भाई वैद्य  : जितंजागतं समाजवादी विद्यापीठ
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • भाई वैद्य (२२ जून १९२८ - २ एप्रिल २०१८)
  • Wed , 04 April 2018
  • सदर सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar भाई वैद्य Bhai Vaidya

१९९६-९८चा काळ. पुणे विद्यापीठात शिकत होतो. पुण्यात संध्याकाळी जाहीर कार्यक्रमाला जाण्याचा आणि भाषणं ऐकण्याचा नाद लागला होता. एक दिवस शनिवार पेठेत स्नेहसदनमध्ये भाई वैद्य यांचं जागतिकीकरणावर भाषण होतं. ऐकायला गेलो. आजपर्यंत ऐकलेल्या वक्त्यांमध्ये हा माणूस वेगळा आहे, हे जाणवलं.

भाई वैद्य यांची ही जवळून पहिली भेट. ओळख करून घेतली आणि संधी मिळाली की त्यांचं काही ऐकायचं असा नाद जडला. भाईंच्या बोलण्याचं एक वैशिष्ट्य होतं. आवाज स्पष्ट, मोठा, धारदार. विचार टोकदार, पण तर्कसंगत असायचे. त्यामुळे पटायचे. बोलण्यातला आशय तर भलताच बंडखोर होता. त्यामुळे तरुणवयात अपिल होणारं वक्तृत्व होतं त्यांचं.

जसजसं भाईंच्या जवळ गेलो, तसतसं कळत गेलं… ते आणीबाणीनंतर पुलोदच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. त्यांनी तीन लाख रुपये लाच देण्यासाठी आलेल्या स्मगलरला स्वत: सापळा रचून पकडून दिलं होतं. मंत्री पैसे खातात अशा काळात वाढलेल्या आम्हा मित्रांना हे ऐकून पैसे नाकारणारे भाई म्हणजे दंतकथा वाटत.

पुढे कळत गेलं की, भाई १९४२च्या ‘चले जाव’ चळवळीत बालवयात सहभागी झाले होते. ब्रिटिशांविरोधात लढणारा हा तरुण पुढे गोवा मुक्ती लढ्यातही झगडला. हा लढा समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली झाला. या लढ्यात लोहिया, मधु लिमये यांना बेदम मारहाण झाली. भाईंना डोक्याला मार लागला. रक्तबंबाळ झाले होते. एक हात जायबंदी झाला. त्यामुळे एक हात कायम अधू झाला.

आणीबाणीच्या काळात तर भाई पुण्याचे महापौर होते. आणीबाणीविरोधी त्यांनी शनिवारवाड्यावर सभा घेतली आणि त्यांना अटक झाली. त्यानंतर १९ महिने ते येरवड्याच्या तुरुंगात होते. आणीबाणीनंतर राज्यात पुलोदच्या सरकारमध्ये असताना त्यांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं म्हणून पहिला ठराव मांडला. पोलिसांच्या हाफ पँट बदलून फुल पँट केल्या. पोलिसांना त्यामुळे सन्मान मिळाला. त्याआधी ‘पांडू हवालदार’ म्हणून पोलिसांची टर उडवली जात असे. अनेक सासरे ‘माझा जावई पोलिस आहे’ हे सांगायला लाजत असत. भाईंचा पोलीस दलातले लोक खूप आदर करताना दिसत.

भाई डॉ. लोहियांचा विचार मानणारे होते. महाराष्ट्रात त्यांनी समाजवादी नेते एस.एम. जोशी यांचं शिष्यत्व स्वीकारलं होतं. एसेमही त्यांना मानसपुत्र मानत असं बोललं जाई. एसेम यांच्या व्यक्तिमत्त्वाची झलक भाईमध्ये दिसे. एसेम यांच्यात असणारा प्रेमळपणा, मनमिळावू स्वभाव, समोरच्याचा मताचा आदर करणं, विचार आणि कृतीत जराही अंतर नव्हतं. जसे विचार, तशी कृती. सर्वांना सोबत घेऊन जाणारी वृत्ती. सत्तेच्या मोहापायी तडजोड करण्यास नकार. सत्ताग्राही न होता सत्याग्रही होणं. लोकशाही समाजवादी विचारांवर प्रामाणिक निष्ठा. त्यासाठी वाटेल ती किंमत चुकवायची सतत तयारी. आरशासारखं स्वच्छ जीवन.

समाजवादी पक्षांची नावं बदलली, मंच बदलले, पण भाईंनी १९४२ साली समाजवादाचा झेंडा खांद्यावर घेतला तो शेवपर्यंत खाली ठेवला नाही. ते राष्ट्र सेवा दलात घडले. सेवा दलातल्या सैनिकांचं आवडतं गाणं आहे – ‘सदैव सैनिका पुढेच जायचे, न तुवा कधी मागे फिरायचे’. भाई समाजवादाचा झेंडा घेऊन सैनिकासारखे सतत पुढेच जात राहिले. भाईंना शेवटचा निरोप देतानाही पुण्यात साने गुरुजी स्मारकाच्या मैदानात हेच गाणं सेवादल सैनिकांनी गायलं.

भाई सर्व महत्त्वाच्या चळवळीत अग्रभागी राहिले. आणीबाणीनंतर जनता पार्टीच्या प्रयोगात ते पुढे होते. जनता पार्टी फुटल्यानंतर ते चंद्रशेखर यांच्यासोबत समाजवादी जनता पार्टीत होते. चंद्रशेखर यांच्यासोबत त्यांनी ‘भारत पदयात्रे’त सहभाग घेतला. या यात्रेत कन्याकुमारी ते दिल्ली असं जवळपास चार हजार किलोमीटर अंतर ते चालले. या यात्रेच्या संयोजनात भाईंचा महत्त्वाचा वाटा होता.

१९९० नंतर मंडल आयोगाच्या चळवळीचं वैचारिक नेतृत्व त्यांनी केलं. मंडल आयोगाची आवश्यकता का, याविषयी त्यांनी एक अभ्यासपूर्ण पुस्तिका लिहिली. भारतातल्या ओबीसी जातींना न्याय मिळायला पाहिजे, यासाठी भाई आग्रही होते. शेतकरी, उत्पादक, पशुपालक, कारागीर जातींच्या हक्कासाठी तेव्हा भाईंनी महाराष्ट्र आणि देश पिंजून काढला होता.

१९९२नंतर भाईंनी परधर्म द्वेष शिकवणाऱ्या अतिरेकी शक्ती आणि गरिबांचा गळा घोटणारी क्रूर भांडवलशाही या दोन्ही विरोधात रणशिंग फुंकलं. जागतिकीकरणविरोधी कृती समिती स्थापन करून त्यांनी राज्यभर दौरे केले. अक्षरक्ष: खेड्यापाड्यात ते जात. तालुक्याच्या गावात जात. जिथं जिथं संधी मिळेल, तिथं तिथं ते गेले. जागतिकीकरणाचा वरवंटा किती भयानक आहे, हे आकडेवारीनिशी पटवून देणं, हा त्यांचा एककलमी कार्यक्रम होता. परधर्मद्वेषी अतिरेकी शक्ती आणि जागतिकीकरण\उदारीकरण\खाजगीकरणाचं (खाऊजा) धोरण यांना विरोध करण्यासाठी त्यांनी गांधीवादी, समाजवादी, कम्युनिस्ट, आंबेडकरवादी, नक्षलवादी, पर्यावरणवादी, स्त्रीवादी अशा विचारांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, विचारवंतांना आणि अभ्यासकांना लोकशाही समाजवादाच्या झेंड्याखाली एक होण्याचं आवाहन केलं. त्यानंतर सतत २५ वर्षं ते समाजवाद्यांच्या, परिवर्तनवाद्यांच्या एकीसाठी झटत राहिले.

परिवर्तनवाद्यांच्या एकीसाठी त्यांनी सोशलिस्ट फ्रंट, समाजवादी जनपरिषद, सोशलिस्ट पार्टी हे पक्ष काढले. त्यांची अध्यक्ष, सरचिटणीस ही पदं भूषवली. या पक्षाच्या बांधणीसाठी ते देशभर फिरले.

बिहार विधानसभेची निवडणूक होती. भाई तिथं प्रचाराला जाणार होते. समाजवादी जनपरिषदेचे उमेदवार उभे होते. तेव्हा ‘साधना’ साप्ताहिकामध्ये मी लिहीत असे. डॉ. नरेंद्र दाभोलकर नुकतेच संपादक झाले होते. दाभोलकर मला म्हणाले, ‘भाईंबरोबर जातो का बिहारला? निवडणुकीचं वार्तांकन कर. त्यांच्याबरोबर फिर. शिकायला मिळेल.’ मी संधी समजलो. हो, म्हणालो. भाईंनाही बरं वाटलं. म्हणाले, ‘चल, मलाही मदत होईल, सोबत तू असलास की.’

बिहारमध्ये भाईंबरोबर फिरताना खूप शिकायला मिळालं. भाई खूप टापटिपीत राहत. रंगीत खादीचा झब्बा, पांढरा घट्ट पायजमा. त्यांचे खादीचे शर्ट आकर्षक असत. भाई सतत खूप फ्रेश राहत. बिहारमध्ये तेव्हा समाजवादी जनपरिषदेनं दहा ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यांच्यासाठी प्रचाराच्या सभा होत. सभेला माणसं किती याची काळजी नसे. असतील त्या श्रोत्यांना समाजवाद, सध्याच्या राजकारणातले पेच, धर्मांधांचं देशावरचं संकट याची भाई जाणीव करून देत.

एकदा सितामढी परिसरातल्या एका गावात सभा होती. सभा संपली, रात्र झाली. नऊ वाजले होते. पुढच्या गावी जायचं होतं. पण रस्ते नीट नव्हते. बसची सोय नव्हती. सायकल रिक्षा होत्या, पण आडवाट, अंधार, खराब रस्ते अशा अवस्थेत जाऊ नका असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. त्या गावात थांबायचं तर गेस्ट हाऊस, हॉटेल नव्हतं. अगदी छोटं गाव होतं. मग राहायचं कुठे? कार्यकर्ते गरीब, साधारण घरातले. एका कार्यकर्त्याच्या घरी थांबावं लागलं. जेवण उरकलं. अंगणात सतरंजीवर झोपावं लागलं. सकाळी उठल्यावर आंघोळ करण्याचा प्रश्न होता. कार्यकर्त्याच्या घरात न्हाणी वा बाथरूम असण्याचा प्रश्नच नव्हता. घरासमोर सार्वजनिक हातपंप होता. त्यावर पाणी हापसायचं आणि आंघोळ करायची. भाईंनी उत्साहानं बादली घेतली आणि आंघोळ केली. जराही कुरकूर, नापसंती नाही. आपण कुणी ग्रेट वगैरे आहोत, मंत्रीबिंत्री होतो, याचा कुठेही बडेजाव नाही. नेहमीसारखे फ्रेश होऊन भाई पुढच्या ठिकाणी जायला तयार झाले. असा आणि इतका साधेपणा त्यांच्याकडे होता.

गेली २५ वर्षं भाई गावोगाव हिंडत होते. कार्यकर्ते घडवत होते. त्यांना लोकशाही समाजवादाची निकड पटवत होते. हा सारा काळ समाजवादी चळवळीच्या पडझडीचा होता. या पडझडीत निराश न होता लोकांना लढण्यासाठी उभं करणं हे सोपं काम नव्हतं. हे करताना यशापयशाची तमा न बाळगता भाईंनी असंख्य माणसं घडवली. म्हणून त्यांना लोक ‘जितंजागतं समाजवादी विद्यापीठ’ म्हणत.

राष्ट्र सेवादलाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मोलाचं काम केलं. गरिबांचं शिक्षण हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. लोहिया, एसेम यांच्या विचारांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. माणूस चारित्र्यवान आहे की नाही, हे जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या हातात सत्ता द्यावी आणि मग पारख करावी असं म्हणतात. भाई सत्तेत होते. तिथं ते भ्रष्ट झाले नाहीत. सत्तेतून बाहेर पडल्यावर त्यांचं चारित्र्य अधिक झळाळून तळपलं. जवळ आलेल्या प्रत्येकाला त्यांनी प्रेम दिलं आणि समाजवाद सांगितला. त्यांना अखेरचा निरोप देताना ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हे साने गुरुजींचं गाणं गायलं गेलं. ते अतिशय समर्पक होतं!

खूप मोठा माणूस. या पुढे ते दिसणार नाहीत म्हणून काय झालं? त्यांचे विचार तर सोबत आहेतच की!

.............................................................................................................................................

भाई वैद्य यांचं अखेरचं भाषण, १७ मार्च २०१८, पुणे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......