोया. रेखाचित्र - संजय पवार
  • Sat , 28 April 2018
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar सलमान खान Salman Khan भाजप BJP न्या. लोया Justic loya ब्रिजगोपाल हरिकिशन लोया Brijgopal Harkishan Loya

आमचा एक वकील मित्र आहे. पूर्वी समाजवादी चळवळीत काम केलेला. आता थेट सामाजिक काम, चळवळ वगैरेमध्ये नसला तरी त्यावेळची जुळलेली नाळ तुटलेली नाही. शेवटी घडायच्या-बिघडायच्या वयात झालेले विचारांचे, विचारसरणींचे संस्कार फारच कोडगा झाल्याशिवाय मनातून आचार-विचारातून जात नाहीत. अंतर राखूनही अंतर न देण्याचा हा प्रकार. तर असा हा मित्र.

दिल्लीत सत्तांतर झाल्यावर सत्ताधारी पक्षातही सत्तांतर झालं. पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष हे एक नवंच अद्वैत राजकीय पटावर अवतरलं. अन्यथा कुठल्याही पक्षाचा अध्यक्ष आणि तो पक्ष सत्तेत असला तर सत्तेच्या खूर्चीत बसलेले यांच्यात समन्वयापेक्षा शह, तहाचं, कुरघोडीचं अंतस्थ राजकारण चालतं. पण सध्याच्या केंद्र सरकारातील सर्वोच्च पद आणि सत्ताधारी पक्षातलं सर्वोच्च पद, त्यावरची माणसं ही जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखी आहेत. थोडक्यात देशावर या दोघांचीच सत्ता आहे. पक्ष आणि सरकार फक्त ही दोनच माणसं चालतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा.

दोघंही गुजरातचे. गुजरातच्या बहुचर्चित, वादग्रस्त दंगलीचा शिक्का दोघांवरही. युपीएचं सरकार असताना अमित शहांना अटकही झाली. त्यांच्यावर गुजरात बंदीही होती, तर नरेंद्र मोदींच्या विरोधात भारतात नव्हे तर जगभरातच ‘दंगलखोर’ अशी प्रतिमा उभी करण्यात विरोधक यशस्वी झाले. परिणामस्वरूप मोदींना तेव्हा अमेरिकेनं व्हिसा नाकारला होता. मात्र गुजराच्या जनतेनं त्यांना सलग तीन टर्म मुख्यमंत्रीपदी बसवलं आणि २०१४ साली गुजरातसह अर्ध्याहून अधिक देशानं त्यांना दोन तृतीयांश बहुमतानं दिल्लीच्या गादीवर बसवलं. आपलं स्थान अधिक भक्कम करण्यासाठी मोदींनी लगेचच अमित शहांना पक्षाध्यक्षपदी आणलं. आणि अमित शहा नावाचं नवं मिथक तयार झालं.

अमित शहांनी आपल्या कुशल बांधणीद्वारे राज्यामागून राज्यं काबीज केली. अपवाद दिल्ली व प. बंगाल. बिहारही होता. पण शहा-मोदी या जोडीनं नीतिशकुमारांना वश करून घेतलं आणि गोवा, मणिपूर वगैरे छोट्या राज्यांप्रमाणे सत्ता, संपत्तीचा वापर करून बिहारही ताब्यात घेतला. अमित शहांची बुथ मॅनेजमेंट जशी कामाला आली, तशीच त्यांची ध्रुवीकरणाची गनिमी नीतीही यशस्वी होत गेली अशी चर्चा आहे. थोडक्यात पंतप्रधान मोदींचं स्किल, तर पक्षाध्यक्षपदी अमित शहांचं स्किल नावाजलं जाऊ लागलं.

जो पक्ष सत्तेत येतो, त्यातही तो जर स्पष्ट बहुमतानं सत्तेत आलेला असेल तर तो सत्तेचा दुरुपयोग करून सरकारच्या विविध संस्था, यंत्रणा यावर आपलं नियंत्रण कसं राहील हे अग्रक्रमानं बघतो. प्रशासन, पोलिस यंत्रणांवर सरकारचा अदृश्य हात\पंजा रोवून असतो. काही वेळा यातून न्यायव्यवस्थाही विविध पद्धतीनं हाताळली जाते.

आमच्या त्या वकील मित्राची आठवण येण्याचं कारण काल-परवाच ‘नेटवर्क १८ लोकमत’वर निवृत्त न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांची झालेली (खळबळजनक) मुलाखत. कारण या मित्रानं मला अशी एक कर्णोपकर्णी झालेली बातमी सांगितली होती. खरी-खोटी माहीत नाही. व्हॉटसअॅपच्या जमान्यात तर एवढी तसदीही कुणी घेत नाही. त्यानं असं सांगितलं होतं की, दिल्लीत एक मिटिंग झाली, ज्यात न्यायव्यवस्थेतील काही लोक होते. त्यात गुजरात दंगलीसंदर्भात गुजरात बाहेर जे खटले चालू आहेत, ते अशा खंडपीठाकडे वर्ग करायचे की, तिथून जामीन मिळेल. पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता अशा गोष्टी टप्प्याटप्प्यानं करायच्या. माणसं मोकळी करायची. कायदेशीर चौकटीतून बाहेर काढायची.

परवाच्या मुलाखतीत न्या. सावंत यांनी अशा प्रकारची व्यवस्था कायद्याला धरून होऊ शकते, हे सांगितलं, तेव्हा मित्रानं सांगितलेली बातमी आणि सत्तांतर झाल्यापासून लागलेले निकाल पाहता, सावंतांनी अधोरेखित केलेली गोष्ट पाहता, काही घडलंच नसेल असं म्हणता येईल?

शिवाय सावंतांच्या मुलाखती आधीच सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी जाहीर पत्रकार परिषद घेत मुख्य न्यायमूर्तींच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले होते. त्यात उदाहरणादाखल न्या. लोया यांच्या आकस्मिक मृत्यूच्या चौकशी संदर्भातल्या यांचिकांबद्दलही प्रश्न उपस्थित केला होता. परवा न्या. लोया यांच्या संदर्भातील जनहित याचिका फेटाळताना मुख्य न्यायमूर्तींसह खंडपीठानं जी निरीक्षणं नोंदवलीत, ती नागरिक म्हणून न पटणारी आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर असहमती दाखवणं अथवा त्यावर आपलं मत मांडणं, हा अवमान ठरेल का माहीत नाही. पण शंका मांडणं, प्रश्न विचारणं व शक्य झाल्यास उत्तरं मिळवणं, हा लोकशाहीतला नागरिक अधिकारच आहे.

.............................................................................................................................................

‘सेपिअन्स - मानवजातीचा अनोखा इतिहास’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

आता अगदी थोडक्यात आढावा घ्यायचा म्हटला तर हेमंत करकरे हे ज्या तपासामुळे हिंदुत्ववाद्यांच्या काळ्या यादीत गेले, त्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित व इतर यांना जामीन मिळाला. तो मिळताच करकरेंनी केलेला ‘छळ’ बाहेर आला. कर्नल पुरोहितांसारख्या ‘मिल्ट्री मॅन’लाही कशी वागणूक मिळाली हेही प्रसृत झालं. बदललेली सत्ता, बदललेल्या तपासयंत्रणा, त्यांचे प्रमुख आणि नवी खंडपीठं आणि असे निकाल हा योगायोग की ‘खरा’ तपास, ‘खरा’ न्याय?

गुजरात दंगलीसंदर्भात ज्यासाठी अमित शहांना गुजरातबंदी होती, तोही खटला चालला आणि अमित शहांवरचे आरोप गुजरातबंदी एवढे महत्त्वाचे राहिले नाहीत. यानंतर इतर छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांवरील खटले चालले, जामीन मिळाले, काही सुटले. त्याच्या छोट्या-मोठ्या बातम्या येऊन गेल्या. नुकतेच असीमानंद आणि मागोमाग माया कोडनानीही सुटल्या. असीमानंद अथवा माया कोडनानी यांनी निकालावर कसलीही प्रतिक्रिया दिली नाही (की दिली जाऊ नये असं पाहिलं? कदाचित नंतर यूट्युबवर युपीए सरकार, तत्कालिन सीबीआयची कृष्णकृत्यं व छळ पाहायला मिळतील.)

आता न्या. लोयांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालय इतकं संतप्त झालं की, त्यांनी या याचिका म्हणजे न्यायसंस्थेवरच हल्ला असं म्हटलं. शिवाय जनहित याचिका राजकीय अजेंडा म्हणून आणि न्यायालयाचा वेळ वाया घालवणाऱ्या म्हणूनही फटकारलं.

आता मुद्दा असा आहे, खालच्या न्यायालयातल्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं एकत्रित केल्या. चार न्यायमूर्तींनी शंका, नाराजी व्यक्त केलेली असतानाही मुख्य न्यायाधीशांनी या याचिका स्वत:च्या खंडपीठाकडेच घेतल्या. आणि न्या. लोयांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नांना बाजूला ठेवत न्यायालयानं याचिकाकर्त्यांवरच दोषारोप करत कडक शब्दांत फटकारलं. त्यातला एक युक्तिवाद तर बुचकळ्यात टाकणारा आहे. न्यायालय म्हणतं, न्या. लोयांसोबत चार न्यायाधीश होते. त्यांनी जे सांगितलं, म्हटलं त्यावर अविश्वास कसा काय दाखवला जातो? हा तर न्यायव्यवस्थेवरचाच अविश्वास!

ते चौघेही एका लग्न समारंभासाठी नागपूरला गेले होते. त्यामुळे रवी भवन या सरकारी निवासस्थानात त्यांची नीट नोंदही नाही. ते जर न्यायाधीशाच्या भूमिकेत होते, तर त्यांच्या दिमतीला सुरक्षारक्षक, वाहन का नव्हतं? त्यांना रुग्णवाहिका का मिळू नये? योग्य हॉस्पिटल, उपचार का मिळू नयेत? दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला, पण नंतर एक अॅम्ब्युलन्सवाला या मृत न्यायाधीशाचा मृतदेह मुंबईऐवजी त्यांच्या गावी नेतो कुणा अनाम माणसासोबत? हे मृत व जिवंत न्यायाधीशांच्या पदाला शोभेलसं आहे?

याहून आश्चर्याची गोष्ट, या निकालानंतर ‘एबीपी माझा’वर सरकारी वकिलांनी निरंजन टकलेंच्या ‘मृत शरीरावर न्यूरो सर्जरी कशी केली, वेळा बघा’ या प्रश्नाला सरकारी वकील किंचित हसत म्हणाले, ‘हॉस्पिटल कर्मचाऱ्याच्या टायपिंग एररला का महत्त्व देता?’ आणखी गंमत म्हणजे महाराष्ट्रात जो खटला चालू होता, त्याचेच वकील या वेगळ्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयात पुन्हा वकील म्हणून होते. यात एक हरिश साळवे होते. त्यांच्याबद्दल असं वाचलं होतं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात ते महाराष्ट्र सरकारचे वकील आहेत, पण ते गैरहजरच असतात. याउलट रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात सलमानला अर्ध्या तासात जामीन मिळवून देणारे हरिश साळवेच होते!

सर्वोच्च न्यायालयानं ज्या पद्धतीनं याचिकेतले मूळ प्रश्न बाजूला ठेवून याचिकाकर्त्यांना झोडपण्यात आपल्या निकालाचा ९० टक्के भाग खर्च केलाय. तो कदाचित (कायद्यानुसार) योग्यही असेल. पण त्यामुळे न्या. लोयांच्या आकस्मिक मृत्यूचं गूढ वाढतच गेलंय.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संशयास्पद मृत्यूवर पुराभिलेख, देश-विदेशातील साधनं, कागदपत्रं खुली करणारं सरकार न्या. लोयांचा आकस्मिक मृत्य झाला, चौकशी झाली, ‘आकस्मिक मृत्यू’ असं उच्चरवानं का सांगतंय? साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं का देत नाही? न्या. लोयांचं कुटुंब शांत आहे. त्यांची शांतता न समजण्याइतकी जनता दुधखुळी नाही.

सर्वोच्च न्यायालयानं न्या. लोयांना न्याय दिलाच नाही. उलट असं वाटतंय, सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी केलेल्या बोभाट्याचा विंचू या पावण्यांच्या काठीनं मारला. न्यायव्यवस्थेच्या मानसन्मानाची बाब ठणकावून सांगताना सर्वोच्च न्यायालयासह, सत्ताधारी पक्षही हे विसरला की, तक्रार एका न्यायाधीशाच्या आकस्मिक मृत्यूचीच आहे.

न्यायालयानं न्या. लोयांच्या मृत्यूचं प्रतीकस्वत:साठीच वापरलं!

.............................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Manjusha Bhagade

Thu , 10 May 2018

जज लोया ना न्याय मिळाला नाही। त्यांचे गुन्हेगार कोण आहेत हे सारा देश जाणतो।फक्त जाणत नाहीत ते सत्तेच्या आणि पैशाच्या मस्तीने माजलेले सत्ताधारी आणि त्याचे आंधळे पाठीराखे।महाराष्ट्रा चा एक प्रामानिक जज पैश्याच्या, सत्तेच्या दडपणाला बळी न पडता नेकीने आणि निष्ठने लढतो। फक्त महाराष्ट्रालाच नाही तर देशाला अभिमान वाटतो जज लोयांच्या कर्तव्यनिष्ठतेचा। सर्वोच न्यायालय निर्णय देवो अगर ना देवो हा देश न्या लोया ना विसरणार नाही।


Gamma Pailvan

Wed , 02 May 2018

काय हो संजय पवार, जर न्या. लोयांचा मृत्यू संशयास्पद आहे, तर तथाकथित पत्रकार तीन वर्षं का थांबले? ताबडतोब भांडाफोड करायला हवा होता ना? अमित शहांना कोंडीत पकडण्यासाठी म्हणून चौकशीयाचिकेसाठी २०१७ साल उजाडलं असाच अर्थ लोकं काढणार ना? शिवाय न्या.लोयांच्या मृत्यूसमयी सर्व परिस्थिती इतर न्यायाधीशांच्या देखरेखीखाली हाताळली गेली आहे. नाव ठेवायला जागा नाही म्हणून तुम्ही त्रागा करताय. असो. न्यायव्यवस्थेस वेठीस धरलं जाणं म्हणजे काय ते तिस्ता सेटलवाड यांच्याकडे पाहिलं की दिसतं. या भ्रष्ट बाईने मोदींना अडचणीत आणण्यासाठी गुजरात दंगलींचा खटला गुजरातबाहेरच्या न्यायालयात हलवला ना? एव्हढं आकाशपाताळ एक केलं तरीही मोदींवर साधं आरोपपत्र दाखल करायला न्यायालयाने नकार दिला. शिवाय याच तिस्ताने खोट्या साक्षी देण्यासाठी बेस्ट बेकरी हत्याकांडातली पीडिता झहिरा शेख हिला भरीस पाडलं. ज्यामुळे बिचाऱ्या झहिरास पुढे एक वर्षं तुरुंगवासही भोगावा लागला. रशीद खान तर उघडपणे तिस्ताला शिव्या घालतो. याला न्यायव्यवस्थेचा गैरफायदा घेणं म्हणतात. तुमची लेखणी जरा हिच्याविरुद्ध चालू द्या ना! आपला नम्र, -गामा पैलवान


vishal pawar

Sun , 29 April 2018


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......