वायुसेना, सरकार यांच्या पराक्रमाच्या बातम्या देताना पत्रकारिता काळवंडली!
पडघम - माध्यमनामा
रवीश कुमार
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 28 February 2019
  • पडघम माध्यमनामा टीव्ही चॅनेल्स TV Channels वृत्तवाहिन्या News Channels रविशकुमार Ravish kumar

जेव्हा नेमकी माहिती मिळण्याची गरज असते, तेव्हा भिस्त असते मीडियावर. आणि अनुभव असा की, अशा वेळी आपली माध्यमं तोकडी पडतात. आजही तसंच झालं. दणादणा म्युझिक, आवेशपूर्ण स्वर, स्क्रीनवर बॉम्बच्या धुरळ्याचं नेपथ्य, व्हर्च्युअल युद्धच घडवून आणत होते सगळे जण स्क्रीनवर. कानठळ्या बसवणारे आवाज आणि ‘२१ मिनिटांची कारवाई समजून घ्या ३ मिनिटांत’ या प्रकारच्या मथळ्यांची रेलचेल. पुन्हा हे सारं प्रत्येकच ठिकाणी एक्स्क्ल्युजिव - असं आज विविध चॅनल्सवर खूप पाहिलं. फेसबुककरांपेक्षाही खूप चेतलेला, अधीर झालेला मीडिया पाहिला. त्यावर काही लिहायचं सुचत असतानाच रवीशकुमारनं त्याच्या आज, २६ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजता प्रकाशित झालेल्या पोस्टमध्ये या प्रकारच्या पत्रकारितेबद्दल स्पष्टच लिहिलेलं वाचलं. त्याच्याच पोस्टचा हा पत्रकार मेधा कुळकर्णी यांनी केलेला स्वैर अनुवाद….

............................................................................................................................................................

भारतीय लढाऊ विमानं पाकिस्तानच्या सीमेपलीकडे घुसली, बॉम्बफेक करून सुखरूप परतली. कमाल केली भारतीय वायुसेनेनं. मात्र, ही बातमी ब्रेक केली पाकिस्तानी सेनेनं. भारतातले पत्रकार सकाळी उशिरापर्यंत झोपतात. तसंही, सकाळी चॅनल्सवर ज्योतिषीमंडळीच अँकरिंग करतात म्हणा!

पहिली बातमी पाकिस्तान प्रवक्ता मेजर जनरल गफूर यांनी ५ वाजून १२ मिनिटांनी ट्वीट करून सांगितली की, भारतीय सेना आतपर्यंत आली होती. आम्ही ती परतवून लावली. तपशील नंतर सांगितला जाईल. त्यानंतर ७ वाजून ६ मिनिटांनी ट्वीट केलं की, मुज़फ्फराबाद सेक्टरमध्ये भारतीय विमानं घुसली. पाकिस्तानी वायुसेनेनं प्रत्युत्तर दिलं आणि त्या गडबडीत बालाकोटजवळ बॉम्ब टाकले गेले. कोणीही मृत झालं नाही, काहीही नुकसान झालं नाही. यांचं तिसरं ट्वीट ९ वाजून ५९ मिनिटांनी आलं की, भारतीय सेना आज़ाद काश्मीरच्या तीन-चार मैल आतमध्ये मुज़फ़्फ़राबाद सेक्टरमध्ये जबरदस्तीनं घुसली. आणि पाकनं प्रत्युत्तर दिल्यानं माघारी परतायला लागल्यानं त्यांनी मोकळ्या जागेत बॉम्ब टाकले. आणखी तपशील, तांत्रिक बाबींची माहिती नंतर सांगितली जाईल.

या तिसऱ्या ट्विटनंतर मेजर जनरलसाहेबांकडून ना अन्य ट्विट आलं, ना कुठली माहिती आली. त्यानंतर ११.३० ला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद झाली. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी जाहीर केलं की, दहशतवादी संघटना जैशच्या अड्ड्यावर नेम साधला आहे. भारताला खात्रीशीर माहिती समजली होती की, जैश भारतावर फिदायीन हल्ल्यांच्या तयारीत आहे. त्यापूर्वीच, जैशला नामोहरम करण्यासाठी भारतानं ही अ-सैन्य कारवाई केली. एकही सामान्य नागरिक यात मारला गेला नाही. या पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तरं झाली नाहीत. भारतीय वायुसेनेचं नावही घेतलं गेलं नाही. कारवाईचं नेमकं ठिकाणही सांगितलं गेलं नाही. पाकमध्ये घुसून ही कारवाई केली की, पाकव्याप्त काश्मीरमध्ये केली गेली, हेही नाही सांगितलं.

...............................................................................................................................................................

या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y3g5mf7t

...............................................................................................................................................................

भारतानं आधिकारिक घोषणा अशी सौम्यपणे केली. पण पाकिस्ताननेच या कारवाईला दुजोरा देत भारताची विमानं कुठवर घुसली ते सांगितलं होतं. उमर अब्दुल्ला यांनी आधी बालाकोटबद्दल प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, काश्मीर पख़्तूनख़्वामध्ये हे घडलं असेल तर ही मोठीच कारवाई आहे. तसं नसेल तर ही केवळ सांकेतिक कारवाई ठरेल. मात्र, नंतर त्यांनी पुन्हा ट्वीट करून सांगितलं की, कारवाई काश्मीर पख़्तूनख़्वामध्येच झाली आहे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे.

युद्ध किंवा दोन देशांतला ताणतणाव हा काळ मीडियासाठी आव्हानात्मक असतो. ‘ऑफ रेकार्ड’ आणि ‘ऑन रेकार्ड’ मिळणारी माहिती, त्या पुष्ट्यर्थ पुरावे मिळवणं किंवा प्रश्न उपस्थित करणं – या सगळ्यावर बऱ्यापैकी मर्यादा येते. सगळ्याच माहितीचा सोर्स सहसा एकच असतो. दुपारी अनेक चॅनल्स सांगू लागली की, आतंकी मसूद अज़हरचा मेव्हणा मारला गेला आहे. त्याचा भाऊ सासुरवाडीला गेला आहे. तेव्हा, जो मेला असण्याची शक्यता आहे, तो मेव्हणाच असला पाहिजे. पण ही माहिती कुठून मिळाली, ते कोणालाच माहीत नव्हतं. अनेकदा संरक्षण मंत्रालय किंवा परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती मिळते. ‘ऑफ रेकार्ड’ मिळालेली माहितीदेखील खात्रीची असू शकतेच. पण आज माध्यमांच्या वार्तांकनामध्ये गोंधळ सुरू राहिला. मरणाऱ्यांचा आकडाही वेगवेगळा सांगितला जात होता. पाकिस्तान म्हणत राहिलं की, कोणीही मृत झालेलं नाही. भारतीय वायुसेनेनं शानदार काम केलं आणि गप्प राहिली. त्यांच्याकडून एकही ट्वीट केलं गेलं नाही.

या हल्ल्याचं नियोजन कसं केलं गेलं, याचा तपशील आत्ता हाती यायला लागला आहे. मिराज २००० लढाऊ विमानांनी केलेली कमाल चर्चेत आहे. भारतीय सैनिकांवर एकही ओरखडा उमटला नाही, म्हणजे किती कुशलपणे रणनीती आखली होती. इतकं अचूक आणि निर्दोष ऑपरेशन, ही मोठीच गोष्ट. वायुसेनेच्या या पराक्रमाचा लोक गौरव करू लागले. अभिनंदन, कौतुक यांचा वर्षाव सुरू झाला.

दरम्यान, मीडियातून खातरजमा करता न येणाऱ्या बातम्यांचा भडिमार सुरू झाला होता. चर्चा आणि घोषणा राजकीय होऊ लागल्या होत्या. सरकार आणि वायुसेना यांच्या पराक्रमाच्या ऎन वेळेला चॅनल्सचं (वृत्तपत्रं आणि त्यांच्या वेबसाईट्सचंही) जे अधःपतन दिसलं, त्याविषयीही बोलावंच लागेल. आज सरकारी निवेदनातले शब्द अधिक संयमित, सकारात्मक होते. मात्र, चॅनल्सची भाषा आणि स्क्रीन्स जणू व्हीडिओ गेम झाले होते. टीव्ही न्यूज़नं इतकी खालची पातळी गाठणं, हे या गौरवाच्या क्षणीच नीट समजून घेतलेलं बरं.

चॅनल्स वेगवेगळी, पण सगळ्यांचं पब्लिक एकाच प्रकारचं आहे, हे मी पुन्हापुन्हा सांगत आलोय. हा एक प्रकार सोडता, बाकीचं पब्लिक चॅनल्सनी केव्हाचंच हद्दपार करून टाकलंय. अँकरांच्या हावभावावरून वाटत होतं की, हीच मंडळी विमानं घेऊन शत्रूच्या प्रदेशात घुसली होती. आपल्या देशात युद्धकाळातल्या आदर्श पत्रकारितेचा असा कोणता नमुनाच नाही. ना आपल्याकडे, ना त्यांच्याकडे. मिळालेली माहिती किती प्रमाणात लोकांपुढे ठेवायची, हे ठरवणंही अशा प्रसंगी अवघड असतं.

आपणा सर्वांच्या हृदयांत स्वाभाविक देशप्रेम असतं. आणि त्यावरच भरवसा ठेवलेला बरा. जी चॅनल्स आत्ता आपल्याला देशप्रेमानं माखू बघताहेत, तीच उद्या भूतप्रेत दाखवायला लागतील, तेव्हा काय करणार आहोत आपण? या ऎतिहासिक क्षणीच हा फरक उघड झालेला बरा. याच ऎतिहासिक क्षणांचा मीडियानं कसा फार्स करून टाकला आहे, बघा. भारतीय सेना आणि सरकारचं यश एकीकडे आणि मीडिया त्याला देत असलेलं तमाशाचं स्वरूप दुसरीकडे. मीडियाचा तमाशा आणि मूळ बातम्या, खरी माहिती यातलं पवित्र काय, ते ठरवायला हवं.

आज पंतप्रधानांचा दिवस कितीतरी अधिक रचनात्मक होता. ते गांधी शांती पुरस्कारापासून गीतापाठापर्यंतच्या कार्यक्रमांत सामील झाले. गीतेचं वजन ८०० तर बॉम्बचं १००० किलोग्राम असल्याचं सांगितलं गेलं. दोन्ही ‘अ-सैन्य’च! त्यांनी प्रकाशित केलेल्या गीताग्रंथाची छपाई इटलीत झाली आहे. बघा, चॅनल्सनी आज लोकांना माहिती देण्याची, सुजाण करण्याची मोठीच संधी गमावली. आज गांधींना शांती मिळाली किंवा गीताद्वंद्वाचं कोडं सुटलं की नाही कोण जाणे! पण सूत्रांना आज खूप काम पडलं. ही सूत्रच नसती, तर चॅनल्स पाच मिनिटांहून जास्त काळ कार्यक्रम करूच शकली नसती!

पाकिस्तान घेरलं गेलंय. हा देश मनोवैज्ञानिक, रणनीतिक आणि कूटनीतिक पराजयाच्या टोकावर आहे. तो उसळून उठेल. काय करेल, ते बघावं लागेल. भारतीय बाजू त्याने फेटाळून लावली आहे. पाकच्या कारवाईची शक्यता लक्षात घेऊन भारताची सीमा सज्ज ठेवली आहे. युद्ध होईल का? माहीत नाही. आजचा दिवस मात्र ऐतिहासिक आहे.

............................................................................................................................................................

मूळ पोस्ट : रवीशकुमार, स्वैर अनुवाद : मेधा कुळकर्णी

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

Post Comment

ramesh singh

Thu , 28 February 2019

तुम्हाला काही लिहायचे सुचायला वेळ गेला ते बरे झाले. अन्यथा रवीश कुमार यांच्या पोस्टऐवजी तुमचे उथळ संपादकीय वाचावे लागले असते.


Mahesh Pokharanakar

Thu , 28 February 2019

सुंदर लेख!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......