खटाववाडीत आता ‘मौज’ राहिली नाही!
दिवाळी २०१८ - संकीर्ण
विकास परांजपे
  • राम पटवर्धन, श्री. पु. भागवत, मौज प्रकाशन गृहाची मुद्रा
  • Wed , 24 October 2018
  • दिवाळी २०१८ संकीर्ण राम पटवर्धन Ram Patwardhan श्री. पु. भागवत Shree. Pu. Bhagwat मौज प्रकाशन गृह Mouj Prakashan Griha खटाववाडी Khatav Wadi गिरगाव Girgaon

मराठी साहित्य विश्वात ज्याचा ‘खटाव विद्यापीठ’ असा बोलबाला होता, त्या मौज प्रकाशन व प्रेसमध्ये मी पहिल्यांदा १९८७-८८ साली गेलो. तेव्हा प्रेस दुमजली होता. दुसऱ्या मजल्यावर भागवत बंधूंची कार्यालये होती. दुसरा मजला लाकडी होता. जागेला मोठमोठ्या खिडक्या होत्या. त्यामुळे प्रकाश व हवा भरपूर होती. भागवतांच्या उदारमतवादी विचारांमुळे वातावरणही मोकळेढाकळे असे. या ठिकाणी प्रभाकाका, मुकुन्दभाऊ, संजयभाऊ, माधवभाऊ अशा सर्वांची टेबले होती. गुरुनाथ सामंत आणि प्रेसचे मॅनेजर पाठक इथेच बसत. त्यापुढील विस्तीर्ण जागेत मुद्रणासाठी खिळे जुळवण्याचे काम चाले. 

त्या विशाल जागेत एकत्र यायला बैठका घ्यायला भरपूर वाव होता. त्या सुमारास अप्पा परचुरे, पांडुरंगशेठ कुमठा, धनंजयशेठ ढवळे, मुकुंद भागवत यांच्या पुढाकाराने आम्ही काही प्रकाशकांनी एकत्र येऊन ‘मराठी ग्रंथ प्रकाशक संघटना’ अशा दणकट नावाची एक अगदी अशक्त संघटना काढली. भागवतांनी आपल्या जागेत या संघटनेला उदार आश्रय दिला तो शेवटपर्यंत.

प्रारंभापासून या संघटनेच्या बैठका या मौजच्या जागेतच झाल्या. पहिल्या मजल्यावर जिना चढल्यावर समोरच एक खोली होती. तिला ‘प्रभाकाकांची खोली’ म्हणत. पण त्यात प्रभाकाका क्वचितच बसत. पूर्वी तिथे पटवर्धन बसत व त्याहीपूर्वी तिथे दलालांचा स्टुडिओ होता. डाव्या बाजूला प्रकाशनाचे कार्यालय होते. उजव्या बाजूला वर जाण्यासाठी आतून एक जिना होता. या जिन्याने वर जाताना आपण एखाद्या अदभुत जागेत प्रवेश करत आहोत, असा भास होई.

मी मौजेत जायला लागलो आणि तीन-चार वर्षांत लेटर प्रेस बंद होऊ लागले. मौजेनेही तो निर्णय घेतला. दुसरा मजला गेला. आता भागवत बंधूंची बसण्याची जागा, प्रेसचे कार्यालय तळमजल्यावरील प्रेसच्या पोटमाळ्यावर आले. ही जागा तशी आटोपशीर असल्यामुळे तिथे थोडी ‘भाऊगर्दी’ व्हायला लागली. उजवीकडील प्रकाशनाच्या जागेत थोडे फेरफार झाले. ही जागाही भरपूर खिडक्या असणारी आणि हवेशीर होती. तर प्रेसचे कार्यालय वातानुकुलित झाले. सगळे भागवत तसे वातानुकूलित होतेच! या जागेत दलालांनी केलेली गांधी आणि टिळकांची पोर्ट्रेट होती. यांच्या मधोमध एक दत्ताची तसबीर! माधवभाऊ बसत त्या बाजूला विष्णुपंत भागवतांचा एक कृष्णधवल फोटो होता. प्रभाकाकांच्या खोलीत त्यांचेच एक पळशीकरांनी केलेले पोर्ट्रेट होते. त्यामध्ये त्यांचे घट्ट मिटलेले ओठ माझ्या अजून लक्षात आहेत. ‘बंद ओठ’ हा त्यांचा स्वभावविशेष होता का माहीत नाही!

मी विष्णूपंताना पाहिलेले नाही, पण संजयमध्ये तो गुण (?) दिसतो हे निश्चित. तसे इतर सर्व भागवत फार बोलायचे अशातला भाग नाहीच. पण सर्वांचा स्वभाव स्वागतशील होता. त्यांना माणसांचा लोभ होता. वेगवेगळ्या विचारांच्या माणसांचे तिथे स्वागत होई. माझ्याबद्दल तर सर्वांनाच विशेष आपुलकी होती. प्रत्येकाची तऱ्हा वेगळी होती. मुकुंदभाऊशी संवाद होई. ते जमाखर्चाचे सगळे काम बघत. संघटनेचे दफ्तर तेच सांभाळत. माधवभाऊ प्रेसचे काम पाहत. आणि त्यांना छपाईच्या तंत्राची उत्तम जण होती. सकाळी सर्वांत आधी आठ वाजता ते प्रेसमध्ये हजर असत. सुट्टी त्यांना माहीत नव्हती. ते दुसऱ्याला कुठल्याही प्रसंगात धीर देत. ‘थांब रे तू, शांत बस. मी सगळं बघतो आता’ असे म्हणत आणि आपले काम बाजूला टाकून मदतीचा हात पुढे करत. पण काही वेळा प्रश्न विचारून भंडावून सोडत. या दोघांचाही मला आधार वाटे. प्रभाकाका गत कालात रमलेले असत. त्यांच्याकडे आठवणींचा मोठा खजिना होता. आपल्याला वेळ असेल तर तो उलगडायला ते केव्हाही तयार असत. कामगारांना त्यांचा धाक वाटे. त्यांना अनेक लोक भेटायला येत. मौजेच्या सर्व लेखकांशी त्यांचा आणि माधवभाऊचा चांगला संपर्क होता.

जगाची आणि व्यवहाराची उत्तम जाण आणि साहित्याची समज याबाबतीत संजय माझ्या मते अव्वल आहे. त्याची आणि माझी मैत्री सर्वाधिक. आपल्या संयत, निरागस स्वभावामुळे त्याचे इतर प्रकाशकांशी आणि विक्रेत्यांशी उत्तम संबंध होते. तो तोंड भरून कधीही बोलत नसे, कारण बहुतेक वेळा ते पानाने आधीच भरलेले असे. एकूण सारे भागवत अगत्यशील होते आणि त्यांच्याशी संवाद साधायला कुणाला फारशी अडचण नसे. त्यांच्यावरील टीका ते अगदी निर्विकारपणे स्वीकारत. विनोदाला गालात हसून दाद देत. खळखळून हसणारा भागवत विरळाच! असे असले तरी मी बरीच वर्षे तिथे जात असूनही या लोकांना आपसांत मोकळेपणाने बोलताना मी कधीही पाहिलेले नाही!  

श्रीपुंना सगळे ‘तात्याकाका’ म्हणत. वास्तविक ते या तथाकथित ‘खटाव विद्यापीठा’चे कुलगुरू. पण गिरगावात क्वचितच येत. त्यांचे अस्तित्व तरीही तिथे जाणवे. त्यांचे नाव घेताच इतरांच्या चेहऱ्यावर त्यांचा ‘दबदबा’ दिसे. महिन्यातून एकदा त्यांच्या घरी सगळे भागवत मिटिंगला जात. मिटिंगची वेळ बहुधा सायंकाळी सहाची असे. मिटिंग सायनला असली, तरी इकडे गिरगावात सारे भागवत सकाळपासूनच शहाण्या मुलासारखे वागत!

सगळ्या भागवतांचा वेश ठरलेला असे. माधवभाऊ धड अर्धा नाही धड पूर्ण नाही असा खादीचा झब्बा घालत. असा झब्बा कुठे मिळतो हे मला कोडेच होते. प्रभाकाका पांढरा शुभ्र पायघोळ झब्बा आणि लेंगा घालत. त्यांच्या हातात एक आंघोळ करायला पुरेल इतका मोठा पांढरा टॉवेल असे. मुकुन्दभाऊ मात्र सर्वसाधारण लोक घालतात तशी पँट शर्ट घालत. संजयच्या वेषाकडे आपण लक्ष देण्याचा प्रश्नच येत नसे, कारण त्याचे स्वतःचेच आपल्या कपड्याकडे लक्ष नसे! गुरुनाथ सामंत झब्बा घालत तर व्यवस्थापक पाठक पांढरा फुल शर्ट घालत. सकाळी आठ वाजता ते प्रेसवर हजर असत. हे पाठक तसे मिस्कील होते. पण कामगारावर त्यांचा वचक होता. तेही कधीकधी कामगारात मिसळून खेळीमेळीने वागत. त्यांची एक सवय होती. विचारांत गढले की, दोन फुटाची मोठी पट्टी घेऊन तिचे एक टोक पुढ्यातील टेबलावर टेकून दुसरे टोक आपल्या ओठांच्या खाली दाबून ते काही काळ जमिनीकडे बघत बसत. मग एकाएकी निर्णय झाल्यासारखे उठून मशिनकडे जात.

बाकी मौजचा कर्मचारी वर्ग मोठा नामी होता. भागवत लोक सगळ्या माणसांना ‘आहेत तसे आहे तिथे’ या तत्त्वावर त्यांच्या गुण दोषांसकट स्वीकारत. ते इथेही दिसून येते. प्रेस दुमजली होता, तेव्हा तिथे शंकर हा वयाने खूपच मोठा असा अतिशय अबोल असा एक माणूस त्यांच्या सेवेत होता. पुढे विलास त्याचा मुलगा तिथेच लागला. हे दोघेही नुसते मौजचे कर्मचारी नव्हते, तर भागवत कुटुंबालाच त्यांनी आपली सेवा देऊ केली होती. शिवराम नावाचा एक कामगार दर गुरुवारी टिळक आणि गांधी यांच्यामध्ये असलेल्या त्या दत्ताच्या तसबिरीला हार घाली. आणि सर्वांना दुधीवडी प्रसाद म्हणून देई. हे तो इतक्या इमानेइतबारे करे की, जो तेव्हा अनुपस्थित असेल तेव्हा त्याच्यासाठी कागदात दुधीवडी बांधून ठेवे. आता ही दत्ताची तसबीर तिथे कोणी कधी लावली, हे मला कोडेच होते. भागवतांपैकी कोणी दत्त संप्रदायी असणे शक्यच नाही. सगळे एकजात निरीश्वरवादी आहेत. पण त्यांनी ही दोन किलो दुधीवडी वाटण्याची परंपरा सुरू ठेवली. भक्तीभाव नसला, तरी सारे भागवत सात्त्विक चेहरा करून दर गुरुवारी दुधीवडी खात, एवढे मात्र खरे! फार नंतर  मला कळले की, ती तसबीर पूर्वी कधीतरी पांडोबा भागवतांनी प्रेसमध्ये लावली होती.

अनंत नवले नावाचा एक शिपाई होता, तो ‘बेणं’ सदरात मोडणारा होता. हा कामगारांचा पुढारी होता. मौज प्रकाशनच्या भागात शिरले की डाव्या बाजूला हेमा नावाची एक टेलीफोन ऑपरेटर बसे. हिला खाण्यापिण्यात फार रस होता. तिच्या कामाची तिची अशी एक गती होती (किंवा नव्हती) त्यामुळे अनेक वेळा असं होई की, माधवभाऊ तिला एखादा फोन लावायला सांगत. तिच्या गतीने तिने त्या व्यक्तीला फोन लावण्याची वाट पाहत (किंवा न पाहताच) ते स्वतःच त्याला फोन लावत. त्याचा हेमाला अर्थात पत्ता नसे. मग हेमाचा फोन होई आणि ती व्यक्ती बुचकळ्यात पडे.

प्रकाशनामध्ये नारायण नावाचा शिपाई किवा ‘सर्व काही’ असा एक माणूस होता. तो मूळचा नेपाळी होता. म्हणूनच असेल पण अतिशय कष्टाळू आणि सदा आनंदी. ही एक वल्लीच होती. त्याचे हिन्दी कम नेपाळी कम मराठी उच्चारच विनोद निर्माण करत. शिवाय त्याला विनोदबुद्धी होतीच. पुस्तकांना त्याने स्वतःची वेगळी नावे ठेवली होती. ‘बटाट्याची चाळ’चा उल्लेख नुसताच ‘बटाटा’ असा करी. हेमा लेले यांचे ‘आत्मनेपदी’ नावाचे एक पुस्तक होते. त्याच्या मुखपृष्ठावरून तो या पुस्तकाला ‘दो हसोंका जोडा’ म्हणे. ते पुस्तक त्यातील मोठ्या टायपामुळे लोक बदकांची गोष्ट समजून घेऊन जातात आणि दोन पाने वाजताच दुसऱ्या दिवशी परत करतात असा किस्सा तो रंगवून सांगे. आपल्या पुस्तकांची ही अशी समीक्षा भागवत मंडळी मुकाट्याने ऐकत. गुरुनाथ सामंतांचा ‘गुरुचरित्र’ हा काव्यसंग्रह काही वेळा ‘ते’ गुरुचरित्र समजून कोणीतरी नेई. आणि अर्थात दुसऱ्या दिवशी परत आणून देई. नारायण ही घटना खुलवून सांगे. सामंतही अगदी निरागस चेहरा करून ते ऐकत.

आठवड्यातून दोनदा पटवर्धन गप्पा मारायला येत, तेव्हा नारायण तिथे हजर असे. आम्हा सगळ्यांना चिवडा-चहा देण्याचे काम तोच करी. त्याचे एकीकडे पुस्तके लावण्याचे कामही चालू असे. कान मात्र पटवर्धन काय बोलतात इकडे असत. आणि मधेच एखादे वाक्य बोलून हशा पिकवी. याशिवाय विनायक धाडी नावाचा एक चालक होता. साधारण चारचौघांत जे बोलू नये ते विनायक हमखास बोले. बरे त्याच्या तोंडात काही शब्द असे होते की, भागवतांच्या तीन चार पिढ्यांत कोणी ते उच्चारले नव्हते! या अशा कर्मचारी वर्गामुळे आप्पा परचुरे मौजला ‘नवरत्नांचा दरबार’ म्हणत.

अशा रत्नांकडून काम करवून घेण्याचे विलक्षण कसब प्रकाशनाचा विक्रीचा पसारा सांभाळणारी सरिता मानकामे-मळेकर हिच्याकडे होते. तिचे व्यवस्थापन कौशल्य वादातीत होते. पुस्तकांच्या विक्रीकडे तिचे बारकाईने लक्ष असे. त्यामुळेच पाडगावकरांसारखे कवी मौजेत आले की, आवर्जून सरिताची विचारपूस करत! गुरुनाथ सामंत यांच्याबाबत लिहावे तेवढे थोडेच आहे. त्यांना संपादनाचा मोठा अनुभव, स्वतः कवी, स्वभाव कमालीचा गरीब आणि भिडस्त. कारण काही असो सामंतांनी कधी गिरगाव सोडले नाही. त्यांचा कविमित्रांचा असा एक मोठा गोतावळा होता. त्यापैकी अनेक जण त्यांना भेटायला येत. सभा-संमेलनांची, विवाहांची निमंत्रणे सामंतांना देत. सामंत सर्वांना ‘प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकत नाही’ हे ठराविक उत्तर टपालाने कळवत. संजय एकदा त्यांना म्हणाला की, तुम्ही दरवेळी पोस्टकार्ड लिहिण्यापेक्षा मी तुम्हाला दोन-तीनशे कार्ड छापूनच देतो. फक्त नाव टाकून पाठवा. यावरही सामंत फक्त गोड हसले. सामंत विडी ओढत, पान खात आणि खुशीत असले म्हणजे रुमालाचे एक टोक तोंडात घालत! श्रीपुंचा त्यांच्यावर भारी जीव होता आणि ते पटवर्धनाचे भक्त होते!

श्रीपु, राम पटवर्धन, श्रीनिवास विनायक कुलकर्णी आणि मोनिका गजेंद्रगडकर अशा चार संपादकांबरोबर सामंतांनी काम केले. त्याबद्दल त्यांनी कधी लिहिले, तर एक चांगला दस्ताऐवज तयार होईल. श्रीपु क्वचित येत, ह्याच कारणाने त्यांनी जोडलेले लेखकही तिथे कमी येत. पटवर्धन वारंवार येत. त्यामुळे त्यांच्या लेखकांचा तिथे अधिक राबता असे. वर म्हटले तसे लेखकांचे दोन गट किंवा ‘सुप्त’ विभागणी होती. पण त्यांच्यात ‘गटबाजी’ अजिबात नव्हती. याचे मुख्य कारण मुळात भागवत लोकांचा ईर्ष्या करणे, स्पर्धा करणे हा स्वभावच नव्हता हेच असावे. पण एरव्ही हा गुण वाटला तरी व्यवसायात ‘व्यावहारिक यश’ मिळायला तो अवगुण ठरू शकतो.

सन १९९७ पासून प्रकाशक म्हणून संजय भागवत यांचे नाव येऊ लागले. संपादनाची जबाबदारी श्रीनिवास विनायक कुलकर्णी सांभाळत होते. तेही दिवाळी अंकाची तयारी सोडली तर गिरगावात कमीच येत. त्यांच्या पश्चात हे काम मोनिका गजेंद्रगडकर करू लागल्या. त्या मात्र दर सोमवारी गिरगावात येत. श्रीपु प्रकाशक होते, तोपर्यंत प्रकाशनाचे-संपादनाचे काम त्यांच्याकडेच चाले. हे दोन्ही संपादक त्यांच्याच घरी काम करत. त्यामुळेच भागवत मंडळीही गिरगावच्या जागेला ‘प्रेस’ म्हणत. प्रकाशन सायनला. कोकणातला माणूस कितीही वर्षे मुंबईत राहिला तरी त्याचे घर कोकणात असते. मुंबईत असते ती केवळ ‘खोली’, त्यातला प्रकार. खटाववाडी हा प्रेस राहिला. श्रीपु ‘प्रकाशक’ असेपर्यंत ते स्वाभाविक म्हणता येईल. पण संजयचे नाव प्रकाशक म्हणून यायला लागल्यावरही ८-१० वर्षांत प्रकाशनाचा केंद्रबिंदू सायनहून गिरगावात सरकला नाही, एवढे मात्र खरे!

मोनिका गजेंद्रगडकर दर सोमवारी येते. मग त्यांना आणि संजयला भेटायला काही नवे लेखक तिथे येऊ लागले. मोनिका विद्याधर पुंडलीकांची मुलगी. स्वतः कथा लेखिका. पण ती छान नकलाही करते. बालपण सदाशिव पेठेत गेलेले असल्यामुळे असेल कदाचित, नावडत्या माणसांच्या नकला करण्यात तिला अधिक रस! ‘चार दिवस मौजेचे’ असा एक साहित्यक गप्पांचा उपक्रम काही काळ चालला. संजय एकदा मोनिकाला ‘आपण एक दिवस तुझ्या नकलांचाच कार्यक्रम ठेवू’ असे म्हणाला होता. कोणा साहित्यिकाबाबत वा त्याच्या साहित्यकृतीबाबत तिचे म्हणणे रोखठोक ती मांडते हे ठीकच. पण एखादे व्रात्य मूल चालता चालता उगाच शेजारील झुडपात काठी मारते, तसे ती दर चार-पाच वाक्यांत कोणाला तरी फटका मारते.

संजय आणि मोनिका यांच्यात फार उत्तम सामंजस्य होते. संजयने संपादक म्हणून तिला पूर्ण स्वातंत्र्य दिले. असे असले तरी एखादा निर्णय कठोरपणे घ्यावा लागला तर ती जबाबदारी स्वतःवर घ्यायला मागेपुढे पहात नसे. अशा वेळी समोरील व्यक्तीच्या ‘मोठेपणाचा’ कोणताच दबाव त्याच्यावर येत नसे. एकदा समाजात सर्व प्रकारचे मानमरातब मिळालेल्या एका ‘प्रथितयश’ लेखकाचे एक हस्तलिखित मौजेकडे आले. संजयला त्यातील ‘वाङमयचौर्य’ लक्षात आले. मौजनेच पुस्तक काढावे असा त्या लेखकाचा आग्रह होता. संजय त्याच्या मोठेपणाला बधला नाहीच, वर त्यांच्या प्रमादाची स्पष्ट जाणीव करून देऊन त्याने त्यांना वाटेला लावले. पुढे ते पुस्तक दुसऱ्या प्रकाशकाने काढून त्याला पुरस्कारही मिळाले, हे सांगायला नकोच! पण संजयला त्याची खंत नव्हती. संजय सदा स्वस्थचित्त असे!

या ‘चार दिवस मौजेचे’ कार्यक्रमाचे आयोजन सुभाष देसाई यांच्या प्रबोधन संस्थेच्या सहकार्याने होत असे. या संस्थेतर्फे सुनील वेलणकर काम पहात. ते भागवत मंडळींचे मित्र आणि ‘सैनिक’. वेलणकरांचा खाक्या ‘तडकाफडकी’ निर्णय घेणे आणि भागवतांची गाडी नुसतेच मौन, हुं, बघू, यापुढे कधी सरकत नसे. त्यामुळे वेलणकरांचा आणि भागवतांचा संवाद मोठा ‘मजेशीर’ असे. खटाववाडीत उपक्रमाच्या आगेमागे महिनाभर त्याचे ‘कवित्व’ चाले. पण अशा विजोड साहचार्यामुळे ‘चार दिवस मौजेचे’ हा उपक्रम जेमतेम चार वर्षे चालला.

‘प्रेस’च्या कीर्तीमुळे इथे काही इतर प्रकाशक आपली छपाईची कामे घेऊन येत. यात परचुरे, डिंपल, पॉप्युलर, शब्द, मॅजेस्टिक, रोहन इ. प्रकाशक येत. त्यामुळेच साहित्यक्षेत्रातील अनेकांचा इथे राबता असे. माधवभाऊ इतर प्रकाशकांची कामेही तेवढ्याच आस्थेने करत. मग कधी ‘पुणे- एका सांकृतिक संचिताचा मागोवा’साठी डॉ. अरुण टिकेकर, तर कधी ‘दाते सूची’साठी डॉ. सरोजिनी वैद्य अशी मंडळी येत. चतुरंग संस्थेच्या स्मरणिका इथेच तयार होत. तर नाना पालकर स्मृती समितीसारख्या सामाजिक संस्थेचे कामही तितक्याच आस्थेने होई. कामाबरोबर गप्पाही चालत. गप्पांना कुठल्या विषयाचे वावडे नव्हते. संगीत, नाटक, सिनेमा, राजकारण सर्व विषय त्यात येत. वाड झडत. उखाळ्या पाखाळ्या काढणे चाले.

नव्या लेखकांमध्ये निळू दामले, अचला जोशी, मीना प्रभू, भानू काळे येत. हे लेखक संजयच्या काळात जोडले गेलेले लेखक आहेत. व्यवसायात नसलेले इतर भागवत तिथे कधी कधी आवर्जून येत. यात श्रीरंग भागवत आणि पद्मा भागवत तर नेहमीच येत. श्रीरंगची ‘मौज’मध्ये खूपच भावनिक गुंतवणूक होती आणि स्वभावानेही तो हळवा. संजयबद्दल त्याला विशेष माया आणि त्याची जमेल तितकी पाठराखण तो करी. त्याची पत्नी पद्मा संपादन सहाय्य करत असल्यामुळे तर तिथे अगदी हक्काने बसे. यशोदा भागवत या प्रेसवर मधून मधून भेट देत. गजानन भागवत हे या भागवतामध्ये एक ज्येष्ठ बंधू. त्यांना सगळे ‘नाना’ म्हणत. त्यांची पत्नी म्हणजे यशोदा भागवत. त्या तेवढ्या त्यांना ‘नाना’ न म्हणता ‘गजानन’ म्हणत.

सुरुवातीला त्यामुळे माझा असा समज झाला होता की, नाना आणि गजानन अशा दोन व्यक्ती आहेत. यशोदावहिनी नेहमी पान खात. एकंदरीत त्या सर्व भागवतांमध्ये ‘बिनधास्त’ भागवत होत्या. संध्याकाळ झाली की हळूच सगळे गेल्याची खात्री पटवून तिथे जया दडकर येत. त्यांना गुरुनाथ सामंत सोडून कोणाला भेटण्यात फारसा रस नसे. तिसरा कोणी आला तर दडकर सावध होत. कडक विडी ओढत दोघांचीच बैठक तिथे रंगे.

पुस्तकांच्या वितरणाचे काम खटाववाडीतूनच चाले. मौजचे एकमेव विक्री प्रतिनिधी होते अरुण गाडगीळ. महाराष्ट्राच्या ग्रंथव्यवहाराची त्यांना साद्यंत माहिती होती. मौजच्या पुस्तक विक्रीसाठी त्यांनी सगळा महाराष्ट्र उभा आडवा फिरला होता. मराठीतील साहित्यिक वर्तुळ सोडले तर गावोगावी विशेषतः विक्रेत्यांमध्ये अरुण गाडगीळ हाच मौजचा चेहरा होता. अरुण गाडगीळ कधी कधी प्रेसवर येत. त्यांच्या मनात सतत पुस्तक विक्रीच्या व्यवहार्य आणि अव्यवहार्य अशा अनेक योजना असत. मुकुन्दभाऊंना त्या ते सांगत. त्यातला अर्ध्या अधिक भागवत लोक फेटाळत. आणि मग गाडगीळ पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासारखे त्या वास्तूत इकडून तिकडे फिरत. त्यांचा त्रागा होई. पण राजापेक्षा राजनिष्ठ सेवक असल्यामुळे ते दोन महिन्यांनी नव्या उत्साहाने तिथे येत. चित्रकार बाळ ठाकूर अधूनमधून तिथे येत. ते फार अल्पाक्षरी बोलत. त्यांनी केलेल्या एखाद्या मुखपृष्ठावर माधवभाऊ, कुलकर्णी वा अन्य कोणी बोले. त्या चित्रात अपेक्षित असलेला बदल, पूर्ण पसंती, पूर्ण नापसंती, स्तुती, कौतुक या सर्वांवर ठाकुरांचे एकच उत्तर असे –एक दीर्घ सुस्कारा आणि मग प्रसन्न हास्य!

नवीन पुस्तकांची खबरबात काढायला रविप्रकाश कुलकर्णी तर कधी पुस्तके विकत घ्यायला शशिकांत सावंत, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे असे अनेक ग्रंथप्रेमी तिथे आवर्जून येत. मौजची पुस्तके इतर विक्रेत्यांकडे मिळत होतीच. पण पान खाणारा माणूस आपल्या नेहमीच्या पानवाल्याकडचे पान जसे ‘रंगते’ तसे इतरत्र खाल्लेले रंगत नाही असे मानतो, त्यातलाच हा प्रकार. मौजमध्ये जाऊन पुस्तक खरेदी करणे यात एक वेगळी ‘मौज’ त्यांना वाटे. याचे एक कारण खटाववाडीतले मोकळे वातावरण आणि तिथे सहज जमणारी ‘गप्पाष्टकं’ हेच असणार. दुसरा एखादा ग्रंथप्रेमी तिथे हमखास भेटेच आणि कोणी नसले तरी गुरुनाथ सामंत एखादा शेर वा किस्सा नक्कीच ऐकवत.

अरुण घाटे, कृष्णा करवार, अंबरीश मिश्र, सतीश भावसार, विजय पाडळकर, भानू काळे, प्रभाकर कोलते, अरुण आठल्ये, श्रीराम सिधये, विकास गायतोंडे अशी विविध क्षेत्रांतील कितीतरी माणसे तिथे मला गेल्या २५ ३० वर्षांत भेटली. एकंदरीत खटाववाडीची ही जागा म्हणजे साहित्यिक सांस्कृतिक ‘पार’ होता. या पारावर मधू मधून हजेरी लावावी असे अनेकांना वाटे. भागवतांनी प्रेस आणि प्रकाशनाचा व्यवसाय सांभाळताना हा ‘कट्टा’ जोपासला. मुख्य म्हणजे त्याला उपक्रमाचे स्वरूप कधी आले नाही. ही चावडी नेहमीच अनौपचारिक आणि म्हणूनच सर्वांसाठी मोकळी राहिली. याचे श्रेय भागवतांच्या स्वागतशील वृत्तीला द्यावेच लागेल. म्हणूनच एखादा पुस्तकप्रेमी मुंबईत दूर कुठे भेटला की, गिरगावात ‘मौज’मध्ये एक ‘चक्कर’ मारणार आहे,, असे म्हणे!

काही वर्षापूर्वी बॉम्बे बुक डेपो बंद झाला. ग्रंथव्यवहार तंत्रज्ञानाच्या गर्तेत सापडला आहेच. आता खटाववाडीतील मौजचा प्रेस बंद झाला. प्रकाशनाचे कार्यालय आणि विक्रीकेंद्र विलेपार्ले येथे गेले.

गिरगाव आता ‘पहिले उरले नाही’!

.............................................................................................................................................

लेखक विकास परांजपे ज्योत्स्ना प्रकाशनाचे संचालक आहेत.

vikas@jyotsnaprakashan.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Vividh Vachak

Mon , 21 January 2019

सुंदर लेख! पारंपरिक प्रकाशन व्यवसायातील अनौपचारिकता आणि जोडलेले संबंध यांचे छान दर्शन झाले. एक विचार मनात येतो : प्रकाशकांची माणसे जोडणारी वृत्ती असल्यामुळे त्यांनी हे लेखकांचे केंद्र बनवले. परंतु ह्या वर्तुळात जर वाचकपण सहभागी झाले असते तर कदाचित पुस्तक व्यवसाय आणखी फोफावला असता. ज्या "पारा"चा आपण उल्लेख केला तोच आजच्या इंटरनेट युगात "ऑनलाईन कम्युनिटी" म्हणून अस्तित्त्वात आहे आणि मोठमोठ्या उद्योगांनी याचा फायदा आपला ग्राहकवर्ग घट्ट धरून ठेवण्यासाठी केलाय. तसे काही जर मौजला करता आले तर फार उत्तम होईल.


Shashank

Thu , 25 October 2018

He sagle vachtana angavar katha ubha rahayla...evdhi bhavya Sahitya parampara..Mi kahi ya vyaktina olkhat nahi pan vachun anand zala...Aaj asa vatavaran kuthay???Soneri divas!!!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख