अडवाणी नावाची महाशोकांतिका!
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • लालकृष्ण अडवाणी
  • Sat , 23 March 2019
  • पडघम देशकारण लालकृष्ण अडवाणी Lal Krishna Advani अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpayee नरेंद्र मोदी Narendra Modi हिंदुराष्ट्र Hindu nation भाजप BJP संघ RSS

लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या आठवड्यातले सर्वाधिक चर्चेतले चेहरे आहेत राष्ट्रीय पातळीवर लालकृष्ण अडवाणी आणि राज्याच्या पातळीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे. नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाल्यापासून लालकृष्ण अडवाणी यांचा हळूहळू नियोजनबद्ध अस्त केला जातोय, अशी भूमिका घेत मी सलग लिहितो आहे. अर्थातच अडवाणी भक्तांना ते मान्य नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा लालकृष्ण अडवणी आता राष्ट्रपती होणार असा युक्तीवाद अडवाणी भक्तांनी सुरू केला होता. मात्र ते त्यांचं सांकेतिक समाधान आहे, अशी माझी ठाम धारणा होती. कारण हे सगळं एका दिवसात घडलेलं नाहीये. त्यामागे एक नियोजनबद्ध खेळी आहे, हे स्पष्ट दिसत होतं. एक पत्रकार म्हणून मी ते अनुभवत होतो. ‘पद्मविभूषण’ हा देशाचा क्रमांक दोनचा सर्वोच्च सन्मान जाहीर झाल्यावर आता लालकृष्ण अडवाणी कधीही या देशाचे राष्ट्रपती होणार नाहीत, असं मत मांडलं तेव्हाही भक्त माझ्यावर खवळले होते. पण त्यांना मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी ही जोडी काय आणि किती मोजून पावलं उचलते आहे, हे कळत नव्हतं, असं माझं म्हणणं होतं. 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू असताना भाजपचे ज्येष्ठ नेते, शोकाकूल लालकृष्ण अडवाणी यांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं या मजकूरसोबत दिलेलं एक छायाचित्र इंटरनेटवर बघितलं, तेव्हा लिहिलेल्या मजकुरात (नेमकी तारीख सांगायची तर, ३१ ऑगस्ट २०१८ पुनरुक्ती होत असूनही तो मजकूर देतोय) मी म्हटलं होतं- एकेकाळी पक्षाचे सर्वेसर्वा ते भावी पंतप्रधान ते अडगळीत गेलेले आणि आता पूर्णपणे एकाकी पडलेले लालकृष्ण अडवाणी, हा प्रवास त्या अश्रूंतून डोळ्यासमोर झळकला. जाणीव-नेणीवेच्या पल्याड गेलेले असले तरी, वाजपेयी यांचा असलेला आधार तुटल्याचं दु:ख व्यक्त करणारे ते अडवाणी यांचे अश्रू होते. वाजपेयी राजकारणाच्या पडद्यावरून गायब होऊन जवळ जवळ दशक उलटलं. अडवाणीही तसे अडगळीत होते. नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर भाजपातला वाजपेयी-अडवाणी युगाचा अस्त झालेलाच होता. वाजपेयी यांच्या निधनानं अडवाणी यांच्या वाट्याला आलेलं एकाकीपण टिपणार्‍या त्या छायाचित्राला दादच दयायला हवी. दहा हजार शब्द जे सांगू शकत नाही ते एक छायाचित्र जास्त प्रभावीपणे व्यक्त करू शकतं, असं जे म्हणतात त्याचा साक्षात प्रत्यय देणारं, हे अडवाणी यांचं छायाचित्र आहे. सर्वोच्च पदाची सत्ताकांक्षा फलद्रूप न झाल्याची मध्यवर्ती कल्पना घेऊन समकालीन राजकारणावर वास्तववादी कादंबरी लिहिली गेली तर ती एक अत्यंत कसदार शोकात्म ललित कृती होईल. शरद पवार, नारायण राणे, मायावती, मुलायमसिंह असे काही त्या कादंब-यांचे नायक असू शकतील. लालकृष्ण अडवाणी यांच्यावरची कादंबरी मात्र महाशोकांतिका असेल आणि लालकृष्ण अडवाणी महानायक ठरतील!    

लालकृष्ण अडवाणी आणि त्यांच्या भाजप या राजकीय पक्षाचा एकांगी हिंदुत्ववाद, राजकारणाची (अनेकदा हिंसक झालेली व त्याची देशाला फार मोठी किंमत मोजावी लागलेली) शैली आणि धर्मांधता प्रस्तुत भाष्यकाराला पूर्णपणे अमान्य असली तरी त्यांचं राजकीय कर्तृत्व उंच, व्यापक, राष्ट्रीय पातळीवरचं, महत्त्वाचं म्हणजे वैयक्तिक तसंच सार्वजनिक पातळीवर स्वच्छ चारित्र्याचं आहे. (हवाला प्रकरणात त्यांचं नाव आलं, पण पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जात त्यांनी निर्दोषत्व सिद्ध केलं). त्यांची अव्यभिचारी पक्षनिष्ठा आणि अविश्रांत राजकीय तपस्या तब्बल साडेसातपेक्षा जास्त दशकांची आहे.

आता पाकिस्तानात असलेल्या कराचीत ८ नोव्हेंबर १९२७ रोजी जन्मलेले लालकृष्ण अडवाणी त्यांच्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणानंतर झालेल्या फाळणीच्या भळभळत्या जखमा घेऊन भारतात आले आणि इथल्या समाज जीवनाचं एक कट्टर व अभिन्न अंग झाले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले ते १९४२ पासून. तेव्हापासून ते राजकीय आणि सार्वजनिक जीवनात आजवर सक्रीय आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते पूर्ण वेळ प्रचारक होते. नंतर त्यांना जनसंघात पाठवण्यात आलं. जनसंघ ते जनता पक्ष ते भारतीय जनता पक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे आणि तो प्रचंड खाचखळग्यांचा, तसंच अनेक नैराश्यपूर्ण घटनांचाही असला तरी कधी खचल्याची जी पुसटशीही रेषा त्यांच्या करड्या चेहऱ्यावर उमटलेली दिसली नाही आणि आता दिसले ते अश्रू...

भारतीय राजकारणातली वाजपेयी-अडवाणी ही जोडी आजवरची सर्वांत यशस्वी आणि त्यांच्यातली दोस्ती सुमारे ६५ वर्षांची. इतकं वय असणारी जोडी भारतीय राजकारणात आजवर झालेली नाही. लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी हा पक्ष शून्यातून राष्ट्रीय पातळीवर उभा केला, देशभर पक्षाची पाळंमुळं रुजवली. पक्षाचा चेहरा व वाणी उदारमतवादी अटलबिहारी वाजपेयी तर कठोर श्रम व कट्टर हिंदुत्वाचा अजेंडा लालकृष्ण अडवाणी यांचा, अशी कायम विभागणी राहिली. कामाची ती जबाबदारी लालकृष्ण अडवाणी यांनी नेहेमीच कोणतीही कुरकुर न करता स्वीकारली. विचारी पण ठाम, जहाल पण संयमी, शांत व धोरणी आक्रमकता असं गुणवैशिष्ट्य असणारं त्यांचं व्यक्तिमत्त्व आहे. राजकीय लाभासाठी राम जन्मभूमी आंदोलनाचा भडका अडवाणी यांनीच उडवला (आणि समाज दुभंग करणाऱ्या धर्मांध राजकारणाला देशात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. म्हणूनच जातीय आणि धार्मिक समीकरणांचा ‘सांगोपांग’ विचार करुन राजकारण करणाऱ्या देशातील मायावती, मुलायमसिंह , ओवेसी अशा अनेकांचे अडवाणी हे ‘गुरु’ शोभतात.) त्यासाठी अडवाणी देशात वणवण फिरले. प्रमोद महाजन यांचं सारथ्य आणि लालकृष्ण अडवाणी यांची यात्रा हे समीकरणच एकेकाळी देशाच्या राजकारणात रूढ झालं होतं.

देशाच्या उपपंतप्रधानपदापर्यंत लालकृष्ण अडवाणी पोहोचले. ते जेव्हा उपपंतप्रधान झाले तेव्हा पंतप्रधान असलेले अटलबिहारी वाजपेयी थकलेले होते. स्वाभाविकच लालकृष्ण अडवाणी हेच केंद्रीय सरकारचे सर्वेसर्वा होते. माझं म्हणणं अनेकांना रुचणार नाही, पण नमूद करतोच. ‘प्रथम देश आणि मग पक्ष’ अशी भूमिका घेत म्हणजे, काही वेळा रा. स्व. संघाचा अजेंडा बाजूला ठेवून, पंतप्रधान वाजपेयी आणि उपपंतप्रधान अडवाणी यांनी केंद्र सरकार चालवताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आखून ठेवलेली परराष्ट्र धोरणांची चाकोरी बदलली नाही, देशाच्या सेक्युलर भूमिकेला तडा न जाऊ देण्याचा प्रयत्न केला आणि संघ धुरिणांची इच्छा डावलून पाकिस्तानशी असलेले संबध अधिक सुरळीत व सौहार्दाचे होण्यासाठी प्रयत्न केले. म्हणूनच त्या दोघांची जनमानसातली प्रतिमा उजळली. २००४ पाठोपाठ २००९च्या लोकसभा निवडणुका भाजपने अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या, पण भाजपचं स्वबळावरचं किंवा एनडीएचं सरकार स्थापन होण्याइतकं बहुमत मिळालं नाही. उलट काँग्रेस सभागृहातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. केंद्रात मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीएचं सरकार सलग दोन वेळा  सत्तारूढ झालं. तेव्हाच संघाच्या दृष्टीकोनातून लालकृष्ण अडवाणी यांची किंमत शंभर टक्के उतरलेली होती!

इथं एक बाब ठळकपणे लक्षात घेतली पाहिजे– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ‘परिवारा’त जसजसे सर्वशक्तिमान होत गेले, तस-तसं लालकृष्ण अडवाणी यांचं पक्षातलं स्थान डळमळीत होत गेलं. आधी लालकृष्ण अडवाणी यांच्याकडून लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपद काढून सुषमा स्वराज यांच्याकडे दिलं गेलं. मग (अडवाणी यांची ईच्छा नसताना) रा. स्व. संघाचे ‘ब्ल्यू आईड बॉय’ नितीन गडकरी यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान करण्यात आलं. नंतर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांना समोर आणलं गेलं, अशी ही लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान न होऊ देण्याची ‘परिवारा’कडून खेळली गेलेली एक नियोजनबद्ध प्रदीर्घ खेळी होती. राष्ट्रपतीपद त्यांना मिळणारच नव्हतं. भारतीय राजकारणाच्या पटावर सध्या तरी लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखा इतकी मोठी इनिंग्ज खेळलेला, अविश्रांत कठोर श्रम घेतलेला, अनुभवी नेता दुसरा कोणीही नाही. मात्र त्यांची पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा फलद्रूप झालीच नाही... ज्या राम मंदिरासाठी त्यांनी इतका हिंसक संघर्ष केला तो ‘राम’ लालकृष्ण अडवाणी यांना पावलाच नाही.

तब्बल ९१ उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला या खेळी समजल्या कशा नाहीत; कुठे थांबावं हे त्यांना कळलं कसं नाही? खरं तर, या खेळी समजूनही जर महत्त्वाकांक्षा जाणीवपूर्वक तेवतच ठेवली गेली असेल तर, ही महाशोकांतिका ओढावून घेण्यास लालकृष्ण अडवाणी हेही तितकेच जबाबदार आहेत, असा निष्कर्ष काढला तर तो अवाजवी ठरणार नाही.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर अडगळीच्या खोलीत ढकलले गेलेले अडवाणी आता वाजपेयी यांच्या निधनानंतर एकाकी पडलेले आहेत... आता तर लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या गांधी नगर या लोकसभा मतदार संघातून उमेदवारीच नाकारण्यात आलेली आहे किंवा भक्तांच्या भाषेत सांगायचं तर, वयाच्या ९२ व्या वर्षी आता त्यांची निवडणूक लढण्याची सर्व इच्छा संपली आहे! पण याचा अर्थ पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा बाळगलेली एक प्रदीर्घ राजकीय लढाई अडवाणी अंतिमत: हरलेले आहेत. एका राजकीय शोकांतिकेचा नायक म्हणून त्यांचं नाव नोंदवलं जाईल. अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेच्या प्रसंगी अडवाणी यांच्या डोळ्यात आलेले, महाशोकांत नायकाचेही हताश्रू होते... 

२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबतच मुरली मनोहर जोशी, कलराज मिश्र, (निवडणूक लढवणार नाही असं चाणाक्षपणे आधीच जाहीर करणार्‍या) सुषमा स्वराज यांनाही वगळण्यात आलेलं आहे. भारतीय जनता पक्षात वाजपेयी-अडवाणी युगाचा पूर्ण अस्त झाला असून यापुढे या पक्षावर मोदी-शहा शैली आणि वृत्तीची पकड राहणार हाही याचा आणखी एक अर्थ आहे! 

(काही गाळलेला आणि काही जोडलेल्या मजकुरासह जुन्या लेखाचा संपादित मसुदा)    

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 25 March 2019

नमस्कार प्रवीण बर्दापूरकर! नरेंद्र मोदींची कार्यशैली पाहिल्यावर अडवाणींची एक त्रुटी प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे अडवाणींकडे कार्यविभाजनाची दूरदृष्टी नसणे ही होय. मोदींनी अमित शहांवर निवडणुका जिंकायची जबाबदारी टाकली आहे. तशी अडवाणींना कुणावरही टाकता आली नाही. वाजपेयींना अडवाणी निवडणुका लढवून द्यायचे. पण अडवाणीच जर पंतप्रधान व्हायचे म्हणणार असतील तर त्यांना निवडणूक कोण लढवून देणार, असा प्रश्न उपस्थित होतो. अडवाणी हे वाजपेयींच्या १९९९च्य शासनात गृहमंत्री होते. या जबाबदारीमुळे त्यांचं पक्षाकडे दुर्लक्ष झालं ही वस्तुस्थिती आहे. पक्षाचे सर्वेसर्वा पक्ष सोडून इतरत्र लक्ष घालंत असतील तर नुकसान होणारंच ना? २००४ साली भाजप निवडणुका हरली, त्यात पक्षशैथिल्य या घटकाचा कितपत वाटा होता यावर फारशी चर्चा झाली नाहीये. याव्यतिरिक्त अडवाणींची दुसरी गंभीर त्रुटी म्हणजे सुधींद्र कुलकर्णी यांच्यासारखे अस्तनीतले निखारे. अशांना अडवाणींनी वेळीच दूर करायला हवं होतं, पण ते झालं नाही. त्यामुळे कट्टर हिंदूंमध्ये अडवाणींची प्रतिमा संशयास्पदच राहिली. मोदींचा पर्याय मिळाल्यावर अडवाणी आपसूकच अडगळीत गेले. असो. तुमचा लेख आवडला. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......