भारतात आळशी लोकांची संख्या दोन टक्क्यांनी वाढली आहे!
पडघम - देशकारण
कलीम अजीम
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Tue , 18 December 2018
  • पडघम देशकारण आळशीपणा नैराश्य मैदानी खेळ व्यायाम

बदलत्या जीवनशैलीनं मैदानी खेळ सपुष्टात आणले, तसं नानाविध आजारांना निमंत्रण मिळालं. आज प्रत्येकांकडे वेळेचा अभाव आहे. दहा ते सहाच्या शिफ्टमध्ये माणूस इतका गुंतला आहे की, त्याला दैनंदिन दीनचर्चा पार पाडण्याचीदेखील उसंत मिळत नाही. अशा वेळी शरीराला व्यायाम मिळणारे खेळ कधी व कसे खेळावे असा प्रश्न असतो.

अनेकांच्या रोजच्या प्राधान्यक्रमात खेळणं हा प्रकार नसतो. बदललेल्या जीवनशैलीनं आमच्या दैनंदिन व्यवहारातून मैदानी खेळ आणि व्यायाम हिरावून घेतला, तशा आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सप्टेंबरमध्ये जागतिक आरोग्य सघटनेनं (डब्लुएचओ) जारी केलेल्या अहवालात भारतीय समाजात वाढणारं नैराश्य व आरोग्याच्या समस्यांवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अशा वेळी वाढत जाणाऱ्या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी पुन्हा ‘मैदानी खेळाकडे वळा’, असा सल्ला हेल्थ एक्सपर्ट व मानसोपचार तज्ज्ञांकडून दिला जात आहे. अवेळी जेवणं, खाण्याच्या पद्धतीत बदल, जंक फूडचं व्यसन, रसायनयुक्त भाज्या व फळे खाल्ल्यानं रक्ताचे व हृदयाचे आजार फोफावत आहेत. वाढत्या आरोग्याच्या समस्यांमुळे निरोगी राहण्यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.

धक्कादायक आकडे

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (डब्ल्युएचओ) अहवालानुसार जगभरातील लोकांमध्ये हृदय रोग, स्ट्रोक आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात वाढला आहे. संघटनेनं सप्टेंबर-२०१८ला जारी केलेल्या ‘इनसफिशिएन्ट फिजिकली ॲक्टिव’ (शारीरिक स्वरूपात कमी सक्रिय) शीर्षकाच्या अहवालात १६८ देशांतून एकत्र केलेल्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे. तब्बल १९ लाख लोकांशी चर्चा करून ही आकडेवारी जमवण्यात आली आहे. यातील सुमारे ७७ हजार भारतीय लोकांशी डब्लुएचओनं संवाद साधलेला आहे. संबधित अहवालात भारतीय लोक शारीरिक सृदढतेच्या बाबतीत चीन, पाकिस्तान, नेपाळ आणि म्यानमारपेक्षाही कमी प्रमाण ॲक्टिव्ह असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

अहवालानुसार भारतातील केवळ ३४ टक्के लोक इनसफिशिएन्ट फिजिकली ॲक्टिव्ह आहेत. यापूर्वी २००१ साली अशा प्रकारचा सर्व्हे झालेला होता. तेव्हा ३२ टक्के लोक इनसफिशिएन्ट फिजिकली ॲक्टिव्ह होते. डब्ल्युएचओच्या या नव्या आकडेवारीत भारतात आळशी लोकांची संख्या २ टक्क्यांनी वाढली आहे.

डब्लुएचओच्या मते शारीरिक दुर्लबलेमुळे जगभरातील तब्बल दीड कोटी तरुणांवर सहा प्रकारच्या गभीर आजाराचा धोका वाढला आहे. यात कार्डियोवेस्कुलर डिसीज, हाइपरटेंशन, टाइप-२ डायबिटीज, ब्रेस्ट आणि आतड्यांचा कॅन्सर आणि डिमेंशियासारख्या आजारांचा सामावेश आहे. भारतात सरासरी पुरुषांच्या तुलनेत महिला कमी ॲक्टिव्ह आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार,  महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, कर्नाटक आणि तमिळनाडूसह बऱ्याच राज्यातील लोकांना या डब्लुएचओनं सर्वेक्षणात सामील करून घेतलं होतं. अहवालात मैदानी खेळाचा अभाव व व्यायाम नसल्यानं या समस्या उद्भवलेल्याचं कारण देण्यात आलं आहे.

खाण्याच्या पद्धती बदलल्यानं व रसायनयुक्त भाजीपाल्यामुळे भारतीय समाजात नवे आजार बळावले आहेत. याबद्दल अनेकदा प्रसारमाध्यमांतून धक्कादायक अहवाल प्रसिद्ध होतात. आजारांचं दुसरं एक कारण भारतीय मीडियानं नोंदवलंय ते म्हणजे  व्यायाम व खेळाच्या अभावामुळे भारतीय लोकांमध्ये आजारांना निमंत्रण मिळतं.

सदृढ व निरोगी आरोग्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये मैदानी खेळ, योगा व व्यायामाला महत्त्व दिलेलं आहे. मैदानी खेळामुळे जीवनातील व्यथा व चिंता विसरण्यास मदत होते. त्यातून मानवी मन ताजंतवाणं होऊन अधिक क्रियाशील होतं. ताणतणाव व कामाचा क्षीण घालवण्यासाठी व्यायाम अधिक फायदेशीर ठरतो. खेळांत शरीराला भरपूर व्यायाम मिळतो. त्यामुळे शरीर मजबूत व बळकट होतं. खेळांमुळे मनोधैर्य, संयम, एकाग्रता व खिलाडू वृत्ती जोपासली जाते. संघटनात्मक खेळामुळे सहकार्याची वृत्ती, संघभावना व नेतृत्वगुण यांना चालना मिळते.

विविध दृष्टिकोनांतून विचार केल्यास खेळाचे अनेक प्रकार पडतात. खेळांची वैशिष्ट्यं लक्षात घेऊन सामान्यतः त्यांचे ढोबळमानाने दोन प्रकार पडतात. त्यात बैठे खेळ व मैदानी असे खेळ आहेत. बैठे खेळ म्हणजे घरात किंवा एकाजागी बसून खेळले जाणारे खेळ. उदा., पत्ते, बुद्धिबळ, कॅरम इत्यादी. तर मैदानी खेळात बॅडमिंटन, क्रिकेट, टेनिस, खो-खो, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल असे आधुनिक तर विट्टी-दांडू, कबड्डी, पोहणे, लपंडाव, धावणे, गोळाफेक, थाळीफेक यांसारखे ग्रामीण खेळ येतात.

प्राचीन काळात महत्त्व

इतिहासाची पानं चाळली तर असं दिसून येईल की, ग्रीक संस्कृतीने जगाला विविध खेळ दिलेले आहेत. तसंच त्या खेळाला विस्तारित स्वरूपही या युनानी लोकांनीच दिलं. आठव्या शतकात ग्रीक देशात खेळाला सुरुवात झाली. ऑलम्पिक खेळाचं पहिलं अधिकृत आयोजन इसवी सन पूर्व ७७६ काळात ग्रीकमध्ये झालं. तर शेवटचं आयोजन इ.स. ३९४ मध्ये झालं.

प्राचीन काळी युनानी युद्धवीर विरंगुळा म्हणून विविध खेळ खेळत असत. नंतरच्या काळात त्याचा विकास होत गेला. सुरुवातीच्या काळात धावणं, बॉक्सिंग, कुस्ती आणि रथांची रेस सैनिक प्रशिक्षणाचे भाग होता. यात उत्तम प्रदर्शन करणाऱ्या प्रतिभागींना वार्षिक खेळ स्पर्धेत खेळण्याची संधी मिळत असे. १२०० वर्षांपूर्वी याच देशानं त्यांच्या पारंपरिक खेळाला आधुनिक स्वरूप देत ऑलम्पिकची सुरुवात केली. पहिलं ऑलम्पिक खेळ १९८६ साली खेळला गेलं. ग्रीकची राजधानी अथेन्समध्ये या खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑलम्पिया नावाच्या पर्वतावर खेळल्या गेलेल्या या खेळाला ‘ऑलम्पिक’ नाव पडलं.

भारतातही प्राचीन काळात धनुर्विद्या, कुस्ती, रथांच्या व घोड्यांच्या शर्यती इत्यादी खेळ प्रचलित होते. भारताप्रमाणे ईजिप्त, चीन, जपान इत्यादी देशांतही शिकार, पत्त्यांचे खेळ, शतरंज यांसारखे खेळ पुरातनकाळापासून रूढ होते. भारतात आजही ग्रामीण भागात विटीदांडू, खो-खो, हुतूतू, गोट्या, लगोरी, सुरपारंब्या, लपंडाव, भातुकली, कुस्ती असे भरपूर खेळ खेळले जातात.

गेल्या काही वर्षात प्रचलित खेळ जसे, क्रिकेट, बुद्धिबळ, कराटे, टेबल टेनिस, फुटबाल, हॉकी,  नेमबाजी आदी आधुनिक खेळांना ग्लॅमर आलेलं आहे. गेल्या पन्नास वर्षांत प्रतिष्ठा म्हणून क्रीडाक्षेत्र पुढे आलं आहे. पारंपरिक चौकटीतून बाहेर येऊन ‘स्टेटस’ म्हणून खेळ हा प्रकार मिरवला जात आहे. खेळाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाल्यानं त्याचं महत्त्व वाढलं. अनेक कॉर्पोरेट्स कंपन्या या खेळाच्या मार्केटिंग बाजारात दाखल झाल्या. कंपन्यांनी जागतिक कीर्तीचे खेळाडू तयार करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. या लाटेनं अनेक नवे खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना मुख्य प्रवाहात आणलं.

व्यावसायिक खेळामुळे सामान्य वर्गांमध्ये खेळाची ओढ निर्माण झाली. खेळाच्या देवाणघेवाण प्रक्रियेतून विविध देशांचे निरनिराळे खेळ खेळले जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटला एकहाती लोकप्रियता लाभली होती. आता विविध ऑलम्पिक खेळाचं महत्त्व जनसामान्याला पटलं आहे. सामान्यामध्ये ऑलम्पिक खेळांप्रती आकर्षण निर्माण झालं आहे, तर दुसरीकडे एका मोठ्या वर्गानं खेळाला सदृढ आरोग्यासाठी सप्रमाण मानून त्याचा व्यक्तिगत विकास केलेला आहे. त्यातूनच आज शहरी व निमशहरी भागात अनेक स्पोर्टस क्लब स्थापन झालेले आहेत.

खेळाचं महत्त्व

शरीर ही आपली संपत्ती आहे. त्याची योग्य देखरेख करणं आपली जबाबदारी बनते. नियमित व्यायाम करून शरीराची निगा राखायची असते. प्रत्येकांनी व्यायाम हा दैनंदिन जीवनाचा भाग बनवला पाहिजे. विविध शारीरिक हालचाली व खेळांमुळे शरीर सदृढ बनतं. खेळामुळे शरीराचा चांगला व्यायाम होतो. स्नायू बळकट होतात. रक्तपुरवठ्यामध्ये नियमितता येते. शरीरातील अतिरिक्त चरबी नाहीसी होते. त्यामुळे शरीराचा चांगला व्यायाम होण्यासाठी मैदानी खेळाला महत्त्व आलं.

आरोग्याच्या दृष्टीनं मैदानी खेळ फायद्याचे असतात. फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल आदी खेळामुळे स्नायूंचा चांगला व्यायाम होतो. नियमित व्यायाम केल्यामुळे मानसिक, शारिरीक, भावनिक संतुलन कायम राहतं. शरीराची जडणघडण दोन्ही बाजूंनी चांगली होते. शरीर प्रमाणबद्ध व सौष्ठवपूर्ण दिसू लागतं.

नियमित धावण्यानं पायांचे स्नायू बळकट होतात. धावण्यानं शरीराच्या पूर्ण हालचाली होतात. त्यातून चालण्याची गती वाढते, चालण्यातला वाकडेपणा जातो. शरीर बॅलेन्सिंग होतं. धावण्यानं शरीरात चपळता येते. नियमित व्यायाम खेळामुळे कार्यक्षमता वाढीस लागते. चांगल्या आरोग्यासाठी खेळातून शारीरिक श्रमाला महत्त्व आलं. नियमित व्यायाम करून घाम गाळणं दैनंदिन नित्यकार्य झालेलं आहे. आरोग्याला हितकारक म्हणून व्यायामाला अनेकांनी जोपासलं आहे.

बदलत्या जीवनशैलीचे परिणाम

वाढतं शहरीकरण व बदलत्या जीवनशैलीमुळे मैदानी खेळ लयास जाण्याच्या मार्गावर आहेत. धकाधकीच्या काळात शारीरिक कष्ट उपसण्याचं सगळ्यांनी सोडून दिलं आहे. कोणतीही गोष्ट अलीकडे सहज साध्य होते. त्यामुळे चालण्याचे प्रकार थांबले आहेत. दुसरीकडे शहरात मैदानं कमी होत आहेत. वेळेच्या अभावानं मैदानी खेळ दिनचर्येतून गायब झालेले आहेत. त्याजागी बैठ्या खेळाचं चलन वाढलं. त्यातही फक्त कम्प्युटर व मोबाईलवर आधारित खेळाचं चलन फोफावत आहे. ऑनलाईन व्हिडिओ गेम्स, मोबाईल गेम्स, कॉम्पुटर गेम्स आमच्या जीवनाचा अनिभाज्य भाग बनला आहे. पूर्वी विरंगुळा म्हणून खेळ खेळले जात असत, पण मोबाईल गेम ॲडिक्शन (लागण) म्हणून खेळावंच लागतं, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

आधुनिक प्रकारच्या या बैठ्या खेळामुळे नव-नव्या आजारांना आमंत्रण मिळालं आहे. कॅरम व बुद्धिबळ वगळता इतर खेळांमुळे साहजिकच आयोग्यावर आघात केला. मोबाईल व कॉम्प्युटर आधारित खेळामुळे आपसातील संवाद संपुष्टात आलेला आहे. तसंच शारीरिक हालचालीदेखील कमी झालेल्या आहेत. त्यातून आळशीपणाही वाढला आहे. अनिद्रासारख्या भयंकर आजार आज प्रत्येकामध्ये बळावला आहे. इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या अति वापरामुळे एकाग्रतेचा अभाव तरुणामध्ये दिसून येत आहे. त्याचा विपरित परिणाम म्हणून शारीरिक तसेच मानसिक ताण येतो. सेलफोनमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅगनेटिक रेडिएशनचा सर्वांत वाईट परिणाम आपल्या ब्रेनवर होतो. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार गॅझेटच्या अतिरेकी वापरामुळे ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता दाट असतो. रेडिएशनमुळे शरीराच्या तापमानात अतिरिक्त वाढ होते. त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो.

एका संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की, रात्री उशीरापर्यंत संगणक व मोबाईलवर बसल्यामुळे झोपेचा सरासरी वेळ कमी झाला आहे. सकाळी ऑफिससाठी लवकर उठायचं असल्यामुळे रात्री कितीही उशीरा झोपलं तरी सकाळी उठावंच लागतं. दुसरीकडे उठण्याच्या दडपणातून जागरणाचं प्रमाण वाढलं आहे. म्हणजे तंत्रज्ञानानं आमची शांत झोप हिरावून घेतली आहे. झोपेचं प्रमाणही कमी झालंय. शरीराला पुरेशी झोप नसल्यानं चिडचीड, राग, डोकेदुखी, मळमळ होणं, उलट्या, भूक न लागणं, पोट साफ न होणं इत्यादी आजार बळावले आहेत.

इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या अती वापरामुळे आलेल्या आजारांबद्दल जागतिक स्तरावर गंभीर चर्चा सुरू आहे. जगभरात हा आजार चिंतेचा विषय म्हणून पुढे येत आहे. सतत मोबाईल खेळणं हा मानसिक आजार असल्यानं संशोधन जागतिक आरोग्य संघटनेनं जून २०१८मध्ये जारी केलं आहे. संघटनेनं जाहीर केलेल्या इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसिजेस म्हणजे जागतिक स्तरावरील आजारांचं प्रमाण यामध्ये ऑनलाईन गेम खेळण्याच्या व्यसनला एक मानसिक आजार म्हटलं आहे. सतत गेम खेळल्यामुळे आयुष्यातील इतर प्राधान्याच्या व महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचं या अहवालामध्ये नोंदवण्यात आलं आहे. नव्या आजाराची काही लक्षणं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशननं या अहवालात जारी केलेली आहेत.

डब्लूएचओच्या २०११च्या अन्य अहवालानुसार भारत नैराश्यग्रस्त माणसांचा देश झालेला आहे. भारतातील डॉक्टरांच्या वर्ल्ड असोसिएशन ऑफ सोशल साइकिएट्री संघटनेनं हा अहवाल स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यांच्या मते भारतात मानसिक आजारांचा इलाज करणारे डॉक्टर आणि पुरेसा सुविधांचा अभाव आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो की, भारतात मानसिक रोगी वाढत आहेत.

डब्ल्यूएचओनं आपल्या रिपोर्टमध्ये वेगवेगळ्या उत्पन्न गटाच्या १८ देशातील ९० हजार लोकांशी चर्चा केली होती. या रिपोर्टनुसार १० सर्वांत जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या देशात ताण आणि नैराश्याचं सरासरी वय १४.६ टक्के होतं, तर आठ मध्यम आणि कमी उत्पन्न असणाऱ्या देशात हे आकडे सरासरी ११.१ टक्के आहेत. २०११च्या जुलै महिन्यात जारी झालेल्या या अहवालात भारतात ९ टक्के लोकांचं आयुष्य  ताण व नैराश्यानं ग्रासलेलं आहे. भारतीय लोकांमध्ये मेजर डिप्रेसिव्ह एपिसोड्स सर्वांत जास्त म्हणजे ३५.९ टक्के आहेत. चीनमध्ये प्रमाण १२ टक्के आहे.

डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार भारतात नैराश्यग्रस्त लोकांची संख्या सतत वाढत आहे. आरोग्य तज्ज्ञाच्या मते हा रेशो रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. जर वेळी उपाययोजना केल्या नाहीत, तर निराश लोकांचं वय सरासरी कमी होऊन ३० वर्षांपर्यंत येऊन पोहोचेल, अशी भीती या अहवालातून व्यक्त करण्यात आलेली आहे.

भारत सरकारनं १९८२ साली राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केला होता. हा प्रयोग मानसिक रोगींची वाढती संख्या आणि त्यांच्यावर उपचाराच्या साधनांचा अभाव यासाठी सुरू करण्यात आला होता. परंतु मनोचिकित्सकांच्या कमतरतेमुळे याचा चांगला उपयोग होऊ शकला नाही. तज्ज्ञांच्या मते या संकटापासून बचाव करण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे.

भारतात प्रत्येक १० लाख व्यक्तीमागे फक्त ३.५ मनोचिकित्सक आहेत. यामुळेदेखी समस्या वाढत आहेत. डबलुएचओच्या मते बरेचशे डॉक्टर शहरात राहतात. ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था फारच वाईट आहे. परिणामी ग्रामीण निमशहरी भागात राहणाऱ्या नैरास्यग्रस्त व्यक्तींना योग्य उपचार मिळू शकत नाही.

जागतिक आरोग्य सघटनेच्या (डब्ल्युएचओ) एका अन्य अहवालात भारतीयात नैराश्यामुळे अकाली अपंगत्व येण्याचं प्रमाण वाढलं आहे. २०१५ पर्यंत जगभरात नैराश्यग्रस्तांची संख्या ३२.२ कोटी होती. डब्ल्युएचओनं याला ‘धोक्याची घंटा’ म्हणत मानसिक आरोग्यासंदर्भात पारंपरिक दृष्टिकोन बदलण्याची गरज व्यक्त केली होती. संयुक्त राष्ट्रानं जारी केलेले हेच आकडे ३० कोटी होते. संयुक्त राष्ट्राच्या मते गेल्या १० वर्षांत या संख्येत १८ टक्के वाढ झालेली आहे.

भारतात वाढणाऱ्या प्रदूषणाला घेऊन गेल्या वर्षी ९ डिसेंबरला ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये एक बातमी प्रकाशित झाली होती. त्यानुसार भारतानं जर डब्लुएचओच्या मानकांचं पालन केलं नाही तर इथले लोक केवळ नऊ वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. आणि जर मानकांचं पालन केलं तर फक्त सहा वर्षं जिवंत राहू शकतात. त्यातही कोलकाता आणि मुंबईचे लोक ३.५ वर्षं जिवंत राहू शकतात. २०१४ आणि २०१५ या वर्षांत दिल्ली जगातील सर्वांत जास्त प्रदूषित शहर होतं. डब्लुएचओच्या मानकांनुसार Particulate matter (PM) चा शर्थी स्वीकारल्या जाव्यात. या प्रयोगानं वायू प्रदूषणाचा स्तर ७० ते २० µg/m3 कमी केल्यानं होणाऱ्या मृत्यूची सरासरी कमी केली जाऊ शकते.

जागतिक स्तरावरील नामांकित आरोग्य मासिक ‘द लँसेट’च्या मते दर वर्षी  वायू प्रदूषणामुळे १० लाखांपेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होतो. २०११च्या आकडेवारीनुसार मासिकानं फेब्रुवारी २०१८मध्ये आपली धक्कादायक आकडेवारी जारी केली. त्यात असं म्हटलं आहे की, जलवायू परिवर्तनामुळे मानवीय आरोग्यावर त्याचा सर्वांत जास्त धोकादायक परिणाम होऊ शकतो. मासिकाच्या मते जगातील अवेळी होणाऱ्या मृत्युमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. ‘द लँसेट’च्या मते जगभरात वायू प्रदूषणामुळे दररोज १८ हजार लोक मरतात.

उपाययोजना

सप्टेंबर २०१८ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं एक अहवाल जारी केला होता. त्यात भारतातील तब्बल ३४ लोक निरोगी राहण्यासाठी पुरेसा व्यायाम करत नाही, असा खुलासा करण्यात आला होता. अहवालाच्या मते जागतिक पातळीवर तब्बल १.४ अब्ज लोकांमध्ये पर्याप्त शारीरिक हालचाली न केल्यामुळे गंभीर आजारांचा धोका बळावला आहे. या अहवालामध्ये असंही नोंदवण्यात आलेलं आहे की, २००१ नंतर या परिस्थितीत कुठलाही बदल झालेला नाही. व्यायामाच्या कमतरतेमुळे हृदय रोग, टाइप-२ मधुमेह, डिमेंशिया आणि कॅन्सर यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.

हार्ट केअर फाउंडेशन (एचसीएफआई)च्या मते, एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहण्याच्या सवयीनं आरोग्यावर नकारात्मक परिणाम पडत आहे, जे लोक बैठे म्हणजे डेस्कचे जॉब करतात, खुर्चीवर बसून आपलं जास्तीत-जास्त काम उरकतात, अशा लोकांमध्ये हा धोका जास्त आढळून येत आहे.

दिवसेंदिवस कामाचा वाढता व्याप वाढतो आहे, अशा परिस्थितीत आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. संगणकावर काम करणाऱ्या व्यक्तींनं आपल्या कामाच्या वेळा ठरवून घेतल्या पाहिजेत. सतत कॉम्पयुटरला चिकटून बसण्यापेक्षा थोडीशी उठ-बस केलेली बरी. संगणकाच्या रेडिएशनमुळे डोळ्यांना व पाठीला कायमस्वरूपी इजा होऊ शकते, असं संशोधनातून सिद्ध झालं आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेतलेली बरी. कॉम्प्युटरवर सलग बसण्यापेक्षा थोडासा खंड देऊन बैठक मारली पाहिजे. मधून-मधून चहा व तोंडावर पाणी मारण्यासाठी उठलं पाहिजे. थोडंसं बाहेर जाऊन लांबपर्यंत फेरफटका मारला पाहिजे. स्क्रीन व डोळ्यांमधील अंतर, बसण्याची जागा याचा एक ठराविक नियम बनवावा.

ऑफिसमध्ये काम करताना मध्यंतरात काही वेळ कॉम्प्युटर बंद करावा. जेवणानंतर थोडीशी शतपावली करावी. या वेळेत बुद्धिबळाचा एखादा डाव खेळण्यात हरकत नाही. तसंच बॉलला जमिनीवर आदळून खेळावं. जागा असेल तर बॅडमिंटनचा एखादा डाव खेळावा. या खेळानंतर काम सुरू केल्यानंतर कार्यक्षमता दुपट्टीनं वाढते. अंगात तरतरी येते. ताण हलका होऊन उत्साह येतो.

दैनंदिन व्यवहारातून थोडासा वेळ काढून छोटे-छोटे मैदानी खेळ खेळता येऊ शकतात. रात्री जेवणानंतर व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेनिस खेळता येऊ शकते. काही वेळ चालण्यानंसुद्धा बराच फरक पडू शकतो. असे प्रयोग मुंबईतील अनेक कॉर्पोरेट्स कंपन्यामध्ये सुरू झालेला आहे. या प्रयोगानंतर तिथली कार्यक्षमता वाढल्याचं वृत्त प्रसारमाध्यमामध्ये वाचनात आलं होतं.

सकाळी नियमित लवकर उठणं व आपल्या नित्यक्रमाला लागणं ही चांगली सवय आहे. झोपेतून उठून थोडसं दोन-एक किलोमीटर पायी चालणं आरोग्याच्या दृष्टीनं हितावह होऊ शकतं. तासभर चालण्यानं दिवसभर उत्साह कायम राहतो. सकाळची स्वच्छ हवा शरीराला लाभदायी असते. त्यामुळे नित्यक्रमानं ही सवय लावून घेतली पाहिजे.

हार्ट केअर फाउंडेशनच्या मते आहारामध्ये बदल केल्यानेदेखील बराच फरक पडू शकतो. रोजच्या अन्नामध्ये एकदलीय धान्य, फळं आणि भाजीपाल्याचा समावेश केला पाहिजे. रेशेदार अन्नामुळे दीर्घकाळापर्यंत तुमचं पोट भरल्यासारखं वाटेल. शक्य असेल तेवढं प्रोसेस्ड आणि रिफाइंड अन्न टाळावं, असाही सल्ला हार्ट केअर फाऊंडेशननं दिलेला आहे. अधिक प्रमाणात मद्यसेवन वजन वाढण्यास कारणीभूत ठरतं. त्यामुळे मद्यप्राशन टाळावं. मद्य रक्तदाब आणि ट्राइग्लिसराइडची पातळी वाढवू शकते. हार्ट केअर फाउंडेशनच्या मते पुरुषांनी रोज दोन पेग तर महिलांनी एका पेगवर मद्य सेवन थांबावं. धूम्रपान केल्यानं मधुमेहाची शक्यता दुपटीने वाढतं. त्यामुळे ही सवय शक्यतो सोडावी असा सल्लाही हार्ट केअर फाउंडेशननं दिलेला आहे.

नियमित व्यायाम करणं ही देखील चांगली सवय आहे. वेळ नसल्याचं कारण देत आपण व्यायाम टाळतो. पण दहा मिनिटांचा व्यायाम तुमच्या शरीरासाठी लाभकारी ठरतो. त्यामुळे दैनंदिन व्यवहारातून दहा मिनिटं सहज काढता येतात. या वेळात छोटासा मैदानी खेळ किंवा योगा केल्यास शरीराला लाभकारी ठरू शकतो. सकाळी किंवा सध्याकाळी व्यायामासाठी वेळ राखीव ठेवता येऊ शकतो. कुठेही असा- प्रवासात, ऑफिस, घरी, अंथरुणावर तिथं छोटीशी व्यायामक्रिया सहज पार पाडता येऊ शकते.

आपल्याकडे वेळ भरपूर असतो. पण आळस आपल्याला वेळेचं कारण पुढे करायला भाग पाडतो. दिवसभराचा वेळ कसा खर्च केला याची उजळणी केली तर आपल्याला दिसून येईल की, आपण किती अमूल्य वेळ फालतू कामात वाया घालवला आहे. त्या वेळेत महत्त्वाची कामं करून उरलेला वेळ व्यायामासाठी वापरता येऊ शकतो.

दिवसभरात किमान दोन किलोमीटर पायी चालणं आरोग्याच्या दृष्टीनं हिताचं आहे. आपलं वाहन कामाच्या ठिकाणापासून लांब पार्क करता येऊ शकतं. परत जाण्यासाठी लांबचा बस स्टॉप निवडता येऊ शकतो. बाजारात खरेदी करताना गाडी एका ठिकाणी पार्क करून फिरता येऊ शकतं. जवळच्या ठिकाणी कामासाठी जाताना गाडीची गरज शक्यतो भासत नाही, तिथं सायकलीचा वापरदेखील करता येऊ शकतो.

राज्य व स्थानिक सरकारनं महानगरात सायकल स्टॅण्ड उभे केले आहेत. ते वापराविना धुळखात पडल्या आहेत. त्याचा वापर केला जाऊ शकतो. सायकलींची संख्या वाढली तर सायकल ट्रॅक तयार केले जाऊ शकतात. सायकलीचा प्रवास सदृढ आरोग्य देऊ शकतो, तर प्रदूषण कमी होऊ पर्यावरणाचं जतनही केलं जाऊ शकतं. छोट्या मैदानी खेळाला दैनंदिन सवय करून घेतली पाहिजे. आधुनिक शिक्षणशास्त्र व आरोग्यशास्त्रात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. सदृढ व निरोगी आरोग्याचं एक महत्त्वाचं अंग म्हणून खेळांचा विकास झालेला आहे. खेळातून विरंगुळा मिळतो. त्याबरोबरच शरीरास व्यायाम मिळून मन आणि शरीर प्रसन्न व कार्यक्षम बनतं. म्हणूनच खेळांना व्यक्तिगत व सामाजिक महत्त्व प्राप्त झालं आहे.

.............................................................................................................................................

लेखक कलीम अजीम 'सत्याग्रही विचारधारा' मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.

kalimazim2@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......