भीमसेन देठे : शोषित-वंचितांचा भाष्यकार
संकीर्ण - श्रद्धांजली
टीम अक्षरनामा
  • भीमसेन देठे आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Mon , 08 May 2017
  • संकीर्ण श्रद्धांजली भीमसेन देठे Bheemsen Dethe तुफानातील दिवे Toofanatil Dive इस्कोट Iskot

ज्येष्ठ साहित्यिक भीमसेन देठे यांचं ६ मे २०१७ रोजी मुंबईत कर्करोगाच्या आजारानं निधन झालं. ते ७०वर्षांचे होते. गेली दोन वर्षं ते रक्ताच्या कर्करोगानं आजारी होते.

देठे यांनी उदरनिर्वाहासाठी सरकारी नोकरी केली. त्यातून निवृत्त झाल्यानंतर मात्र त्यांनी स्वत:ला समाजकार्यात झोकून दिलं होतं. देठे यांनी मोजकीच पण लक्षणीय साहित्यनिर्मिती केली. ती करताना त्यांनी प्रस्थापित साहित्यातले मानदंड आपल्या परीनं मोडण्याचा प्रयत्न केला. प्राकृत मराठी भाषेचा वापर आंबेडकरी साहित्यात केला. कल्पनारंजनाच्या मागे न धावता आपल्या साहित्यातून समाजवास्तवाला भिडण्याचा प्रयत्न केला. आपल्यापरीनं समाजाशी झोंबी घेतली. त्यांच्या निधनानंतर मुलगी आणि पत्नी यांनी त्यांना अग्नी दिला, ही घटनाही बरीचशी सूचक आहे.

भीमसेन देठे हे दलित साहित्यातील एक लक्षणीय नाव. ते मूळचे मंचरचे. ते राहत असलेल्या सिद्धार्थनगरमध्ये राजानंद गायन पार्टी होती. शाहीर भीमानंद देठे या पार्टीचे कार्यक्रम करत. या शाहीराला साथ द्यायला म्हणून वस्तीतल्या मुलांसह देठेही जायचे. त्यांचं बोट पकडून देठे यांनीही शब्द जुळवायला सुरुवात केली. त्यातून कधी गाणी, तर कधी कविता तयार होऊ लागल्या. दहावीनंतर देठे पुढील शिक्षणासाठी मोठ्या भावासोबत मुंबईला आले. सिद्धार्थ महाविद्यालयात दाखल झाले. तिथं त्यांना शिकवायला होते, प्रा. रमेश तेंडुलकर. त्यांनी देठे यांच्या पहिल्याच निबंधाचं भर वर्गात कौतुक केलं. मुंबईचं मायावी जग पाहून बावरलेल्या देठेंना या कौतुकानं हायसं वाटलं. पुढे त्यांची एक कविता तेंडुलकरांनी महाविद्यालयाच्या वार्षिकात छापली. त्याने खेड्यातल्या या मुलाला आत्मविश्वास आला.

देठे गोरेगावात जिथं राहत होते, तिथं त्यांच्याजवळच दया पवारही राहत. त्यांच्यासह काही मित्रांनी मिळून ‘संबोधी’ नावाची वाङ्मयीन संस्था सुरू केली. त्याअंतर्गत कवितांच्या मैफली झडू लागल्या, स्पर्धेसाठी नाटकं केली जाऊ लागली. झोपडपट्टीतल्या मुलांसाठी उजळणी वर्ग सुरू केले गेले. तर दुसरीकडे देठे यांच्या कविता ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘अस्मितादर्श’, ‘निकाय’, ‘आयुध’, ‘पूर्वा’ या नियतकालिकांच्या दिवाळी अंकांत येऊ लागल्या. ‘होरपळ’ या देठे यांच्या कवितासंग्रहाला तेंडुलकरांनी प्रस्तावना लिहिली. तेव्हाच त्यांनी या कवीतल्या कथा-कादंबरीकाराची बीजं हेरली होती. जी पुढे खरी ठरली.

देठे निखिल वागळे यांच्या हस्ते दया पवार स्मृती पुरस्कार स्वीकारताना

दरम्यान दया पवारांचं ‘बलुतं’ हे आत्मकथन प्रकाशित झालं. या पुस्तकाचा देठे पहिला श्रोता. नंतर पुस्तक वाचून देठेंनी पवारांना पत्र लिहिलं. तेव्हा पवारांनी ‘तुम्ही कादंबरी छान लिहाल’ असं त्यांना कळवलं. देठे यांनाही हा वाङ्मयप्रकार साद घालत होताच. त्याने उचल खाल्ली आणि ‘इस्कोट’ ही कादंबरी लिहिली गेली. ती बरीच गाजली. ‘भीमसेन देठे यांची ‘इस्कोट’ कादंबरी म्हणजे समाज-पुरुषाच्या वेदनेची हृदयस्पर्शी कहाणी आहे’ असे उदगार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी काढले. या कादंबरीचे वाचन प्रसिद्ध कथाकार अरविंद गोखले यांच्या पुढाकाराने साहित्य-सहवासमधील साहित्यिकांसमोर झाले...नि देठे कादंबरीकार झाले.

पुढे देठे कथेकडे वळले. अण्णा भाऊ साठे, शंकरराव खरात, बाबुराव बागूल यांच्या कथांनी ते प्रभावित झाले होते. ‘तुफानातील दिवे’ या त्यांच्या पहिल्या कथासंग्रहातील कथा या साठे-खरात-बागूल यांच्या तोडीच्या आहेत. सर्व जातिधर्मातील माणसं ही वंचित, शोषित असतात. त्यांच्या आयुष्यातल्या तुफानाला ती न घाबरता त्याविरुद्ध संघर्ष करत राहतात. या कथासंग्रहातील माणसंही तशीच आहेत.

‘इस्कोट’, ‘घुसमट’, ‘झाकळ’ या कादंबऱ्या; ‘तुफानातील दिवे’, ‘इंगा’, ‘गिऱ्हाण’, ‘रिडल्स’ हे कथासंग्रह; ‘योद्धा’, ‘बांडगुळ’ ही नाटकं आणि ‘होरपळ’ व ‘कृष्णमेघ’ हे कवितासंग्रह ही देठे यांची साहित्यसंपदा. ‘डबुलं’ हे त्यांचं आत्मकथनही दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालं आहे. ‘तुफानातील दिवे’ या कथासंग्रहात देठे यांनी म्हटलं आहे – “माझ्या जीवनाच्या वेगवेगळ्या वळणावर जी माणसं भेटली ती नुसती दलित नव्हे तर इतर जातिधर्माचीही होती. त्यांची सुख-दु:ख माझी झाली. स‌र्व अर्थाने ही माणसं माझा झाली. माझ्या जीवननिष्ठेशी या माणसांनी संवाद साधला आहे.” स्वातंत्र्य, समता, न्याय या मूलभूत हक्कांच्या जाणीवेनं जागा झालेला, त्यासाठी संघर्ष करणारा समाज हा देठे यांच्या लेखनाचा आत्मा होता.

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे २०१५सालच्या दया पवार स्मृती पुरस्काराने देठे यांना गौरवण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ त्यांना २०१३-१४ या वर्षासाठी देण्यात आला होता. त्यांच्या निधनानं निरलसपणे आपलं काम करणारं आंबेडकरी साहित्यातील एक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......