टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • राज ठाकरे, सुप्रिया सुळे, रामदेव बाबा आणि मुकेश अंबानी
  • Thu , 16 February 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या राज ठाकरे Raj Thackeray सुप्रिया सुळे Supriya Sule बाबा रामदेव Baba Ramdev मुकेश अंबानी Mukesh Ambani

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता नोटाबंदीवर बोलणे बंद केले आहे. दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपल्याकडे घेण्यासाठी भाजपवाले पैसे देत आहेत. इतके पैसे कुठून आले त्यांच्याकडे? नोटाबंदीनंतर भाजपकडे निवडणुकांसाठी इतका पैसा कुठून आला, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.  

राजसाहेब, सगळ्याच पक्षांकडे जिथून येतो, तिथूनच भाजपकडेही पैसा येणार ना? नोटाबंदीच्या आधीच्या महिन्यांमध्ये झालेल्या व्यवहारांची खरोखरच पडताळणी झाली तर कळेल गुपित. शिवाय, भाजप सत्तेत आहे- त्यांच्याकडे नव्या नोटांमध्येही हवा तेवढा पैसा येणार, हे काही गुपितही नाही.

………………………………

२. गेल्या दोन वर्षांत महागाई खूप वाढली आहे. या महागाईने सर्वांचे कंबरडे मोडले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन नियम काढणार आहेत. तुमच्याकडे किती सोने आहे याचा हिशोब आता तुम्हाला द्यावा लागणार आहे. महागाईने आता किती लोकांकडे सोने उरले आहे हो? आता या मोदी सरकारचा लोकांच्या घरातल्या सोन्यावर डोळा आहे. : खासदार सुप्रिया सुळे

चला, ताई आता साहेबांच्या तालमीत तयार व्हायला लागल्या म्हणायच्या. पण, त्या बोलतायत, त्यातलं एक वेगळंच तथ्य समजतंय का? नोटाबंदी झाली, तेव्हा महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसला. आताही सरकारचा डोळा आहे तो सर्वसामान्यांच्या घरातल्या सोन्यावर. श्रीमंतांना आणि राजकारण्यांना असल्या नियमांची काही झळ बसत नसते, हेही त्यांनी न सांगताच सांगून टाकलंय.

………………………………

३. या वेळी देशातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मोठी उलथापालथ होणार आहे. निवडणुकीनंतर येणाऱ्या वादळात अनेक मोठे दिग्गज नेस्तनाबूत होणार आहेत, असे विधान रामदेव बाबा यांनी केले होते. ते म्हणाले, २०१४ मध्ये मी एका पक्षाच्या बाजूने होतो. परंतु मी आता निष्पक्ष आहे.

रामदेव बाबांचं हे विधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासह पाच राज्यांमधल्या भाजपच्या दिग्गजांना उद्देशून केलेलं आहे, असं विरोधकांना वाटतंय. केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा यांनी मात्र हे विधान भाजपच्या बाजूने असल्याचा दावा केलाय. योगाच्या माध्यमातून बाबांना येणाऱ्या काळात घडणाऱ्या घटनांची माहिती होते, असंही ते म्हणतात. या विधानांची संदिग्धता आणि कोणालाही आपल्या सोयीने कसलाही अर्थ काढता यावा, असा जो सैलपणा आहे, तो पाहता बाबांना भारताचे नॉस्ट्राडेमस म्हणायला काहीच हरकत नाही.

………………………………

४. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातून अमेरिकेत गेलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांविषयी घेतलेली प्रतिकूल भूमिका भारतातील माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रासाठी संधी ठरू शकते, असे मत रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले.

याला म्हणतात धंदेवाईक माणूस. तिकडे परदेशांत गेलेल्या आयटी कर्मचाऱ्यांचं काही व्हायचं ते होवो, इकडचा धंदा वाढणार याचा यांना आनंद. अमेरिकेतल्याप्रमाणे भारतात कडक कायदे, जाचक नियम आणि अटी नसल्यामुळे कमी पैशांत या कर्मचाऱ्यांना पिळून घेता येईल आणि वाट्टेल ते मार्ग वापरून सगळा उद्योग आपल्या 'मुठ्ठी में' करता येईल, याचा आनंद सर्वाधिक असणार, हे उघड आहे.

………………………………

५. नगर शहराजवळील पांगरमल येथील बनावट दारूच्या मृत्युकांडातील मृतांची संख्या वाढून सहावर गेली आहे. दोघांचा काल, मंगळवारी रात्री रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणाच्या शोधात पोलीस व उत्पादन शुल्क विभागाला जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या आवारातील उपाहारगृहातच बनावट दारूचा कारखाना आढळला. 

या मंडळींनी 'दवादारू' या शब्दाचा अर्थ अगदी शब्दश: घेतलेला दिसतो आहे. सरकारी रुग्णालयांची आणि तिथल्या उपचारांची एकंदर स्थिती पाहता, वेदनाशमनासाठी रुग्णांना दवापेक्षा दारूचाच आधार अधिक वाटेल, याच उदात्त भावनेतून त्यांनी हा कारखाना उघडला असणार.

………………………………

६. उपनगरीय मार्गावरील लोकल गाड्यांमध्ये अपंग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास करणाऱ्या अव्यंग प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने एक फेब्रुवारीपासून मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष लक्ष्य केले जाणार आहे. एक ते १३ फेब्रुवारी या कालावधीत तब्बल ८०० प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी ६० जण सरकारी कर्मचारी आहेत. आता या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये संबंधित विभागांना पत्र पाठवून वरिष्ठांकरवी या कर्मचाऱ्यांना समज देण्याची विनंती करण्यात येणार आहे.

हे साफ चूक आहे. अपंगांना आताच्या सरकारी भाषेत काय म्हणतात? दिव्यांग. बरोबर ना. म्हणजे त्यांच्यात काही दिव्य शक्ती आहे, असा अर्थ घ्यायचा. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये बाय डिफॉल्टच तशी दिव्य शक्ती असते, ते पदसिद्ध दिव्यांग म्हणजे दिव्य शक्तीप्राप्त अंगाने युक्त आहेत. मग त्यांनी या डब्यातून प्रवास केला तर बिघडतं काय?

………………………………

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......