माझ्या बाजूने मी गोविंदरावांशी अनाक्रमणाचा करार केला. काँग्रेस-नेहरू-यशवंतराव-शरद पवार हे विषय पूर्णपणे वर्ज्य केले आणि आमच्या दोघांधला ‘साकल्याचा प्रदेश’ किती मोठा होता हे जाणवायला लागलं. वर सांगितलेल्या सर्व जागतिक/भारतीय घटनाक्रमाबद्दल आमच्या प्रतिक्रिया एकसारख्या होत्या, कारण मुळात आम्ही दोघेही आधुनिक उदारमतवादी विचारसरणीचे होतो. त्यातच नेल्सन मंडेला, मिखाइल गोर्बाचोव्ह हे दोघांचेही हिरो होते. येऊ घातलेल्या नव्या जागतिक अर्थव्यवस्थेध्ये भारताला सामील व्हावंच लागेल, तेव्हा साप म्हणून भुई धोपटण्यापेक्षा हे संकट नसून संधी आहे, या भूमिकेवर दोघेही ठाम होतो. जागतिकीकरण/उदारीकरण/खाजगीकरण म्हणजे शोषित वर्गाविरुद्धचं भांडवलशाही कारस्थान आहे या मठ्ठ कम्युनिस्ट भूमिकेचा किंवा ‘स्वदेशी’ (म्हणजे नेमकं काय ते न सांगता) हाच या संकटावरचा रामबाण उपाय आहे म्हणणार्या संघ परिवाराचा दोघांनाही सारखाच तिटकारा होता; मग गप्पा मोकळेपणाने सुरू झाल्या आणि त्या २००७ पर्यंत चालू होत्या.
अलिकडे गोविंदरावांच्या केबिनला काच बसवण्यात आली होती. त्यामुळे आलेली व्यक्ती त्यांना दिसत असे आणि आलेल्या माणसाला ते व्यग्र आहेत/नाहीत हे कळत असे. पूर्वी गोविंदरावांच्या केबिनमध्ये शिरलेला माणूस किती सेकंदात बाहेर येईल यावर बाहेर बसलेल्या सहकार्यांच्या पैजा लागत, अशी आठवण (दुर्दैवाने कै.) अरुण टिकेकरने एका कार्यक्रमात सांगितली होती. काचेपाशी जाऊन उभं राहिलं की कॉम्प्युटरवर लेखन करणारे गोविंदराव वळून बघायचे, त्या दिवशीच्या मुद्रेध्येच आज काय मूड आहे व आपल्याला किती वेळ मिळणार आहे ते कळायचं. माझ्याच वयाचे त्यांचे सहकारी कौतुकाने बघायचे.
गोविंदराव सत्तरीकडे चालले होते आणि मी पंचेचाळीशीकडे. त्यांची धार कायम होती, पण कठोरपणा कमी झाला होता. माझा वांडपणाही बहुधा कमी व्हायला लागला होता. मध्यम उंची, रूंद खांदे, मजबूत भारदस्त शरीर, गौर वर्ण, भव्य कपाळ (केस मागे सरकायला लागल्यामुळे जरा जास्तच भव्य), डोळ्याला चष्मा सतत, त्यामुळे सरळ नाक अधिकच सरळ वाटायचं आणि कमालीची शांत, स्थिर, कोरडी पण धारदार नजर - तरुणपणी भरपूर काळे केस असतानाचे त्यांचे फोटो नंतर पाहिले. ऐर्यागैर्याला त्यांची नजर एका क्षणात गारद करून टाकत असे यात नवल नाही. पांढरा किंवा फिकट रंगाचा एका खिशाचा मॅनिला, तशीच सौम्य रंगीच पँट, पुढे निवृत्त झाल्यावर ते क्वचित पँट-टीशर्ट मध्ये वा नेहरू (!) शर्ट-पायजमा या पोषाखात दिसत.
आमच्या ‘साकल्याच्या प्रदेशा’ला मुख्य आधार इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाचा होता. अरुण टिकेकरचा अपवाद वगळता त्यांच्या आसपास इंग्रजी वाचन अद्ययावत असणारे फार कमी होते. फरक इतकाच की ‘स्ट्रँड बुक स्टॉल’मध्ये नवं पुस्तक आलं की गोविंदरावांना फोन येत असे; मग ते स्वत: जाऊन खरेदी करत; मला मात्र पुण्याच्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये ते पुस्तक यायची वाट बघावी लागत होती. त्यातच गोविंदरावांना टाइम्स ऑफ इंडियाकडे परीक्षणासाठी येणारी पुस्तके सहज उपलब्ध होत होती. टाइम्स लिटररी सप्लिमेंट हे ब्रिटिश साप्ताहिक आणि न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स हे अमेरिकन पाक्षिकही त्यांच्या नित्य वाचनात असे. मला पुण्याच्या ब्रिटिश लायब्ररीत जरा उशिरा मिळत असे. १९९२ मध्ये मी ‘न्यू क्वेस्ट’चा कार्यकारी संपादक झाल्यावर ही दोन्ही नियतकालिके मलाही नियमित मिळायला लागली, शिवाय इतर काही युरोपियन द्वै/त्रैमासिकांची त्यात भर पडली. ‘न्यू क्वेस्ट’कडे अभिद्यायार्थ येणार्या पुस्तकांनी आमच्या वाचनामधली दरी बर्यापैकी भरून काढली.
गोविंदरावांचा वाचनवेग त्या वयातही चांगला होता; बहुधा ते एका दृष्टीक्षेपात संपूर्ण पान वाचत असावेत. आम्ही चर्चा केलेल्या पुस्तकांची यादी ठेवायला हवी होती, ती संख्या तीन आकडी नक्कीच भरेल. इतिहास, राजकारण, राजकारण्यांची चरित्रे/ आत्मचरित्रे, आठवणी, पत्रव्यवहार, सैद्धांतिक विश्लेषण, निरनिराळ्या देशातल्या संपादक, पत्रकार, स्तंभलेखकांच्या लिखाणाचे संग्रह, बुद्धिजीवींचं लिखाण हे त्यांचे खास आवडीचे विषय. माझा कल त्या त्या काळातल्या साहित्यामधून तो काळ समजून घेण्याकडे असला तरी मीही इतिहास-राजकारण- आयडिऑलॉजी वाचत होतोच मात्र माझी स्तंभलेखनाच्या संग्रहांना कधीच पसंती नव्हती, आजही नसते. लेनिन, स्टालिन, चर्चिल, रूझवेल्ट आणि त्यांना १० वर्षं कामाला लावणारा हिटलर हेही दोघांच्या कुतूहलाचे विषय पण गोविंदरावांना चर्चिल-रूझवेल्ट जवळचे तर मला लेनिन-हिटलर (नाझीवादासाठी नव्हे) यांच्याबद्दल अधिक उत्सुकता. भारतीय इतिहासाच्या आधीच उल्लेख केलेल्या ‘धन्य पुरुष’ (गोविंदरावांचा शब्द!) मंडळींचा उल्लेखही होतच असे; मात्र आमच्यामध्ये गांधी हा विषय फारसा कधी डोकावला नाही - दोन्ही गांधी आम्हांला वर्ज्यच होते?
सैद्धांतिक विषयात परीक्षणांवरून पुस्तकासंबंधी मत बनवायचं नाही, मूळ पुस्तक मिळवून वाचायचं ही सवय दोघांनाही होती. गोविंदरावांनी सर्व आयडिऑलॉजीचे मूळ ग्रंथ त्यांच्या तरुण वयातच वाचले असावेत. तर्कतीर्थ आणि मानवेंद्रनाथ रॉय यांच्या सहवासाचाच हा प्रभाव नव्हता, त्यांची बौद्धिक भूकच तशी होती. भांडवलशाही, समाजवाद, साम्यवाद, लोकशाही समाजवाद, लोककल्याणकारी राज्य, आधुनिक अर्थव्यवस्था, औद्योगिकरणाची निकड, माध्यमांचं स्वातंत्र्य आणि कर्तव्ये, प्रशासन, व्यवस्थापन हे सगळं पचवलेला संपादक मराठीत तर नव्हताच, पण इंग्रजीतही दुर्मिळच होता. त्यांच्याही दोन पावलं पुढे जाऊन इंग्रजीत लिहिणार्या शामलाल यांच्याकडे गोविंदरावांनीच माझं लक्ष वेधलं; आज मीही शामलाल यांचा भक्त आहे - जरी त्यांचं लेखन मुख्यत: स्तंभवजा होतं तरी!
मराठी साहित्य वगैरे (त्यांचाच शब्द) आमच्या बोलण्यात कधीच डोकावत नसे! मात्र शेक्सपिअर, डॉ. जॉन्सन, डिकन्स, जॉर्ज ऑर्वेल, आर्थर कोत्स्लर, वुडहाऊस यांचा उल्लेख होत असे. लिंकनविषयक लेखन आणि स्वत: लिंकनही संभाषणात डोकावून जात होता. एकोणिसाव्या शतकातले ब्रिटिश विचारवंत लास्की, रस्कीन इ. त्यांनी बारकाईने वाचले होते. आणि उदारमतवादी, लोकशाहीवादी, नर्मविनोदी, संयमी पण स्पष्ट इंग्रजी लेखनशैलीचा प्रभाव गोविंदरावांच्या लिखाणाप्रमाणेच बोलण्यातही होता. उच्छृंखल विनोद, अतिशयोक्ती यांचा पूर्ण बहिष्कार हा त्यांचा दंडक. मात्र काही मार्मिक वाक्यं बोलण्याआधी त्यांचे डोळे किंचित खट्याळपणे चमकायचे आणि बोलण्यावर मग एक कोरडं, मार्मिक स्मित (wry smile) पाहायला मिळायचं. या सार्या गप्पा त्यांच्या ऑफिसात सुरू झाल्या आणि नंतर त्यांच्या २००५ व २००७ मधल्या पुण्यातल्या मुक्कामातही चालू होत्या. एखादं पुस्तक एकाच वेळी त्यांनी मुंबईत आणि मी पुण्यात वाचलेलं असलं की मला धन्य वाटायचं. ‘लाँग वॉक टू फ्रीडम’ हे नेल्सन मंडेलांचं आत्मचरित्र आणि आयर्न लेडी मार्गारेट थॅचर यांच्या मंतत्रिमंडळातले मंत्री अॅलन क्लार्क यांची डायरी या दोन पुस्तकांची आठवण होते.
टाइम्समध्ये गप्पा मारता मारता गोविंदराव कधीकधी चहाचा ग्लास घेऊन बाहेर आले की, सन्नाटा पसरायचा. सगळ्यांच्या गप्पा- टप्पा बंद व्हायच्या. एकदा आम्ही बाहेर दिवाळीचा फराळ चाखत होतो आणि हे बाहेर आल्यावर सगळ्यांची धांदल उडाली - तोंडातले घास तोंडात आणि हातातले हातात! गोविंदरावांच्या ते लक्षात आलं; तेही दोन मिनिटे घुटमळले; मग थोडा चिवडा उचलून तोंडात टाकला आणि सिंह आपल्या गुहेत परत गेल्यावर पॉझ संपल्यासारखी हालचाल बाहेर सुरू झाली. सगळेजण त्यांना एवढे वचकून का होते?
गोविंदरावांनीच याचं कारण एकदा गप्पांच्या ओघात सांगितलं. आर्थर कोत्स्लरचं निधन झाल्याची बातमी मध्यरात्री आली होती. दुसर्या दिवशी सकाळी इंग्रजी टाइम्समध्ये ती बातमी
गोविंदरावांनी पाहिली; ‘मटा’मध्ये मात्र ती दिसली नाही म्हटल्यावर ते खवळले, ऑफिसात आल्यावर रात्रपाळीच्या संपादकाला बोलावून घेतलं; तो तर बिचारा कोत्स्लरच्या स्पेलिंगनेच बिचकला असणार! ‘तुम्हांला माहीत नव्हतं तर रात्री फोन का केला नाहीत?’ असा जाब विचारला. ‘आजपासून तुची मटामधली नोकरी संपली आहे. मी तुम्हाला काढून टाकणार नाही पण तीन महिन्यात दुसरीकडे जा!’ त्याप्रमाणे तो गेलाही!
एवढं महाभारतीय रणकंदन झाल्यावर मात्र गोविंद तळवलकर नावाचा संपादक कामाला लागला आणि मराठी वाचकांना आर्थर कोत्स्लर वरचा एक अप्रतिम लेख वाचायला मिळाला!
५.
तरीही पेचप्रसंग निर्माण व्हायचेच; बहुतेक वेळा माझ्यामुळेच! १९९१ मध्ये नरसिंहराव पंतप्रधान होण्याच्या मार्गात शरद पवार यांनी खोडा घालून स्वत:चं देशपातळीवर हसं करून घेतलं होतं आणि गोविंदरावांनी ‘ना शहाणपण, ना मुत्सद्देगिरी’ असा खरमरीत लेख लिहून पवारांच्या डोळ्यात अंजन घातलं होतं. देशाच्या पंतप्रधानपदाची निवडणूक आणि सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यातला फरकच तुम्हाला कळला नाही, इतकं स्पष्ट लिहिलं होतं. मी त्यांना, लेख आवडल्याचं कळवताना ‘पण शरद पवार is not prime ministerial material’ हे तुमच्या लक्षात यायला हवं होतं’ असं म्हटलेलं गोविंदरावांना नक्कीच झोंबलं असणार. त्याचा प्रत्यय नंतर आला. देशमुख कंपनीने ‘निवडक पत्रे’ नावाचं कुरुंदकर आणि देशमुख पतिपत्नी यांच्या पत्रव्यवहाराचं पुस्तक प्रकाशित केलं होतं. (संपादक- जया दडकर) त्याचं अतिशय पॉझिटिव्ह परीक्षण ‘मटा’मध्ये स्वत: गोविंदरावांनी लिहिलं. मात्र त्यात त्या संग्रहाला मी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा उल्लेखही नव्हता. मी बुचकळ्यात पडलो!
एक दिवस माझं मलाच कारण कळलं. त्या प्रस्तावनेत ‘अनंतराव भालेराव यांच्यासारख्या खुमासदार शैलीत अग्रलेख लिहिणारा संपादक तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात नव्हता’ असं वाक्य आहे. मग गोविंदराव मला अनुल्लेखाने मारतील नाही तर काय करतील? कारण स्वत:वरच्या टीकेला उत्तर देण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत, हे मला तेव्हा माहीत नव्हतं. इथं एवढंच सांगतो की, माझं मत मुख्यत: शैलीबद्दल होतं; अनंतराव मिस्किल जास्त होते, गोविंदरावांसारखी बोचरी धार त्यांच्या लिखाणात नव्हती. कदाचित त्या काळात अनंतराव आणि मी यांची राजकीय भूमिकाही समान होती. माझ्याशी ते अतिशय आपुलकीने वागत, त्यामुळेही मी तसं लिहिलं असेल.
ही चूक दुरुस्त करण्याची संधी पुढच्या वर्षी मिळाली. तर्कतीर्थ निधन पावल्यानंतरचा ‘आचार्य देवो भव’ हा गोविंदरावांचा लेख अप्रतिम होता. त्याची तुलना टिळकांनी रानडे, आगरकर व गोखले यांच्यावर लिहिलेल्या स्मृतिलेखांशी (मला ‘मृत्यू लेख’ शब्द फार बटबटीत वाटतो.) करावी लागेल. तो लेख आवडल्याचं मी त्यांना फोनवरून कळवलं - मग पुन्हा गप्पा सुरळीत सुरू झाल्या. तो लेख विशेषत: त्याचं शीर्षक माझ्या मनात इतकं खोल गेलं की, पुढे मी माझे गुरुवर्य डॉ. नागराजन यांच्यावरच्या लेखाला तेच शीर्षक दिलं (अंतर्नाद, मे २०१४) पण परत एकदा घोटाळा झाला.
तर्कतीर्थांच्या पहिल्या स्मृतिदिनाला गोविंदराव पुण्याला येणार होते. मी त्यांना उतरून घ्यायला येतो असं सुचवल्यावर त्यांनी त्या खास निर्लेप नजरेनं माझ्याकडे पाहत, ‘कार्यक्रम कळवल्यावर सगळी व्यवस्था आमचं ऑफिस करतं’ असं सांगितलं. व्यवस्था म्हणजे पहिल्या वर्गाचा प्रवास, त्या गावातल्या सर्वोत्कृष्ट हॉटेलमध्ये रिझर्वेशन आणि एसी वाहन - हे कळल्यावर मी चूप बसलो! ‘पुण्याला आल्यावर मला फोन करा’ असं सुचवलं. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी ते पुण्याला आले. दुसर्या दिवशी सकाळी त्यांचं उरकल्यावर आठच्या सुमाराला त्यांनी घरी फोन केला - ‘हर्डीकर इतक्या लवकर उठत नाहीत’ म्हणून कोणीतरी त्यांना सांगितलं आणि फोन कट केला. नऊ वाजता उठल्यावर मला हे कळलं आणि माझं धाबं दणाणलं. धावतपळत त्यांच्याकडे गेलो. ते ब्ल्यू डायमंडमध्ये होते! त्यांचा इतका कडू चेहराही मी नंतर कधीच बघितला नाही! मात्र मी निबरपणाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. चिकटून राहिलो - ते मात्र स्वत:हून एक शब्दही बोलत नव्हते.
परिस्थिती माझ्या मदतीला धावून आली. तर्कतीर्थांचा पहिला ‘स्मृतीदिन’ होता; वाईच्या प्राज्ञ पाठशाळेधल्या दोन शास्त्र्यांचं वेदपठण झाल्यानंतर मुख्य कार्यक्रम सुरू होणार होता. त्या शास्त्र्यांनी त्यांच्या विलंबित ख्यालाच्या शैलीत पठण सुरू केलं. दहा, पंधरा, वीस, पंचवीस मिनिटं झाली; इकडे गोविंदराव चुळबूळ करायला लागले. ‘अहो, यांचं संपणार केव्हा?’ माझ्या कानात म्हणाले. मी म्हटलं ‘त्यांना नरकात पडायचं नाही!’ गोविंदराव म्हणाले, ‘म्हणजे काय! हे असंच कितीही वेळ म्हणतील हो!’ मी म्हणालो, ‘वेदपठण अर्ध्यावर सोडता येत नाही. त्रुटिता पठिता वाणी। भवेत् नरककारिणी हे त्यांचा ट्रेनिंग आहे; कदाचित अर्धवट म्हटलं म्हणून ते आणि अर्धवट ऐकलं म्हणून ‘आपणही नर्कात जाऊ’. गोविंदरावांच्या नजरेत ‘ती खास’ चमक डोकावली. म्हणाले, ‘एकवेळ ते परवडेल!’ आणि माझा जीव भांड्यात पडला! त्यानंतरही एकदा काही किरकोळ मतभेद झाले होते ते बहुधा पुन्हा शरद जोशींच्या विषयी बोलताना. मग काही दिवसांनी गोविंदरावांनी नुकत्याच झालेल्या आणि क्षुद्र विवादांनी गाजलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ‘घरगुती साहित्य संमेलन’ असा स्वत:च्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहावर सुंदर लेख लिहिला; मी त्यावर छोटंसं (सुंदर?) पत्र लिहिलं. ते ‘मटा’मध्ये छापूनही आलं. ते संपादक असताना माझा तेवढाच मजकूर ‘मटा’ मध्ये आला आहे.
मात्र एकदा गोविंदरावांना माझी मदत घ्यावी लागली. वि.म. दांडेकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी गोविंदरावांनी पुण्याला येणं क्रमप्राप्त होतं. तिथं ते एका बाजूला एकटेच बसले होते. दांडेकरांच्या मुलांनी जरा जास्तच उत्साहाने हिंदू पारंपरिक पद्धतीने विधी चालवल्यामुळे वैतागलेही होते. ‘हे अमेरिकेत स्थायिक आहेत ना मग ते जरा अतीच करणार’ असं म्हटल्यावर गोविंदराव पुढे जे म्हणाले ती माझी सामाजिक उपयुक्तता त्यांना पटल्याची पावती होती. ‘आता हे सगळं संपेपर्यंत तुम्ही माझ्या शेजारून हलू नका; तुम्ही असलात की मला त्रास द्यायला कुणी येणार नाही!’ मी धन्य झालो - तो डाव्या हाताचा सलाम मी आजही गौरवास्पद मानतो!
६.
यानंतर काही वर्षं गोविंदराव अमेरिकेत होते - मुख्य कारण पत्नीच्या प्रकृतीचं - दोन्ही कन्याही अमेरिकेत स्थायिक हे दुसरं! पण इकडे त्यांचे लेख वाचायला मिळत असत. लायब्ररी ऑव्ह अमेरिकन काँग्रेससारखा खजिना त्यांना आता उपलब्ध झाला होता. एकीकडे भोगवादी वाटणारे अमेरिकन ज्ञान आणि संशोधनाची प्रतिष्ठा कशी सांभाळतात हे त्यांनी आवर्जून लिहिलं
होतं- पुलं म्हणाले तसा तो ‘एक बेपत्ता देश’ नाही याची जाणीव करून दिली होती. ११ सप्टेंबर २००१ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकन समाजाची प्रतिक्रिया कशी धीरोदात्त आणि सुसंस्कृत संयमाची होती हेही त्यांच्यामुळेच कळलं होतं. त्या अर्थाने लिखाणातून गोविंदराव भेटतच होते, पण २००५ आणि २००७ मध्ये ते पुण्याला येऊन राहिले आणि एक गप्पांचा महोत्सव सुरू झाला!
बारामती हॉस्टेलच्या व्हीआयपी सूटमध्ये गोविंदरावांनी उतरणं साहजिकच होतं. ते आल्याचं कळताच मी त्यांना भेटायला गेलो. बरोबर माझा मित्र राम कोल्हटकर होता. इतका व्हीआयपी पाहुणा वागवायची हौस, ऐपत, साधनसामग्री रामकडेच आहे; त्यांचं फार लगेच जुळलं. दोघांची निवासस्थानंही जवळच होती. या दोन्ही वास्तव्यात रामने त्यांचं पालकत्व अतिशय मायेनं पार पाडलं. इकडे तळवलकर पुण्यात आले आहेत म्हटल्यावर त्यांचे जुने मित्र त्यांना भेटायला जात होते. ज्यांना ते शक्य नव्हतं त्यांच्या घरी राम त्यांना घेऊन जायचा. कधी ब्रेकफास्ट कधी दुपारचं/रात्रीचं जेवणही रामच्या घरी व्हायचं.
माझी खेप संध्याकाळची असे. कुणाकडे जायचं असेल तर सकाळी किंवा दुपारी, संध्याकाळी आठच्या सुमारास गोविंदराव जेवायला बसत. त्याच्याआधी तासभर ते ड्रिंक घेत. मी धावत पळत साडेसात-पावणेआठला पोचलो की त्यांना कंपनी देत असे ती दहा-साडेदहाला ते झोपायला जात तोपर्यंत - राम थांबला असेल तर नऊच्या बेताला घरी जाई. गोविंदराव येतानाचा उत्तम स्कॉच/वाइनचा स्टॉक घेऊन येत, त्यातच त्यांना भेटीदाखलही उत्तम मद्य आणून देणारे होतेच. त्यामुळे ती सरबराई आमच्यावर कधीच पडली नाही. उलट परत जाताना शिल्लक स्टॉक आवर्जून माझ्या ताब्यात देत.
मध्ये सात-आठ वर्षं गेली होती. तरी जग-भारत-महाराष्ट्र ही त्यांची फ्रिक्वन्सी तितकीच सजग होती; शिवाय नवीन विषय शोधणं चालूच होतं. त्यावेळेला मोहित सेन यांचं The Traveller and The Road हे आत्मचरित्र प्रकाशित झालं होतं. ते गोविंदराव घेऊन आले होते आणि त्यांनी बजावल्यामुळे मी चार/पाच दिवसात वाचून त्यांना परत दिलं होतं. कारण त्या पुस्तकावर त्यांना लिहायचं होतं. ते पाच-सात दिवस मग भारतीय कम्युनिस्ट चळवळ हा विषय असायचा. मध्येच त्यांना एखाद्या जुन्या ग्रंथाची आठवण व्हायची. उदा.- निबंधमाला. मग आम्ही त्यांना ती प्रा. सु.रा. चुनेकरांकडून आणून द्यायचो. उत्तरादाखल गोविंदराव त्यांना जेवायला बोलवायचे. पण संभाषण चालू ठेवण्याची जबाबदारी आमचीच!
गोविंदरावांना एकटं एकटं वाटू नये म्हणून रामने एकदा नसता उद्योग करून ठेवला. एका मराठी लेखकाला त्याने त्यांच्याशी गप्पा मारायला पाठवलं. त्यांना आधी न विचारता. प्रसंग घडला तो असा - लेखक मोठ्या उत्साहानं बारामती हॉस्टेलवर गेला. गोविंदराव काही पुस्तक चाळत होते. लेखक म्हणाला, ‘नमस्कार मी अमुक अमुक’. गोविंदरावांनी अर्धा सेकंद नजर वळवून म्हटलं, ‘हां!’ लेखक म्हणाला, ‘रामभाऊ म्हणाले आपण एकटेच असता म्हणून आलो.’ आता नजर न वळवता ‘हां!’ थोड्या वेळानं लेखक म्हणाला, ‘मी अमुक लिहितो’. आता नजरही नाही आणि उत्तरही नाही. अर्धापाऊण तास गेल्यावर लेखक म्हणाला, ‘मी निघतो आता!’ पुन्हा नजर न वळवता ‘हां!’ लेखक ठणाणा करत रामकडे गेला; राम सर्द झाला. दोनचार दिवसांनी गप्पात सहज आल्यासारखं गोविंदराव म्हणाले, ‘नाशिकच्या लोकांना मी निवृत्त असलो तरी रिकमटेकडा नाही, हे कळलंच नाही म्हणून मी तिथं बंगला बांधला तरी राहिलो नाही!’ सूज्ञांस अधिक सांगणे न लगे!
मात्र श्री. म. माटे, रावसाहेब कसबे यांच्या घरी जायचं आहे, असं गोविंदरावांनीच सुचवलं. अशा भेटीतलं वातावरण गमतीदार असायचं. गोविंद तळवलकर घरी येणारा म्हटल्यावर ‘धन्य आनंददिन’ अशी त्या मंडळींची अवस्था व्हायची. गोविंदराव यायचे. त्यांच्या स्थिर, अलिप्त नजरेनं सगळ्यांचं स्वागत स्वीकारायचे. थोडंफार खाणं, चहा/कॉफी व्हायची. सगळं नेमस्त. शेकहँड सुद्धा क्वचित मग कडकडून भेट वगैरे सोडूनच द्या. हातातल्या काठीशी चाळा करत थोडफार बोलणं व्हायचं - मात्र त्या घरी जाताना-येताना भरपूर जुन्या आठवणी निघायच्या. माट्यांच्या घराच्या आसपासच गोविंदराव त्यांच्या काकांकडे (गोपीनाथ तळवलकर) राहत. तेव्हा काही जुनी माणसं य. गो. जोशी वगैरे आठवली होती. त्याच भागात मीही सध्या राहतो; रामचं ऑफिसही जवळत होतं. तिथे पुष्कळ वेळा बसणं झालं, एकदा थोडा वेळ माझ्या घरीही येऊन गेले. परांजपे नावाचे एक चिनी भाषा येणारे आणि नेहरू-माओ यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणारे, माओला भेटलेले गृहस्थ पुण्यातच राहत होते, त्यांना गोविंदरावांनी स्वत: बारामती हॉस्टेलवर बोलावून घेतलं होतं.
विद्याधर गोखले, त्यांचा बेबंद स्वभाव, त्यांच्यातला नकलाकार आणि उमदा मित्र, गोखल्यांच्या दुसर्या लग्नासाठी गोविंदराव आणि इतर मित्रांनी केलेली धावपळ हा एव्हरग्रीन विषय. मात्र त्यांनी कधीही दोन्ही गोखल्यांबद्दल ते हिंदुत्ववादी होते म्हणून कुचकट प्रतिक्रिया दिल्याचं आठवत नाही. पु.भा.भावे हे दुसरे डोंबिवलीकर हिंदुत्ववादी. त्यांच्या भडक भाषेचा निषेधवजा उल्लेख केला होता; ते वाक्य खरोखर छापण्यासारखं नाही. बोलता बोलता गंभीर आणि हलक्या/फुलक्या विषयांची सहजपणे अदलाबदल होत असे. ग. प्र. प्रधानांना भेटून आल्यानंतर सहजच विषय मधु लिमये, मधु दंडवते वगैरे मंडळींकडे वळला! या सर्वांनाच आपापल्या पत्नीचं फार मोठं पाठबळ मिळालं होतं, असं बोलणं चालू होतं. ‘या समाजवाद्यांना सगळ्यांना बायका मात्र चांगल्या मिळाल्या’ असं गोविंदराव म्हणाल्यावर ‘गोविंदराव या वाक्यात मला जेलसी दिसते आहे’ असं मी म्हटल्यावर गडबडून लगेच ‘नाही, नाही अजिबात नाही!’ पण रागवले नव्हते.
अजूनही माझ्या छातीवर संघटनेचा बिल्ला होताच - कारण मी पुन्हा कार्यकारिणी सदस्य झालो होतो. सगळं बारामती हॉस्टेल खचाखच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भरून गेलेलं असताना त्यांच्या नाकावर टिच्चून व्हीआयपी सूटमध्ये जाताना मला आसुरी आनंद व्हायचा. गोविंदरावांची नाराजीही होतीच. मात्र तिच्यात पूर्वीसारखा धिक्कार नव्हता. एकदा वैतागून म्हणाले, ‘अहो, तुम्ही त्या शरद जोशीच्या नादी लागून वाया चालला आहात, भुसावळला जाता काय, नांदेडला काय जाता, जरा एका जागी बसून वाचन-अभ्यास करा, तुम्ही साठीच्या जवळ आला आहात!’ वार पचवून मी म्हणालो, ‘शेतकरी संघटनेुळे मला ग्रामीण भागात प्लॅटफॉर्म मिळाला आहे, तो माझ्या पार्श्वभूमीच्या माणसाला पुन्हा सहजासहजी मिळणार नाही. आपण बारामती हॉस्टेलमध्ये बोलतो आहोत. तुम्ही मला शरद पवारांकडून तसं व्यासपीठ मिळवून द्या; मी त्यांच्याबरोबर जातो. पण ग्रामीण भागात काम करायचं असेल तर महाराष्ट्रात एका शरद बरोबरच जावं लागेल!’ गोविंदराव म्हणाले, ‘अहो भलतंच काय बोलता! तुमचं बोलणं त्यांना कळणारसुद्धा नाही.’ ते बहुधा विषय वाढवायला नको म्हणूनच! कारण राजकीय फायदा असेल तर शरद पवारांना तुम्ही न बोलतासुद्धा सगळं कळतं असा सार्वत्रिक अनुभव आहे. मात्र त्यांच्या जाहीर मुलाखतीमध्ये ‘तुमचा शरद वेगळा आणि माझा शरद वेगळा’ या माझ्या वाक्याला गोविंदरावांनी टाळी दिली होती.
आम्ही गोविंदरावांच्या बाबतीत पझेसिव्ह झालो होतो हे खरंच, पण इतरांनाही त्यांचा लाभ करून दिला होता. त्यांची दोन तासांची स्वतंत्र, सर्वंकष जाहीर मुलाखत मी घेतली होती आणि १७५० ते २००७ या अडीचशे वर्षांच्या भारतीय इतिहासावर सांगोपांग चर्चा ‘अर्थबोध’मध्ये झाली होती. त्या कार्यक्रमांचं रेकॉर्डिंग रामकडे आहे. योग्यवेळी शब्दांकन करून पुस्तक करायचं असंच तेव्हा ठरलं होतं. आता गोविंदरावांना पुण्यातच ठेवून घ्यावं, आपण त्यांना सांभाळू असा विचार मनात रूजत असतानाच, फणस खाल्ल्याचं निमित्त होऊन त्यांचं पोट बिघडलं, आयसीयूध्ये दाखल करावं लागलं. त्यातून बाहेर येताच अशक्तपणामुळे डोळ्यांचाही त्रास सुरू झाला. मग मात्र त्यांना परत पाठवणं भागच होतं. आम्ही त्यांना सिंहगडावरचा टिळकांचा बंगला दाखवणार होतो, ते राहून गेलं!
मे २००७ मध्ये एका सकाळी आम्ही रामच्या गाडीतून गोविंदरावांना घेऊन मुंबईला निघालो होतो, परत केव्हा विचारल्यावर गोविंदराव म्हणाले, ‘तिकिट पाठवाल तेव्हा’. सर्वांचा मूड छान होता. मुंबईला त्यांचे ज्येष्ठ मित्र कै. भाऊसाहेब नेवाळकर यांच्या घरी ब्रेकफास्टला गेलो. नव्वद पार केलेले भाऊसाहेब तुरूतुरू बाहेर येऊन ‘अरे, गोविंद तुला चालताना काठी लागते?’ म्हणत त्यांना आत घेऊन गेले. आत उत्सवी वातावरण होतं. नेवाळकर मंडळीही खूश होती. गोविंदरावांना कुणी अरेतुरे म्हणताना, ज्युनिअरसारखं वागवताना आम्ही प्रथमच पाहात होतो. गप्पा मुख्यत: १९४५ ते १९६० या काळातल्या चालल्यामुळे त्या ऐकणं एवढंच काम आमच्याकडे होतं. तास-दीडतासात माझ्या एकच लक्षात आलं की, बहुधा सगळी रॉयिस्ट मंडळी काँग्रेसवादीच होती. मात्र त्यांनी अधिकृतपणे काँग्रेस सदस्यत्व घेतलं नव्हतं. मग मला काँग्रेस-नेहरू-यशवंतराव समीकरणाची उकल झाली. तिथून आम्ही दादरला ‘प्रीतम’मध्ये जेवायला गेलो. तिथं गोविंदरावांच्या नाशिकच्या एस्कॉर्टकडे त्यांना सोपवलं - तेही काँग्रेसचेच! जेवण्यापूर्वी गोविंदराव बिअर घेत होते, मी जीन घेत होतो. पुन्हा नेवाळकरांचा विषय निघाला आणि माझ्या तोंडून वाक्य गेलं, ‘गोविंदराव, आज तुमचा कन्फेशनचा दिवस दिसतोय!’
गोविंदरावच ते! उलटून काही बोलले नाहीत. मात्र डोळ्यात मी प्रथमच संताप बघितला, त्यांचा हसरा चेहरा लालबुंद झाला. रामने मला चिमटा काढला. जेमतेम जेवण उरकलं. निरोपाचा शेकहँडही झाला. अवघडलेल्या मूडमध्येच आम्ही त्यांना निरोप घेतला.
७.
नऊ वर्षं होऊन गेली. गोविंदराव नक्की नाराज झाले हे तर जाणवतं कारण नंतरच्या माझ्या इमेल्सना त्यांचं उत्तर आलेलं नाही. हल्ली रामलाही क्वचितच इमेल येतो. गोविंदराव अजूनही वाचतात-लिहितात याचे पुरावे मिळतातच. ‘साधना’मधून जागतिक घडामोडींचं विश्लेषण चालू असतंच. मधल्या काळात त्यांचं यशवंतराव चव्हाणांवरचं देखणं पुस्तक प्रकाशित झालं. पण माझे चव्हाणांविषयीचे सर्व प्रश्न, सर्व टीकेचे मुद्दे आणि नाराजी त्या पुस्तकानंतरही कायम राहिली आहे, असं मी त्यांना कळवल्यामुळे कदाचित जुन्या जखमेवरची खपली पुन्हा निघाली असावी; पण त्यांच्याशी खोटं बोलणं तर मला जमणारच नाही. गेल्या वर्षी ‘साधना’ दिवाळी अंकात रविंद्रनाथ टागोरांवरचा त्यांचा मार्मिक लेख अतिशय आवडल्याचं मी कळवलं. इमेल्सना उत्तर येत नाही. क्वचित् मुली पोच देतात.
दोन गोष्टी सांगितल्या पाहिजेतच. आम्ही त्यांना घेऊन श्री. म. माट्यांच्या घरी गेलो होतो. माट्यांना संपादकांचा अनुभव फार वाईट असावा कारण ‘अंगी कोणतीही पात्रता नसताना वर्तानपत्राचा संपादक कुणीही होऊ शकतो’ अशा आशयाचं माट्यांनी लिहिलं होतं. गोविंदरावांची गाठ पडली असती तर त्यांनी आपलं मत नक्की बदललं असतं!
दुसरी आठवण वैयक्तिक स्वरूपाची ‘सुमारांची सद्दी’ ही मी २००३ मध्ये प्रथम वापरलेली फ्रेझ एकदा गोविंदरावांच्या लिखाणात आलेली पाहिली, तेव्हा स्वत:चा हेवा वाटला होता.
सध्या मी एक कल्पनाचित्र रंगवत असतो. आता गोविंदरावांना ९२ वर्ष चालू आहे. त्यामुळे ते इकडे येणार नाहीत हे उघड आहे. ते मला तिकिट पाठवणार नाहीत हेही साहजिकच! पण मी जर माझं सगळं किडूकमिडूक गोळा करून अमेरिकेला गेलोच तर कसा प्रसंग घडेल?
मी त्यांचं घर शोधत जाईन. ते बहुधा आरामखुर्चीत बसून एखादा ग्रंथ चाळत असतील. मी म्हणेन, ‘गोविंदराव, मी विनय!’ ते किंचित पाहिल्यासारखं करून म्हणतील, ‘हां!’ मी चिवटपणे म्हणेन, ‘मुद्दाम तुम्हाला भेटायला आलोय!’ ते पुस्तक चाळतच म्हणतील ‘हां!’. अर्ध्यापाऊण तासाने मी म्हणेन, ‘गोविंदराव, मी आता भारतात परत जातो!’ गोविंदराव न पाहताच म्हणतील, ‘हां!’ आणि मी परत येईन! यातली रिस्क फारच मोठी आहे. त्यापेक्षा इथूनच त्यांना म्हणावं झालं, ‘गोविंदराव, आय मिस यू!’
(अंतर्नाद, दिवाळी २०१६च्या अंकातील लेख लेखक-प्रकाशकांच्या पूर्वपरवानगीने साभार.)
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
ravi mukadam
Thu , 30 March 2017
विनय हर्डिकरांच्या इतर लेखनाप्रमाणेच हा लेख आहे. सतत 'मी' केंद्रस्थानी ठेवून उच्चभ्रू बुद्धिवादी वर्तुळामध्ये स्वतःचे स्थान असल्याचा आव आणायचा. या वर्तुळाचा पोकळपणा दाखवण्याची हिंमत दाखवायची नाही. अशा या पोकळ लेखाबद्दल हर्डिकर यांचे पुनश्च अभिनंदन!
Nivedita Deo
Mon , 27 March 2017
अतिशय सुंदर.