तुकोबा अभंगांतून स्फुरलेल्या चित्र-शिल्पांचे हे पुस्तक उदाहरण म्हणून पाहावे
ग्रंथनामा - झलक
भास्कर हांडे
  • ‘रंगरूप अभंगाचे’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 18 May 2018
  • ग्रंथनामा झलक रंगरूप अभंगाचे भास्कर हांडे तुकोबा

चित्रकार भास्कर हांडे यांनी तुकोबाच्या अभंगांना चित्र-शिल्पाच्या माध्यमातून साकारण्याचा प्रयत्न गेली पंचवीसेक वर्षं सातत्यानं केला आहे. त्याविषयीच्या त्यांच्या ‘रंगरूप अभंगाचे’ या पुस्तकाचे प्रकाशन आज संध्याकाळी पुण्यात होत आहे. त्यानिमित्तानं त्यांनी या पुस्तकाला लिहिलेलं मनोगत...

.............................................................................................................................................

तुकाराम महाराजांच्या अभंगांतून स्फुरलेल्या चित्र-शिल्प प्रकल्पातील चित्रांविषयी काही टिपणी लिहून ठेवावी, अशी इच्छा अनेक रसिकप्रेक्षकांनी गतकाळात प्रदर्शित केली. चित्र आणि शिल्प साकार करताना तुकोबांचे अभंग हे शब्दश: चित्रात रूपांतरित केलेले काही चित्रांमध्ये दिसतात. त्या चित्रांची संकल्पना अभंगातील एका कडव्यामधून आलेली म्हणजे भावलेली असते. चित्र साकारण्याची प्रक्रिया २५ वर्षांपूर्वी घडलेली आहे. त्या काळात माझ्या अभिव्यक्तीची स्पंदने अन् आता मी लिहीत असलेली त्या संवेदनांची विश्लेषणे व विवेचन खरे तर तंतोतंत जमायला हवे. तोच प्रयत्न मी या प्रस्तुत अभंगांतून स्फुरलेल्या चित्रांच्या लेखनातून करणार आहे. मागील २५ वर्षांत अभंगांतून स्फुरलेल्या चित्र-शिल्पांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने वारंवार चर्चा करण्याची पद्धत कशी असू शकते, याचे ‘रंगरूप अभंगाचे’ हे पुस्तक उदाहरण म्हणून पाहावे, ही रसिक वाचकांना विनंती.

तुकोबांचे काव्य व त्यावरून स्फुरलेल्या चित्र-शिल्पांचे विश्लेषण व विवेचन, तसेच तुकोबांच्या अभंगातील आशयाचा परामर्ष घेणे, हे दुहेरी पैलू ‘रंगरूप अभंगाचे’ या पुस्तकात आले आहे. आधुनिक चित्रकलेत हे आव्हानात्मक आहे, हे चित्र-शिल्प तयार करताना जाणवत होते. समकालीन आधुनिक कलाविश्वात काम करताना त्याची जाणीव होती.

तुकोबांच्या गाथेतील चित्र-शिल्प संकल्पनेची सुरुवात फारच उत्साही वातावरणात झाली. माझा उमेदीचा काळ. त्यात मला कविता लिहिण्याची फार ओढ. मी भाषेत रमत जायचो, त्यामुळे अनेक भाषांत मला बोलणे शक्य झाले. मात्र, मी व्यक्त होताना मराठी मायबोली नकळत जिभेवर प्रकट व्हायची. हिंदीचे एके काळी आकर्षण होते; परंतु परदेशात इंग्रजीने जास्त व्यापले आणि ज्या देशात राहतो तेथील भाषा ‘डच’ हिचाही तेवढाच हक्क. ती भाषा बोलणे, समजणे, लिहिणे यांतून मित्रांसोबत संवाद व आपल्या भाषेची महती सांगताना तुकोबांची गाथा, ज्ञानेश्वरी, नामदेवांची अभंगवाणी यांची चर्चा सहज होत असे. त्यामुळेच तुकोबांचे अभंग डच भाषेत भाषांतरित होण्यास मित्रांनी पुढाकार घेतला. अॅकॅडमिक पद्धतीने काहींनी कार्य पुढे नेले, तर लवचीक पद्धतीने ही भाषांतरे झाली. मी माझ्या पद्धतीने तुकोबांच्या गाथेभोवती सतत व्यग्र राहिलो.

पोलंड या देशातील मित्रांनी तुकोबांचे अभंग ‘पोलीश’ भाषेत भाषांतरित केले आहेत. मात्र ते अभंग अद्याप प्रकाशित झाले नाहीत. डच भाषेतील अभंग ‘तुकाराम डॉट कॉम’ या संकेतस्थळावर आहेत. तुकोबांच्या अभंगांची चित्रांत रूपांतरे करताना माझ्या डोळ्यांसमोर संपूर्ण मावळप्रांत उभा होता. तुकोबांनी शब्दांमधून सर्व पद्धतींनी वर्णने करून ठेवली आहेत. शेती, व्यापार, मनुष्यस्वभावातील बारकावे, वैश्विक जाणीव, वन्यजीवन, निसर्ग या सर्वांची मांडणी अभंगांत होताना शब्दांची पारख व मांडणी इतकी अचूक की, ते ओलांडण्याचे धाडस अद्याप कोणत्याही अभिव्यक्तीमध्ये नाही. तुकोबा नामदेवांची विठ्ठलासोबत येऊन शिल्लक राहिलेली सेवा पूर्ण करण्याची आज्ञा शिरसावंद्य मानून पुढे अभंगरचना करत राहिले. त्यामुळेच असे म्हणावेसे वाटते की, निसर्गाने पश्चिम घाटावर एक वेगळी बैठक मारली आहे व त्या बैठकीच्या अवतीभवती आपल्याला गवसणी घालणारे शब्दही पेरून ठेवले आहेत. पंचमहाभूतांच्या सान्निध्यात ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम हे निसर्गनियम व मानवता यांची सांगड घालून मानवाचे जीवन सोपे करून गेले. अभंगचित्र साकारताना या विचारांनी सतत आठवण करून दिली.

भामगिरी पर्वतावरून देहू या इंद्रायणीकाठी वसलेल्या गावाचे दृश्य हिवाळ्यात किती मनोहर, रम्य दिसते. भंडारा डोंगराकडे उन्हाळ्यात पाहिल्यावर सूर्यास्ताचे दर्शनही असेच मनोरम्य होत असते. हा रम्यपणाचा त्रिकोण आहे. देहू इंद्रायणीकाठी पश्चिमेला, भंडारा डोंगर किंचित मध्य उंचीवर तर उत्तरेला भामगिरी डोंगर परिसरातील सर्वांत उंच भाग. ज्या परिसरातून नदी वाहते, तो सखल भाग असतो. भामगिरी डोंगरासारखे उंच डोंगर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये बरेच आहेत. तुकोबा त्यांच्या काळात अशाच मार्गाने उत्तरेला बाबाजी चैतन्य यांच्या मठात जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे जायचे. तसेच कागदाच्या खरेदीसाठी जुन्नर या ठिकाणी आल्याची नोंद सापडते. देहू ते जुन्नर मार्गे ओतूर हा माग सह्याद्रीच्या पूर्वेकडील उत्तरणीच्या भागातून जातो. साधारण १०० किलोमीटर अंतर आहे. आळंदी ते त्र्यंबकेश्वर हा मार्ग याच मार्गाचा एक भाग आहे. भामगिरीच्या उत्तरेला भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक रमणीय ठिकाण आहे. तसेच पुढे उत्तरेकडे घोडेगाव हे जुने गाव आहे, तर अतिप्राचीन शहरांपैकी ‘जुने नेर’ म्हणून जुन्नर हे प्राचीन शहर आजही सह्याद्रीच्या कुशीत आपली ओळख ठेवून आहे. तोच मार्ग उत्तरेकडे हरिश्चंद्रगडावरून त्र्यंबकेश्वर व ब्रह्मगिरीला जातो, जिथे गोदावरी नदीचा उगम झाला आहे.

जुन्नर ते हरिश्चंद्रगड या दोन्हींच्या मध्यावर बाबाजी चैतन्य यांचा मठ आहे. याच मठात तुकोबा बाबाजी चैतन्य यांच्या भेटीसाठी गेले होते. तुकोबांचे वास्तव्य ज्या ठिकाणी होते, तिथे तुकोबांचे एक छोटेखानी मंदिर बांधले आहे. या खाणाखुणा मी प्रत्यक्ष पाहिल्यामुळे चित्रात जे चैतन्य आले आहे, त्याचे ते प्रमाण आहे. अशा दंडकारण्यातील ठिकाणांची निसर्गसंपदा किती उच्च कोटीची आहे, हे सह्याद्रीच्या कडेकपारी, भरघोष वन व वनचरे पाहिल्यावर लक्षात येते. त्यासोबत तुकोबांचा हा निसर्गभ्रमणाचा अनुभव ते अभंगात सामावतात. चित्र तयार करताना माझा भामगिरीचा अनुभव आणि त्या सर्व परिसराचा प्रभाव मी चित्रात रंगवला आहे. पक्ष्याच्या डोळ्याने कसे पाहावे हे दृश्य मला भामगिरी डोंगरावरून देहूकडे पाहताना उमगले. तेच दृश्य चितारले आहे, असेच वाटत राहते.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4422

.............................................................................................................................................

माझ्या डोळ्यांपुढे लहानपणीची पंढरपूर-वारीला जाणार्‍या लोकांची दृश्यं डोळ्यांसमोर आली. ही चित्रं मी हजारो मैल दूर बसून रेखाटली आहेत. १९९० मध्ये मी भारतात मुंबईत प्रदर्शन करून हॉलंडला परतलो होतो. माझ्याच १० वर्षांच्या कवितांचे ‘दशक’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्या कवितासंग्रहात ‘अस्तित्व’ ही १९८५ साली लिहिलेली कविता व त्यावरील विठोबाचे चित्र रेखाटले होते, कारण त्या कवितेत नकळत विठोबाचा संदर्भ आला होता.

बावरलेल्या परिस्थितीच्या कानात कळवळलो

बघ तुझ्या चटक्याने पोळून

मी काळा विठोबा झालो

देह चंद्रभागेत बुडवून आलो

सर्व इच्छा संपविल्या आहेत

म्हणते कशी

बस या विटेवर

ठेवून हात कटेवर

भोग या जागी

आरतीच्या या आगी

त्या संदर्भाच्या अनुषंगाने तुकोबांच्या गाथेतील अभंग झरझर/झटपट डोळ्यांपुढे सरकू लागले. यात दिलीप चित्रे यांचे ‘पुन्हा तुकाराम’ आणि ‘Says Tuka’ (इंग्लिश भाषांतर) व अरुण कोलटकर यांनी इंग्लिशमध्ये केलेले काही अभंग यांचे वाचन झाले होते. अभंगांचे वेगळे रूप मला जाणवले. त्याचे चित्र व शिल्प-रूप माझ्या दृक्पटलासमोर फेर धरू लागले होते. माझा चित्रकलेतील प्रवास मार्गी लागला होता.

‘तुझे रूप माझे देणे’ हे शीर्षक नामदेवांच्या अभंगावरून आले आहे. ‘तुझे रूप माझे नयनी’ असा तो शब्दप्रपंच आहे. विठोबाचे रूप नेहमी नयनी ठेवणार्‍या नामयाची वाणी मला भावली आणि प्रकल्पाचे शीर्षक ‘तुझे रूप माझे देणे’ असे ठरले.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......