टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • दिग्विजय सिंह, विश्वनाथ महाडेश्वर, नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी
  • Thu , 09 March 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या दिग्विजय सिंह Digvijay Singh विश्वनाथ महाडेश्वर Vishwanath Mahadeshwar नरेंद्र मोदी Narendra Modi लालकृष्ण अडवाणी Lal Krishna Advani

१. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी लखनऊ येथील दहशतवाद्यांबरोबरील पोलिसांच्या चकमकीवरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. नोटाबंदीची घोषणा करताना पंतप्रधान मोदींनी दहशतवादी संपुष्टात येणार असल्याचे म्हटले होते. परंतु, प्रत्यक्षात असं झालंय का असा सवाल त्यांनी केला आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला पाकिस्तानच्या आयएसआयकडून निधी मिळत असल्याचा आरोप संघाचे कार्यकर्ते आणि पुणे बॉम्बस्फोट प्रकरणाचे आरोपी कर्नल पुरोहित आणि आपटे यांनी मोहन भागवत आणि इंद्रेश यांच्यावर केला होता. याचे उत्तर संघाने द्यावी, अशी मागणीही केली.

दिग्गीराजा, नोटबंदीचा पूर्ण फियास्को झाला आहे, हे कोंबडं आता आरवून आरवूनही थकलं आहे. पण, अतिशय अविश्वसनीय दावे करून, लोकांना नोटबंदीच्या जाचक अनावश्यक उपक्रमात ढकलून, त्यांचे शिव्याशाप घेऊनही मोदींनाच लोक का निवडून देत आहेत, यावर तुम्ही विचार करणं अधिक श्रेयस्कर राहणार नाही का? उत्तर प्रदेशात एकही मुस्लिम उमेदवार न देणारे मोदी आणि आयसिसच्या दहशतवाद्याच्या वडिलांनी त्याचा मृतदेह स्वीकारायलाही नकार दिलेला असताना, कसलीही माहिती न घेता त्याच्या बाजूने शड्डू ठोकून उतरणारे तुमच्या पक्षासारखे पक्ष यांच्यात गुणात्मक फरक काय?

…………………………….…………………………….…………………………….

२. २२७ सदस्य असलेल्या मुंबई महानगर पालिकेमध्ये १७१ इतकी भरघोस मते पडून शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर महापौर झाले. शिवसेनेचे ८४ नगरसेवक असताना त्यांना १७१  सदस्यांनी मतदान केले. भारतीय जनता पक्षाच्या ८२ नगरसेवकांनी त्यांना मत दिले. भाजपचे भगवे फेटे घातलेले नगरसेवक इतके उत्साहात होते की, महाडेश्वर यांचा सत्कार सुरू असताना नगरसेवकांनी ‘मोदी मोदी’ असा जयघोष सुरू केला.

‘मान न मान मै तेरा मेहमान’, या म्हणीचा अर्थ आता शिवसेनेला कळू लागेल. शिवसेनेचा महापौर भाजपच्या 'दिलखुलास' मेहेरबानीवर झाला आहे आणि त्याची वाटचाल ही भाजपच्या अदृश्य वेसणीने निश्चित केली जाणार आहे, हेच मोदींच्या जयघोषातून स्पष्ट झालेलं आहे. आपलं संख्याबळ घटलेलं असताना बलाढ्य 'मित्रा'समोर शक्तिप्रदर्शन करायला जाण्याचा अगोचरपणा शिवसेनेने केला खरा; पण, पुढे काय वाढून ठेवलंय याची चुणूक त्यांना आता मिळाली असेल. त्यातून ते काहीच शिकणार नाहीत, हा भाग अलाहिदा.

…………………………….…………………………….…………………………….

३. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशातील बॅंकांचे राष्ट्रीयीकरण केलं, परंतु त्यांना गरिबांचे दुःख काही कमी करता आलं नाही; गरीब हे गरीबच राहिले. भारतीय जनता पक्षाने गरिबांच्या घरोघर जाऊन बँक खाती काढून गरिबांचं खरोखरचं कल्याण केलं आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

बरोबरच आहे पंतप्रधानांचं. इंदिरा गांधींनी फक्त राष्ट्रीयीकरण केलं, त्याने काय होतं. भाईयो और बहनों, आधार कार्ड कुणी आणलं? मोदींनी आणलं. जनधन खात्यांची कल्पना कुणाची? मोदींची. नोटाबंदीतून गरिबांचा फायदा झाला, असं कुणाला वाटतं? मोदींना वाटतं. सगळी खाती काढली कोणी? मोदींनी. सगळ्या खात्यात १५-१५ लाख रुपये भरले कोणी? मोदींनी. रोजगार नसलेला आणि कॅशलेस व्यवहार करू न शकणारा गरीब वर्गच नामशेष कोण करून दाखवणार? मोदी. गरिबांना हटवल्याशिवाय गरिबी हटणार नाही, हा क्रांतिकारक विचार सुचला कुणाला? मोदींना. बोला, मोदी, मोदी, मोदी.

…………………………….…………………………….…………………………….

४. बाबरी मशीद खटल्याबाबत मला कोणतीही माहिती मिळालेली नाही. फक्त वर्तमानपत्रात कुठेतरी मी याविषयी थोडेसे वाचलं होतं, असं भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि बाबरीपतनाच्या खटल्यातले एक आरोपी लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं आहे.

तुमचं वय आणि सोय लक्षात घेता तुम्हाला बाबरी मशीद आठवते आहे, हेच फार मोठं आश्चर्य आहे. तुम्ही तिला बाबरी मशीद म्हणूनच ओळखता, हे तर त्याहून आश्चर्यजनक आहे. या खटल्यातून तुमची फार सहज सुटका झाली; आता तुम्हाला अडचणीत आणणारी काही वळणं हा खटला घेतो आहे. लवकरच स्मरणशक्तीला ताण द्यावा लागण्याची वेळ येणार आहे, असं काही त्याच वर्तमानपत्रांतल्या राशीभविष्यात लिहिलंय का हे तपासून घेतलंत तर बरं.

…………………………….…………………………….…………………………….

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......