'आजचा सुधारक'चे दयामरण आणि काही प्रश्न (भाग दुसरा)
पडघम - सांस्कृतिक
श्रीनिवास हेमाडे
  • ‘आजचा सुधारक’ मासिकाचं एक मुखपृष्ठ
  • Thu , 15 June 2017
  • पडघम सांस्कृतिक आजचा सुधारक Aajcha Sudharak दि.य. देशपांडे D.Y. Deshpande श्रीनिवास हेमाडे Shriniwas Hemade रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ Ravindra R. P.

२७ वर्षे अखंड चालू असलेल्या या मासिकाला पूर्णविराम देण्याचे कारण काय असावे? फेब्रुवारी २०१७ च्या अंकात संपादक रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी दिलेल्या निवेदनानुसार आणि 'एबीपी माझा' आणि 'लोकसत्ता' यांच्या वार्तांकनानुसार ‘आ. सु.’ला गेल्या दोनेक वर्षांपासून टपाल विभागाशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यातून टपाल विभाग व मासिक व्यवस्थापन यांच्यात वाद होऊन ते प्रकरण न्यायालयापर्यंत गेले. त्यामुळे आधी नियतकालिक म्हणून निघणारे मासिक गेल्या काही काळात ग्रंथमाला म्हणूनही प्रसिद्ध होत होते. मात्र मासिकाच्या डाक खर्चात मिळणाऱ्या सवलतींवर आलेली बंधने, तसेच इतर व्यवस्थापकीय व आर्थिक अडचणींमुळे शेवटी मासिकाचे प्रकाशन थांबवण्याचा निर्णय ‘आजचा सुधारक’च्या व्यवस्थापनाने जाहीर केला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याची चर्चा करण्यावर बंधने येतात. परिणामी अधिक माहिती लोकांना देणे व्यवस्थापनाला आणि संपादकांना शक्य नाही.

मासिक बंद करणे याचा अर्थ त्याला ‘दयामरण’ देणे असा होतो. अशा काही असह्य वेदना होत आहेत की, त्या 'सहन करता येत नाहीत आणि सांगताही येत नाहीत' अशी कोंडी झाल्याने व्यवस्थापनाने या विवेकवादी मासिकाला अखेर नाईलाजाने दयामरण दिले. इथे 'दयामरण' म्हणजे काय? हे समजून घेतले पाहिजे.

दयामरण

दयामरण हे इंग्लिशमधील Euthanasia चे मराठी भाषांतर आहे. या शब्दाचे मूळ ग्रीक भाषेत असून eu + Thanatos मिळून Euthanasia असा शब्द बनतो. eu म्हणजे सोपे किंवा चांगले आणि Thanatos म्हणजे मृत्यू. म्हणून दयामरण म्हणजे 'सोपे आणि चांगले मरण'. ग्रीक पुराणकथांनुसार Thanatos ही मृत्यूची देवता आहे. एका कथेनुसार ती निद्रा आणि रात्र यांनी मिळून जुळी देवता होते तर अन्य कथेनुसार मृत्यू ही निद्रा आणि रात्रीचा मुलगा अशी जुळी भावंडे आहेत. हे खरेच आहे की मृत्यू म्हणजे निद्रा आणि रात्र यांचा दीर्घ विस्तार मानला जातो. भारतीय तत्त्वज्ञानात (म्हणजे अद्वैत वेदान्तात) निद्रेला लघुमरण म्हंटले आहे. Euthanasia हा शब्द वैद्यकीय अर्थाने सर्वप्रथम फ्रान्सिस बेकनने वापरला होता. विद्यमान ज्ञानक्षेत्रात ही समस्या जैवनीतीशास्त्रात (bioethics) अभ्यासली जाते.    

मरण, मृत्यू ही केवळ संकल्पना नसून ते वास्तव असते. मृत्यूचे ज्ञान होण्याचा क्षण आणि आपल्या नाहीसे होण्याचा क्षण एकच असतो. त्या थेट प्रत्यक्ष ज्ञानाचे दान करण्याआधीच आपण नष्ट होत असल्याने त्या ज्ञानाविषयी केवळ अंदाजच बांधणे शक्य असते. 'मी मरणार आहे' याचे नक्की ज्ञान माणसाला आत्मभान असल्याने होते. या ज्ञानाला इतरांच्या मरणाचा आधार असतो. मानव, मानवेतर प्राणी आणि वनस्पतींच्या अंताला 'मृत्यू' हा शब्द वापरला जातो. पृथ्वीला सजीव मानले जाते, त्यामुळे पृथ्वीच्या मृत्यूचीही कल्पना केली जाते. एखाद्या ताऱ्याला उद्देशूनही 'मृत्यू' शब्द वापरला जातो. मानवनिर्मित समाज, राज्य, पैसा, इमारती, पुस्तके, बल्ब, पेन इत्यादी सामाजिक संस्था आणि वस्तूंना 'मृत्यू' हा शब्द यथार्थाने उपयोजित होत नाही. पण हे फारसे योग्य शब्दयोजन नाही. समाजाचा अंत झाला, राज्य नष्ट झाले, पैसा संपला इ. इ. म्हणता येते.

दयामरण ही निवड

मरण अनिवार्य असले तरी दयामरण ही मात्र निवड असते. रुग्णाला असाध्य आजारातून उद्भवणाऱ्या शारीरिक आणि मानसिक वेदना टाळण्याच्या दयाळू हेतूने मृत्यू देणे म्हणजे दयामरण. ठरावीक काळापासून डॉक्टरच्या सानिध्यात असलेल्या रुग्णाला कमालीच्या असह्य वेदना होत आहेत आणि त्यातून त्याच्या बरे होण्याची पुसटशी देखील शक्यता नाहीच. अशा वेळेस रुग्णाने केलेली कळकळीची विनंती आणि इतर सहकारी डॉक्टरांनी या मुद्द्यावर दर्शवलेली सहमत या आधारावर असे दयामरण देता येते. अशा मरणाला इच्छामरण म्हणतात आणि जर रुग्णाला त्याच्या वेदनांचे भान नसेल आणि त्याची सुटका करायची असेल तर कायद्याच्या चौकटीत नातेवाईकांच्या सहमतीने असे मरण देता येते. जर रुग्णाला वेदनांचे भान नसेल पण सुटका करायची असेल तर त्याला सर्व नैतिक व कायदेशीर बंधने पाळून मरण देणे म्हणजे दयामरण. कधी कधी प्राण्यांना असे दयामरण द्यावे लागते.

रुग्णाची, त्याच्या नातेवाईकांची, मित्रांची, मुख्य म्हणजे कायद्याची आणि नैतिक नियमांची परवानगी न घेता मरण देणे म्हणजे खून करणे. समाजाचा, पुस्तकाचा, झाडाचा खून होत नसतो पण तरीही आपण 'झाडाची कत्तल' म्हणतो. असे शब्द हे भावनेची तीव्रता दर्शवण्यासाठी वापरले जातात. मी येथे त्याच तीव्र भावनाभिव्यक्तीसाठी ‘आजचा सुधारक'चे दयामरण" असा शब्दप्रयोग करीत आहे. माझी भावना प्रातिनिधिक आहे, एकमेव मीच केवळ तिचा कर्ताभोक्ता नाही.

आता, 'आ.सु.' मासिकाला पूर्णविराम देण्याचे कारण काय असावे? याची मला दोन करणे दिसतात. पहिले आधी वर नमूद केले आहे ते कायदेशीर कारण म्हणजे टपाल खात्याशी संबधित काही अपरिहार्य तांत्रिक कारणे. दुसरे कारण माझ्या मते अधिक गंभीर आहे.    

‘आ. सु.’च्या ‘विचारभिन्नता विशेषांक’ (ऑगस्ट-सप्टेंबर २०१६)  च्या अंकात अतिथी संपादक उत्पल व. ब. म्हणतात, “ ‘आजचा सुधारक’चा ‘विचारभिन्नता विशेषांक’ वाचकांसमोर ठेवताना आम्हांला आनंद होतो आहे. तात्त्विक दृष्टिकोनापासून ते रोजच्या जगण्यापर्यंत आपल्याला विचारभिन्नतेला सामोरं जावंच लागतं. या भिन्नतेला बरोबर घेऊनच आपण आपल्या जगण्याची चौकट आखत असतो. ... भारतामध्ये गेल्या दोन दशकांत विचारभिन्नतेचा प्रवास कसा झाला आहे? एका अर्थी सार्वजनिक चर्चाविश्वात विविध विषयांवर वाद-चर्चा होणे ही आश्वासक गोष्ट आहे, परंतु या चर्चेला विधायक वळण लागण्याऐवजी विघातक वळण लागताना दिसतं आहे आणि प्रस्थापित व्यवस्थेकडून विरोधी विचार ऐकून घेण्यापेक्षा त्याचं दमन करण्यावरच भर दिला जातो आहे."

या संपादकीयातून दुसरे कारण मिळू शकते. ते तात्त्विक आहे आणि विद्यमान सामाजिक स्थिती अधोरेखित करणारे, त्यावर बोट ठेवणारे आहे. तेच मूळ कारण आहे. ते असे :  

'आ.सु.'ला टपाल खातेरूपी प्रस्थापित व्यवस्थेकडून दमनाला सामोरे जावे लागले. टपाल खाते हे प्रचंड मोठ्या व्यवस्थेचे अनिवार्य अंग आहे. ते ब्रिटिशकालिन असल्याने खाक्यात काम करणारे आहे. तिथे राजकीय प्रभाव फारसा नसला, ते पक्षनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष काम करत असले तरी ती निखळ नोकरशाही आहे. या खात्याला समजूतदारपणा नको आहे, केवळ नियम हवे आहेत, असे दिसते. 'आ.सु.'सारखी मासिके गुळगुळीत सिनेमासिक नाही, त्यापासून कोणतेही उत्पन्न नाही. 'आ. सु.' वितरणासाठी आले काय आणि नाही आले काय, याची दखल घेण्याचे त्यांना महसुली कारण नाही.

आ. सु. ला टपाल खात्याशी संघर्ष करावा लागला, याचे कारण केवळ कायदेशीर तांत्रिक कारण हे नसावे. कोणत्याही भांडणाचे मूळ कारण संवादाचा, संवाद तंत्राचा/कौशल्याचा अभाव आणि विसंवाद मिटवून सामंजस्याकडे नेणाऱ्या मध्यस्ताचा अभाव हे आहे. टपाल खात्याची मूलभूत भूमिका टपाल संकलन आणि वितरण एवढीच आहे. या खात्यात पब्लिक रिलेशन्स ऑफिसर हे पद असले तरी ते कितपत प्रभावी असते, कोण जाणे.

व्यवस्थापन, संपादक आणि टपाल खात्याचे अधिकारी यांच्यात काहीएक चर्चा तरी निश्चित झाली असणार, अनेक वेळाही झाली असणार. पण ती विफल झाली. चर्चा कशी करावी, याचे भान 'आ. सु.'कारांना आहे, यात शंका नाही. पण ती टपाल खात्याच्या अधिकाऱ्यांना असेल असे नाही. जी काही चर्चा झाली ती विफल झाली आणि मासिक बंद करण्याचा निर्णय हाच एकमेव पर्याय 'आ. सु.'कारांपुढे उरला. तो कायद्याच्या चौकटीत बसणारा होता.

अनेक कारणांमुळे आधीच रुग्ण झालेल्या या मासिकाच्या वेदना असह्य झाल्या आणि आता मृत्यूची चाह केली पाहिजे, असा निर्णय घेणे भाग पडले. कायद्यानेच मासिक बंद करावे लागले, याचा अर्थ कायद्याच्या चौकटीत झालेला हा वैचारिकतेचा खूनच म्हटला पाहिजे. या मुद्द्यावर दयामरण की खून? असा प्रश्न उपस्थितही करता येईल. खुनाला प्रवृत्त करणे हाही गुन्हाच मानला जातो. म्हणजे तात्त्विक, नैतिक अर्थाने 'आ.सु.’चे मरण हे दयामरण आहे किंवा खून आहे? गेलाबाजार खुनाला प्रवृत्त करणे आहे. उघडच हा गुन्हा नैतिक न्यायालयात चालणार, जे अस्तित्वात नाही!

हे म्हणजे मूळ 'सुधारक'कारांना साजेसे झाले! सनातन्यांनी आगरकरांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. त्याचा परिणाम आगरकरांनी 'फुटके नशीब' हे आत्मचरित्र लिहिले आणि स्वतःच्याच मरण सोहळ्याचे साक्षीदार असल्याचे जाहीर केले. त्याधर्तीवर विद्यमान 'आ.सु.'कारांनाही आपणच देत असलेल्या दयामरणाचे साक्षीदार व्हावे लागले, जाहीर सोहळा करावा लागला!!     

अन्य तात्त्विक कारण असे की, एक मासिक संपले आणि धाड्कन तमोयुग सुरू झाले, असे नाही. आगरकरांनी १८८० साली 'सुधारक' सुरू केले आणि दियं १९९० साली 'नवा/आजचा सुधारक'! तमोयुग एकोणिसाव्या शतकातही होते आणि आज एकविसाव्या शतकातही आहेच. उलट आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाने आजचे तमोयुगसुद्धा गतिमान झाले आहे. धर्मवाद्यांनी गेल्या दशकापासून पुन्हा एकदा भारतात, महाराष्ट्रात तमोयुगाचे पुनरुज्जीवन केले आहेच. अमर्त्य सेन, रघुराम राजन यांची हकालपट्टी, गजेंद्रसिंहाचे आरोहण, गडकरी मास्तरांचे विध्वंसन, बंगाल विद्यापीठातील धुडगूस, रोहित वेमुलाची आत्महत्या, दाभोलकर-पानसरे- कलबुर्गी खून, नथुराम गोडसेपूजा, गोवंशमांस प्रकरणी संशयितांचे सामुहिक खूनसत्र, सरकारवर टीका केल्यास द्रोह समजला जाईल, असा आधुनिक 'द्रोहकाल', अनेकांना धमक्या किंवा अन्य असेच काहीही हिंसक व असहिष्णु कारवाया ह्या उदाहरणांनी आपण तमोयुगात जगत आहोत, याची साक्ष मिळते. महाराष्ट्राचे आजचे तत्त्वज्ञान काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला तर फारच केविलवाणी स्थिती होईल.  

'आजचा सुधारक' - एक प्रणाली    

'सत्यकथा' बंद पडली आणि मराठी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले, म्हणून मराठी साहित्यविश्व बेवारस पडले असे नाही, इतर अनेक नव्या नियतकालिकांची सुरुवात झाली, ती स्थिरावली. पण 'सत्यकथा नाही ती नाहीच', असे म्हणावेच लागते. तसे 'आजचा सुधारक' बंद पडले याचा अर्थ त्याची उणीव भासणार ती भासणारच. शिवाय आजचा सुधारक वगळता महाराष्ट्रात इतरही वैचारिक मासिके, नियतकालिके आहेतच की. आजचा सुधारक बंद पडले म्हणून विवेकवादच खलास झाला आणि इतर मासिके, नियतकालिके काहीच करत नाहीत, असे नाही. वैचारिक मासिके महाराष्ट्रात फार आहेत, असे नाही. जी काही आहेत ती तशी मोजकीच आहेत. पण तीही बाजारू मासिकांच्या तुलनेत कमीच आहेत. साहित्यिक प्रकाशनेही फार नाहीतच. त्यांचीही प्रत्येकाची भूमिका आहे, कार्य आहे, कार्यक्षेत्र आहे.

पण त्या नियतकालिकांमध्ये आणि 'आजचा सुधारक'मध्ये काही मूलभूत फरक आहेत. या पार्श्वभूमीवर एका विशिष्ट विचारसरणीला वाहून घेणारे, त्यातही विवेकवादी विचारसरणीला वाहून घेतलेले आजचा सुधारक हे महाराष्ट्रातील एकमेव मासिक होते. पाश्चात्य तत्त्वज्ञानात आणि भारतीय चार्वाक तत्त्वज्ञानात ज्याला बुद्धिप्रामाण्यता म्हणता येईल असे विचार  मांडणारे हे मासिक होते. विवेकी जीवन म्हणजे काय? याचे चिंतन हा या मासिकाचा केंद्रबिंदू होता. सामाजिक अर्थाने 'आजचा सुधारक'ला दि.यंनी एका व्यापक बौद्धिक चळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले होते. तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत 'आजचा सुधारक' ही एक प्रणाली (School) होती. तिच्यात दोष असतीलही, होतेच. पण ती मुख्यतः विचारप्रणाली असल्याने तिचे नसणे म्हणजे एक महत्वाचा तत्त्वविचार नसणे.

लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर इथं तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.

shriniwas.sh@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......