निवडणूक निकाल : काही निरीक्षणं
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, चंद्रशेखर राव, वसुंधरा राजे, शिवराजसिंग चौहान,रमणसिंह आणि लाल थानहवला
  • Sat , 15 December 2018
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi राहुल गांधी Rahul Gandhi भाजप BJP काँग्रेस Congress वसुंधरा राजे Vasundhara Raje शिवराजसिंग चौहान Shivraj Singh Chouhan रमणसिंह Raman Singh के. चंद्रशेखर राव K Chandrashekar Rao लाल थानहवला Lal Thanhawla

१.

‘काँग्रेसमुक्त भारत’ ही केवळ वल्गना आहे, भारतातून काँग्रेसचं उच्चाटन कधीच होणार नाही. कारण सर्वधर्म समभाव हा विचार घेऊन या देशात वावरलेल्या आणि विस्तारलेल्या काँग्रेसनं देशातील सर्व जाती-उपजाती-पोटजाती, विविध भाषक, अनेक धर्म, परस्परभिन्न संस्कृती यांची मोट या देशात सर्वांत आधी बांधली. काँग्रेस नेत्यांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलं, स्वातंत्र्यानंतरही इंदिराजी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी प्राणाहुती दिली, पक्षाची पाळंमुळं देशाच्या कानाकोपर्‍यात, वाड्या-तांड्यापर्यंत पोहोचलेली आहेत. काही कमी-जास्त असलं, काही गंभीर चुका झालेल्या असल्या तरी लोकांना हा पक्ष आपला वाटतो. त्यामुळे कोणी कितीही वल्गना केल्या तरी ‘काँग्रेसमुक्त भारत’ हे स्वप्न कधीही अस्तित्वात येणार नाही, असं मी जे  २०१३पासून सातत्यानं लिहितो आहे, त्यावर नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानं शिक्कामोर्तब केलेलं आहे.

मंदिरांना भेटी, गोमूत्र आणि शेणापासून गोवर्‍यांचं उत्पादन, गोशाला असा मवाळ हिंदुत्वाचा राहुल गांधी आणि काँग्रेसनं चोखाळलेला मार्ग या देशातील अनेकांना रुचलेला नाही. त्यामुळे काँग्रेसचं भगवीकरण होतं असल्याची चिंता अनेकांना वाटते. याची दखल काँग्रेस घेणार, का मतांसाठी असे अनुनय यापुढेही करत राहणार?   

२.

राहुल गांधी यांनी आज तरी स्वत:ला सिद्ध करण्याचं आव्हान पेललं आहे, हाही या निकालांचा अर्थ आहे. भाजप आणि नरेंद्र मोदी यांचं आव्हान स्वीकारण्यास आपण तयार आहोत, याचे स्पष्ट संकेत राहुल गांधी गुजरात निकलातून दिलेले होते. तरी ते गंभीरपणे न घेण्याचा कोडगेपणा भारतीय जनता पक्षाच्या सर्व पातळीवरील नेत्यांनी अवलंबला आणि ‘काँग्रेसमुक्त भारता’च्या वल्गना सुरूच ठेवल्या. कोणाला संपवण्याची संकल्प करून आपण मोठं होत नसतो, हा धडा नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपच्या नेत्यांना या निकालांनी शिकवला, हाही या निकालांचा एक अर्थ आहे. बुद्धिभ्रम करून आणि लोकांची भलावण करून सत्तेत काही काळ राहता येतं, जनतेच्या मनात कायम नाही राहता येत, हाही इशारा या निकालातून मतदारांनी भाजपला दिला आहे.  

३.

लोकशाहीत कुणीच ताम्रपट्टा घेऊन जन्माला आलेला नसतो. शेवटी मतदार ठरवेल त्याच्याच गळ्यात सत्तासुंदरी पडते याची जाणीव या निकालांनी भाजपला करून दिलेली आहे. पराभव झाल्यावर मतदारांचा निर्णय स्वीकारण्याचा आणि त्या पराभवाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेण्याचा जो उमदेपणा रमणसिंह, शिवराज चौहान आणि वसुंधरा शिंदे यांनी दाखवला, तो नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना दाखवता आलेला नाही. या देशात रुजलेली ही लोकशाही अजून मोदी-शहा आणि भाजपच्या बहुसंख्य यांच्या रक्तात नाही, हाही या निकालांचा आणखी एक अर्थ आहे. 

भारतीय जनता पक्ष हा काही आता आदर्श आणि साधनशुचितेचा जप करणारा राजकीय पक्ष राहिलेला नसून काँग्रेससारखाच तद्दन व्यावसायिक राजकीय पक्ष झालेला आहे. त्यामुळे भाजप या पराभवातून ‘योग्य’ तो धडा शिकून दुप्पट जोमानं कामाला लागेल आणि पराभवाचं उट्टं काढण्याचा प्रयत्न करेल, हा इशारा काँग्रेसनं समजून घ्यायला हवा.   

४.   

या निकालाचा म्हणजे विशेषत: राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील मतदारांच्या कौलाचा आगामी लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही, असं जे म्हटलं जातंय त्यातही तथ्य नाही, असं ठामपणे वाटतं. मला आठवतात ते, २०१३ या वर्षी झालेले याच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल. त्यावेळी मी दिल्लीत होतो आणि त्या निकालांतूनच देश काबीज करण्याचं स्वप्न आवाक्यात आल्याचं भाजपला आणि पंतप्रधानपद टप्प्यात आल्याचे संकेत नरेंद्र मोदी यांना स्पष्टपणे मिळालेले होते (जसे की आता राहुल गांधी आणि काँग्रेसला मिळालेले आहेत). नरेंद्र मोदी ही तेव्हा एक व्यक्ती किंवा केवळ नेते राहिलेले नव्हते, तर ती एक ‘लाट’ बनलेली होती. ‘लाट’ हा शब्द काँग्रेस किंवा माझा नाही, तर भाजपच्या नेत्यांनी आणि माध्यमांनी वापरलेला आहे. ती ‘लाट’ २०१४च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम राहिली. 

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यात मिळून लोकसभेच्या जागा आहेत ६५ आणि २०१३च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या आधारे मांडलेल्या सूत्राप्रमाणे २०१४च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल ६१ जागी भाजपने विजय संपादन केलेला होता. तेव्हा जे सूत्र लागू करण्यात आलेलं होतं, तेच याही (आता लाट ओसरल्यावर) वेळी लागू केलं, तर तर त्याआधारे येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २३ आणि काँग्रेसला ४० जागा मिळतील असा अर्थ होतो. उत्तर प्रदेशात असलेल्या लोकसभेच्या ८० पैकी ७३ जागा लाटेच्या याच सूत्रांनुसार भाजपनं जिंकल्या होत्या. या प्रदेशात विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळूनही मोदी/भाजप/योगी यांची लाट ओसरलेली आहे. त्यानुसार किमान निम्म्या म्हणजे ३५ ते ३८ जागा भाजप गमावणार असे अंदाज आलेले आहेत. गुजरात‘गडा’चे चिरे राहुल गांधी यांनी आधीच खिळखिळे केलेले आहेत. शिवसेनेशी युती झाली तरी महाराष्ट्रात ३२ ते ३४च जागा मिळतील. आंध्र आणि तेलंगणातून फार काही आशा बाळगावी अशी स्थिती नाही. पश्चिम बंगाल आणि कर्नाटकातून फार फार तर पाच-सात जागांची आशा आहे.

याचा अर्थ गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा २०१९च्या निवडणुकीत भाजपला ९० ते १०० जागा कमी मिळतील. या जागा भरून निघाल्या नाहीत तर एकता भारतीय जनता पक्ष तर सोडाच एनडीए (भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी!) सुद्धा देशाची सत्ता मिळवू शकणार नाही, हाही या निकालांचा आणखी एक अर्थ आहे.

शिवाय ‘लाट’ आज ना उद्या ओसरणारच आहे, तेव्हा किमान पिण्याच्या तरी पाण्याची (म्हणजे जनाधार कायम राखण्यासाठी निगुतीनं कारभार करण्याची) तरतूद वेळीच करून ठेवायला हवी याचं भान असणारे नेते भाजपमध्ये नाहीत, असाही या निकालांचा अर्थ आहे! 

५.

भाजपचा ‘सुपडा साफ झाला’, ‘भाजपची दारुण पीछेहाट’ हे विश्लेषकांनी मांडलेलं मत वा निष्कर्ष मान्य होण्यासारखा नाहीच. कारण मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला एकूण २३० पैकी १०९ म्हणजे ४७.४ टक्के जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला ११४ म्हणजे ४९.६ टक्के जागा मिळालेल्या आहेत. एकूण मतांच्या भाजपला १ कोटी १६ लाख ५० हजार ७५१ तर काँग्रेसला १ कोटी १६ लाख ६१ लाख ५६१ मतं मिळाली आहेत. राजस्थान विधानसभेत भाजपला १९९ पैकी ३६.५ म्हणजे ७३ (१ कोटी २८ लाख ३४ हजार १९० मते)  तर काँग्रेसला ४९.५ टक्के म्हणजे ९९ ( १ कोटी २९लाख ८९ हजार ५३ मतं) जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे या दोन मोठ्या राज्यात काँग्रेस आणि भाजप हेच दोन पक्ष प्रामुख्यानं अस्तित्वात असून यापुढील देशातील राजकीय लढती (काही राज्यात प्रादेशिक पक्ष त्यांचं अस्तित्व कायम राखूनही) या दोन पक्षांतच  होतील हे स्पष्ट आहे.

दुसर्‍या शब्दात सांगायचं तर राष्ट्रीय राजकारण यापुढे प्रामुख्यानं काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन पक्षाभोवतीच केंद्रित राहील. हे समजण्यासाठी या दोन्ही पक्षांची पाळंमुळं अगदी तळागाळापर्यंत कशी पोहोचलेली आहेत, हे नीट उमजून घ्यावं लागेल. ही मुळं पक्की होण्यात कुणाच्या यशापशाचा वांता नाही, तर ते नियोजनबद्ध संघटनात्मक काम आहे, हे ज्याला नीट उमजेल तो म्हणेल, या पक्षांची सरकारं कशी कामगिरी करतात यावर या दोन्ही पक्षांचं प्रत्येक निवडणुकीतील यशापयश अवलंबून राहील. त्यामुळे काँग्रेसच्या अपयशात भाजपचं यश दडलेलं आहे किंवा भाजपच्या अपयशात काँग्रेसच्या यशाची बीजं आहेत, अशी भोंगळ विधानं तथाकथित राजकीय विश्लेषक आणि विचारवंतांना यापुढे बाद करावी लागतील.

६.

आणखी एक मुद्दा प्रचाराच्या पातळीचा आहे. प्रचाराच्या घसरलेल्या पातळीसंबधी विश्लेषक आणि विचारवंताना फारच काळजी वाटत असल्याचं वेगवेगळ्या चर्चातून जाणवतं. यासाठी कोणत्या एका पक्षाला जबाबदार किंवा अपवादही ठरवता येणार नाही. विशेषत: १९८० नंतर गल्ली ते दिल्ली अशा प्रत्येक निवडणुकीतील प्रचाराची पातळी खालीच घसरत चाललेली आहे. नथुराम गोडसेचे पुतळे उभारण्याची भाषा आपल्याच राज्यात झाली होती आणि मनमोहन सिंह हे ‘कमजोर’ पंतप्रधान आहेत, ही भाषा करणारे साधनशुचितावाले होते! फार लांब कशाला नरेंद्र मोदी यांचा भारतीय राजकारणात उदय झाल्यावर गुजरात विधानसभा निवडणुकीत ‘मौत का सौदागर’ ही भाषा करणारांनी घसरलेल्या पातळीवर बोलणं हा भोंदूपणा आहे. कुणी कुणाला ‘पप्पू’ म्हटल्यावर कुणाला वाईट वाटतं, पण पंतप्रधानांना ‘चोर’ म्हटल्याचा आसुरी आनंद होतो, हा दुटप्पीपणा आहे. कुणाची ‘चड्डी’ काढणारे ‘जाणते राजे’ असतात आणि त्यांनी भाषणात तशी भाषा वापरली की टाळ्या वाजवणारे काय साधू संत थोडीच असतात? सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी यांनी सस्मित अभिवादन केलं नाही असे गळे काढणारे याच काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याच पक्षाचे पी. व्ही. नरसिंहराव समोर आल्यावर नापसंतीनं मान वळवली, हे कसं काय विसरता येईल?

सर्व भेद वळचणीला लटकवून  सभ्यता, शिष्टाचार विसरणं ही आपली सर्वपक्षीय राष्ट्रीय संस्कृती झालेली असताना पातळीची अपेक्षा बाळगणं निर्भेळ बावळटपणा नाही का?

७.

ज्या देशाच्या बहुसंख्य समाजाचीच सुसंस्कृतपणाची पातळी खालावलेली आहे; जो समाज बहुसंख्येनं गडद राजकीय-जातीय-धार्मिक विचाराचे चष्मे घालून एकारला आणि कर्कश्श झालाय, त्या समाजाच्या नेत्यांकडून सभ्यतेची अपेक्षा कशी काय बाळगता येईल? जसा समाज, तसं त्या समाजाचं नेतृत्व असणार हे उघडच आहे. देशातील येत्या निवडणुकांत प्रचाराची पातळी आणखी घसरतच जाणार आहे... आई-बहिणीचा असभ्य उच्चार जाहीरपणे होण्याचे दिवस दूर नाहीत, हाही या निवडणुकीतील प्रचारानं दिलेला संकेत आहे...                

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Pravin Lanke

Sat , 15 December 2018

सर, अतिशय सुंदर विश्लेषण आपण या लेखात केले आहे. धन्यवाद


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......