येशूमधल्या देवत्वापेक्षा येशूमधील माणूसपण आपण ओळखणे आवश्यक आहे...
ग्रंथनामा - झलक
नारायण लाळे
  • ‘शालोम’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Fri , 14 September 2018
  • ग्रंथनामा Granthanama झलक शालोम Shalom नारायण लाळे Narayan Lale

‘शालोम’ हा ‘येशू ख्रिस्त आणि संबंधित मराठी कविता’ असलेला संग्रह नारायण लाळे यांनी साहित्य अकादमीसाठी संपादित केला आहे. या संग्रहात ८२ मराठी कवींच्या १४८ कवितांचा समावेश आहे. या कवितासंग्रहाला नारायण लाळे यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

येशू ख्रिस्त ही एक वैश्विक व्यक्तिरेखा आहे. या विश्वपसाऱ्यात आणि त्याच्या कानाकोपऱ्यात, येशू ख्रिस्ताला ओळखणारी, त्याच्याबद्दल भक्तिभाव जपणारी, त्याची शिकवण अनुसरणारी माणसे संख्येने जास्त आहेत. असे म्हटले जाते की, २०१५ साली जागतिक लोकसंख्येच्या ३१ टक्के लोक ख्रिस्तीधर्मीय म्हणजेच येशू ख्रिस्ताला अनुसरणारे असणार आहेत. इतकेच नाही, ख्रिस्तीतर समाजामध्येही येशू ख्रिस्तावरील प्रेम, त्याच्याबद्दलचा आदर, भक्ती, मनात ठेवून आहेत. हे जागतिक स्तरावरील निरीक्षण आहे. येशू ख्रिस्ताशिवाय अन्य कुठलीही व्यक्तिरेखा इतक्या वैश्विक पातळीवर सर्वज्ञात आहे, असे मला वाटत नाही. तसे पाहिले तर, येशू ख्रिस्ताला इन-मिन तेहतीस वर्षांचे आयुष्य मिळाले. त्यातील तीस वर्षे येशू स्वगृहीच होता. आपल्या वडिलांच्या सुतारकामात हातभार लावत होता. काहींच्या मते येशूचे पूर्वायुष्य कसे होते, हे एक गूढच आहे. आयुष्यातील शेवटची तीन वर्षे येशूने सर्वत्र भ्रमंती केली. गावोगाव तो पायी फिरला. प्रवचन, बोधकथा, दया, क्षमा, शांती, करुणा हे जीवनमार्ग संपूर्ण विश्वरचनेतील समाजमनात झिरपत गेले. विस्तारल गेले. येशू ही अशी व्यक्तिरेखा आहे की, तिचा अनेकानेक माणसांवर, विविध समाजमनांवर प्रभाव दिसून येतो.

‘शालोम’मधील ‘येशू ख्रिस्त आणि संबंधित मराठी कवितां’चे संपादन करताना एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो, तो म्हणजे, या संपूर्ण नावातून (येशू ख्रिस्त आणि संबंधित मराठी कविता) कोणता अर्थबोध होतो? स्पष्ट जाणवणारा एक अर्थ म्हणजे, येशू ख्रिस्तावरील मराठी कविता आणि दुसरा परंतु अध्याहृत असणारा भाग म्हणजे, मराठी ख्रिस्ती कविता. या दोन्ही भागांतील सीमारेषेचा जेव्हा मी शोध घेतला, त्यावेळी असे लक्षात आले की, हे दोन्ही भाग (अर्थबोध) एकमेकांत मिसळले आहेत किंवा इतके एकरूप आहेत की, जसा पाण्यात रंग मिसळावा! पाण्यात मिसळलेला रंग वेगळा काढता येत नाही. त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त आणि ख्रिस्ती यांच्यात भेद करता येणे कठीण आहे.

संपादित कवितांमधून येशू ख्रिस्त, क्रुसिफिकेशन, क्रूस, काटेरी मुकुट असा आला की, ती येशू ‘ख्रिस्तावरील मराठी कविता’ म्हणायचे आणि ‘बायबल’मधील (जुना\नवा करार) वचनांचा, संवादाचा, ख्रिस्ती धर्मस्थलांचा आणि येशू ख्रिस्ताव्यतिरिक्त अन्य व्यक्तींचा उल्लेख, ख्रिस्ती धर्माची नीतितत्त्वे अशा आशयांना व्यक्त करणारी कविता असेल तर ती ‘मराठी ख्रिस्ती कविता’ अशी ढोबळ व्याख्या करून ‘येशू ख्रिस्तावरील मराठी कविता’ आणि ‘मराठी ख्रिस्ती कविता’, असा कृत्रिम भेद दर्शवण्याचा आणि तशा कविता गोळा करण्याचा मी विचार केला नाही. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे येशू ख्रिस्त आणि ख्रिस्ती यामध्ये काही फरक असल्याचे मला जाणवत नाही. म्हणूनच ‘येशू ख्रिस्त आणि संबंधित मराठी कवितांचे संपादन’ असे ‘शालोम’ या नावाला उपशीर्षक देण्याचे मी निश्चित केले. या नावामुळे येशू ख्रिस्त या वैश्विक व्यक्तिरेखेचा विविध अंगांनी उल्लेख असलेल्या कविता, तसेच येशू ख्रिस्ताचा उल्लेख नसलेल्या परंतु ‘बायबल’मधील स्थळ, काल, प्रसंगाचा उल्लेख असलेल्या मराठी ख्रिस्ती कविता आणि ख्रिस्तीतरांनी अशाच प्रकारे लिहिलेल्या मराठी कविता, असा व्यापक आढावा मला संपादनात घेता आला.     

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मराठी साहित्यावर ख्रिस्ती साहित्याचे फार मोठे ऋण आहे. कारण आधुनिक मराठी साहित्याचा उदय आणि उगम ख्रिस्ती साहित्यातून झालेला दिसतो. तंत्र आणि यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने स्पष्ट करायचे झाल्यास, पहिला मराठी टाईप मिशनरींनी पाडला. पहिला छापखाना त्यांनीच मांडला. पहिल्यांदा मराठीत पुस्तके त्यांनीच काढली.

अभिजात साहित्य हे धर्म, भाषा, पंथ यांच्या भेदापलीकडे असते. त्याला मर्यादा नसतात. समाजात एकात्मता निर्माण होण्यासाठी साहित्याचे व्यासपीठ आवश्यक असते. मानवी जीवनाशी साहित्याचे अतूट नाते आहे. मानवी संस्कृती आणि साहित्य यांचे घनिष्ठ संबंध आहेत. संस्कृती विकासात साहित्याला नवनवीन धुमारे फुटतात. संस्कृतीला लौकिक अशी परंपरा आहे. अलौकिकपणाशी तिचा संबंध नाही. म्हणूनच साहित्याचे मूळ स्वरूप सांस्कृतिक आहे. मानवी जीवनात धर्माला आणि साहित्याला अनन्यसाधारण महत्त्व असले तरी या दोन्ही गोष्टी एकत्र नांदत नहीत. धर्म स्थिर आहे, अचल आहे, तर संस्कृती ही गतिमान आहे, परिवर्तनशील आहे. धर्मश्रद्धेवर निष्ठेवर आधारित असतो, तर संस्कृती ही ज्ञानावर, विचारांवर संवर्धित होत असते. नेमका हा फरक (धर्म आणि संस्कृतीमधील) संपादित झालेल्या कवितांच्या वाचनातून सहज लक्षात येतो.

‘शालोम’मधील कवितांच्या संपादनाचा मुख्य उद्देश येशू ख्रिस्त आणि संबंधित मराठी कवितांचे केवळ संकलन असा नसून त्या अनुषंगाने ख्रिस्ती मराठी कवितेची परंपरा, त्यामुळे एकूण मराठी साहित्यातील काव्य विभागत पडलेली समृद्ध भर आणि साहित्यातून (कवितेतून) होणारी संस्कृतीची, भाषेची जपणूक या उद्देशांना समोर ठेवले आहे.

‘शालोम’ या संपादित संग्रहात मराठी साहित्यातील ख्रिस्ती-ख्रिस्तीतर कवींच्या कविता समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कविता संपादनातील कुसुमाग्रजांपासून ते आजच्या नवोदित कवींपर्यंतच्या कवितांमधून येशू ख्रिस्त किंवा त्याच्या संबंधित घटनांचा उल्लेख, कधी संदर्भ म्हणून तर कधी आशयसूत्र म्हणून तर कधी प्रतिमा-प्रतीके म्हणून आला आहे.

जगातील बहुसंख्य समाज ख्रिस्ती धर्मीय आहे. त्यांच्या जगण्यात येशू ख्रिस्त हे प्रेरणास्थान असणे स्वाभाविक आहे. परंतु ख्रिस्तीतर समाजातही येशू ख्रिस्ताबद्दल भक्ती, प्रेम, आदर दिसून येतो. येशू ख्रिस्त म्हणजे दया, क्षमा, शांतीचा सागर होता. त्याच्यातील आणखी एका ऊर्जोचा उल्लेख मला महत्त्वाचा वाटतो. त्याच्यातील प्रचितीस आणून देण्याची शक्ती (कन्व्हिन्सिंग पॉवर). सर्वसामान्यांना एखादी गोष्ट त्यांच्या बोलीत पटवून देणे आणि त्यासाठी सुबोध कृतीचा मार्ग सांगणे, हे येशू ख्रिस्ताचे बलस्थान आहे. एका वेश्येवर दगड मारणाऱ्यांना उद्देशून येशू म्हणतो, ‘ज्याने आयुष्यात पाप केले नाही त्यानेच दगड मारावा.’

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

ही जी माणसांना समजावण्याची ताकद आणि कृती आहे, ती येशूमधील दया, क्षमा, शांती, करुणेचे उगमस्थान आहे. येशूमधल्या देवत्वापेक्षा येशूमधील माणूसपण आपण ओळखणे आवश्यक आहे. या कवितांच्या संपादनाकडे, हा सारा प्रयत्न प्रचारकी आहे, येशूचे महत्त्व वाढवण्यासाठी आहे, अशा दूषित दृष्टीने न पाहता, संग्रहातील कवितांमधील काव्यमूल्यांना, समान सूत्राला, काव्यप्रकाराला, वैविध्याला आणि विविधतेतील एकतेला वाचकांनी आपलेसे करावे, अशी मी नम्र विनंती करतो. कवितांमधील आणि कवींच्या बहुविविधतेमुळे कवी, कविता आणि वाचक एकमेकांशी जोडले जातील, अशी मी आशा व्यक्त करतो.

येशू ख्रिस्ताबद्दल स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘केवळ स्वजातीयांसाठीच नव्हे तर, जगातील असंख्य मानववंशासाठी येशू म्हणजे भावी काळातील एक महान प्रेरक शक्ती आहे. जे काही उच्चतम आणि उत्कृष्ट होते ते सर्व येशूमध्ये मूर्त झाले आहे.’

असंख्य मानववंशासाठी येशू म्हणजे प्रेरक शक्ती आहे. या प्रभावातूनच जगातील अनेक कलाकारांच्या कलाकृतींमध्ये येशूचा संदर्भ येतो, हे आता वेगळेपणाने सांगण्याचे कारण नाही.

‘शालोम : येशू ख्रिस्त  आणि संबंधित मराठी कविता’ - संपादक - नारायण लाळे

साहित्य अकादेमी, दिल्ली | पाने - २०५ | मूल्य - २७५ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 17 September 2018

आयशप्पत नारायणराव, तुमी डायरेक पोपच्या धोतरालाच हात घातलात बगा. पोप काय म्हंतंय की गनपतीचा चर्चमदी कायबी काम नाय. हितं बगा : https://dailycaller.com/2017/08/29/hindu-god-paraded-through-catholic-church-forces-priests-resignation/ . तेचा काय हाय की, पोपच्या मते येशू सादासुदीक मानूस नसून अक्षी द्येवाचा पुत्र हाय. आन तुमी म्हंता की तेला फकस्त मानूस म्हना. आता-गं-बया, कसं निस्तरायचं ह्यो झेंगट ! आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......