पुस्तकांनी नादावलेल्यांच्या जगाची सफर
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
विकास पालवे
  • ‘लीळा पुस्तकांच्या’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 07 July 2017
  • ग्रंथनामा Booksnama लीळा पुस्तकांच्या Leela Pustakanchya नीतीन रिंढे Nitin Rindhe पुस्तकांविषयीची पुस्तकं Book on Books लोकवाङ्मय गृह Lokvangmaya Griha

‘मैं किताबों की शरण में वैसे ही जाता हूँ, जैसे लोग धुआंधार बमबारी से बचने के लिए अण्डरग्राउण्ड डेरे में जाते हैं।’ - निर्मल वर्मा

वाचन ही एकट्यानं आणि गंभीरपणे करावयाची कृती आहे. या कृतीत सातत्य आणि शिस्त असणं या अत्यंत मूलभूत व आवश्यक गोष्टी आहेत. यासाठी प्रसंगी वाचकाला सगळ्या बंधनांपासून स्वत:ला बाजूला करून घेत एकटं पडावं लागतं. यामुळे ‘स्वार्थी’, ‘तुसडा’, ‘क्रूर’ अशी विशेषणं आपल्या नावामागे लावली जातील, हे ठाऊक असूनही त्याला ही जोखीम पत्करावी लागते. निर्मल वर्मा यांनी या कृतीला म्हणूनच ‘अण्डरग्राउण्ड’ होण्याशी जोडलेलं आहे.

प्रत्येकाच्या वाचनाची निमित्तं वेगवेगळी असू शकतील, पण म्हणून या सगळ्या प्रकारच्या वाचकांना वाचन, पुस्तकं यांविषयी जिव्हाळा असेलच असं नाही. हिंदी सिनेमे, क्रिकेट यांविषयीचं प्रेम जसं आपल्या समाजात लहानपणापासून आपसूकच निर्माण होत जातं, त्याप्रमाणे पुस्तकांविषयीचं प्रेमही लहान वयातच निर्माण होईल, अशी काही ठोस व्यवस्था आपल्याकडे नाहीच.

यासाठी काहीएक व्यवस्था उभी करायची झालीच तर ‘पुस्तकांविषयीची पुस्तकं’ हा त्यातील एक महत्त्वाचा घटक होऊ शकेल. मराठीत या स्वरूपाच्या पुस्तकांचं प्रमाण तुरळकच आहे. नीतीन रिंढे यांचं ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तक म्हणूनच या प्रकारातील अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तक ठरतं. या पुस्तकाला लिहिलेल्या ‘विषयांतर...’नामक मनोगतात त्यांनी पाश्चात्य देशांतील पुस्तकसंस्कृती आणि वाचनसंस्कृती यांविषयीची त्यांची मतं, त्याचबरोबर आपल्याकडील वाचनसंस्कृती आणि ‘पुस्तकांविषयीचं पुस्तकं’ या प्रकारात केलं गेलेलं लेखन, समाजात वाचनसंस्कृती रुजावी, यासाठी ही पुस्तकं कशी साहाय्यभूत ठरू शकतात आणि या विषयासंदर्भात आपण एकूणच आजपर्यंत गाठलेली मजल यांविषयी सविस्तर लिहिलं आहे.

पाश्चात्य समाजात सगळ्या थरांतल्या लोकांत ‘पुस्तक’ या गोष्टीविषयी अपार जिव्हाळा, प्रेम असल्याचं दिसून येतं. पुस्तकं, लेखकांच्या अप्रकाशित डायऱ्या, पत्रं यांची जपणूक करण्याकडे त्या लोकांचा विशेष कल असतो. आणि म्हणूनच त्या समाजात पुस्तकांचा अनेक अंगांनी विचार, अभ्यास, संशोधन होऊ लागलं. पुस्तकांची मुखपृष्ठं, अर्पणपत्रिका, समासातल्या नोंदी, बुकमार्क्स, बुकशेल्फ, यांविषयी तिथल्या संशोधकांनी स्वतंत्र पुस्तकं लिहिली आहेत. त्यात नवनवीन विषयांची भरही सातत्याने पडत राहते. आता तर ‘पुस्तकांतल्या तळटिपांचा इतिहास’ या विषयावरही संशोधन सुरू आहे. लवकरच हे संशोधनही पुस्तकरूपाने प्रकाशित होईल. नीतीन रिंढे यांनी उपरोक्त उल्लेख केलेल्या विषयांसंबंधीच्या पुस्तकांवरील लेख आपल्या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. पुस्तकांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या रहस्यकथा-कादंबऱ्या यांवरही दोन लेख आहेत. पुस्तकचोरी याविषयीची चर्चाही एका लेखात आहे. न वाचलेल्या पुस्तकांविषयी जाहीरपणे बिनदिक्कत कसं बोलावं याविषयी चर्चा करणाऱ्या एका पुस्तकावरील लेखही आपल्याला वाचायला मिळतो. पुस्तकांच्या मुखपृष्ठांचा इतिहास कथन करणाऱ्या पुस्तकाविषयी लिहिताना त्यांनी केवळ त्या मुखपृष्ठांविषयीच लिहिलंय असं नाही, तर त्या त्या पुस्तकाच्या आशयासाठी ती मुखपृष्ठं कशी समर्पक होती हेही सोदाहरण पटवून दिलं आहे.

पुस्तकांच्या विविध बाजूंविषयीचं हे लेखन वाचून आपल्याकडेही कोणाला अशा तऱ्हेचा अभ्यास-संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली तर या पुस्तकाच्या लेखनाचा हेतू सफल झाला असं म्हणता येईल.

लीळा पुस्तकांच्या - नीतीन रिंढे

प्रकाशक - लोकवाङ्मय गृह, मुंबई

मुखपृष्ठ - नीतिन दादरावाला

पाने – १९२, मूल्य – २५० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3383

.............................................................................................................................................

नीतीन रिंढे यांनी आपल्या या पुस्तकात केवळ इतर देशांतल्या पुस्तकांच्या इतिहासाविषयीचा किंवा विविध पैलूंचा आढावा घेतलेला नाही तर प्रसंगोपात्त भारतातील पुस्तकनिर्मितीच्या इतिहासावरील संशोधन, त्याविषयी प्रसिद्ध झालेली पुस्तकं, या विषयांची माहितीदेखील दिलेली आहे. त्या त्या देशांत ज्ञानकोश, शब्दकोश यांच्या निर्मितीसाठी व्यक्तिगत आणि संस्थात्मक पातळीवर कसं काम केलं जातं, तिथले समीक्षक-संशोधक कशा तऱ्हेनं आपलं लेखन अद्ययावत, परिपूर्ण व्हावं यासाठी अपरिमित कष्ट उपसत असतात आणि या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशात काय परिस्थिती आहे, याबद्दलही ते भाष्य करतात.

वॉल्टर बेंजामिन, अल्बर्तो मँग्वेल, उम्बर्तो इको या समीक्षक-संशोधक-पुस्तकसंग्रहाकांविषयी स्वतंत्र लेख आहेत. या लेखकांची अनावश्यक ठरू शकेल अशी चरित्रात्मक माहिती देण्याचं त्यांनी टाळलं, हे बरंच झालं. संबंधित लेखकाचं वाचन, पुस्तकसंग्रह यांतल्या चढ-उतारांना पूरक ठरेल अशीच माहिती ते देतात. त्यामुळे लेखांची लांबी आटोक्यात आली आहे. आजच्या इंटरनेटच्या जमान्यात मिळालेली सगळी माहिती येनकेनप्रकारेण आपल्या लेखात ‘कोंबून’ आपली ‘विद्वत्ता’ प्रदर्शित करण्याच्या घातकी लालसेपासून हे लेख कोसो दूर आहेत.

‘वाचक जेव्हा कादंबरीचं पात्र बनतो...’ या लेखात वाचकाला कादंबरीचं पात्र बनवून लिहिल्या गेलेल्या इतर भाषांतील कादंबऱ्यांबद्दल लिहिताना ते मराठीतील अशा प्रकारच्या लेखनासंबंधी काय परिस्थिती आहे, याचीही माहिती देतात. युरोपीय कादंबऱ्यांत पुस्तकाला महत्त्वाचं स्थान दिलं जातं, पण तसं भारतीय भाषांतल्या कादंबऱ्यांमध्ये मात्र होताना आढळत नाही, याचा संबंध ते ‘आपल्या समाजाच्या अविकसित पुस्तकसंस्कृतीशी’ जोडतात. किंवा कादंबरीकारांनी स्वत:च्या लेखन प्रक्रियेविषयी लिहिलेल्या पुस्तकांबाबत लिहिताना मराठीत अशा स्वरूपाचं लेखन कोणत्या स्तरावर आहे, याविषयीही ते टिप्पणी करतात. ‘फिल्शनमधली पुस्तकं’ या लेखात त्यांनी ज्या कादंबऱ्यांच्या आशयसूत्रात पुस्तकं केंद्रस्थानी आहेत, अशा मोजक्या कादंबऱ्यांचा आढावा घेतला आहे. त्या कादंबऱ्यांविषयीचं त्यांचं विवेचन आणि त्या कादंबऱ्यांची रोचक कथानकं, यांविषयी वाचल्यानंतर अशा स्वरूपाच्या अधिकच्या काही कादंबऱ्यांचा शोध घेण्याची जिज्ञासा वाचकाच्या मनात निर्माण होते.

उम्बर्तो इको

‘‘एका ‘तरण्या’ कादंबरीकाराचा कबुलीजबाब’ हा लेख तर कोणत्याही कादंबरीकाराला मार्गदर्शक ठरू शकेल असा आहे. उम्बर्तो इको या लेखकाच्या लेखनप्रक्रियेविषयी, लेखनासाठी तो घेत असलेल्या मेहनतीविषयीची माहिती या लेखातून मिळते. लेखकावरच्या प्रेमानं त्याच्याविषयी उपलब्ध होऊ शकणाऱ्या सर्व वस्तू जमवण्याचं झपाटलेपण काय असू शकतं याची प्रचीती ‘अत्तरविक्याचं प्रूस्तप्रेम’ हा लेख वाचल्यानंतर येते. त्या देशांत लेखकाचं साहित्य तर जपलं जातंच, पण त्याचबरोबरीने लेखकाच्या इतर बारीकसारीक वस्तू, छोटे छोटे कागदाचे चिटोरे यांचाही सांभाळ करण्याची वृत्ती दिसून येते. या विषयासंबंधी आपल्या समाजात किती ‘आनंदीआनंद’ आहे, याविषयी खरं तर रिंढे यांना स्वतंत्र लेखही लिहिता येईल.

पुस्तकं आणि वाचन यांबद्दलच अनास्था असणाऱ्या आपल्या समाजात म्हणूनच तर महात्मा गांधीजींची सही असलेलं पुस्तक रस्त्यावरच्या रद्दीवाल्याकडे मिळून जातं! (हे पुस्तकही रिंढे यांनाच मिळालं होतं). जर पुस्तकांचीच अशी दशा असेल तर त्यांच्या वस्तू संग्रहालयातून चोरीला जातात, याचं आश्चर्य वाटू नये. असो. हा लेख वाचून निदान सुजाण, जाणकार मंडळींनी तरी आपल्याकडे लेखकाची पत्रं, डायऱ्या, हस्तलिखितं, इतर सामग्री यांची जपणूक करण्यासंबंधी काहीएक सोय करता येईल का, या अंगानं विचार करायला हरकत नाही. या कामात त्या त्या लेखकांच्या प्रकाशकांनाही हातभार लावता येईल.

लेखक-समीक्षक यांनी वाचलेल्या पुस्तकांवरून त्यांची चरित्रं लिहिली गेलीत, अशा पुस्तकांविषयीचे लेखही आहेत. हिटलरच्या पुस्तकसंग्रहाविषयी, वाचनाविषयी मागोवा घेणाऱ्या पुस्तकावरील दीर्घ लेखही आहे. वाचक कसा असू नये याचं आदर्श उदाहरण म्हणजे हिटलर. जो कलाविचार, तत्त्वज्ञान यांविषयांवरील पुस्तकंही वाचत होता आणि त्याची प्रत्यक्ष कृती मात्र या प्रकारच्या पुस्तकांतून होणाऱ्या संस्कारांच्या विरुद्ध जाणारी होती. तसेच एकाच प्रकारच्या विचारांचं समर्थन करणारी पुस्तकं तो वाचत होता आणि त्यामुळे त्याच्यात संकुचितपणा, आपल्या विचारांविषयीची कट्टरता दिसून येते. म्हणूनच वाचनाविषयीची आपली भूमिका कशी असू नये, हे ठरवण्यासाठीदेखील हा लेख साहाय्यभूत ठरू शकतो.

प्रत्येक लेखात वर्णन केलेले किस्से, लेखक आणि पुस्तक विक्रेत्यांच्या आयुष्यात घडलेल्या गमतीजमती, काही लेखकांचं तऱ्हेवाईक वागणं, दुर्मीळ पुस्तकांचे व्यवहार, ती पुस्तकं मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे संग्राहक, यांमुळे आपण कधी विस्मयचकित तर कधी स्तब्ध होऊन जातो. एखादा पट्टीचा वक्ता एखाद्या विषयाची पार्श्वभूमी, विषयप्रवेश आणि त्याचे विविध आयाम अत्यंत खेळकर, गमतीशीर शैलीत अशा प्रकारे उलगडत जातो, की आपण त्या विषयाच्या शेवटापर्यंत पोहोचलो आहोत, हेही आपल्या ध्यानी राहत नाही.

रिंढे यांच्या लेखांची शैली ही बहुतांशी अशीच आहे. हे पुस्तक हाती घेतल्यानंतर कधी वाचून संपतं, तेही कळत नाही. याचं श्रेय त्यांच्या सुबोध मांडणीला जातं. उम्बर्तो इको या लेखकाच्या भाषेबाबत ते एके ठिकाणी म्हणतात की, ‘इकोचं लेखन कोणत्याही विषयावरचं असो, ते अकादमिक क्षेत्राबाहेरच्या सर्वसामान्य वाचकाला कधीच कंटाळवाणं, अनाकलनीय होत नाही. खेळकर आणि सुबोध भाषाशैली ही त्याच्या लेखनाची वैशिष्ट्यं.’ हेच वर्णन रिंढे यांच्या लेखनशैलीबाबतही तितकंच चपखलपणे लागू होऊ शकेल. जेव्हा एखादा विषय लिहिणाऱ्याला पूर्णपणे कळलेला असतो, तेव्हाच अशी मांडणी शक्य होते. पुस्तकाविषयी किंवा लेखांविषयी लिहिताना अत्यंत साध्या भाषेत त्यांचं मर्म सांगण्याची हातोटी त्यांना लाभलेली आहे.

काही लेखांत एखाद्या पुस्तकाविषयी लिहिताना दुसऱ्याच एखाद्या पुस्तकातील कथेचा उल्लेख येतो; एखाद्या पुस्तकातील लेखाविषयी लिहिताना एखाद्या कादंबरीचा उल्लेख येतो, पण त्यात काहीएक सूत्र असतं. एखादं पुस्तक कोणत्या पार्श्वभूमीवर लिहिलं गेलं, त्यातील आशय-विषय काय इथवरच विवेचन करून ते थांबत नाहीत, तर ते पुस्तक वाचकाने का वाचायला हवं याचंही मार्गदर्शन करतात.

नीतीन रिंढे यांच्या या सर्व लेखनातील वेगळेपण असं की, त्यांनी केवळ या लेखकांचं कौतुकच केलेलं नाही तर आवश्यक तिथं त्या लेखकाने मांडलेल्या विचारांतील उणिवा, अपुरेपणा यांविषयीही अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध मांडणी केली आहे.

साधारणपणे आपण म्हणू शकतो की, पुस्तकं आणि वाचन या दोन बाबी केंद्रस्थानी ठेवून लिहिलेलं हे पुस्तक आहे. पुस्तकांनी नादावलेल्या जगातील एका रहिवाशानं इतर समानधर्मी रहिवाशांचा, त्यांच्या वाचन आणि पुस्तकवेडाचा करून दिलेला हा परिचय आहे. अभ्यासाबाहेरची पुस्तकं म्हणजे निव्वळ रद्दी अशी समजूत असणाऱ्या घरात राहूनही निग्रहानं ग्रंथसंग्रह करू इच्छिणाऱ्या आपल्या समाजातील कोणाही ग्रंथसंग्राहकाला नीतीन रिंढे यांच्या या पुस्तकामुळे मोठाच आधार वाटू शकेल.

हे पुस्तक वाचल्यानंतर या संग्राहकाच्या हेही लक्षात येईल की, त्याच्याकडे केवळ भरपूर पैसे आणि चांगल्या लेखकांची-पुस्तकांची यादी असून भागत नाही, तर त्याला सातत्यानं ही पुस्तकं मिळवण्यासाठी परिश्रम करावे लागतात. यासाठी त्याला पुस्तकांच्या दुकानांना, रस्त्यावरच्या पुस्तकविक्रेत्यांच्या स्टॉल्सना, रद्दीच्या दुकानांना भेटी देत राहाव्या लागतात. एखादा मध्यमवर्गीय चाकरमनी ज्याप्रमाणे अधूनमधून एलआयसीची पॉलिसी कधी ड्यू होणार हे पाहत असतो, तसंच पुस्तकसंग्राहकाला अधूनमधून पुस्तक प्रदर्शनांच्या तारखांकडे लक्ष ठेवावं लागतं.

वाचनाला जगण्यातील महत्त्वाची, प्राधान्याची बाब समजणारा कोणताही वाचनवेडा हा कोणत्याही टप्प्यावर समाधानी नसतोच. नीतीन रिंढे यांच्या या पुस्तकामुळे आपण समृद्ध होऊ, पण समाधानी नक्कीच होणार नाही. वाचावयाच्या पुस्तकांच्या यादीत आणखी काही नावांची भर पडेल. विनोद कुमार शुक्ल या हिंदीतील थोर लेखकाने एका मुलाखतीत असं म्हटलं आहे की, नुसत्या वाचनासाठी किमान ५०० वर्षांचं आयुष्य असायला हवं किंवा संपूर्ण आयुष्य रविवारच्या दिवसासारखं तरी असायला हवं. या वक्तव्यातून स्पष्ट होते ती वाचनाविषयीची प्रचंड असोशी. तळमळ. नीतीन रिंढे यांच्या या पुस्तकामुळे ही असोशी, तळमळ यांत आणखीच वाढ होते आणि हेच या पुस्तकाचं खरं यश आहे.

लेखक प्रकाशन व्यवसायात कार्यरत आहेत.

vikas_palve@rediffmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......