स्त्रियांवरचे अत्याचार आणि पुरुषी मानसिकता (उत्तरार्ध)
अर्धेजग - कळीचे प्रश्न
आदित्य कोरडे
  • सोमवारी इन्फोसिसमधल्या रसिला राजू ओपी नावाच्या एका इंजीनिअर मुलीचा सुरक्षा रक्षकाकडूनच खून झाल्याची बातमी आली
  • Thu , 02 February 2017
  • अर्धे जग कळीचे प्रश्न Rape बलात्कार Rasila Raju OP रसिला राजू ओपी

एखादी व्यक्ती जेव्हा दुय्यम नागरिक असते, तेव्हा ती माणूस म्हणून पूर्णच असते, फक्त त्या देशातले नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य यापासून वंचित असते. दुय्यम माणूस म्हटल्यावर साहजिक माणसांचे बहुतांश अधिकार नाकारले जातात. वस्तू, मालमत्ता, पशु आणि स्त्री अशी वर्गवारी होते. घराला कुंपण, गाडीला गॅरेज, गुरांना गोठा आणि स्त्रीला घराची, नियमाची/ मर्यादांची बंधनं. ‘शिक्षण घे, पण ते घरात राहून, मुलांचा अभ्यास घेण्यासाठी’, ‘नोकरी कर, पण घराला हातभार लावण्यासाठी. बायको, आई, सून, मुलगी वगैरे म्हणून ज्या अपेक्षित जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडूनच’, कामावर/बाहेर जा, पण संध्याकाळी ७ च्या आत घरी परत ये.’, ‘रात्री- अपरात्री एकटीदुकटी फिरू नको. कुणी पुरुष माणूस बरोबर असलेला बरा’, अशा मर्यादा तिला घातल्या जातात. मर्यादाभंग झाला की, मग शिक्षा केली जाईल, वठणीवर आणले जाईल असा धाक असतोच. या शिक्षा करण्याचा अधिकार कुणाचा? अर्थात पुरुषांचाच.

रात्री-बेरात्री घराबाहेर राहिला म्हणून एखाद्या पुरुषाचा विनयभंग किंवा बलात्कार झाल्याच्या घटना आपण किती वेळा वाचतो? जर बलात्कार करणारे सगळे विकृत मानसिकतेचे असतात, तर मग त्यातला एकही समलिंगी नसतो? खरं कि काय? (समलैंगिकता ही विकृती नाही, पण तो वेगळा विषय आहे.) बऱ्याचदा मी सेकंड शिफ्ट वरून रात्री घरी येतो, तेव्हा एक वाजलेला असतो. क्वचित कुणी चोर मला पकडून माझ्याकडचे पैसे, घड्याळ वगैरे चीजवस्तू लुबाडून घेऊन जाईल अशी भीती वाटते, पण माझ्यावर कुणी पुरुष किंवा अगदी एखादी विकृत स्त्री बलात्कार करेल अशी भीती सोडा शंकाही येत नाही. का? कारण बलात्कार हे इतर मार्गांनी लैंगिक भूक शमवता येत नाही म्हणून होत नसतात, तर ते समस्त स्त्री वर्गाला धाकात, जरबेत ठेवण्यासाठी केले जातात. स्त्रीने प्रतिकार करायचा प्रयत्न केला तर तिला धडा शिकवण्यासाठी त्यात अधिक क्रौर्य, विटंबना ते अगदी छळ, निर्घृण खूनही सामील होतात. चोरी/ दरोडा वाईट, पण चोरी होणाऱ्या वस्तुला चोराचा/ दरोडेखोराचा प्रतिकार करायचा अधिकार असतो काय?... आणि याचा भयानक परिणाम समस्त स्त्रीवर्गावर झालेला दिसतो.

ज्या स्त्रियांशी या विषयावर बोलू शकतात त्यांच्याशी बोललो आणि मला सगळ्यांनी हेच सांगितलं की, बलात्कार ही त्यांच्या बाबतीत घडू शकणारी, त्यांचं आयुष्य उदध्वस्त करू शकणारी, त्यांचं सर्वस्व हिरावून घेऊ शकणारी अशी एक गोष्ट आहे. का? मग लग्नानंतर नवऱ्याकडून होणाऱ्या बलात्काराचं काय? असं का? परपुरुषाने केलेला आणि नवऱ्याने केलेला बलात्कार यात असा गुणात्मक फरक कसा? एक तर बऱ्याच जणींना नवरा जबरदस्ती करत असेल तर तोदेखील बलात्कारच होतो, हेच मान्य नव्हतं.

याचं उत्तर मला सुझान ब्राऊनमिलर या प्रसिद्ध स्त्री चळवळीच्या खंद्या कार्यकर्तीच्या ‘Against our will’ या अत्यंत गाजलेल्या पुस्तकात मिळालं. त्यात ती म्हणते, “Rape is nothing more or less than a process of intimidation by men to keep all women in a state of  fear.” (पुरुषांनी समस्त स्त्रीवर्गाला सतत दहशतीत ठेवण्यासाठी अंगीकारलेली एक प्रक्रिया म्हणजे बलात्कार.)

हे वाचून एकदम ट्यूब पेटली. लाक्षणिक अर्थानं सगळे पुरुष बलात्कारी नसतात, नव्हे फार थोडे बलात्कारी असतात, तसेच सगळ्या स्त्रियांवर बलात्कार होत नाहीत, पण जवळपास सगळ्या स्त्रिया बलात्काराला अत्यंत घाबरतात. ही मानसिकता पुरुषांनी स्त्रियांच्या मनात रुजवलेली आहे. फक्त लैंगिक अत्याचार, परपुरुषाने जबरदस्तीने केलेला संभोग म्हणजेच बलात्कार नव्हे. (तो त्याचा एक भाग झाला) बलात्कार ही पुरुषवर्गाने धर्म, पाप-पुण्य, न्याय, नीती, समाज, अश्लील, उचित- अनुचित, स्त्रियांच्या वागण्या-बोलण्यावरील मर्यादा अशा असंख्य गोष्टींच्या आडून चालवलेली, स्त्रियांना जखडून टाकण्याची प्रक्रिया आहे. ती पिढ्यानपिढ्या चालूच आहे. एखादी स्त्री बंधन तोडून बाहेर येत असेल तर तिला निरनिराळ्या शिक्षा आहेत, पण तिच्या मनाला पडलेली दहशत सगळ्यात मोठी शिक्षा आहे. बहुसंख्य स्त्रिया या मानसिकतेच्या बळी झालेल्या दिसतात.

आम्हाला व्यवस्थापनात एक गोष्ट सांगायचे. हत्तीच्या पिल्लाला अगदी लहानपणापासून जाड साखळदंड लावून कायम बांधून ठेवतात. ते लहान असताना साखळदंड तोडू शकत नाही, पण पुढे तो मोठा हत्ती झाल्यावर आणि साखळदंड सहज तोडू शकेल असं सामर्थ्य आल्यावरही तो ते साखळदंड तोडू शकत नाही. कारण त्याने आत्मविश्वास गमावलेला असतो. स्त्रियांची इतक्या हजारो वर्षांच्या गुलामीने अशीच काहीशी अवस्था आज झालेली आहे. मर्यादा फक्त स्त्रियांच्या आचारविचारावर नाही, ती त्यांच्या मनात भिनवली गेलेली आहे आणि पुरुषांच्यासुद्धा. त्यामुळे त्यातून मुक्ततेची गरज फक्त स्त्रियांना नाही तर पुरुषांनाही आहे.

एका महान हिंदुत्ववादी नेत्याला मी ‘ ‘भारता’मध्ये बलात्कार होत नाहीत तर ते ‘इंडिया’मध्ये होतात” असे भरमसाट विधान करताना ऐकलं आहे. पाश्चात्यांच्या अनुकरणाने बिघडलेला ‘इंडिया’ सोडून आपल्या मूळ, शुद्ध, पवित्र ‘भारता’त परत या, अशी ती हाक होती. पोरबंदर इथं लागलेलं एक पोस्टर बघा-

खरं तर महिला सशक्तीकरणाच्या नावाखाली योग्य-अयोग्य कपडे परिधान करण्याचा अनाहूत सल्ला कोण कसं काय देऊ शकतं? पण ते एक वेळ बाजूला ठेवलं तरी अयोग्य कपडे कोणते तर जीन्स-टी शर्टस? या मापदंडाने काही पारंपरिक भारतीय कपडे खरं तर अधिक उत्तान/ मादक भासतात. मग? पण त्या सगळ्याचा स्त्रीविषयक अत्याचाराशी काहीही संबंध नाही.

हीच तर ती मानसिकता आहे, जी स्त्रीने कसं वागायचं, कसं राहायचं, कोणते कपडे परिधान करायचे याचे मापदंड ठरवते. त्यात देश काल धर्म इ. परत्वे भिन्नत्व येतं, पण ते एक सारखेच जाचक असतात. त्याच्या उल्लंघनाबद्दल शिक्षा होते. कारण स्त्री मानव नाही, ती पुरुषांची मालमत्ता आहे! पण त्यांना तसंही म्हणायचं नाही. त्यांना आडून असं सांगायचं आहे की, पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होते. ही विचारसरणी तर्कदुष्ट आहे.

मी स्वत: एक सभ्य आणि सुशिक्षित माणूस आहे. या विषयानिमित्ताने मी ज्या काही थोड्याबहुत लोकांशी बोललो, ते सगळे सुशिक्षित आणि सभ्यच आहेत. यातल्या कुणीही स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक, मानसिक, लैंगिक अत्याचारांचं समर्थन केलेलं नाही. उलट ते अत्यंत विकृत, गंभीर, निंदनीय, कडक शिक्षा देण्याच्या योग्यतेचे आहेत, असंच हिरीरीनं मांडलं. पण ते तसे विकृत, गंभीर, निंदनीय कडक शिक्षा देण्याच्या योग्यतेचे का आहेत, यावर उपायांची फलश्रुती अवलंबून आहे. आपण जर चुकीच्या कारणाकरता स्त्रियांवरचे अत्याचार चूक मानत असू, तर आपण एक प्रकारे या अत्याचारांना समर्थनच देतो, ही बाब फारशी कुणाच्या लक्षात आलेली नाही.

(समाप्त)

……………………

लेखक टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

aditya.korde@gmail.com

Post Comment

ADITYA KORDE

Thu , 02 February 2017

ORIGINAL ARTICLE IS LIKE THIS, स्त्रियांवरचे अत्याचार आणि पुरुषी मानसिकता ३.३० ची वेळ हि कंपनीत चहाची वेळ असते. आम्ही ७-८ लोक नेहमी चहाला सेक्शनच्या गच्चीवर जमतो. चहा फक्त निमित्त, गप्पा महत्वाच्या. एरवी कामाच्या धबडग्यात १०-१५ मिनिट गप्पा मस्त मारून होतात, चांगला विरंगुळा होतो. आणि विषय तर काय एक एक- राजकारण, क्रिकेट, सिनेमा, साहित्य, काव्य शास्त्र विनोद (हे जरा जास्त झालं, नुसत विनोद ठीक आहे) कुठल्याही विषयावर गप्पा रंगतात. काल पासून मात्र जरा गंभीर विषयावरच गप्पा झडत आहेत. ह्याला कारणीभूतही मीच आहे. सोमवारी इन्फोसिस मधल्या रसिला नावाच्या एका मुलीचा सुरक्षा रक्षकाकडूनच खून झाल्याची बातमी आली.(पूर्ण बातमी ह्या लिंक वर वाचू शकता. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/rasila-op-murder-case/articleshow/56884188.cms ) आता हल्ली हल्ली असल्या बातम्या ऐकून आमच्या सेक्शनच्या लोकांनी प्रतिक्रिया देणच कमी केलं आहे. एक प्रकारचा कोडगेपणा आलाय. त्यातून कुणीतरी संजय लीला भंसाळीच्या कानफटात मारली हा एवढा राष्ट्रीय महत्वाचा विषय असताना एका साध्या काम करणाऱ्या मुलीच्या खुनाची चर्चा ती काय करायची! पण मी देखिल उगाच किडा म्हणून हे विषय खोदुन काढायचे ठरवले नव्हते. झाल असं कि ह्या वर्षीच्या सुरुवाती पासूनच अशा घटना घडताना सतत पाहतो ऐकतोय. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी बेंगलोर मध्ये भररस्त्यात महिलांचा विनयभंग केल्याचा तो किळसवाणा प्रकार घडला, ते आता परवा इन्फोसिस मध्ये घडलेला प्रकार ह्याच्या मध्ये अशा अनेक घटना घडल्यात. रसिलाचा खून झाल्यावर पुण्यातच पुन्हा दोन वेग वेगळ्या घटनांमध्ये बलात्कार आणि फसवणूक झाल्याच्या घटना पेपरात वाचल्या. ह्या गोष्टीवर माझी माझ्या बायकोशी नेहमीच चर्चा होते. तिच्यामुळेच माझ ह्या विषयावर बऱ्यापैकी प्रबोधन होऊ लागलय. प्रश्न फक्त ह्या किंवा अशा सतत घडणाऱ्या घटनांचा नाही तर एकंदरीत पुरुषी मानसिकतेचा आहे हे सांगायला काही कुणा तज्ञाची गरज नाही. पण काय आहे हि मानसिकता? नक्की कुठे आणि कुणाचे चुकतंय?ह्याचा मी माझ्या पद्धतीने काढलेला हा निष्कर्ष आहे. तो चूक की बरोबर?, अपूर्ण कि पूर्ण? वरवरचा कि मूलगामी? ते तुम्ही ठरवायचं. माझी पत्नी वसुधा हि मानसोपचारतज्ञ आहे.(M.A. In Clinical psycology) तशी ती पुण्यात लहान/ किशोरवयीन मुलांच्या समस्यांमध्ये त्यांना समुपदेशन, मार्गदर्शन करायचे काम करते पण तिने तिचे पदव्यत्तर शिक्षण गुन्हेगारी मानसिकता हा विषय घेऊनच पूर्ण केलय. (M. Sc.in Cirminology and forensic Psycology, Middlesex university London) तेव्हा ह्या विषयावर बोलायला घरीच एव्हढा तज्ञ माणूस असताना मला बाहेर गप्पा मारायची गरज काय? हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो पण तसे ते नाही. मी तिने सांगितलेल्या गोष्टी माझ्या पद्धतीने तपासून पाहतोय. त्या करता मुद्दामहून हे विषय मी बस, कॅन्टीन, चहाची जागा ,मित्रांबरोबरचे गप्पांचे अड्डे अशा ठिकाणी छेडतो. आणि लोकांच्या प्रतिक्रिया पाहतो, ऐकतो. ह्या बरोबरच मी सुझान ब्राऊन मिल्लर हिच्या “Against our will- Men Women and Rape” ह्या पुस्तकाचा तसेच You tube वरील BBCच्या “Documentary on Women’s liberation movement.” चा प्रामुख्याने आधार घेतला आहे.शिवाय इतर अनेक Documentaries, articles ,मराठी लेख,फेस बुक वरील बातम्या, पोस्ट आणि त्यांवरच्या प्रतिक्रिया- थोडक्यात इंटरनेट वर उपलब्ध माहितीचा उपयोग केलेला आहे. त्यामुळे ह्या विवेचनाला काही मर्यादा पडल्यात ह्याची मला जाणिव आहे. वाचकांनी वाचताना ह्याचे भान ठेवावे हि विनंती भारतामध्ये स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक/ शारीरिक अत्याचारांचे प्रमाण पाहिल्यावर एखाद्या महामारी / साथीच्या रोगाची आठवण होते. (आणि कदाचित त्यामुळेच) ह्याविषयाबाबत समाजात एक प्रकारचा कोडगेपणा हल्ली हल्ली येऊ लागला आहे असं मला वाटू लागलय. मागे झालेल्या निर्भया प्रकरणावेळी किन्वा अगदी ह्या हल्लीच्या बेंगलोर प्रकरणावेळी अबू आझमी सारख्या अनेक महान दार्शनिक विचारवंतानी केलेली विचारधनाची उधळण (पक्षी मुक्ताफळे) पहिली/ऐकली कि हा कोडगेपणा वाढत चालला आहे हे जाणवू लागते. ह्या अबू आझमी आणि त्याच्या मुलासारख्यांच्या निरनिराळ्या विधानांमुळेच मी ह्या प्रकरणाचा जास्त विचार करू लागलो. का? कारण हि माणसं मूर्ख नसतात. ती अनवधानाने, चुकून असे फारसे काही कधी बोलत नसतात. ती जे बोलतात ते त्यांचा जो मतदार वर्ग असतो त्यांच्या मानसिकतेला धरून असेच असते. त्यांच्या मतदात्यांच्या भावनांना फारसा धक्का न लावण्याचे, उलटपक्षी बऱ्याचदा त्यांना गोंजारायचे काम ह्या प्रतिक्रिया करतात. म्हणजे त्यांनी कुठेही विनयभंग किंवा बलात्कार योग्य आहे असे म्हटलेले नाही पण त्याची बरीचशी जबाबदारी त्या त्या मुलींवर टाकून ते मोकळे झाले. खरेच असे असते का? स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारात बलात्कार हा सगळ्यात क्रूर, विकृत मनाला जातो. म्हणजे दुजाभाव, गुलामी, मारहाण ते अगदी जीव घेणे, विनयभंग आणि सगळ्यात भयंकर म्हणजे बलात्कार अशी काहीशी महिला अत्याचारांची चढती भाजणी लोक मानतात. मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, बलात्कार का होतो ? ह्या प्रश्नाची जी उत्तरं, अगदी सर्वसामान्य माणूस ते विचारवंत (बरेचसे, सगळे नाही आणि ह्यात स्त्रियाही येतात) देतात त्यांच्या मध्ये मला सर्वसाधारण पणे खाली दिलेले विचार आढळतात.( मी ह्याकरता मित्रांच्या सहकार्यांच्या प्रतिक्रिया, इंटरनेटवरील निरनिराळ्या चर्चा, निरनिराळ्या लेखांवर, बातम्यांवर आलेल्या असंख्य प्रतिक्रिया ते यु- ट्यूब वरच्या निरनिराळ्या विडीओंचा संदर्भ घेतला आहे.) १. बलत्कार करणारे पुरुष अडाणी, अशिक्षित, विकृत, खेडवळ, असंस्कृत, बुरसटलेल्या विचारांचे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात. २. बलात्काराच्या शिकार झालेल्या स्त्रिया ह्या गरीब ते मध्यम वर्गीय गटातल्या, नोकरी-कामधंदा करणाऱ्या, तोकडे किंवा पाश्चात्य(modern?)पद्धतीचे कपडे घालणाऱ्या रात्री उशिरा घराबाहेर राहणाऱ्या( नोकरी, काम शिक्षण किंवा अगदी मौज मजेसाठीही), fashion(!) करणाऱ्या असतात. ३. पुरुषांना बऱ्याचदा त्यांच्या कामोत्तेजना शमवता न आल्यामुळे बलात्कार होतात ( कामाकरता बाहेर राहिल्याने कुटुंब आणि बायकोशी संपर्क न राहिल्यामुळे?) ४. सध्याच्या काळात सगळीकडे सिनेमा,मालिका, जाहिरातीमध्ये स्त्रियांना उत्तेजक / उत्तान अश्लील हावभाव/ वर्तन करताना दाखवतात किंवा पोर्नफिल्म्सचा सूळसुळाट झाल्यामुळे. हि यादी अजून कितीही लांबवता येईल पण ढोबळ मानाने अशा प्रतिक्रियाच येतात.ह्या प्रतिक्रिया ३ विभागात वर्गीकृत करता येतात. १. भूमिका भंग २. मर्यादा भंग ३. औचित्यभंग किंवा धार्मिक/ सांस्कृतिक सीमांचे उल्लंघन १ भूमिका भंग पुरुषांनी स्त्रियांचे रक्षण करायचे असते आणि तसे करायच्या ऐवजी तेच त्यांचे शोषण करू लागतात किंवा पुरुष स्त्रियांचे/ त्यांच्या अधिकारांचे, लज्जेचे, अब्रूचे रक्षण करण्यात कमी पडतात. म्हणजे उदा. पोलीस हे कायद्याचे रक्षक पण जेव्हा तेच कायद्याचे उल्लंघन करतात तेव्हा ते रक्षक न राहता भक्षक बनतात किंवा ते कमी पडतात तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो. अशी काहीशी हि भूमिका/ प्रतिक्रिया आहे. २ मर्यादा भंग स्त्रियांच्या चालण्या बोलण्या वागण्याच्या काही विशिष्ट मर्यादा असतात. त्यांचे त्या उल्लंघन करतात. त्यामुळे त्या स्वत:ला अशा धोकादायक परिस्थितीत टाकतात. त्यामुळे अशावेळी घडणाऱ्या घटनांना त्याच काही किंवा बऱ्याच अंशी जबाबदार असतात. ३. औचित्यभंग किंवा धार्मिक/ सांस्कृतिक सीमांचे उल्लंघन भारतासारख्या आध्यात्मिकदृष्ट्या/सांस्कृतिकदृष्ट्या उन्नत देशात पाश्चात्य विचाराचे/ संस्कृतीचे अतिक्रमण झाल्याने आपली मूळ संस्कृती / विचारधारा दुषित होऊन पाश्चात्यांच्या भोगवादी संस्कृतीच्या अतिक्रमणामुळे सध्या बलात्कारांचे/ विनयभंगाचे प्रमाण वाढले आहे. इथे एक मुद्दा मला स्पष्ट केला पाहिजे कि ह्या प्रतिक्रिया पूर्णपणे बरोबर, पूर्णपणे चूक किंवा अंशत: चूक आहेत किंवा मला त्या मान्य आहेत असे म्हणायचा माझा उद्देश नाहीये. सर्व सामान्य माणूस जो विनयभंग/ बलत्कार हे गंभीर अपराध मानतो, अशा दोष्यांना कडक, अगदी कायद्याने शक्य नसलेल्या शिक्षा द्यायला हव्यात असेही म्हणतो( उदा. भर चौकात फासावर लटकावणे, हात, पाय ते अगदी त्याचे लिंग तोडणे अशा) त्यांच्या दृष्टीने ह्या गंभीर गुन्ह्यामागची हि सर्वसाधारण कारणमीमांसा आहे. सर्व सामान्य माणसं ते अगदी धर्मगुरु मग ते हिंदू असो मुसलमान असो व अन्य कोणत्याही धर्माचे, ‘आपापला किंवा सगळेच धर्म स्त्रियांचा आदर करतात आणि स्त्रियांचे अबृहनन करण्याला महापाप मानतात. ’ असेच हिरीरने सांगतात. स्त्रीशी कसे वागावे / तिला सन्मान कसा द्यावा ह्याचे वर्णन आपापल्या धर्मात कसे व्यवस्थित सांगितले आहे ह्याचे दाखलेही देतात. म्हणून ह्या गुन्ह्यान्बद्दलची धार्मिक भूमिका हि सुद्धा मी भूमिका ह्याच सदरात घेतली आहे. भूमिका समाजाचा(फक्त भारतीय नाही) स्त्री विषयक दृष्टीकोन हा सगळ्यात गोंधळाचा आणि वाट चुकलेला दृष्टीकोन आहे. सर्वसामान्य माणूस मग तो स्त्री असो व पुरुष, गरीब असो व श्रीमंत, अशिक्षित असो व अगदी सुशिक्षीत विचारवंत, त्यांच्या मनात स्त्रीचे सामाजिक स्थान काय आहे ह्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर एकंदरीत ह्या प्रश्नाच्या उत्तराची फलश्रुती अवलंबून आहे. माणूस सामाजिक प्राणी आहे असे आपण अगदी लहानपणापासून शिकतो आणि तसे त्यात चुकीचे काही नाही. समाज म्हटले कि त्यातल्या प्रत्येक घटकाचे समाजातले स्थान, कर्तव्य, जबाबदारी आणि तदनुषंगिक मिळणारे लाभहि आले. मग ह्यात स्त्रीचे स्थान नक्की कुठे आहे. जगातल्या जवळपास सर्व संस्कृतींमध्ये स्त्रीचे स्थान हे माणूस म्हणून नाही तर एक वस्तू किंवा सेवापुरवणारी व्यवस्था म्हणूनच आहे. हे इतक्या नागडेपणाने कुणी मांडत नसले तरीही सर्व धर्म आणि संस्कृतींचा स्त्री विषयक दृष्टीकोणाचा गाभा तोच आहे. स्त्री हि माणूस नसून एक वस्तू किंवा सेवा पुरवणारी पद्धती आहे म्हणजेच ती कुठल्यातरी पुरुषाची खाजगी मालमत्ता आहे असे मानले गेल्यामुळे स्त्री विषयी जाहीरपणे बोलताना, उल्लेख करताना आणि प्रत्यक्ष वागताना अशा विरोधाभासी वाटणाऱ्या गोष्टी घडतात.तुम्ही जेव्हा स्त्रीला देवी-देवता मानता किंवा तिला सर्व पापाचे मूळ कारण/ आगर मानता तेव्हा त्यातून तिचा माणूसपणा हिरावून घेता, हे कदाचित कोणाला जाणवत नसावे.पण तसे करताना तिला दुय्यम मनुष्यत्व (sub human status)दिले जाते. एखाद्याची जशी घर, गाडी, पैसा, इतर कमी अधिक मौल्यवान मालमत्ता असते तशीच त्याची, स्त्री हि मालमत्ताच असते.आपली चीज वस्तू आपण निष्काळजी पणे इकडे तिकडे कुठेही ठेवली तर जसे ती चोरी होण्याचा, इतरांनी तिचा वापर करण्याचा धोका उत्पन्न होतो तसेच स्त्रीचेही होते. आपापली मौल्यवान चीज वस्तू आपण सांभाळली पाहिजे. असाच ह्या सगळ्या विधानांचा अर्थ असतो. (निर्भया प्रकरणावेळी, झेपत नव्हते तर मैत्रिणीला घेऊन असे एकटे दुकटे बाहेर जायचे कशाला असे मत tv वर एका महिलेला व्यक्त करताना मी स्वत: ऐकले आहे. तीच गोष्ट शक्ती मिल काम्पाउंड मध्ये झालेल्या रेपची, ती महिला पत्रकार आणि तिचा पुरुष सहकारी तिथे गेले तर अंगी सामर्थ्य नसताना एकट्या दुकट्याने तिथे महिला सहकाऱ्यासोबत जायचे कशाला अशाच प्रकाराच्या प्रतिक्रिया मी ऐकल्या आहेत) एकंदरीत काय तर भूमिका असे मी जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या भूमिकांचा विसर पडणे किंवा त्यांचे उल्लंघन केले जाणे (अगदी पुरुषांकडून हि) हे ह्या समस्येचे मूळ कारण नसून मुळात भूमिका हीच चुकीची आहे. ती म्हणजे स्त्री हि कुणाची तरी खाजगी मालमत्ता आहे आणि तिचे ज्याचे त्याने तसेच समाजाने रक्षण करावे. तिची चोरी किंवा नासधूस करू नये. मर्यादाभंग एकदा समाजाने स्त्रीला दुय्यम मानव मानल्यावर मर्यादाभांगाची संगती सहज लावता येते. पुढे लिहिण्याआधी स्पष्ट करतो, मी दुय्यम मानव म्हणतोय, दुय्यम नागरिक नाही, कुणी जेव्हा दुय्यम नागरिक असतो तेव्हा मानव म्हणून पूर्णच असतो फक्त त्या देशातले नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य ह्यापासून मुक्त असतो. दुय्यम मानव म्हटल्यावर सहजीक माणसांचे सगळे/ बहुतांश अधिकार नाकारले जातात. वस्तू मालमत्ता पशु आणि स्त्री अशी वर्गवारी होते. घराला कुंपण, गाडीला गारेज, गुरांना गोठा आणि स्त्रीला मग संरक्षणासाठी घराची, नियमाची/ मर्यादांची बंधनं घातली जाऊ लागतात. शिक्षण घे पण ते घरात राहून मुलांचा अभ्यास घेण्यासाठी, नोकरी कर पण घराला हातभार लावण्यासाठी ते पण बायको, आई, सून, मुलगी वगैरे म्हणून ज्या अपेक्षित जबाबदाऱ्या आहेत त्या पार पडूनच. कामावर / बाहेर जा पण संध्याकाळी ७ च्या आत घरी परत ये. रात्री अपरात्री एकटी दुकटी फिरू नको.कुणी पुरुष माणूस बरोबर असलेला बरा अशा मर्यादा तिला घातल्या जातात. आणि मर्यादा भंग झाला कि, मग शिक्षा केली जाईल, वठणीवर आणले जाईल असा धाक असतोच. आणि ह्या शिक्षा करण्याचा अधिकार कुणाचा? अर्थात पुरुषांचाच. रात्री-बेरात्री घराबाहेर राहिला म्हणून एखाद्या पुरुषाचा विनयभंग किंवा बलात्कार झाल्याच्या घटना आपण किती वेळा वाचतो? जर बलात्कार करणारे सगळे विकृत मानसिकतेचे असतात तर मग त्यातला एकही समलिंगी नसतो? खरं कि काय?(समलैन्गिकता हि विकृती नाहीये पण तो वेगळा लेखन विषय आहे) बऱ्याचदा मी सेकंड शिफ्ट वरून रात्री घरी येतो तेव्हा १.०० वाजलेला असतो. मला क्वचित कुणी चोर मला पकडून माझ्याकडचे पैसे, घड्याळ वगैरे चीजवस्तू लुबाडून घेऊन जाईल अशी भीती वाटते पण माझ्यावर कुणी पुरुष किंवा अगदी एखादी विकृत स्त्री बलात्कार करेल अशी भीती सोडा शंकाही येत नाही.का? कारण बलात्कार हे इतर मार्गांनी लैंगिक भूक शमवता येत नाही म्हणून होत नसतात तर ते समस्त स्त्री वर्गाला धाकात, जरबेत ठेवण्यासाठी केले जातात. ते पुरेसे होत नाही असे जाणवले, स्त्रीने प्रतिकार करायचा प्रयत्न केला तर तिला धडा शिकवण्यासाठी त्यात अधिक क्रौर्य, विटंबना ते अगदी नंतर छळ करून केले गेलेले निर्घृण खूनही सामील होतात.चोरी/ दरोडा वाईट पण चोरी होणाऱ्या वस्तुला चोराचा/ दरोडेखोराचा प्रतिकार करायचा अधिकार असतो काय?... आणि ह्याचा भयानक परिणाम समस्त स्त्रीवर्गावर झालेला दिसतो. मी ज्या स्त्रियांशी ह्या विषयावर बोलू शकतो अशा स्त्रियांशी बोललो आणि मला सगळ्यांनी हेच सांगितले कि त्यांच्या दृष्टीने बलात्कार ही त्यांच्या बाबतीत घडू शकणारी, त्यांचे आयुष्य उध्वस्त करू शकणारी, त्यांचे सर्वस्व हिरावून घेऊ शकणारी अशी एक गोष्ट आहे. का? बलात्कार वाईट ह्यात संशय नाही पण बलत्कार झाल्यावर सर्वस्व कसे काय नष्ट होते? आयुष्य धुळीला कसे काय मिळते? ह्याचे तर्कसंगत उत्तर एकीलाही देला आले नाही. आणि मग लग्नानंतर नवऱ्याकडून होणाऱ्या बलात्काराचे काय? असा प्रश्न विचारला तर सगळ्याजणीनी ती गोष्ट हि वाईटच असे सांगतले पण त्यानेदेखिल त्यांचे आयुष्य उध्वस्त होते का? सर्वस्व नष्ट होते का? ह्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी दिले. असे का? परपुरुषाने केलेला आणि नवऱ्याने केलेला बलात्कार ह्यात असा गुणात्मक फरक कसा? एक तर बऱ्याच जणींना नवरा जर जबरदस्ती करत असेल तर तो देखिल बलात्कारच होतो हेच मान्य नव्हते.(ह्याच न्यायाने वेश्यांवर हि बलात्कार होत नाही असे म्हणणरे महाभाग मला भेटले आहेत.) ह्याचे उत्तर मला सुझान ब्राऊनमिलर ह्या प्रसिद्ध स्त्री चळवळीच्या खंद्या कार्यकर्तीच्या “Against our will” ह्या अत्यंत गाजलेल्या पुस्तकात मिळाले. त्यात ती म्हणते “Rape is nothing more or less than a process of intimidation by men to keep all women in a state of fear” पुरुषांनी समस्त स्त्री वर्गाला सतत दहशतीत ठेवण्यासाठी अंगीकारलेली एक प्रक्रिया म्हणजे बलात्कार. हे वाचून एकदम ट्यूब पेटली.लाक्षणिक अर्थाने सगळे पुरुष बलात्कारी नसतात, नव्हे फार थोडे बलात्कारी असतात, तसेच सगळ्या स्त्रियांवर बलत्कार होत नाहीत पण जवळपास सगळ्या स्त्रिया बलात्काराला अत्यंत घाबरतात. हि मानसिकता पुरुषांनी स्त्रियांच्या मनात रुजवलेली आहे.फक्त लैंगिक अत्याचार, परपुरुषाने जबरदस्तीने केलेला संभोग म्हणजेच बलात्कार नव्हे.(तो त्याचा एक भाग झाला)बलात्कार हि पुरुष वर्गाने धर्म, पाप-पुण्य,न्याय, नीती, समाज, अश्लील, उचित- अनुचित, स्त्रियांच्या वागण्याबोलाण्याच्या मर्यादा अशा असंख्य गोष्टींच्या आडून चालवलेली, स्त्रियांना जखडून टाकण्याची प्रक्रिया आहे. आणि ती पिढ्यानुपिढ्या चालूच आहे. कुणी स्त्री हि बंधन तोडून बाहेर येत असेल तर मग तिला निरनिराळ्या शिक्षा आहेत पण तिच्या मनाला पडलेली दहशत हि सगळ्यात मोठी शिक्षा आहे, आणि बहुसंख्य स्त्रियाही ह्या मानसिकतेच्याच बळी झालेल्या दिसतात. आम्हाला व्यवस्थापनात एक गोष्ट सांगायचे. हत्तीच्या पिल्लाला अगदी लहानपणापासून जाड साखळदंड लावून कायम बांधून ठेवतात. ते लहान असताना अशक्त असल्याने साखळदंड तोडू शकत नाही. पण पुढे तो मोठा हत्ती झाल्यावर आणि साखळदंड सहज तोडू शकेल असे सामर्थ्य आल्यावरही तो ते साखळदंड तोडू शकत नाही कारण त्याने आत्मविश्वास गमावलेला असतो. स्त्रियांची इतक्या हजारो वर्षाच्या गुलामीने अशीच काहीशी अवस्था आज झालेली आहे.मर्यादा फक्त स्त्रियांच्या आचार विचारावर नाही ती त्यांच्या मनात भिनवली गेलेली आहे आणि पुरुषांच्या सुद्धा. ह्यातून मुक्ततेची गरज फक्त स्त्रियांना नाही तर पुरुषांना सुद्धा तितकीच तातडीची आहे. औचित्यभंग किंवा धार्मिक/ सांस्कृतिक सीमांचे उल्लंघन खरेतर हा विभाग असा काही वेगळा असायची गरज नाही पण बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया त्या अंगाने आल्यामुळे मला नाईलाजाने त्याप्रतीक्रियांचा हा असा वेगळा विभाग करावासा वाटला. “भारत हा पौर्वात्य देश आहे आणि खरेतर आमची संस्कृती सगळ्यात जुनी आणि सगळ्यात श्रेष्ठ पण आधी मुसलमान आणि नंतर आलेल्या पाश्चिमात्य( इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज वगैरे) आक्रमकांमुळे आमच्या संस्कृतीत भेसळ झाली त्यामुळे अनेक वाईट गोष्टींचा प्रादुर्भाव झाला. आजकाल तर ह्या पाश्चात्यांच्या अतिरिक्त अनुकरणामुळे चंगळवाद, भोगवाद फोफावला असून त्यामुळे सद्य समाजाचा स्त्रीविषयक दृष्टीकोन असा विकृत झालेला आहे त्यामुळे भारतात हल्ली हल्ली स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. आपण एकदा का हि पाश्चात्य संस्कृतचे अनुकरण थांबवले कि सर्व काही आलबेल होईल.” असा काहीसा ह्याप्रकारात येणाऱ्या प्रतिक्रियांचा अर्थ आहे. अशाच एका महान हिंदुत्ववादी नेत्याला मी “भारतामध्ये बलात्कार होत नाहीत तर ते इंडिया मध्ये होतात” असे एक भरमसाट विधान करताना ऐकले आहे. पाश्चात्यांच्या अनुकरणाने बिघडलेला इंडिया सोडून आपल्यामूळ, शुद्ध, पवित्र भारतात परत या अशी ती हाक होती.पोरबंदर इथे लागलेले एक पोस्टर बघा. खरेतर महिला सशक्ती करणाच्या नावाखाली योग्य अयोग्य कपडे परिधान करण्याचा अनाहूतत सल्ला कोणी कसे काय देऊ शकते? पण ते एक वेळ बाजूला ठेवले तरी अयोग्य कपडे कोणते तर जीन्स आणि टी शर्टस? ह्या मापदंडाने काही काही पारंपारिक भारतीय कपडे खरेतर अधिक उत्तन/ मादक भासतात. मग? पण त्या सगळ्याचा स्त्रीविषयक अत्याचाराशी काहीही संबंध नाही. हीच तर ती मानसिकता आहे जी स्त्रीने कसे वागायचे, कसे राहायचे, कोणते कपडे परिधान करायचे ह्याचे मापदंड ठरवते. त्यात देश काल धर्म इ. परत्वे भिन्नत्व येते पण ते एक सारखेच जाचक असतात आणि त्याच्या उल्लंघनाबद्दल मग शिक्षा होते. कारण स्त्री हि मानव नाही ती पुरुषांची मालमत्ता आहे. पण त्यांना हि तसे म्हण्याचे नाही. त्यांना अडून असे सांगायचे आहे कि पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होते.हि विचारसरणी इतकी तर्क दुष्ट आहे कि खरेतर ह्याचा प्रतिवाद कराची हि गरज नाही पण बरेच लोक असा विचार करतात. इथ पर्यंत मी पुरुषी मानसिकतेचाच आढावा घ्यायचा प्रयत्न केला.( मी पुरुषी मानसिकता म्हणतोय फक्त पुरुषांची मानसिकता नाही. समारोप मी स्वत: एक सभ्य आणि सुशिक्षित माणूस आहे, ह्या विषयानिमित्ताने मी ज्या काही थोड्याबहुत लोकांशी बोललो ते सगळे सुशिक्षित आणि सभ्यच आहेत. ह्यातल्या कुणीही स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक, मानसिक, लैंगिक अत्याचारांचे समर्थन केलेले नाही. उलट ते अत्यंत विकृत, गंभीर, निन्दानिय, कडक शिक्षा देण्याच्या योग्यतेचे आहेत असेच हिरीरने मांडले. पण ते तसे विकृत, गंभीर, निन्दानिय कडक शिक्षा देण्याच्या योग्यतेचे का आहेत? ह्याच्या कारण मीमांसेवर किंवा कार्यकारण भावावर उपायांची फलश्रुती अवलंबून आहे. आपण जर चुकीच्या कारणाकरता स्त्रियांवरचे अत्याचार चूक मानत असू तर आपण एक प्रकारे ह्या अत्याचारांना समर्थनच देतो हि बाब फारशी कुणाच्या लक्षात आलेली नाही. ह्यावर उपाय काय आहेत? हे आता लगेच मला नीट सांगता येणार नाही. अजून थोडा अभ्यास करावा लागेल. पण आतापर्यंत मी तरी नक्की कुठे आणि कसा चुकत होतो हे समजू लागलय.हेही नसे थोडके. हा विषय पूर्ण कधीच होणार नाही म्हणून... क्रमश: ---आदित्य.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘लव जिहाद’ असो की ‘समान नागरी कायदा’, यांचा मूळ हेतू स्त्रियांना दुय्यम ठेवण्याचा आहे. त्यामुळेच त्यांना राजकारणात महत्त्व प्राप्त होते. स्त्रियांनी हे सत्य जाणून भानावर यायला हवे

हे दोन्ही कायदे स्त्री-स्वातंत्र्य मर्यादित करणारे आणि स्त्रियांवर पुरुषसत्ताक गुलामी कायम ठेवणारे आहेत. ‘लवजिहाद’चा कायदा स्त्रियांना आपला जीवनसाथी निवडण्याचा मूलभूत अधिकार नाकारतो; ‘समान नागरी कायदा’ लग्न, घटस्फोट, पोटगी, दत्तक आणि वारसा याबाबतीत भरवसा देऊन स्त्रीला ‘पत्नी’ म्हणून मर्यादित करतो. आपली गुलामी आणि दुय्यम स्थान संपवणारे राजकारण स्त्रियांना ओळखता आले पाहिजे.......