कहाणी - बकची आणि जॅक लंडनचीही!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
रमा सखदेव
  • ‘द कॉल ऑफ द वाईल्ड’चं मुखपृष्ठ-मलपृष्ठ
  • Sun , 04 December 2016
  • ग्रंथनामा Booksnama द कॉल ऑफ द वाइल्ड The Call of the Wild जॅक लंडन Jack London

‘द कॉल ऑफ द वाईल्ड’ हे डायमंड पब्लिकेशन्सच्या ‘वर्ल्ड क्लासिक्स’ मालिकेतलं एक अतिशय वाचनीय पुस्तक आहे. १६ ऑगस्ट १८९६ला वायव्य कॅनडाच्या स्थानिक खाणकामगारांना त्या भूमीत सोनं सापडलं. ही बातमी पुढे सिएटल आणि सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत पसरली, आणि १८९६ ते १८९९च्या दरम्यान सुमारे एक लाख माणसांनी सोनं सापडण्याच्या आमिषाने पराकोटीच्या हाल-अपेष्टा सोसून आणि अत्यंत प्रतिकूल निसर्गाशी दोन हात करत या प्रदेशाच्या दिशेने कूच केलं. या मोहिमा ‘क्लॉन्डाइक गोल्ड रश’ नावाने प्रसिद्ध आहेत. सदर पुस्तकाचे मूळ लेखक जॅक लंडन मूळचे कॅलिफोर्नियाचे होते. १८९७मध्ये आपल्या साथीदारांसह त्यांनी याच प्रदेशात मोहीम काढली आणि स्टुअर्ट नदीलगतच्या सुमारे आठ सोन्याच्या खाणींवर त्यांनी स्वतःचा दावा लावण्यात यश मिळवलं.

अशा मोहिमांवर सामान वाहून नेण्याकरता कुत्र्यांकरवी ओढल्या जाणाऱ्या ‘स्लेड’ प्रकारच्या गाड्या वापरल्या जात. त्यामुळे तंदुरुस्त, शक्तिमान कुत्र्यांना त्या काळात मोठा भाव होता.

कॅनडाच्या अगदी पश्चिमेला असलेल्या युकॉन प्रदेशात या कथेतल्या घटना घडतात. प्रस्तुत कथेचा नायक म्हणजे ‘बक’ हा सेंट बर्नार्ड-स्कॉच कॉली या मिश्रजातीचा उमदा कुत्रा आहे. संपूर्ण कथा बकच्या दृष्टिकोनातून लिहिली आहे. हा कुत्रा कॅलिफोर्नियामध्ये एका श्रीमंत घरात ऐशोआरामात जगत असतो, पण एके दिवशी त्या घरातला एक कर्जबाजारी नोकर बकला विकून टाकतो. आयुष्यात पहिल्यांदाच बकला पिंजऱ्यात डांबलं जातं. अतिशय त्रासदायक प्रवासानंतर तो अलास्कात पोचतो. तिथे इतर कुत्र्यांसोबत तोही स्लेडला जुंपला जातो, आणि त्याचे हाल सुरु होतात. निसर्गातल्या हिंस्र स्पर्धेला पहिल्यांदाच तोंड देत असलेला बक मुळात चाणाक्ष आणि तगडा असल्याने तिथले ‘नियम’ पटकन शिकतो, आणि अखेरीस त्या कुत्र्यांचा म्होरक्या असलेल्या स्पिट्झला द्वंद्वात हरवून स्वतः टोळीचा प्रमुख बनतो. कालांतराने कुत्र्यांविषयी जराही माहिती किंवा प्रेम नसलेला हॅल त्याला विकत घेतो आणि बकच्या आयुष्याला पुन्हा एकदा कलाटणी मिळते. नंतर थॉर्नटन नावाचा अतिशय प्रेमळ माणूस बकला हॅलच्या तावडीतून वाचवतो आणि बकच्या आयुष्यातला सर्वात सुखकर काळ सुरु होतो; पण अजूनही त्याच्या आयुष्यात काहीतरी वाढून ठेवलेलं असतं. एका स्थानिक जमातीकडून थॉर्नटनची हत्या होते आणि सैरभैर झालेला बक निसर्गाच्या सादेला अनुसरून, ‘स्व’च्या शोधात रानोमाळ भटकू लागतो. तिथे रानटी लांडग्यांच्या एका टोळीशी त्याचा मुकाबला होतो, आणि स्वतःच्या ताकदीच्या जोरावर तो त्या टोळीवर कब्जा मिळवतो. अशा प्रकारे अखेरीस बक त्याच्या बापजाद्यांचं मुक्त आणि पूर्णपणे जंगली आयुष्य जगू लागतो.

बकची ही विलक्षण कथा वाचताना त्यातले अनेक पदर आपल्यासमोर उलगडत जातात. ही एक रोमांचक साहसकथा तर आहेच. शिवाय यात आपल्याला इसापनीतीतल्या कथांचे अंश सापडतात; तसंच किपलिंगने लिहिलेल्या ‘जंगल बुकचा' प्रभावही दिसून येतो. यापलीकडे पाहिलं, तर आपल्याला ‘निसर्ग विरुद्ध संस्कृती-सभ्यता’ असं द्वंद्वही या कथेमधून दिसतं. मानवी सभ्यतेचा मुलामा केवळ वरवरचा असतो. त्यामुळे जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न येतो, तेव्हा व्यक्तिमत्त्वाचं खरं अक्राळविक्राळ रूप बाहेर येतं. एका पाळीव कुत्र्याच्या दृष्टिकोनातून लेखक समाजाकडे त्याची नजर वळवतो आणि आपल्यासमोर मानवी सुसंस्कृतपणाच्या आड दडलेली अनिर्बंध हाव, अति महत्त्वाकांक्षा उघडी करतो. सरधोपट, आरामशीर आयुष्यातून रांगड्या निसर्गात फेकलं गेल्यावर कुठल्याही प्राण्याला त्या कठोर वास्तवाशी जुळवून घ्यावंच लागतं. कोणतीही गोष्ट गृहीत धरून चालत नाही. कारण अशा वेळी स्पर्धा, संघर्ष आणि साक्षात मृत्य ठायी ठायी वाट पाहत उभा असतो.

एका वेगळ्या पातळीवर बकची ही कथा जॅक लंडनच्या आयुष्याचीही कथा आहे. अलास्कातल्या वास्तव्यात स्वतःची ओळख होईपर्यंतचं जॅकचं आयुष्य काहीसं भरकटलेलं होतं. त्याने हमाली आणि सटर-फटर कामांपासून, ते जहाजावर खलाशी म्हणून काम करण्यापर्यंत अनेक प्रकारची कामं केली होती; पण या सर्वांतून तावून सुलाखून निघालेला जॅक अलास्कातल्या कठीण परिस्थितीत तग धरून राहिला, नव्हे, तो निसर्गावर मात करून जिवंत राहू शकला.

हेमिंग्वेसारख्या नंतरच्या लेखकांवर जॅक लंडनच्या लिखाणाचा प्रभाव पडला, असं मानलं जातं. या सर्वांच्या लिखाणात नैसर्गिक, अनावृत, शुद्ध, स्वच्छंद जीवनशैलीचं काहीसं उदात्तीकरण केलेलं आढळतं. सर्वसाधारणपणे लेखक वापरत असलेली फारशी कोणती ‘डिव्हायसेस’ न वापरता, साध्या सोप्या शब्दांत हे लेखक आपल्या कथा सांगतात.

मूळ इंग्रजी पुस्तकाच्या गाभ्याला आणि शैलीला माधव जोशींनी अजिबात धक्का लावलेला नाही. त्यांचा अनुवाद तितकाच सहज-सोपा, ओघवत्या शैलीतला आणि त्यामुळेच अतिशय वाचनीय झाला आहे. आयुष्याचं सार सांगण्याकरता शब्दांचं अवडंबर माजवावं लागत नाही किंवा कोणत्याही क्लृप्त्या वापराव्या लागत नाहीत, हेच या कथेतून जाणवतं. कदाचित याच कारणामुळे आजही शंभराहून अधिक वर्षे उलटून गेली असली, तरी बकची ही गोष्ट लोकांच्या मनाला तितकीच भिडते आणि अंतर्मुख करून सोडते.

द कॉल ऑफ द वाईल्ड - मूळ लेखक : जॅक लंडन, मराठी अनुवाद : माधव जोशी, पाने -११३, मूल्य - १०० रुपये.

हे पुस्तक बुक्सनामावर खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. 

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3404

 

लेखिका चित्रकार व अनुवादक आहेत.

rama.hardeekar@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......